वाचताना वेचलेले
☆ “जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
एकदा जपानमध्ये एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय चिणला गेला आहे.
त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतूहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षांपूर्वी हे घर नवीन बांधलं तेव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत
राहिली? हे जवळ जवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलंच आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरीही पाल आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!
हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.
.
.
.
कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता !
पालीसारखा एक नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यापासून काहीतरी नक्कीच शिकू शकतो.
तेव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीला (आई- वडील, पत्नी, पती, भाऊ, बहीण, मित्र) नेहमी आधार द्या. जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेव्हा “तुम्ही” म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण जग असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास.. ) तुटण्यासाठी एक क्षणाचं दुर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈