श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘प्रेमळ आदेश…’ – भाग- १ –  मूळ हिन्दी लेखक – अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

रात्रीचे साधारण ८ वाजले होते. ऑफिसमधून परत आल्यानंतर मी जेवण बनवत होते आणि राकेश अजूनही त्याच्या लॅपटॉपवर ऑफिसच्या कामात व्यस्त होता. तेवढ्यात फोन वाजला. हा कोणाचा फोन आहे याची उत्सुकता मला किचनमधून खेचत होती. फोनवर बोलताना राकेशला खूप अस्वस्थ होताना मी पाहिलं.

‘कृपया, त्यांना दवाखान्यात घेऊन जा. मी ताबडतोब निघतो आहे, तरी मला पोहोचायला २-३ तास लागतील, ‘ असं म्हणत त्यांनी फोन ठेवला. मी काही विचारण्याआधीच त्यांनी घाईघाईने मला सगळा प्रकार सांगितला आणि त्यांचे काही कपडे आणि महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवायला सुरुवात केली.

मथुरा येथे राहणारी राकेशची काकू अचानक खूप आजारी पडली होती. त्यांची अवस्था पाहून शेजाऱ्याने आम्हाला फोन केला. आमच्याशिवाय या जगात काकूंचं कोण आहे? त्यांना स्वतःचे मूलबाळ नाही आणि काही वर्षांपूर्वी काकांचे निधन झाले आहे.

आमच्या लग्नात काकूने माझ्या सासूबाईंचे सर्व विधी पार पाडले. राकेशच्या आई-वडिलांचा फार पूर्वी कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी राकेशची बहीण गरिमा शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होती, मात्र राकेश शाळेत शिकत होता, जो त्याच्या बहिणीपेक्षा 8 वर्षांनी लहान आहे. त्यानंतर काका-काकूंनी बहिणीचे लग्न लावून दिले आणि पुढील शिक्षणासाठी राकेशला शाळेनंतर वसतिगृहात पाठवले. राकेशने मला या दोन वर्षात अनेक वेळा सांगितले आहे की माझ्या काका आणि काकूंनी दीदी आणि माझ्यावर त्यांच्या मुलांसारखे प्रेम केले आहे.

पूर्वी संपूर्ण कुटुंब एकत्र राहायचे पण राकेश चौथीत शिकत असताना त्याच्या काकांची मथुरेला बदली झाली. यानंतर त्यांची इतर अनेक शहरांमध्ये बदली झाली पण त्यांनी मथुरेत घर बनवले होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर आत्या मथुरेत आल्या. नाही तर त्या कुठे गेल्या असत्या?

मला काकूंबद्दल फारशी माहिती नव्हती. आमच्या लग्नाच्या वेळी त्या आमच्याकडे फक्त ५-६ दिवस राहिल्या होत्या. खरे तर आम्हा दोघांना लग्नानंतर बँकॉक ला जायचे होते, म्हणून त्या मथुरेला परतल्या. मी काय काय विचार करू लागले होते. राकेशच्या आवाजाने मला पुन्हा वर्तमानात आणले. ते म्हणत होते, बघ मी घाईत काही ठेवायला विसरलो तर नाही ना?

बॅग भरून झाल्यावर राकेश काकूला एकटं कसं सांभाळतील असा विचार करत मी पण सोबत येण्याबद्दल विचारले तर ते म्हणाले की आधी जाऊन परिस्थिती बघायला हवी, गरज पडली तर तुला फोन करेन. त्यानंतर ते मथुरेला रवाना झाले.

लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की मी रात्री घरी एकटी होते. एक विचित्र भीती आणि अस्वस्थता मला झोपू देत नव्हती. रात्री दोनच्या सुमारास मी राकेशशी बोलले. काकू बेशुद्ध असल्याचे कळले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जात होत्या, आत्ताच काही सांगता येणार नाही असे डॉक्टर म्हणाले होते. राकेश खूप काळजीत दिसत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता राकेशने फोन केला की काकूंच्या उपचार आणि डॉक्टरांवर ते समाधानी नाहीत. काकूंसोबत ते दिल्लीला येत आहेत. दिल्लीतील रुग्णालयाशी चर्चा सुरू आहे.

संध्याकाळपर्यंत ते काकूंना सोबत घेऊन दिल्लीला पोहोचले. काकू बेशुद्ध अवस्थेत खूप अशक्त दिसत होत्या. रंगही पिवळा पडला होता. ते दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मी तिथे पोहोचले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.

काकूंना ५ दिवसांनी दवाखान्यातून घरी सोडण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी औषधोपचारासह विश्रांती घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. आम्ही त्यांना घरी आणले. हा आजार काही विशेष नव्हता. वाढते वय, एकटेपणा, चिंता, कामाचा थकवा, वेळेवर नीट न खाणे ही या आजाराची कारणे होती.

आम्हा दोघांना आणखी सुटी घेणे शक्य नव्हते. आम्ही त्यांच्यासाठी नोकर किंवा नर्सची शोधले पण मिळाले नाही, म्हणून आम्ही घरी काम करणाऱ्या मोलकरणीला दिवसातून २-३ फेऱ्या मारून त्यांना दूध, चहा, नाश्ता वगैरे देण्यास सांगितले आणि ऑफिसला जाऊ लागलो. पण हो, आम्ही दिवसातून अनेक वेळा काकूंशी फोनवर बोलायचो. त्यांची चौकशी करीत असू. काही अडचण तर नाही ना? विचारत राहिलो.

राकेश बद्दल माहित नाही, पण माझा त्रास जरा वाढला होता. जे घर आत्तापर्यंत फक्त आमचं होतं ते अचानक माझ्या सासरच्या घरासारखं वाटू लागलं. आता उठणे, बसणे आणि कपडे घालणे यात काही बंधने जाणवू लागली. आंटी याविषयी कधीच काही बोलल्या नसल्या तरी घरात त्यांची उपस्थिती माझ्यासाठी पुरेशी होती.

पण मी हे सर्व पूर्ण उत्साहाने करत होते, कारण काकू अपेक्षेपेक्षा लवकर बऱ्या होत होत्या. अवघ्या एका आठवड्यानंतर त्यांना मोलकरणीची गरज उरली नाही. त्या स्वतः उठून त्यांची छोटी-मोठी कामे करू लागल्या. त्या लवकरच बऱ्या होऊन मथुरेला परततील याचा मला आनंद झाला. आणखी काही दिवसांची तर गोष्ट होती.

एक दिवस राकेश म्हणाला कि ‘आता आपण काकूंना परत जाऊ द्यायचं नाही. त्या आता आपल्या सोबतच राहणार आहेत. आता या वयात त्यांना एकटे राहणे कठीण होणार आहे. पुन्हा आजारी पडल्या तर? मग त्यांच्याप्रती आपलेही काही कर्तव्य आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले आहे. ‘ राकेश काही चुकीचं बोलले नव्हते पण माझं मन अस्वस्थ झालं.

मला आठवतं, जेव्हा राकेशचं स्थळ माझ्यासाठी आलं तेव्हा माझ्या आई-वडिलांनी माझं मत विचारलं. राकेश कसा दिसतो? किती शिक्षित आहेत? ते किती कमावतात? मला हे सर्व जाणून घेण्याची गरज वाटली नाही कारण मला वाटले की माझ्या आई-वडिलांनी आणि काकांनी हे स्थळ पाहिले आहे तर सर्व काही ठीकच असणार. ते माझ्यासाठी चांगलेच अ तील. मला त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे होते. विचारले असता माझे सासरी मुलाला आई वडील नसल्याचे कळले. एकच मोठी बहीण आहे, तिचेही लग्न झाले आहे. एवढेच जाणून घेणे माझ्यासाठी पुरेसे होते कारण माझ्या मनात सासूची प्रतिमा अशी होती की सून नेहमीच दबावाखाली असते. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या माझी मैत्रिण जया हिच्याशी मी जेव्हा कधी बोलायचे तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा तिच्या सासूबद्दलच जास्त बोलायची. ती नेहमी काळजीतच असायची.

शिवाय, माझी बहीण जेव्हा कधी तिच्या माहेरी आई-वडिलांच्या घरी यायची तेव्हा ती बरेच दिवस परत जातच नाही. आई नेहमी तीला समजावून परत पाठवायची. तिच्या पती किंवा दिराविषयी नव्हे तर सासूंविषयी अनेक तक्रारी होत्या.

पण राकेशची काकू आता आमच्या घरीच राहणार होती. सासू-सासऱ्यांचे एकवेळ ठीक आहे, पण काकूचे बोलणे, टोमणे, टोमणे कुणी व का ऐकावे? असा विचार करणं खूप चुकीचं असलं तरी हा स्वार्थी विचार होता, आणि त्याचा मला खूप त्रास होऊ लागला होता.

एके दिवशी संध्याकाळी मी ऑफिस वरून घरी पोहोचले तेव्हा मी पाहिले की काकूने वाशींगमशीन लावली होती आणि घरातील सर्व मळालेले कपडे जमा करून धुतले होते. मी फक्त रविवारी मशीन वापरते आणि आठवड्याभराचे कपडे धुते. नुकतेच काकूंच्या आजारपणामुळे हे काम राहिले होते. इतके कपडे एकदम धुतलेले पाहून मला आश्चर्य वाटले, “हे काय काकू, तुम्ही एवढं काम का केले? आता तुम्ही आराम करा. ”

“सीमा, मी दिवसभर आरामच तर करते, मग आजकाल मशीनमध्ये कपडे धुणे हे काय काम आहे का? ” असे बोलून काकू हसल्या.

आता जेवणाच्या वेळी गप्पांचा ओघ सुरू झाला. काकू राकेशच्या लहानपणीच्या सवयी आणि खोडकरपणाविषयी सांगायच्या. माझ्या सासरच्या घराबाबतही त्यांनी मला अशा अनेक गोष्टी सांगितल्या, ज्या मला सांगायला कुणीच नव्हतं. मलाही राकेशचा चिडचिडा स्वभाव आणि आवडी-निवडी माहीत होतं होत्या. आता मला त्यांना चिडवायला आणि छेडायला खूपच मजा येत होती. अशा स्थितीत काकूंनीही हसत हसत मला पूर्ण साथ दिली.

— क्रमशः भाग पहिला 

मूळ हिंदी कथालेखक : अनामिक

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments