सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ सरली दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
सरली आज दिवाळी,
जपू मनी आनंदाचे क्षण!
प्रत्येक दिवाळीची ,
मनी असे वेगळी आठवण!
वसुबारस ते भाऊबीज,
दिवस असती प्रकाशाचे !
तोच प्रकाश मनात राहो,
दिवे उजळीत अंतरीचे !
स्नेहभाव वाढीस लागे ,
उणी दुणी विरघळून जाती!
दीपावलीच्या आनंदात ,
झरती स्नेहाच्या बरसाती!
रेखते अंगणी रांगोळी,
ठिपक्यांची अन् नक्षीची!
तशी राखावी सर्वांची अंतरे,
रेखीव, सुंदर नात्यांची !
असेच राहो मन आनंदी,
निमित्त कशाला दिवाळीचे?
प्रार्थना करू ईश्वराची ,
निरंतर राहो सौख्य मनाचे!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈