?इंद्रधनुष्य?

 ☆ पेडगावचे शहाणे… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ?  दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-            

६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-        

अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे). 

कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत  म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले.  धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली.  कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !

खानाच्या फौजेत  एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”  “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज  आला.  आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके  सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.                            

अशा प्रकारे  राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.                       

आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,

 पेडगावचे शहाणे

 आणि                             

वेड पांघरून पेडगावला जाणे

हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.

 

छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

 

माहिती संग्राहक : माधव केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments