सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळी उठल्याबरोबर सौ ने ऑर्डर दिली “अहो ऐकलत का?…”

मी म्हणालो “हो तुझाच तर ऐकतोय बोल.” 

“ काही नाही खाली वाण्याच्या दुकानातून दोन नारळ घेऊन या आणि ते सोलून आणा.. तुम्हाला सोलता येत नाहीत.” 

मी.. “कशासाठी?” नको तो प्रश्न मी विचारलाच..

ती म्हणाली.. “ एक.. संध्याकाळी मारुतीला फोडा आणि एक सकाळी फोडून मी गणपती बाप्पाला नैवेद्याचे मोदक करणार आहे “ ती म्हणाली. “ सुनीता विल्यम्स परत आली. मी देवाला बोलले होते ती सुखरूप परत येऊ दे तुला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवेन.. !” 

“ तिच्यासाठी एवढा नवस बोलण्याचा काय काम?… “

“ अहो जरा काहीतरी वाटू द्या नवीन नवीन संशोधनासाठी ती बाई नऊ महिने अडकून पडली तिथे… बाई म्हणून परत आली.. हो ओढ असते ना आम्हा बायकांना घराची. तिच्याबरोबर तो बाप्या एकटा असता ना तर कधीच मरून गेला असता.. बाई होती म्हणून सगळ धीराने निभावलं.. !”

“ एवढं काही नाही हं.. ” मी म्हटलं !..

“ गप्प बसा.. बाथरूम मध्ये एकदा अडकून पडला होता तर केवढा गोंधळ केला. चार धक्के बाहेरून लागवले तेव्हा ती बाथरूमची कडी निघाली.. पंधरा मिनिटात पॅनिक झाला होता तुम्ही… नऊ महिने तिने बिचारीने एकटीनं घीराने काढले कारण तिला दिसत होत.. आपलं घर ! आठ दिवस माहेरी गेले आणि दोन दिवसात परत आले तर तुम्ही म्हणता का एवढ्या लवकर आलीस? अहो ओढ असते बाईला घरची.. माहेर वगैरे पहिले काही वर्ष.. तुम्हाला कळायची नाही आम्हा बायकांची ओढ…. ” 

“ पण मग त्याच्यासाठी गणपतीला कशाला नैवेद्य दाखवायचा अरे विज्ञानवादी तरी हो नाहीतर अध्यात्मवादी तरी हो.. ! “

“ मी कुठलाही वाद घालत नाही लक्षात ठेवा. विज्ञान हवंच ते आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे पण मनस्वास्थ.. त्याला अध्यात्मही हवं ! आम्हा बायकांची भाबडी श्रद्धा असते आणि तीच तुम्हाला कितीतरी वेळा तरुन नेते.. पहा सुनीताबाईसुद्धा आपल्याबरोबर भगवद्गीता, वेद, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या म्हणून सुखरूप परत आल्या. मनोधैर्य वाढवणाऱ्या त्या गोष्टी होत्या त्यांना खात्री होती. आपल्याबरोबर देव आहे आणि आम्हा बायकांची श्रद्धा बरोबर काम करत असते बरं !. तुम्हाला ठाऊक आहे का त्या यानात एक तरी बाई का पाठवतात?.. ” 

“ का का? “ मी माझा अज्ञान प्रकट करत आजीजीने म्हणालो..

ती.. ” कारण बाईच्या जातीला ओढ असते घराची. अंतराळात गेलेली पहिली लायका कुत्री होती.. कुत्री.. मादी जातीची आणि बायका चिवट असतात बरं का.. कठीणातल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन विजय मिळवण्याचं कसब परमेश्वराने बाईला दिले बाई.. अशी सहजासहजी मरत सुद्धा नाही… ती लढते निकरानं शेवटपर्यंत.. ”.. आणि अजून बरच काही ती बोलत होती…

… मी मनात म्हणालो ‘ कुठून हिला विचारलं.. मुकाट्याने नारळ आणले असते तर झालं असत ना.. खाल्ल्या की नाही शिव्या ‘.. शेवटी मी तिला शरण गेलो आणि म्हणालो “ बाई पिशवी दे आणि पैसे दे. नारळ आणतो.. अगदी सोलून आणतो पण तू मला बोलून घेऊ नकोस.. सखे तू आहेस म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालले बरं..”

अशी शरणागतीची चार वाक्य टाकून मी मोकळा झालो आणि आज जेवायला मोदक मिळणार या आनंदात सुनीता विल्यम्सचे आभार मानून दुकानाकडे चालू लागलो…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments