📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सासू सासरे नकोत – मग अनाथ मुलाशी लग्न करा… लेखिका : श्रीमती प्राजक्ता गांधी ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक 

मुलींनो,

तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता, तसा तुमचा नवराही खूप लाडा-कोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हांला वाटतं, तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.

लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्या सोबतच सुरू होतो.

आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो, तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं, ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही, हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.

तुमची पाळी आल्यावर लगाबगीने तो तुमच्या उशा-पायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल, अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो, हे माहीत नसतं. कारण त्यांच्या आईला (कदाचित्) तेवढा त्रास झालेला नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.

नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिकमतीवर काय करू शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.

तुम्ही जसं उंची, अनुरूपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता, तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी ‘हो’ म्हणावं, असं होत नसतं.

तुम्हाला तुमची आई प्रिय आहे, तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो, तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरू नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न, हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.

सासूसासरे नक्कोच असतील, तर अनाथ मुलाशी लग्न करावं !

तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनिटं बोलला की तुमचा जळफळाट होणार, हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग करु नका.

आईबरोबरच मित्र, मैत्रिणीही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.

दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला- गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इत्यादी बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.

आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल, ते समोरून सांगावं. मुलांना आईने ‘मनातलं ओळखून दाखव बरं‘ सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.

खरे तर जनमानसात हा बदल होणे गरजेचे आहे.तेव्हाच मुलामुलींचे संसार खुशहाल  होतील व ते आनंदात राहतील.

लेखिका :श्रीमती प्राजक्ता गांधी

प्रस्तुती : श्रीमती उषा नाईक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments