मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(चरैवेति  चरैवेति)

[नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या ‘राष्ट्रसेविका’ या अंकासाठी  सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.]

भा–  र –त – ज्ञान आणि भक्ती मध्ये रमणारा, तो भारत. भारतीयांच्या चौकसबुद्धी मुळे भूमिती शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित ,रसायन शास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत, साहित्य, कला अशा अनेक शास्त्रांनी, भारताला सौंदर्य आणि संपन्न बनविले.  अनेक गोष्टीत भारत समृद्ध होता. आणि आहे .त्यापैकीच आजच्या काळातील समृद्धी म्हणजे भारतीय रेल्वे.

भारतीय रेल्वेचे जाळे म्हणजे देशातील रक्ताभिसरण संस्था.’ लाईफ लाईन ‘असे म्हणायला हरकत नाही .त्याचा श्रीगणेशा झाला तो इंग्रजांच्या कारकीर्दीत. ती एक इंग्रजांनी दिलेली  देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही. पहिला आराखडा तयार झाला, तो     १८32 मध्ये. पुढे’,’ रेड हिल’ नावाची पहिली रेल्वे  १८ 37 साली धावली . १८४४  मध्ये लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे चालू करण्याची परवानगी दिली . दोन रेल्वे कंपन्यांना  इस्ट इंडिया मदत करायला लागली.१८५१मधे सोलनी अँक्वाडक्ट रेल्वे ,रुरकी येथे बांधण्यात आली.१८५६मधे मद्रास रेल्वे कंपनीची स्थापना झाली आणि दक्षिण भारतात रेल्वेचा विकास सुरू झाला .१८५७ मधे पहिली प्रवासी गाडी बोरीबंदर ते ठाणे (३४कि. मि.) अशी धावली. त्याची चर्चा ब्रिटनच्या वर्तमानपत्रातही आली. साहिब, सिंध ,आणि सुलतान अशी त्या वाफेच्या इंजिनांची छान नावे ठेवून बारसे झाले. आता रेल्वेच्या बाळाने बाळसे धरायला सुरुवात केली. पुढे हावडा ते हुगळी (२४कि.मी.) नंतर १८६४ मधे  कलकत्ता ते अलाहाबाद–दिल्ली असा लोहमार्ग पूर्ण करून १८७०मधे गाडी त्यावरून धावायला सुरुवात झाली .१८७५ मधे ९१०० कि.मि.चे अंतर स्वातंत्र्यापर्यंत४९३२३ कि.मि. पर्यंत पोचले.१८८५ मधे भारतीय बनावटीचे  इंजीन  बनविण्यास सुरुवात झाली. आणि बाळस  धरलेलं बाळ आता चालायला लागलं. १९४७ पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. स्वातंत्र्यानंतर १९५१मधे त्या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून, ताठ मानेने भारतीय रेल्वे मानाने मिरवू लागली. स्वातंत्र्यानंतरही तिच्या विस्ताराचा वेग फारसा वाढला नाही. तरी विकास कमी झाला नाही. भारतीय रेल्वे देशाच्या प्रगतीशी जोडली गेली आहे.

पूर्वीच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रीकरण करून, त्याचे सहा भाग पाडले गेले .तरीही इतक्या मोठ्या  पसार्याचे  व्यवस्थापन करणे कठीण, म्हणून त्याचे आणखी सोळा-सतरा भाग पाडले गेले.

1) उत्तर रेल्वे–मुख्य ठिकाण दिल्ली.२)उत्तर पूर्व –गोरखपूर. ३)उत्तर पूर्व सीमा -गोहाटी. ४) पूर्व रेल्वे- कलकत्ता. ५)दक्षिण पूर्व-कलकत्ता.६) दक्षिण मध्य-सिकंदराबाद.७) दक्षिण रेल्वे–चेन्नई.८) मध्य रेल्वे–पुणे.९)  दक्षिण पश्चिम–हुबळी.१०)उत्तर पश्चिम–जोधपूर.११) पश्चिम मध्य–जबलपूर.१२) उत्तर मध्य–अलाहाबाद.१३) दक्षिण पूर्व मध्य–बिलासपूर.१४) पूर्व तटीय–भुवनेश्वर.१५)  पूर्व मध्य–हाजिपूर.१६) कोकण रेल्वे–बेलापूर. कोकण रेल्वे भारतीय रेल्वे बोर्डाच्या नियंत्रणाखाली वेगळी संस्था आहे. सोयीसाठी प्रत्येक रेल्वे विभागाने पुन्हा ६४ भाग पाडले आहेत. उपनगरीय प्रवासी वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे प्रणाली वापरली जाते. मुंबई, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद ,पुणे येथे ती कार्यरत आहे. मुंबई, कलकत्त्याच्या उपनगरीय वाहतूकीच्या गाड्या स्वतंत्र उड्डाण पुलासारख्या मार्गावरून धावतात. मुंबई हे ठिकाण पश्चिम मध्य आणि हार्बर वर येत असल्याने मुंबईकर उपनगरीय सेवेवर अवलंबून असतात. तिच्यावर त्यांचा खूप जीव आहे. त्यामुळे ही सेवा मुंबईची नस मानली जाते.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈