सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ लाख मोलाचा जीव –  लेखक- डॉ. अरुण लिमये – सहलेखन व संपादन : उषा मेहता ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

पुस्तक : लाख मोलाचा जीव

लेखक : डॉ. अरुण लिमये

सहलेखन व संपादन : उषा मेहता

ग्रंथाली प्रकाशन 

एकूण पृष्ठे-३००

किंमत (जुनी आवृत्ती)-९०₹

माणसाचा जन्म दुर्मिळ आहे. मागील जन्मी आपण भले/बरे कसे वागलो हे माहीत नसते म्हणून या जन्मात आपण चांगलं वागलं पाहिजे, सत्कर्म केली पाहिजेत आणि संसाररूपी दुःखातून मोक्ष, मुक्ती मिळवायला हवी असे आपली संत परंपरा सांगते. मोक्ष मुक्ती मिळो न मिळो पण माणूस म्हणून आपण नक्कीच चांगलं जीवन जगायला हवे आणि ते जगताना इतरांनाही ते जगण्यासाठी मदत करायला हवी, हीच खरी मानवतेची शिकवण, हाच माणुसकीचा धर्म. पण खरेच हा धर्म सर्वजण पाळतात? ही शिकवण आचरणात आणतात? याचं उत्तर ‘नाही’असंच येतं. आपला जीव अडचणीत येतो, तेव्हा तो किती बहुमोल आहे हे लक्षात येतं पण तोवर वेळ निघून गेलेली असते, बरेच काही करायचे आणि उपभोगायचे राहूनच जाते. त्यावेळची मनःस्थिती ज्यावर ही वेळ आली त्यालाच समजते. बाकीचे सर्व अमर असल्यासारखे जीवन जगतात.

‘युक्रांद’चे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘क्लोरोफार्म’चे लेखक डॉ. अरुण लिमये यांचे’लाखमोलाचा जीव’हे पुस्तक असेच हृदयस्पर्शी. जीव लाखमोलाचा आहेच तो या कारणास्तव की तो एकदा गेला की परत मिळत नाही, दुसरे यासाठी की शरीराला एखादा दुर्धर आजार झाला की जीव वाचवण्यासाठी उपचारार्थ लाखों रुपये मोजावे लागतात. ‘health is wealth’चा हाही एक व्यवहारी अर्थ आहेच. ज्याची आर्थिक परिस्थिती उपचाराला पैसे खर्च करण्याइतपत असते, ते जीव जगवण्याचा प्रयत्न करतात, यशस्वी/अयशस्वी होतात मात्र ज्यांची आर्थिक स्थिती नसेल त्यांची मनःस्थिती, मनाची घालमेल किती होत असेल?

कॅन्सरची शंका, तपासण्या आणि निदान झाल्यानंतर उपचार सुरू झाल्यानंतर जीवाचे होणारे हाल, डोळ्यासमोर क्षणाक्षणाला दिसणारा मृत्यू तरीही प्रचंड जीवनेच्छा बाळगून सारं काही सोसत जगण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. च्या मानसिक स्थितीचे हृदयस्पर्शी वृत्तांत या पुस्तकात आहे. उपचारासाठी वारंवार परदेशात जावे लागले त्यासाठी करावी लागणारी यातायात, पैशांची जुळवाजुळव, अटेंडंट शोधणे, त्याची पेशंट सोबत राहण्याची मानसिक तयारी होणे या सर्व बाबी आणि इतकं करूनही आपण परत येऊ की नाही? ही अनिश्चितता. उपचारांनंतर होणाऱ्या प्रचंड त्रासाने, आजाराच्या वेदनांनी चिडचिडा झालेला स्वभाव आणि अटेंडंटवर काढलेला सर्व वैताग, पश्चाताप दग्ध मन, कुटुंबियांची काळजी, आठवण, मित्र मैत्रिणींच्या सहवासातले क्षण, त्यांची नाजूक क्षणी येणारी आत्यंतिक आठवण, अशातच पत्नीचे साथ सोडणे, आपल्या सामाजिक कार्याची चिंता ही सर्व आवर्तने मनात प्रत्येक वेळी आदळणे आणि त्यातून येणारी अगतिकता व जीवाची घालमेल याचे वर्णन वाचून वाचक प्रत्यक्ष लेखकासोबत आहे असेच वाटत राहते. उपचाराबरोबरच परदेशातील काही ठिकाणी पर्यटन स्थळांना सुद्धा डॉ. नी भेटी दिल्या, त्याचेही तपशील या पुस्तकात आहेत. त्यामुळं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर तसेच उभे राहते. पुढं काय? पुढं काय? याची उत्सुकता मनाला ताणते.

अखेर सहा वर्षे कॅन्सरशी निकराने झुंज देऊनही डॉक्टरांची प्राणज्योत मावळलीच. आपला मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा न हारता, न घाबरता आजाराशी चिवट झुंज देत आपली कार्ये होता होईल तेवढी तडीस लावण्याच्या प्रयत्नांना वाचक मनोमन सलाम करतो.

१९८६-८७ला मी आठवी नववीत असताना प्रथम मोठ्या भावाने हे पुस्तक आमच्या घरी आणले. त्यातली सुरुवातीची काही पाने त्याच्याबरोबरच मी वाचली होती. तो पुस्तक सोबत घेऊन गेला न मी त्या पानावरच थांबले. त्यानंतर ते पुस्तक वाचायचं म्हणलं तरी मिळालं नाही. पुढं पुस्तकाचं अर्ध नाव, लेखकाचं अर्ध नाव मी विसरले आणि पुस्तक मिळवायचं अवघड झालं. आता सहजच भावाला त्यासंबंधी विचारलं तर त्याने लगेचच काढून दिलं. पण जुनी आवृत्ती, अक्षर लहान त्यामुळं वाचायला गोडी लागेना. त्यातच लेखनात एकसंघता नाही. त्यामुळं तुकड्या तुकड्यात वाचताना मनाचा विरस होतो. संपादक उषा मेहता या डॉक्टरांच्या शेवटच्या दिवसाअगोदर अटेंडंस म्हणून सोबत राहिल्या होत्या. त्यामुळं त्यांनीही डॉक्टरांच्या आजारपणातील हाल पाहिले होते, जवळचा मित्र असल्याने स्वभावातील बारकावे सुद्धा टिपणे त्यांना सहज शक्य झाले. त्यांच्या जाण्याने आप्तेष्ट, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, त्यांचे सर्व रुग्णांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. एक डॉक्टर म्हणून एक माणूस म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात वैविध्य आहे.

चांगल्या माणसांना अल्पायुष्य असते असेच इतिहास नेहमी सांगत आला आहे आणि डॉक्टर अरुण लिमये सुद्धा अपवाद नाहीत.

या पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील लेखकाच्या जीवन कथेला अतिशय साजेसे आहे. तेजस्वी सूर्याला ग्रहण लागल्याचे चित्र हेच दर्शवते की एका प्रखर व्यक्तिमत्वाच्या जीवाला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेय आणि त्याची आभा झाकोळलीय. बरेचदा आपल्याला चांगली पुस्तकं नेमकी कुठली? ते समजत नाही कारण इतरांनी वाचलेली, शिफारस केलेलीच आपल्याला माहीत होतात, पण कधीतरी आपल्या हाती अवचित एखादं पुस्तक हातात पडतं आणि स्वानुभवाने आपल्याला कळतं नेमकी कोणती पुस्तकं वाचायला हवीत?

…. ‘ लाखमोलाचा जीव ‘ त्यातीलच एक होय.

परिचय : सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments