श्री जगदीश काबरे

☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…☆ श्री जगदीश काबरे ☆

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे… वाढले नाही ते “सुशिक्षित”तेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या अधीन राहिल्यामुळे आणि आधुनिक विचारांपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच, पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्ववादातून आणि अंधश्रद्धायुक्त घटनांचे छद्मविज्ञानाच्या साह्याने समर्थन करतांना पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे नागरिक “सुशिक्षित” होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होऊ शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. उलट असे कारणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. कारण आधुनिकता ही विचारांत व आचारांत आणावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते, हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडणारा, ढोंगी बाबांबुवांच्या पायाशी लीन होणारा आपला समाज एकूणातच अंधारयुगाकडे जोमाने वाटचाल करत आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. कारण आम्ही क्रमश: इतिहासाची परखड चिकित्सा आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत. इतिहासाचे नको तसे उदात्तीकरण आणि ऐतिहासिक पुरुषांचे दैवतीकरण करत चाललो आहोत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे होय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकित्सा, टिकात्मक टिप्पणी म्हणजे द्वेष पसरवणे असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने आपला इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे विकृतीकरण करत चालली आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. कुंभमेळा दरम्यान कोट्यावधी लोकांनी आंघोळ केल्यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित झाले, त्यात मानवी विष्टेचे कण आढळले असा निष्कर्ष काढणाऱ्यांना आपण सहजपणे हा सनातन धर्माचा अपमान आहे म्हणून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेतल्यामुळे टीकाकारांवर झुंडीने हल्ले चढवणाऱ्या ट्रोलर महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे लोक पक्षीय, जातीय आणि धार्मिक बेड्यांत घट्ट अडकत आहेत. या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनवले जात आहे. धर्म नेहमीच चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला “पाखंडी” ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. माध्ययुगात युरोपातही असे घडून गेले आहे…पण तिकडील विचारकांनी धर्मलंडांचा प्रसंगी छळ सोसुनही शेवटी त्यांना शरण आणले. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कारण ते चिकित्सक होते… प्रश्न विचारत होते… उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले. आपण केव्हा बनणार? की अजूनही आपली मानसिकता प्राचीन आणि मध्ययुगात अडकलेली रहाणार?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments