मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

☆ काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

Best Bhojpuri Video Song - Residence w

रसग्रहण:

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही अतिशय तरल,सुंदर अशी विराणी आहे. नाच-गाणे करणाऱ्या एका कोठीवालीच्या आयुष्यात घडणाऱ्या विफल प्रीतीची ही कहाणी आहे. बैठक संपली. रसिकांना विन्मुख होऊन ती दार बंद करून आली. आता पुन्हा ती अतिशय तन्मयतेने विडा लावते आहे. गाणे गुणगुणते आहे. मनासारखा विडा लावला आणि ती आर्त स्वरात गाऊ लागली. डोळे पाण्याने भरले आणि या स्वरओल्या जोगियाने वेड्या प्रीतीची कहाणी सांगितली.

“मी देह विकून त्याचे मोल घेणारी.  इथे सगळ्या भांगेच्याच बागा.  असाच एक दिवस एक सावळासा तरुण जणू वनमालीच आला आणि या भांगेत तुळस पेरून गेला. मी त्याला नावही विचारले नाही. हळूच दबकत इथल्या सगळ्या व्यवहाराच्या विपरीत असे नवखेपणाने बोलला, “राणी, माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.”

इथे सगळा नीतीचा उघड सौदा आणि हा खुळा इष्कालाच प्रीती समजतो. हसून त्याला म्हटले,’ थोडा दाम वाढवा ‘ आणि पान पुढे केले. तोवर तो निघून पण गेला. खरे प्रेम फक्त पैशातच नसते. पैशाने ते मोजताही येत नाही हे मला त्यावेळी कळले.

माझा हात तसाच थबकून राहिला. मी त्याची प्रीत जाणलीच नाही. आता माझे मन सतत त्याला हुडकते आहे. पण तो आता कशाला येईल इथे ?

तो हाच दिवस,हीच तिथी आणि अशीच ही रात्र होती. मी थकून बसले होते आणि एखादा तारा तुटावा तसा तो मागं वळूनही न पाहता अंधारात निघून गेला.

आजच्या दिवशी त्याच्यासाठी विडा लावून, त्याचे ध्यान करते. त्याच्यासाठी व्रतस्थ राहते. असा वर्षातून एकदा ‘जोगिया’ रंगतो. असा हा खुळ्या प्रीतीचा खुळा सन्मान. ”

ही कहाणी कविवर्य.  माडगूळकरांनी सरळ,ओघवत्या, तरल शब्दरचनेने मांडली आहे.   ‘जोगिया’ ही अत्यंत आर्त स्वरांची रागिणी. ऐकणाऱ्याच्या हृदयाची तार छेडते. हा राग आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची आर्तता व्यक्त करतो. या कोठीवालीला सच्ची प्रीत कधी ठाऊकच नसते. तिचा असतो सगळा देण्या-घेण्याचा रोकडा व्यवहार. भांगेतही तुळस उगवते हे तिच्या गावीही नसते. त्यामुळे त्या प्रीतवेड्या तरुणाची प्रीत जेव्हा तिला समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ती अतिशय कासावीस होते.

आता तो येऊन गेलेल्या तिथीला त्याची आठवण म्हणून प्रीतीचा विडा तयार करून त्याच्यासाठी तयार होणे एवढेच तिच्या हाती उरते. जोगियाचे आर्त सूर त्याला साद घालतात. तीच आर्तता आता तिच्या जीवनात उरलेली असते. त्यांच्या असफल प्रेमाची ही आर्तता आपल्यालासुद्धा बेचैन करते. खऱ्या प्रीतीला नाव,गाव,जात-पात, पेशा, व्यवसाय यांच्याशी काही देणेघेणे नसते. ती असते दोन मनांना छेडणारी तार. कधी सुरेल बनते तर कधी आर्त बनून ‘जोगीया’ गाते.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈