सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ काजळी मनावरची…. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
उदासीनतेची काजळी,
अलगद धरते मनावर !
सारे कसे धुरकट धूसर,
दिसू लागे अंत:पटलावर!
एक काजळी दाट थर,
साठत जातो मना वरी !
विचारांची जळमटं ,
लोंबकळत रहाती त्यावरी!
प्रेमजलाने स्वच्छ धुवावे,
वाटे परी माझ्या मनाला !
निर्लेप पणाच्या वस्त्राने ,
पुसू या हलकेच त्याला !
अलगद निघून जाईल,
ते काजळीचे पटल !
स्वच्छ मनातच होईल,
नव विचारांची उकल !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈