मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “दोन ज्योती” – – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ दोन ज्योती  – श्रीमती अनुराधा फाटक ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

पुस्तकाचे नाव – दोन ज्योती  

लेखिका – श्रीमती अनुराधा फाटक

प्रकाशन -श्री नवदुर्गा प्रकाशन

 

दोन ज्योती (पुस्तक परिचय)

‘दोन ज्योती’ हा अनुराधा फाटक यांचा अलीकडेच प्रकाशित झालेला कथासंग्रह. त्यांचा हा 13 वा कथासंग्रह. राज्य पुरस्कारासकट ( भारतीय रेल्वेची कहाणी – भौगोलिक ) त्यांच्या विविध पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत. वास्तव आणि कल्पनारंजन यांच्या दुहेरी विणीतून त्यांची कथा गतिमान होते. कल्पनारंजन असं की समाजात ज्या गोष्टी घडायला हव्यात, असं त्यांना वाटतं, त्या त्या गोष्टी त्यांच्या कथांमधून घडतात. ‘पालखीचे भोई’ मधील बाबा गावातील विविध धर्मियांची एकजूट करून माणुसकीची दिंडी काढतात. त्यांच्याकडे  भजनाला विविध जाती-धर्माचे लोक येतात. सकाळी तिरंग्याची पूजा करून व त्याला प्रणाम करून पालखी निघते. त्यात सर्व धर्माचे धर्मग्रंथ ठेवलेले असतात. आपआपल्या धर्माचा पोशाख केलेले वारकरी ‘पालखीचे भोई’ होतात.

श्रीमती अनुराधा फाटक

‘झेप’ मधील सायली हुशार पण घरची गरीबी म्हणून ती सायन्सला न जाता आर्टस्ला जाते. संस्कृत विषय घेते. दप्तरदार बंधूंकडे जुन्या औषधांची माहिती असलेली त्यांच्या आजोबांची दोन बाडं असतात. सायली त्यांचा मराठीत अनुवाद करून देते. पुस्तक छापलं जातं. कुलगुरूंच्या हस्ते त्याचं प्रकाशन होतं. वेगळ्या दिशेने झेप घेतलेल्या सायलीचं कौतुक होतं. कथेचा शेवट असा- भारतीय ज्ञान, बुद्धी, यांना साता समुद्रापार नेणारी ही झेप’ नव्या पिढीचा आदर्श ठरणार होती.

‘बळी’ ही ‘यल्ली ’ या जोगतीणीची व्यथा मांडणारी कथा. ती म्हणते, नशिबानं मलाच यल्लम्मा बनीवली आणि दारोदर फिरीवली. तिचा विचार करणारा, तिला चिखलातून बाहेर काढू इच्छिणारा, तसं केलं नाही, तर माझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं म्हणणारा एक स्वप्नाळू तरुण तिच्याशी लग्न करतो. एकदा रस्त्यावरील  एका गाडीच्या अपघातात तो मरतो. शिक्षण नसलेल्या यल्लीला जगण्यासाठी पुन्हा जोगतीणच व्हावं लागत पण आपण मूल जन्माला घालायचा नाही , असं पक्कं ठरवते. कथेचा शेवट असा- ‘यल्लूचे डोळे गळत होते. त्या अश्रूतून मातृत्वाची बांधून ठेवलेली ओल वहात होती. कुणाचा बळी न देण्याचा निर्धारही. ती म्हणते, माझ्या आयुष्याचं बुकच वेगळं हाय. त्यात फाकस्त बकर्‍यावाणी बळीची गोष्ट.’ सजलेली –धजलेली यल्लम्मा  जग डोक्यावर घेऊन  निघाली. तिचाही बळी घेतला होता, समाजातील दुष्ट रुढींनी. खरं तर त्या अश्रूतून बांधून ……. न देण्याचा निर्धारही … इथेच कथा संपायला हवी होती. पण लेखिकेला स्वतंत्रपणे भाष्य करण्याचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या अनेक कथांमधून दिसते.

दोन ज्योती, घर, कलंक,पुरस्कार या कथा वृद्धाश्रमाच्या पार्श्वभूमीवरच्या. ‘दोन ज्योती’मधल्या सुमतीबाई, ‘घर’मधल्या कुसुमताई, कलंक’ मधल्या मीनाताई सगळ्या वेगवेगळ्या कारणांनी आश्रमात आलेल्या. त्या तिथे केवळ रूळल्याच नाहीत, तर रमल्याही.त्यांचा आत्मसन्मान तिथे त्यांना मिळालेला. कुसुमताई सुनेच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या. त्या म्हणतात, ‘नवरा गेल्यापासून आजपर्यंत घरात आश्रमासारखी राहिले, आता या आश्रमात घरासारखी रहाणार आहे.’ मीनाताईंच्या मुलाने हाती लागलेल्या बनावटी पत्रांच्या आधारे, त्याची शहानिशा न करता आईवर लावलेल्या बाहेरख्यालीपणाच्या आरोपाने व्यथित होऊन त्या आश्रमात आल्या आहेत. शेवटी मुलाला आपली चूक कळते. तो त्यांना घरी न्यायला येतो, पण त्या ‘तुझ्या पश्चात्तापाने माझा कलंक पुसला, तरी मनाची जखम ओली आहे.’असा म्हणत पुन्हा घरी जायला नकार देतात. आत्मकेंद्रित, अहंमन्य, पैशाच्या मागे लागलेले, बायकोला गुलामासारखं वागावणारे वसंतराव. त्यांच्या वागणुकीला कंटाळून आश्रमात आलेल्या सुमतीबाई नवरा न्यायला येणार, म्हंटल्यावर धास्तावतात. त्यावेळी आश्रमाच्या व्यवस्थापिका वसंतरावांनाच इथे ठेवून घेऊन हा पेच सोडवण्याचे ठरवतात. त्यावेळी पती-पत्नी यांच्या नात्याबद्दल खूप काही बोलतात. भाषण दिल्यासारखं. वाटत रहातं, लेखिकाच त्यांच्या तोंडून बोलतेय. कथासंग्रहात असं वाटायला लावणार्‍या खूप जागा आहेत.  लेखिकेचा अध्यापणाचा पेशा असल्यामुळे कुठल्याही घटना-प्रसंगावर भाष्य करण्याचा लेखिकेला मोह होतो आणि अनेकदा संवाद भाषणात रूपांतरित होतात.

पुस्तकात पाहुणेर, गोफ, नवजीवन, मंगला, माणुसकी इ. आणखीही वाचनीय कथा आहेत. शब्दमर्यादेचा विचार करता, मासिका- साप्ताहिकातून चित्रपट परीक्षणे येतात, त्यात शेवटी म्हंटलेलं आसतं, ‘पुढे काय होतं, ते प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.’ तसंच म्हणावसं वाटत, ‘कथांचा प्रत्यक्ष पुस्तक वाचूनच आनंद घ्या.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈