श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ आढावा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त:लवंगलता)
(मात्रा:८+८+८+४)
सारे घोडे बारा टक्के,सुभाषिताच्या पुरते….
कुणी रेसचे,कुणी रथाचे, कोणी टांग्यापुरते !
प्रत्येकाचे मुठभर येथे,अभाळ अपुल्यापुरते
तेज दूरच्या नक्षत्राचे, फिक्कट पायापुरते !..
घोडचुकांना ‘अनुभव’ ऐसे,द्यावे गोंडस नाव
नवीन सागर नवी तुफाने, पुन्हा भरकटे नाव !
कळपामधला मृगजळबाधित ,मृग एखादा कोणी
तृषार्त अंती उरि फुटण्याची, सांगे शोककहाणी !
स्मरणऋतूंच्या ओलस हळव्या,उरास भिडती लहरी
उत्तररात्री गजबजते ती , अवशेषांची नगरी !……….
दहा दिशांचे शाहिर गाती, दिग्विजयाची गाणी
झुंजारांच्या शोकांताची, सांगे कोण कहाणी ?
दूत युगांचा क्षण भाग्याचा ,अवचित येई दारा
अनाहुताला वर्ज्य उंबरा, विन्मुख क्षण माघारा!
कधी दुजांच्या बंडाचाही, झेंडा हाती घ्यावा
हतभाग्यांस्तव यावा कंठी, आभाळाचा धावा !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈