कवितेचा उत्सव
☆ आणीबाणी… ☆ अनिल (आ.रा.देशपांडे) ☆
अशा काही रात्री गेल्या, ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या,होते तसे उरलो नसतो.
वादळ असे भरून आले,तारू भडकणार होते
लाटा अशा घेरत गेल्या,काही सावरणार नव्हते.
हरपून जावे भलतीकडेच,इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो,इतके पेटून आले होते रान.
डाव असे पडत होते की,सारा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते,जीव पुरा विटून जावा.
कसे निभावून गेलो,कळत नाही,कळत नव्हते
तसे काही जवळ नव्हते,–नुसते हाती हात होते.
– अनिल (आ.रा.देशपांडे)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈