सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ सामान्यातील असामान्य… ☆ सौ शालिनी जोशी

सालूमरादा थियाक्का यांचे १५/११/२५ रोजी निधन झाले. त्यानिमित्त विशेष लेख:

सामान्यांतील असामान्य

मुख्यमंत्र्यांचा एक लाख झाडे लावण्याचा संकल्प, वनराई संस्थेने माळरानावरती ६००० झाडे लावली, तर कोणी आपल्या ६१ वर्षाच्या वाढदिवसानिमित्त सहाशे दहा तुळशीची रोपे भेट म्हणून दिली. अशा बातम्या आपण नेहमीच वाचतो. अर्थात यातील किती झाडे जगली, याची बातमी कधीच होत नाही, ही गोष्ट वेगळी. आरंभशूर सगळेच असतात. पण नंतर लागणारे सातत्य, कष्ट विसरतात. हे सांगण्याचे कारण मध्यंतरी वाचनात आलेली एक बातमी. नुसती बातमी नव्हे तर सत्यकथा आहे. घडली आहे. घडत आहे आणि पुढे घडत राहण्याचे शाश्वती देणारा मार्ग दाखवणारी आहे. धडा देणारी स्त्री आहे सालूमरादा थियाक्का.

एका निरक्षर घरात जन्माला आली. मोलमजुरी करणारा पती मिळाला. मूलबाळ झालं नाही. पण या दुःखाचा कोणताही बाऊ न करता घराजवळील हायवेवर या माऊलीने ३८५ पेक्षा जास्त वडाची झाडे लावली आहेत. नवऱ्याची ही साथ मिळाली. रणरणत्या उन्हातही लोकांना सावली देत ही झाडे डौलाने उभी आहेत. झाड लावून त्यांचे पोटच्या मुलांप्रमाणे दोघांनी काळजी घेतली. त्या सगळ्या झाडांची माता ती झाली. एवढेच नव्हे तर आज पर्यंतच्या आयुष्यात ८००० झाडे तिने लावली. मुलबाळ नाही या दुःखात रडत न राहता ८००० पेक्षा जास्त ठणठणीत आणि सुस्थितीत असलेल्या समाज उपयोगी मुलांची आईच ती झाली. १०० मुले असलेल्या गांधारी पेक्षाही ती श्रेष्ठ ठरली.

आजचे तिचे वय विचारले तर १०६ वर्षे पूर्ण. गेले ८० वर्षे सतत ती वृक्षारोपणचे काम करते आहे. पर्यावरण, हरित परिणाम, प्रदूषण, ऑक्सिजनचे प्रमाण इत्यादी कोणत्याच गोष्टीशी तिचे कोणतेच देणेघेणे नाही. तरी निष्ठेने तिने हे काम केले. तिला कल्पनाही नसेल, ही झाडे पुढे कित्येक पिढ्यांचा आधार होणार आहेत. निवडलेली झालेली वडाची, भरपूर ऑक्सिजन देणारी आणि कायम हिरवीगार असणारी, पारंब्यातून पुनर्लागवड करणारी आहेत. एकदा रुजली की त्यांची काहीही सेवा करावी लागत नाही. रामाने सेतुबांधताना छोट्या खारीने आपल्या वाटा उचलला. त्यासाठी तिला कोणतेही आमंत्रण द्यावे लागले नाही, की मोबदला द्यावा लागला नाही. तसेच आपले काम निरपेक्ष बुद्धीने करून लोकांपुढे आदर्श ठेवणारी थियाक्का. अक्षर ओळख नाही म्हणून निरक्षर असते तरी सुशिक्षितच म्हटली पाहिजे. कृतीतून तिने दाखवून दिले की वय हा एक आकडा असतो. आयुष्य किती जगता यापेक्षा कसं जगता याला महत्त्व आहे. थियाक्काने दोन्ही साधलं.

आपला सत्कार होईल बक्षीस मिळेल, याची काही तिला जाणीवही नव्हती. आणि अचानक भारत सरकारचे निमंत्रण आले. काय वाटले असेल तिला, ती बावरली असेल. तिला नकोसे वाटली असेल. पण लोकाग्रहास्तव तिला ते स्वीकारावे लागले असेल. भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने तिला सन्मानित केले. खरंतर भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराचाच मान वाढवला. कार्यक्रमाचे वेळी राष्ट्रपतींचे डोक्यावर तिने मायेने हात फिरवला. तो दिवस होता १६ मार्च २०१९. राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद.

नवीन इकोसिस्टीम जन्माला घालणारी ती खरी कर्मयोगी. पोटा पाण्यापुरती मोलमजुरी करून झाडांना जगण्याचे काम तिने निस्वार्थपणे केले. कर्मयोग काय असतं दाखवून दिले. शेतात काम करणाऱ्या बहिणाबाई चौधरीनी आपल्या अहिराणी भाषेतील काव्यातून ज्ञानयोग सांगितला. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले. त्या ज्ञानयोगी ठरल्या. चोखा महाराच्या पत्नीने सोयराने नवऱ्याच्या ग्राम स्वच्छतेच्या शूद्राच्या व्यवसायात मदत करून भक्तियोग साधला. अनेक अभंग तिने लिहिले. प्रत्यक्ष भेटूरायाचे दर्शन कधीही झाले नाही. तरी समाधानी राहिली. अशा या स्त्रिया आणखीही आहेत आणि होतील. पण सामान्यात निर्माण होऊन असामान्य ठरल्या. सामान्यांच्या मार्गदर्शक झाल्या.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments