श्री नितीन सुभाष चंदनशिवे
जीवनरंग
☆ ताशा, वेश्या, आणि कविता… एक सत्यकथा…भाग – १ ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं. मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता. रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती. बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो. मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती. पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता. फटाक्यांचा माळा वाजत होत्या. ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता. तासभर धिंगाणा सुरूच होता. त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली. झोप लागत नव्हती. भूक लागली होती. उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.
विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला “क्या कालू झोपला नाहीस अजून”. “अगं बच्चन अजून आला नाही”… असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली. ओठावर दोन बोटं गच्च दाबून थुकलो. पिचकारी फ्लॅटफार्मच्या बाहेर गेली. हा माझा छंद होता.
बारा वाजले होते जय हिंद थिएटर जवळ होतं. शेवटचा खेळ संपत आला तशी मंगल उभी राहत म्हणाली, ”चल आलेच मी तासाभरात”. असं म्हणून ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक कटाक्ष टाकला आणि तोंडातला विडा बोटाने धरून भिरकावला. मंगल कोण कुठली माहीत नाही. आसऱ्याला एकत्र जमलेल्या गर्दीला एकच नातं असतं ते म्हणजे परिस्थितीचं. आणि म्हणाल तर फक्त ओळखीचं. मंगल इथं धंदा करत होती. शरीर विकून फक्त पोट भरत होती. मी बॅचलर मुलगा. दिवसभर काम आणि कॉलेज करून रात्र काढायला स्टेशनवर येणारा. इथं मी खरी जिंदगी जगलो. फार नाही पण तीन साडे तीन महिने तर नक्कीच.
अर्ध्या तासाने मंगल पुन्हा आली. चिडलेली आहे हे लगेच ओळखलं. आल्या आल्या तिने इशारा केला आणि मी तंबाखू मळायला लागलो. तिच्यासाठी विडा मीच मळत असे. विडा तिच्या हातावर देत म्हणालो “आज लवकर आलीस.. ” “अरे आज निकाल लागला ना, थिएटर रिकामच सालं. गिऱ्हाईकच नाही. जे रोजचे दोघेजण असतात तेपण दिसले नाहीत. तो नालायक नवीन आलेला पोलीस दोनशे रुपये फुकटचे घेऊन गेला. साला… हफ्ता आम्हाला पण द्यायला लागतो काळू “… तिचं बोलणं थांबवत मी आवंढा गिळत विचारलं “जेवलीस?”. मान झटकत छया करत खूप उपाशी असल्याचा इशारा तिने दिला. पण त्यातूनही ती म्हणाली “ तू खाल्लस काय?” मी नाही म्हणालो. त्यावर तिने पुन्हा विचारलं “बच्चन कुठाय” (शिवी)….. ? मी सांगितलं “आज मिरवणुकीत ताशा वाजवायला गेलाय तो”. मंगलने पण तंबाखू थुकली आणि म्हणाली, “थांब कायतरी बघते खायला.. काही नाही मिळालं तर आत्ता महालक्ष्मी येईल पुणे स्टेशनला जाऊ”. तेवढ्यात गाडीचा आवाज आलाच. मंगल म्हणाली, “चल त्या बाजूला जायला हवं नाहीतर उपाशी राहायला लागल आज चल उठ लवकर “.. मी चादर गुंडाळून हातात घेतली आणि आम्ही निघणार तेवढ्यात बच्चनचा आवाज आला. “ये काळू ये मंगला, अरे रुखो मुझे छोडके कहा जाते. ” या दोघांची हिंदी अशीच.
खांद्यावर ताशा अडकवलेला आणि हातात काळी पिशवी घेतलेला ताशेवाला बच्चन दिसला की मला बाप भेटल्यागत वाटायचं. त्याचं वय असेल चाळीस पंचेचाळीस. कधीतरी बोलण्यात परभणीच्या कोणत्यातरी भागातला आहे एवढंच कळलं होतं. बाकी काहीच माहिती नव्हती. त्यादिवशीपण हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दाखवत आम्हाला दोघांना म्हणाला “चलो खाना खाते है”
आम्ही लगेच बाकड्यावर बसलो पिशवी फोडली. गरम बिर्याणी तिघांसाठी आणली होती त्याने. मटण कशाचं म्हणून मी कधीही विचारलं नाही. मंगल म्हणाली “काय बच्चन आज लय खूष.. ‘ त्यावर ताशावर हात मारत बच्चन बोलला “बडी सुपारी मिली दो सो रुपया मिला. सौ का बिर्याणी लाया तेरे लिय.. ” बिर्याणी कधी संपली आणि पोट कधी भरून ढेकर आला कळलं नाही. रेल्वेच्या नळावर हात धूवून पाणी प्यालो आणि बाकड्यावर येऊन बसलो.
बराच वेळ तिघांच्या गप्पा चालायच्या. झोप आली की, मग आपापल्या बाकड्यावर जाऊन आम्ही झोपायचो.
त्याच फ्लॅटफॉर्मवर माझ्या बऱ्याच कवितांचा जन्म झालाय. आणि माझासुद्धा…
ताशेवाला बच्चन या बच्चन बरोबर गप्पा मारत असताना तो एकदा म्हणाला होता की, “काळ्या एक दिवस मी असा ताशा वाजवीन की या दफणभूमीतले मुडदे पण बाहेर येऊन नाचतील. ” त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. साला साधा ताशा वाजवणारा माणूस पण हा सुद्धा एक ध्येय ठेऊन आहे आणि त्याच्या कलेशी किती इमान राखून आहे. कधी कधी मंगलपण लावण्या ऐकवायची. सोलापूरच्या तमाशात कामाला होती असे सांगायची. नंतर नवरा वारल्यावर तमाशा बंद झाल्यानंतर एका मुलाला भावाकडे ठेऊन ती या धंद्यात आणि पुण्यात आली होती. आम्हां तिघा कलाकारांची भेट रोज रात्री इथेच व्हायची. त्याचा ताशा तिची लावणी आणि माझी कविता असायची. त्यावेळी मी कधीच सभागृहात किंवा स्टेजवर कविता म्हणली नव्हती. फक्त लिहायचो आणि बडबडत बसायचो. माझं पब्लिक ही फक्त दोन माणसं. त्यांनी दिलेली जी दाद असायची ती दाद जगातल्या कोणत्याच कवीच्या वाट्याला आली नाही हे मी फार अभिमानाने सांगीन.
रात्री साडेअकरा वाजता मी हजेरी लावायचो ती उपाशी पोट घेऊनच. कारण कोणतंही नातं नसणारी पण हक्काची ही दोन माणसं मला उपाशी झोपू देत नव्हती. आणि मी जे म्हणेल ते ते मला खायला देत गेली. रूमची सोय झालेली असतानासुद्धा मी यांच्यासाठी फ्लॅटफॉर्म सोडायला तयार नव्हतो.
एकदा वर्तमान पेपरला सरस्वती विद्या मंदिर येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धा असल्याची जाहीरात वाचली. बक्षीस तीन हजार रुपये होतं. मी बच्चनला आणि मंगलला ती वाचून दाखवली. माझी जायची कोणतीच इच्छा नव्हती पण बच्चन बोलला “तू जा इथं. ” मंगलनेही तेच वाक्य पुन्हा गिरवले. मला हुरूप चढला. पण घाबरलो होतो म्हणलं, “मला जमणार नाही बोलायला. आपला काय नंबर येणार नाही. आणि मी काय स्टेजवर जाणार नाही. ” त्यावर बच्चन म्हणाला, “देख जितने केलिय मत खेल. तू सिर्फ इधर जैसे बोलता है वैसेच उधर बोल. ” त्यावर मंगल म्हणाली “आणि अजून पंधरा दिवस वेळ आहे. प्रॅक्टिस कर. ” ती तमाशात काम केलेली असल्यामुळे प्रॅक्टिस वैगेरे तिला माहीत होतं.
मी तयार झालो. माझे लाडके मराठीचे प्राध्यापक रोकडे सर यांच्याकडून शिफारस पत्र घेतलं आणि नाव नोंदणी झाली. मग प्रॅक्टिस सुरू झाली. अनेक कवितांमधून माझी भारत माझा देश आहे ही कविता बच्चनला आवडायची त्याने तिच म्हणायला सांगितली. झालं तयारी झाली आणि स्पर्धेच्या आदल्या रात्री दोघांनीही शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं उद्या भेटू काळू. आणि दोघेही अंधारात गेले. एकाच वयाचे होते दोघेही. तिला गिऱ्हाईक मिळालं नाही किंवा मिळालं तरीसुद्धा ते शारीरिक एकत्र येत होते. दोघांमध्ये प्रेम होतं का नव्हतं ते त्यांनाच माहीत. पण दोघेही कुणाला यायला उशीर झाला तर एकमेकांबद्दल काळजी करायचे. मी त्यांना चिडवायचो सुद्धा. अर्थात भाषा कमरेखालची असायची. जी मी इथेच शिकली होती.
स्पर्धेचा तो दिवस आठवतोय. शंभरच्यावर स्पर्धक आले होते आणि मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होतं. माझा नंबर आला मी जीव लावून कविता सादर केली. डोळ्यासमोर फक्त फ्लॅटफार्म आहे असे मनावर गोंदवून आणि समोर फक्त बच्चन आणि मंगलच आहेत असा विचार करून मी माझी आयुष्यातली पहिली कविता सादर केली. स्पर्धक संपले होते. अर्धा तास ब्रेक होता. त्यानंतर बक्षिस वितरण होतं. मी थांबावं का निघावं असा विचार करत होतो. कामाला सुट्टी टाकली होती. म्हणलं जाऊन तरी काय करायचं बसू इथंच. निदान पाडगावकरांना तरी बघून होईल. अर्धा तास खूप जीवघेणा गेला. पुन्हा हॉल गच्च भरला.
प्रमुख पाहुणे पाडगावकर आणि इतर स्टेजवर स्थानापन्न झाले. कार्यक्रम सुरू झाला एक दोन मनोगतं झाली. नंतर पाडगावकर बोलले. आणि त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं. उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली. हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.
– क्रमशः भाग पहिला
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈