? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆ 

ही कहाणी आहे एका शिक्षिकेची. ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची. ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची . ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची –ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची . 

कालपर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे.राष्ट्रपतीपदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी,गरीब,सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची .

ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला.१९७९ साली त्या पदवीधर झाल्या.ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या.नगरसेवक झाल्या.आमदार झाल्या. मंत्री झाल्या. राज्यपाल झाल्या.आणि आता आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही. सारेच कसे थक्क करणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शामचरण मुर्मू आहे. 

आजही त्या मयूरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित,आदिवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची  वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या, पण पुन्हा उभ्या राहिल्या. ताठ उभ्या राहिल्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या.जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले. खचून गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या.त्या अध्यात्माला शरण गेल्या.त्या पुन्हा उभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला.त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.आणि २०१४ साली पती शामचरण मुर्मूही गेले.त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.

परंतू अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुःखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे उभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. २०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.

२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता.आणि २१ जूनला भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमीप्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयूरभंजमध्ये जल्लोष झाला. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे !

संग्राहिका : प्रा. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments