सुश्री नीलांबरी शिर्के

 

? इंद्रधनुष्य ?

☆ तुकोबारायांची होळी…  प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के 

‘मी होळीत काय आणि का जाळलं? ‘ याविषयी तुकोबाराय सांगतात,

 दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥ 

लोकं होळीत शेणाच्या गवऱ्या, लाकडं जळतात. पण तुकोबा म्हणतात..

” मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. ” 

दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही…

सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥ 

.. “दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुखं माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. ” 

…. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे…

आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥ 

.. मला सुखाची अपेक्षा का नाही? तर, “संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे. ”

आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड? ॥ 

“मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त ‘संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव’ एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील? ”

तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां? ॥ 

“मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता? ” 

…. सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.

धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य ती संतांची मांदियाळी

आपल्यातीलही सर्व दोष जळावेत म्हणून मनापासून शुभेच्छा 

प्रस्तुती –  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments