श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ प्रिय सुदामा… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प्रिय सुदामा,

तुला लिहिलेलं माझं पहिलंच आणि बहुदा शेवटचं पत्र…!

तसा खूप उशीर झाला आहे,  पण आजची एकूण परिस्थिती बघून माझे मनोगत तुझ्यापाशी व्यक्त करावेसे वाटले. मूठभर पोह्याचे तुझे ऋण होतं माझ्यावर, म्हणून तू जास्त लक्षात राहिलास….!

माझी नरदेह सोडून सुमारे पाच हजार वर्षे झाली…!

माझ्या संपूर्ण जीवनात मी ‘स्वार्था’पोटी एकही गोष्ट केल्याचे आठवत नाही..!

गावाच्या भल्यासाठी घराचा त्याग करावा, राज्याच्या भल्यासाठी गावाचा त्याग करावा आणि देशाच्या भल्यासाठी जीवाचाही त्याग करावा असे आपल्याकडे मानले जाते. मी तसेच आचरण केले, नाही का… ?

माझ्या जन्मानंतरचे सोडून देऊ, पण जन्माच्या आधीपासूनच माझ्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती…!

जन्म झाल्या झाल्या मला जन्मदात्रीला सोडून दुसऱ्यांच्या घरी राहावं लागले…!

जन्माला आल्यावर पुतना मावशी मारायला टपली होती…!

त्यानंतर कालिया नाग….!!

माझ्या मामाने तर मला मारण्याचा आटोकाट प्रयत्न केला….!

धर्मरक्षणासाठी मला माझ्या मामाला मारावे लागले….!

तिथे जरी मला बलराम दादा होता, तरी जबाबदारी माझ्यावरच जास्त होती….!

मित्रांना लोणी, दूध, दही खायला मिळावे म्हणून मी अन्नाची चोरी करायचो, मी कधीही संपत्तीची चोरली नाही, पण सर्वांनी मला ‘चोर’ ठरवले….!

माझी यशोदामाई सुद्धा मला चोर म्हणाली,तेव्हा मला खूप वाईट वाटले….!

पण एक सांगतो, गोकुळात मला जे प्रेम मिळाले ते नंतर मला कुठेच मिळाले नाही. सगळे गोपगोपी लोण्यासारखे मृदूल…!

गोपींनी तर मला ‘सर्व’ ‘स्व’ दिले….!

तरीही मला कर्तव्यपालनासाठी माझ्या प्रिय गोकुळाचा कायमचा त्याग करावा लागला.

नंतरच्या बऱ्याच गोष्टी तुला माहीत आहेतच….!

तुम्हा सर्वांना त्यातील राजकारण दिसले असेल…!

कधी मला ‘कृष्ण’शिष्ठाई करावी लागली तर कधी मला ‘रणा’तून पळून जावे लागले..!

अनेक राक्षसांचे वध करावे लागले…!

नरकासुराच्या बंदी खान्यातील सोळा सहस्त्र नारींना मी सोडविले, पण त्यांना सामाजिक प्रतिष्ठा देण्यास समाज पूढे येईना, शेवटी मीच त्यांच्याशी विवाह केला….!

द्रौपदीला मी वस्त्रे पुरवली, अर्जुनाला गीता सांगितली अशा अनेक गोष्टी माझ्याकडून नियतीने करवून घेतल्या….!

मग लोकं मला ‘अवतार’ मानू लागले….!

मला देवत्व प्रदान केले गेले…! 

आणि कोणालाही देवत्व प्रदान केले की सामान्य लोकांचे काम सोपे होते. कशीतरी रोजची पूजा करायची, (खरं तर उरकायची !), मंदिरात ‘भंडारा’ करायचा. ‘उत्सव’ साजरा करायचे. हल्ली जो गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात. ना त्यात गो (गाय)  असते, ना गोपाळ असतात ना त्या हंडीत दही असते……!

जे असायला नको ते मात्र सर्व असते….!

मला तुम्ही लोकांनी देव केले, माझी भक्ती करायला सुरुवात केलीत. पूजा अर्चा जमली तर अवश्य करा पण माझी खरी भक्ती करायची असेल तर मी जसा प्रत्येक संकटात वागलो तसे वागण्याचा प्रयत्न करावा. मला तुम्ही पुरुषोत्तम म्हणता पण ‘पुरुषोत्तम’ होण्यासाठी प्रयत्न करणारे फार कमी लोकं आहेत. तुम्हाला मनमोहन व्हायला आवडते पण ‘कालियामर्दन’ करण्याची कोणाची तयारी दिसत नाही. आज अनेक ‘नरकासुर’ आहेत, अनेक ‘कालिया’ आहेत पण त्यांचा बंदोबस्त कोण करणार ? विचार करा.

प्रत्येकाने जेव्हा आपापली काठी लावली तेव्हा माझ्या करंगळीने गोवर्धन उचलला गेला, हे आपण विसरून जात आहात. गीता सांगायला तुम्हाला कोणीही भेटेल पण त्यासाठी तुम्हाला अर्जुनासारखे भक्त व्हावे लागेल…!

भक्ती तशी प्राप्ती असे म्हणतात, पण आज सुचवावेसे वाटते, जशी भक्ति तशी प्राप्ती!!.

आज माझा ‘जन्मोत्सव’ तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरा कराल, तेव्हा याचाही विचार कराल, असा विश्वास वाटतो. 

तुझा सखा,

कृष्ण

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments