सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ गझल… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(आम्ही सिध्द लेखिका संस्था, राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धा २०२५. वर्ष तिसरे उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त कविता )
(मात्रा वृत्त — अनलज्वाला – ८|८|८)
☆
किती अपेक्षा जगाकडुन या करतो आपण
थट्टेचा मग विषय जगाचा बनतो आपण
*
खरे नि खोटे पुरते माहित नसते तरिही
अर्ध्या हळकुंडाने पिवळे दिसतो आपण
*
झाड वाढते सहा ऋतूंची लहर सोसुनी
फक्त उत्सवी वसंत वैभव पुजतो आपण
*
बोलण्यातला अर्थ चुकीचा का लावावा
अर्थपूर्ण ती विरामचिन्हे पुसतो आपण
*
सुखदुःखाचा मेळ गुंफिते नियती अविरत
फक्त सुखाच्या पाठीमागे पळतो आपण
☆
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈