मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रवास – भाग 1 ☆ सौ. आरती अरविंद लिमये

सौ. आरती अरविंद लिमये

ई-आभिव्यक्तीवर  आपले स्वागत.

अल्प परिचय 

शिक्षण – एम ए , बी एड

सम्प्रत्ति – रा .स. कन्या शाळेत 28 वर्षे कार्यरत. 2013 जून मध्ये मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त . लेखन वाचन आणि प्रवास यात विशेष रुची .

? जीवनरंग ?

☆ प्रवास – भाग 1 ☆ सौ. आरती अरविंद लिमये ☆ 

“मेआय कम इन सर ? “

मंदारने अदबीने विचारले.त्याचा  आजचा हा इंटरव्ह्यू ही कंपनीचीही गरज होतीच.आणि तो मंदारसाठीही अतिशय महत्त्वाचा होता.

“येस.हॅव अ सीट”

“थँक्यू सर”

“तर तुम्ही मंदार बर्वे.” त्याच्या फोटोखालील नाव बघून एक सदस्य म्हणाले.

“हो सर”

“तुम्हाला पर्यटन-व्यवसाय आणि त्यातील व्यवस्थापकाची नेमकी जबाबदारी याबद्दल काही माहिती आहे?”

” हो सर. निरनिराळ्या टूरिस्ट कंपन्यांबरोबर मी माझ्या आई-बाबांसह लहानपणापासून खूप प्रवास केलाय. माझा जवळजवळ सगळा भारत फिरून झालाय.मला समजायला लागलं तेव्हापासून त्या प्रवासात संबंधित व्यवस्थापकांशी बोलताना मी त्यांच्या कामाचं स्वरुप आणि जबाबदाऱ्या गप्पांच्या ओघात जाणून घेत असे.प्रवास हे माझं पॅशन आहे सर. त्यामुळेही असेल,मला या फिल्डबद्दल खूप कुतूहल असायचं “

” गुड. मग आजवर तुम्ही नेमकं काय जाणून घेतलंय सांगू शकाल?”

“कोणत्याही टूरचं प्राथमिक नियोजन कंपनीच्या ऑफिसमधेच होत असलं तरी प्रवास सुरू झाल्यावर सर्वांच्या ओळखी करून घेणे, रोजचा दिनक्रम त्यांना सविस्तर सांगणे, स्थलदर्शनासाठी कधी स्थानिक गाईडची व्यवस्था होऊ शकली नाही, तर प्रवासी ग्राहकांचं समाधान होईल इतपत माहिती स्वत: टूर नियोजनाचा एक भाग म्हणून आपण समजून घेतलेली असणे, आणि ती त्यांना सोप्या भाषेत सांगणे,होटेल-रूम्स आणि आहार यातील त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे आणि एकूणच आपल्या कंपनीबद्दल त्यांच्या मनातील विश्वास आणि आपुलकी दृढ करणे ही सर्व जबाबदारी टूर मॅनेजरचीच असते.शिवाय बरोबरचा स्टाफही त्याला सांभाळावा लागतो ” मंदारच्या बोलण्यातला आत्मविश्वास सर्व सदस्यांना जाणवलाय आणि त्यांनी एकमेकांकडे पाहून समाधानाने मान डोलावलीय हे मंदारच्या लक्षात आलं.पण कंपनीचे मालक नानूभाई मात्र कांहीसे साशंक वाटले.मंदारकडे पहात,अंदाज घेत ते म्हणाले,

” हे सगळं महत्त्वाचं आहेच. पण आर्थिक बाबींबद्दलची महत्त्वाची जबाबदारीही व्यवस्थापकाचीच असते याची कल्पना आहे ?”

” हो सर.पण त्याचा मला अनुभव नाहीय.तरीही ते मी शिकून घेईन. सर, मला मनापासून आवडतं हे क्षेत्र. आपल्या मार्गदर्शनाखाली मी उत्तम तयार होईन अशी खात्री आहे माझी.”

” बरं..पण..तुझ्या पगाराच्या काय अपेक्षा आहेत?” नानूभाईंचा अनपेक्षित प्रश्न.

” आधीच्या कंपनीत मला 20000/-मिळत होते.सुरुवातीला निदान तेवढे तरी मिळावेत सर.”

” ती कंपनी बंद पडली तरी त्यांनी तुला एक्सपिरिअन्स सर्टिफिकेट मात्र छान दिलंय.सोs डोण्ट वरी.आमच्या ‘ मनमुराद पर्यटन कंपनी’ मधे सुरुवातच २५०००/- ने होते.सो इट्स बियाॅंड युवर एक्सपेक्टेशन्स. कधीपासून जाॅईन होशील?”

“सर,अॅज यू से.अगदी आजपासूनही ” मंदारला त्याचा आनंद लपवता आला नाही.

“ओके देन.उद्या शार्प दहाला  ये.कांही दिवस आॅफीसवर्क.मग थेट टूर मॅनेजरशीप”

मंदारसाठी हा एक सुखद धक्काच होता. सर्वांना धन्यवाद देऊन तो बाहेर पडला ते आनंदाची एक लहर सोबत घेऊनच.

आधीच्या कंपनीत त्याला व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळण्याआधीच ती कंपनी बंद पडली होती. आता या प्रख्यात कंपनीत मिळालेल्या संधीचं सोनं करायचंच असं मंदारने मनोमन ठरवूनच टाकलं. दोन महिन्यातच त्याने सगळी हिशोबा-हिशोबी शिकून घेतली. सुरुवातीला रत्नागिरी,नंतर महाबळेश्वर, गोवा अशा एक-दोन मुक्कामाच्या छोट्या टूर्स व्यवस्थित पारही पडल्या. त्याला टूरिस्टसकडून कौतुक आणि नानूभाईंकडून उत्तेजनही छान मिळालं होतं. अष्टविनायकची तीन दिवसांची टूर करून तो परतला तेव्हा मात्र त्याला ऑफिसमधलं वातावरण थोडं गढूळ, कांहीसं तणावपूर्ण वाटलं.थोडी चौकशी केली तेव्हा  एवढंच कळलं की सिनियर मॅनेजर देवधरनी जाॅब रिझाईन केला होता त्यामागचं नेमकं कारण समजलं नाही तरी एक मात्र सर्वांनाच समजलं होतं की अलिकडे नानूभाईंच्या मुलाची ऑफिसमधली लुडबूड वाढलेली आहे हे देवधरना आवडलेलं नव्हतं. मंदारच्या छोट्या टूर्स सुरु होत्याच त्यामुळे याची त्याला आधी कल्पना आली नव्हती एवढंच.आणखी एक बातमी समजली ती म्हणजे देवधर यांच्या नंतर अलिकडे नुकतीच आणखी दोन टूरमॅनेजर्सनीही  ‘मनमुराद’ सोडलीय. ऑफिसमध्ये त्यामुळेच थोडी अस्वस्थता होती. अशातच नानूभाईंनी मंदारला बोलावलं. कांहीसं दडपण घेऊनच तो त्यांच्या केबिनकडे वळला.त्याला  पहाताच मनातली चिंताग्रस्तता चेहऱ्यावर दिसू न देण्याचा प्रयत्न करीत त्यांनी मंदारचं हसून स्वागत  केलं.

“ये मंदार. हे बघ, येत्या १४ एप्रिलची काश्मीर टूर तू करतोयस.”

मंदारचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसेना.या अनपेक्षित सुखद धक्क्याने आत येताना मनात असणारं दडपण नाहीसच झालं एकदम.अविश्वासाने तो पहातच राहिला.

” सर.., हे असं अचानक..”

“तयारी आहे ना तुझी..?”

“हो सर..नक्कीच.पण “

“तुला सगळं सविस्तर समजावतो.बैस”

त्याला मनातून खरं तर आनंद झाला होता.अतिशय दुर्मिळ संधी अशी ध्यानीमनी नसताना समोर आली होती. ‘जुना मॅनेजर असा अचानक सोडून गेला याचा आनंद होतोय का आपल्याला..? ‘..या विचारानेच त्याला अपराधी वाटलं क्षणभर. पहिलीच टूर न् तीही काश्मीरची. ही सुसंधी होतीच न् आव्हानही.  पण जमेल आपल्याला..?

“या पहिल्या टूरला मी असेन तुझ्याबरोबर..” जणू त्याच्या मनातली साशंकता समजल्यासारखं नानूभाई म्हणाले.

ही काश्मीर टूर हा मंदारसाठी अतिशय मोलाचा अनुभव होता.एकतर नानूभाई स्वतः त्याच्याबरोबर होते आणि लॉंग टूर मधील बऱ्याच खाचाखोचा त्यानी वेळोवेळी त्याला समजावून सांगितल्याही . टूर एकट्याने हँडल करायचा आत्मविश्वास त्याला दिला. एप्रिल-मे सीझनमधल्या नंतरच्या दोन टूर्स त्याने एकट्याने समाधानकारक पूर्ण केल्या. टूरिस्टस् कडून मिळालेलं फिडबॅकही उत्साहवर्धक होतं. मे अखेरच्या टूरची तयारी करताना नानूभाई त्याला म्हणाले,

“आता ही या सीजनमधील शेवटची टूर .२४ पॅसेंजर्स आहेत. नेहमीप्रमाणे उत्तम काम करायचं”

त्यांना नमस्कार करून तो अकाउंट सेक्शनला गेला तर नेहमीपेक्षा निम्मी रक्कम त्याच्या हातात पडली.तो चमकलाच.

” अहो, काळेसाहेब हे काय?”

“सध्या एवढेच”

“कमालच आहे. थट्टा करताय की काय?”

“अरे नाही बाबा.धाकट्या साहेबांच्या सूचना आहेत. व्यवसायात अशा अडचणी येतात अरे. आपण त्या कशा फेस करतो हे महत्त्वाचं.सध्या हे एवढे घेऊन जा. टूर सुरू कर. चारएक दिवसात तुला उर्वरित रक्कम पोहोचेल.”

“नाही.असं नको काळे साहेब. मला फार अनसेफ  वाटतंय.”

” अनसेफ ? व्हाॅट फाॅर?”  नानुभाईंचे चिरंजीव

अचानक समोर येऊन उभे होते न् त्रासिकपणे त्यालाच विचारत होते..

“व्हाॅट फाॅर..?” मंदारकडे रोखून पहात त्यांनी पुन्हा विचारलं.काय बोलावं त्याला सुचेचना.

” हे बघ ते म्हणतात त्यावर विश्वास ठेव “

“प्रश्न विश्वासाचा नाहीये. प्रवासात काही कमीजास्त झालं तर हाताशी पैसे असावेत म्हणून मी म्हणत होतो.”

” काही कमी-जास्त होत नाही.रेल्वे,फ्लाईट,हॉटेलस् सगळी बुकिंग आधीच झालीयत.प्रश्न फक्त दैनंदिन खर्चाचा आहे.पूर्ण खर्चाचे सगळे पैसे एकरकमी कशासाठी हवेत? आता तेवढीच रक्कम मिळेल.बाकी वेळोवेळी पाठवले जातील.आता यावर वाद नकोय” टकटक  बूट वाजवीत नानूभाईंचे चिरंजीव  निघून  गेले.काय करावं त्याला समजेचना.आता यावर नानूभाई हा एकच दिलासा होता….पण ?

क्रमश:….

©️ सौ. आरती अरविंद लिमये

सांगली

मोबाईल 8698906463

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈