श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
तेरा आणि चौदा ऑगस्ट हे (२०२४) दोन दिवस अत्यंत संस्मरणीय असे ठरले. सांगलीला काही कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त जाणे झाले. या दोन दिवसात सहकुटुंब देवदर्शनाचा लाभ घेता आला आणि खरोखरोच खूप प्रसन्न वाटले. या दोन दिवसात सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिर, नरसोबा वाडी, जयसिंगपूर येथील सिद्धिविनायकाचे मंदिर आणि चाफळ येथील श्री राम मंदिर यांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. पण आज मी प्रामुख्याने बोलणार आहे ते जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिराबद्दल.
जयसिंगपूर येथील माझे मित्र श्री मदन बुरांडे मला अनेक दिवसांपासून घरी या म्हणून बोलावत होते. १४ ऑगस्टला तो योग अचानक आला. सांगलीपासून अवघ्या ११ किमी वर जयसिंगपूर आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजे जयसिंग यांचे नाव या गावाला देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात हे गाव आहे. कोल्हापूरपासून जयसिंगपूर अवघ्या ३८ किमी अंतरावर आहे. शहराच्या पूर्वेला कृष्णा नदी वाहते. हे शहर तंबाखू, गूळ, मिरची आदींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. दूध, दुधाचे पदार्थ या ठिकाणी उत्तम मिळतात. फळे, भाजीपाला यांचीही चांगली आवक आहे. दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर राज्याशी आणि देशाशी एस टी आणि रेल्वे सेवेने जोडले गेले आहे. विविध प्रकारचे शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक उत्तम शैक्षणिक संस्था या शहरात आहेत.
मदनजी यांच्याकडे जाण्यापूर्वी त्यांना फोन केला होता. मी, सौ. श्रद्धा आणि माझी कन्या चि. सौ सारिका असे आम्ही तिघेजण सकाळी लवकरच जयसिंगपूरला पोहोचलो. श्री मदनजी आणि सौ वहिनी आमची वाटच पाहत होते. पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्या दोघांनी आमचे मनापासून स्वागत आणि उत्तम असे आदरातिथ्य केले. नंतर श्री मदनजी म्हणाले ‘ इथून जवळच सिद्धिविनायकाचे अतिशय सुंदर मंदिर आहे. तुम्ही ते पाहिल्याशिवाय जाऊ नका. ‘ त्यांच्या प्रेमळ सूचनेनुसार आम्ही सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचे ठरवले. आमच्यासोबत ते स्वतः मंदिर दाखवण्यासाठी आले. त्यांच्या घरापासून साधारण एक दीड किमी अंतरावर मौजे आगर, जयसिंगपूर येथे हे मंदिर आहे.
दुरूनच हे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. सिद्धिविनायक ट्रस्टने या मंदिराची निर्मिती केली आहे. दुरून ऑक्टोपसच्या आकाराचे दिसणारे पण कमळाच्या पाकळ्यांचा आकार असलेलं हे मंदिर खरोखरच आगळंवेगळं आहे. अशा प्रकारचं मंदिर महाराष्ट्रात तरी माझ्या पाहण्यात नाही. या मंदिराच्या बांधणीतील कल्पकता आणि बांधकामातील कौशल्य अप्रतिम आहे. आज कोणतीही वास्तू बांधताना साधारणपणे लोखंड आणि सिमेंट यांचा वापर केलेला आपल्याला आढळतो. त्याशिवाय कोणतेही बांधकाम पूर्ण होत नाही. पण हे मंदिर मात्र सिमेंट आणि स्टील यांच्या वापरापासून मुक्त आहे. दगड, विटा आणि चुना या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आहे. पण हे मंदिर एवढे सुंदर, कलात्मक आणि भक्कम आहे की त्याच्या बांधकामात सिमेंट आणि स्टीलचा वापर केलेला नाही यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. या मंदिराच्या निर्मितीत वापरली गेलेली वीट आपण वापरतो तशा सर्वसाधारण प्रकारची नाही. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथून ही मशीन कट वीट खास बनवून घेण्यात आली आहे. या विटेच्या वापरामुळे तसेच विशिष्ट प्रकारचा चुना आणि दगड यांचा वापर केलेला असल्याने हे मंदिर किमान पाचशे वर्षे टिकेल असा जाणकारांचा अंदाज आहे.
मंदिराच्या भोवताली रमणीय बाग आणि लॉन आहे. भाविकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था आहे. विशेष प्रसंगी रात्रीच्या वेळी मंदिरावर रोषणाई केली जाते, त्यावेळी तर मंदिर फारच नयनरम्य दिसते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सजवलेल्या एका भव्य अशा गजराजाची मूर्ती आहे. त्याच्याच बाजूला श्री सिद्धिविनायकाचे वाहन असलेल्या मूषकाची मोठी प्रतिमा आहे. त्याच्या हातात मोदक आहे. आपल्या मनातील इच्छा या मूषकाच्या उजव्या कानात सांगायची. ती इच्छा पूर्ण होतेच अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्री गणेशाला अग्रपूजेचा मान आहे. कोणत्याही पूजाविधीची सुरुवात श्री गणेशाच्या आराधनेशिवाय होत नाही. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी असून विघ्नहर्ता आहे. त्यामुळे सर्व दिशा मोकळ्या होतात. सर्व विघ्नांचा नाश होतो असे आपण मानतो. या आपल्या श्रद्धेला अनुसरूनच या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात अष्ट दिशांना प्रत्येकी एक अशा अष्टविनायकांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर कमानी आहेत. त्या कमानींमध्ये असलेल्या आठ स्तंभांवर अष्टविनायक विराजमान झाले आहेत. या कमानी अत्यंत देखण्या आहेत. बाहेरच्या बाजूने लांबून या कमानींकडे पाहिले तर हत्तीच्या सोंडेचा भास होतो. मंदिराला प्रदक्षिणा करताना अनायासेच आपलं अष्टविनायकांचंही दर्शन पूर्ण होतं.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अष्टविनायकाच्या मूर्तीपुढे बाहेरच्या बाजूस हातात मोदक घेतलेला मूषक आहेच.
जेवढे मंदिराचे बाह्य स्वरूप देखणे आहे, तेवढेच अंतरंग देखील! मंदिराच्या २१ पायऱ्या चढून आपण आत गेलो की दृष्टीस पडते ती श्रींची एक अतिशय सुंदर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात घडवलेली मूर्ती. ही मूर्ती पाहताच शांत, प्रसन्न वाटते. कमलदलात स्थानापन्न झालेली सुमारे ३० इंच उंचीची ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ही मूर्ती पाहताच आपण नतमस्तक होतो आणि हात आपोआप जोडले जातात. ही श्रींची मूर्ती पृथ्वीवर स्थानापन्न असून वरच्या बाजूला आकाशाचे प्रतीक म्हणून निळा रंग देण्यात आला आहे. केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अवघ्या विश्वात ईश्वर व्याप्त आहे हेच जणू ही रचना आणि रंगसंगती सूचित करते. त्याचप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि मोक्ष या संकल्पना देखील त्यातून सूचित होतात. मूर्तीच्या पाठीमागे १०८ टोकांची प्रभावळ सोनेरी रंगात असून त्यातील मधल्या बाजूस श्रीगणेशाचा आवडता लाल रंग देण्यात आला आहे. २८ डिसेंबर २०१२ या दिवसाच्या शुभमुहूर्तावर संत प. पु. गोविंददेव गिरीजी महाराज (आचार्य श्री किशोरजी व्यास) यांच्या शुभहस्ते श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
या मंदिराचे वैशिष्ट्य असे की चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे प्रवेशद्वारातून आत येऊन थेट मूर्तीवर अभिषेक करतात. प्रवेशद्वारावर असलेली भव्य दगडी कमान जणू त्या सूर्यकिरणांचे स्वागत करण्यासाठीच उभी आहे असे वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणेश पुराणातील आणि श्री गणेशाच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत.
या मंदिराचा आणखी एक विशेष असा आहे की नऊ या अंकाशी या मंदिराचे विलक्षण साधर्म्य आहे. हे मंदिर पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागली. ज्या दिवशी हे काम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस होता २८/१२/२०१२. या तारखेतील सर्व अंकांची बेरीज केली असता ती सुद्धा नऊ येते हा विलक्षण योगायोग आहे. मंदिरातील मूर्तीचे वजन १०८ किलो आहे. मूर्तीभोवती १०८ टोकांची प्रभावळ आहे. मंदिरातील घंटेचे वजन १०८ किलो आहे. १०८ या संख्येतील अंकांची बेरीज ९ येते. श्रींची मुख्य मूर्ती आणि बाहेरील अष्टविनायक असे मिळून नऊ श्रींच्या मूर्तींचे दर्शन होते. त्याचप्रमाणे मूषकही नऊच आहेत.
नऊ या अंकाचं एवढं विलक्षण महत्व काय असावं असं वाटून मी त्यासंबंधीची माहिती घ्यायला सुरुवात केली आणि मोठी मनोरंजक माहिती हाती आली. जशी रेडिओ लहरींची (तरंगांची) फ्रिक्वेन्सी असते, जिला आपण ‘ हर्ट्झ ‘ या एककात मोजतो, तशीच प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक वस्तूची फ्रिक्वेन्सी असते असे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेनुसार चार उच्च कंपन तरंग आणि चार निम्न कंपन तरंग असतात. अगदी त्याचप्रमाणे विश्वशक्तीचेही स्वतःचे विशिष्ट कंपन तरंग असतात आणि नऊ हा अंक विश्वशक्तीचा विशिष्ट कंपन तरंग अंक आहे असे मानले जाते. असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या उच्च कंपन तरंगांसह विश्वशक्तीच्या संपर्कात येणे आवश्यक असते. हे जेव्हा घडते, तेव्हा विश्वशक्ती त्याच्या जीवनात यायला सुरुवात होते. अशा व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागतात.
विश्वातील प्रत्येक आकार नऊने बनलेला आहे. चक्र किंवा वर्तुळ ३६० अंशांचे असते. यातील अंकांची बेरीज ९ येते. तसेच एक तास म्हणजे ३६०० सेकंद. चौरस किंवा आयताकृतीतील कोनांची बेरीज ३६० येते. त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० असते. पंचकोनातील एकूण कोनांची बेरीज ५४० येते. षटकोनांच्या कोनांची बेरीज ७२० येते. यातील कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज केली असता ती नऊ येते. आईच्या पोटात नऊ महिने राहिल्यानंतर मनुष्याचा जन्म होतो. त्याचप्रमाणे नवग्रह, नवरत्ने, नवरात्री या सगळ्या गोष्टीत नऊचे महत्व आहे. यावरून हा निष्कर्ष काढता येतो की हे मंदिर नऊ या अंकाने वेगवेगळ्या प्रकारे विश्वशक्तीशी जोडले गेले आहे. आपणही या मंदिरात या विश्वशक्तीशी जोडले जातो. श्री गणेश ही बुद्धीची, विद्येची देवता आहेच. तो विघ्नहर्ताही आहे. अशा या सिद्धिविनायकाचे विलोभनीय दर्शन आम्हाला घेता आले याचा आनंद झाला. नरसोबा वाडी किंवा कोल्हापूरपासून हे ठिकाण जवळ असल्याने भाविकांनी एकदा तरी या मंदिराला जरूर भेट द्यावी.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






