सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “गेले मीच उद्धरून…” – कवी : केशवानंद ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

एके दिवशी तुकोबा 

असे तीरावरी आले..

अन् इंद्रायणीलागी थोडे 

हसून म्हणाले…

*

तुला द्यायचीच होती 

माझी गाथा परतुन..

मग पहिल्याच दिशी,

दिली का न तू आणून?

*

उगा मला तिष्ठविले असे 

तुझिया काठाला

दिस चवदा असा तू माझा

अंत का पाहिला.. ?

*

बोले इंद्रायणी मग..

तुम्ही भक्तांचे भूषण

अशा जगाच्या गुरुचा 

अंत मी कसा पाहीन.. ?

*

ऐका तुकोबा..

कधीच कोणा कळली न मात..

काय घडले सांगते 

खोल माझिया डोहात..

*

अशी गाथा त्या दिवशी 

आली डोहाच्या तळाशी..

जणू कुबेराचे धन 

आले माझिया हाताशी..

*

असा अमृताचा घट 

येता सहजी चालून..

कोणी देईल का ??

थोडी चव घेतल्या वाचून ?

*

तशी गाथा अवचित 

माझ्या हाताला लागली..

सारे विसरून जग 

मीही वाचाया घेतली..

*

पुरे चवदा दिवस केले 

तिचे पारायण

आणि मगच तुकोबा..

दिली तुम्हा परतून.. !

*

तुम्ही आभाळाएव्हढे..

अंत मी काय पाहीन..

गाथा तारी जगताला 

तिला मी काय तारीन ?

*

सारे जग शुद्ध होते..

बुडी माझ्यात घेऊन..

गाथा वाचून तुमची 

गेले मीच उद्धरून

कवी : केशवानंद

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments