प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ५ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

श्रावण तसा मन भावन. भरपूर पाऊस होऊन गेलेला. श्रावणाची रिमझिम, उनं पावसाचा खेळ, सोनेरी सूर्याची किरणे त्यात पडणारा पाऊस मध्येच आकाशात इंद्रधनुष्याचे आगमन, मन प्रसन्न करणारे वातावरण.

मातीच्या भिंतीनी धरलेली ओलं. प्रत्येक भिंतीवर बाहेरून उगवलेले गवत आणि आघाडा गवतावरची फुले, बारीक तुरा. रस्त्यावर पण हिरवळ. झाडानी धरलेलं बाळस. परसात भारलेली फुलांची झाड. फुलांच्या वसातील दरवळ. त्यात गुलबा क्षची लाल चुटुक फुले, झेंडूचा वास अनेक प्रकारच्या वेलिंचे जाळे, न सांगता उगवलेले. ही साक्ष म्हणजेच, श्रीचे आगमनाची चाहूल.

 घरात गणपतीची लगबग.

गणपतीचा कोनाडा व जवळ जवळ सगळा सोपा रंगानी सुशोभीत केलेला. श्रीची मखर तयार करण्यासाठी दिवस रात्र एक.

 कुंभार वाड्यात सगळ्यांची वर्दळ. अनेक प्रकारच्या गणेश मुर्त्या तयार झालेल्या. त्यातीलच एकाची निवड करून आमच्या नावाची चिठी त्या गणेशाच्या किरीटवर लावलेल्या असतं.

 एकदाचा तो दिवस आला की सगळीकडे धामधूम. आम्ही गल्लीतील सर्वच जण एकत्रित मूर्ती आणित असू. प्रत्येकांच्या कडे पाट. त्यावर श्री बाप्पा विराजित होतं असतं. कुंभारला पान सुपारी व दक्षणा देऊन मुर्त्या बाहेर पडत, त्या निनाद करतच. प्रत्येकाकडे

घंटी, कैताळ, फटाक्यांचा आवाज आणि जयघोष करत, आपापल्या घरी बाप्पा येत. दरवाज्यात आले की, त्याच्यावरून लिंब लोण उतरून टाकले की बाप्पा मखरात बसत. फटाके फक्त गणपतीच्या सणात मिळत एरवी नाही.

 प्रत्येकाच्या घरी रोज सामूहिक आरती, मंत्रपुष्प, प्रसाद वाटप हे ठरलेलं. रोज वेगवेगळे नैवेद्य. असे दहा दिवस कसे सरत जात होते ते कळत नसे. त्यात भजन कीर्तन वेगळेच. शाळेत पण गणपती बसवत व ते आणायला आम्हालच जावे लागे. रस्ता पावसानी राडेराड कुठे कुठे निसरडे रस्ते. त्यावेळी डांबरी सडक नव्हतेच. त्यात आम्हा मुलांची मिरवणूक. नेमके दोन चार जण तर पाय निसरून पडत असतं. मग ते इतर जण हसतात म्हणून, घरी पोबारा करीत.

 सातवी संपली बरेच मुले दुष्काळी परिस्थिती मुळे इकडे तिकडे कामाला लागली. मलाही पाणी भरण्याचा कंटाळा आलेला. मी पण सातवीत जे गाव सोडले ते आजतागायत!

 गावापासून पाचशे किलोमीटर लांबवर मी आठवीत प्रवेश घेतला त्यावेळी माझं वय होतं ते फक्त 12 वर्षे! एक वर्ष लवकरच शाळेत घातलं गेल.

अनोळखी गाव व तिथले राहणीमान ही वेगळेच. भाषा मराठी पण मराठवाडी. येथे मात्र गोदावरी कठोकाठ वाहत होती. दिवसातून चार वेळा मुबलक पाणी नळाला येत असले तरी, माझी अंघोळ ही गंगेकाठी चं सलग तीन वर्षे नदीत अंघोळ. महापुरात पण पोहण्याचा सराव.

 तस हे तालुक्याचे गाव पण चहुकडे मोठे मोठे दगडी वाडे. एक एक दगड दोन फुटांचा लांब आणि रुंद. निजामशाही थाटातील वड्यांची रचना. तीन तीन मजली वाडे. निजामचे बहुतेक सगळेच सरदार, दरकदार असावेत असे. प्रत्येक घराला

टेहळणी बुरुज पण असलेला. अजूनही बरेच वाडे जश्यास तसेच आहेत.

 मंदिराच गाव असं म्हटलं तर वावगे ठरु नये. गावात बरीच हेमाड पंथी मंदिरे. गोदा काठी तर अगणित मंदिरे. काठाला दगडी मजबूत तटाची बांधणी. बऱ्याच मंदिराचे जीर्णोद्धार हे अहिल्यादेवी होळकर ह्यांनी केलेले. गावात सुद्धा दगडी रस्ता. पण गाव हे गल्ली बोळाचे. अरुंद रस्ता व बोळ. वाडे मात्र टोलेजंग. गाव तस सनातनी धार्मिक. पूजा, अर्चना, भजन कीर्तन, पुराण हे सगळीकडे चालूअसलेलं. का बरं असणार नाही.

हे चक्क संत जनाबाईचे जन्मस्थान! संत जनाबाईचे गाव. वारकरी संप्रदाय पण मोठा. सगळ्या देवी देवतांची मंदिरे.

त्यात तालुक्याचे गाव. निजामशाहीचा ठसा मात्र जश्यास तसाच होता. घराच्या दगडी महिरपी चौकट्या, त्यावर महिरपी सज्जा, सज्यातून वरच्या बाजूला महिरपी लाकडी चौकट. अवाढव्य मोठी घरे प्रत्येक घरात दोन्हीही बाजूला पाहरेकऱ्यांचा देवड्या लादनी आकारात सजलेल्या. प्रत्येक घरात सौजन्य, ममता आस्था, कणवाळू प्रिय जनता.

 तरीपण मला तिथे रमायला काही दिवस लागले, मित्र पण मिळाले. पण आमचे गावठी खेळ तिथे नव्हतेच. प्रत्येक घरात कॅरम बोर्ड, व पत्ते. पत्त्यात पण फक्त ब्रिज खेळण्यात पटाईत लोक दिसलें. कब्बडी खोखो हे मैदानी खेळ, मला आवडणारा खेळ फक्त लेझिम होता, बस्स. चिन्नी दांडू, वाट्टा, धापा धुपी, ईशटॉप पार्टी नव्हतीच! सायकल पण नव्हती! हे विशेष! शाळा झाले की रोज रेल्वे स्टेशनं वर नियमित फिरायला जाणे. सकाळी तासभर नदीत डुंबणे. कधीतरी मित्रासह मंदिरात जाणे. एवढाच कार्यक्रम.

शाळेत असताना मात्र बँड मध्ये सहभागी म्हणून पोवा फ्लूट वाजवायला घरी मिळाला. त्यावर मास ड्रिलचे काही वेगवेगळ्या धून आणि राष्ट्रगीत वाजवत बसणे. गावात असताना भजनात बसत असल्यामुळे सूर पेटीचा नाद लागलेला होता. तो आता येथे येऊन मोडला. स्वरज्ञान, राग आलाप हे आता फक्त फ्लूट वर येऊ लागले. कारण सुरपेटी वाजवायला मिळत नव्हतीच. कसेबसे तीन वर्षे त्या संत जनाबाईच्या गावात काढले, पण बालपण विसरून गेलो. खरी खोटी माणसे वाचवायला फार लवकरच शिकायला मिळाले.

 सुट्टीत गावी आल्यावर काही जुने मित्र भेटत, काही कायमचीच निघून गेलेली होती.

कॉलेज सुरु झाले तसे परत नवीन मित्र मंडळी भेटत गेली. आणि जगण्याची व्याख्या पण बदलत गेली.

क्रमशः…

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments