श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

उगवतीचे रंग – तू गाये जा ? ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

तू गाये जा…

बेकरार दिल तू गाये जा

खुशियों से भरे वो तराने

जिन्हे सुनके दुनिया झूम उठे

और झूम उठे दिल दीवाने…

‘दूर का राही’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायलेलं हे सुरेख गाणं ! असेच आयुष्य जणू जगल्या सुरील्या आवाजाच्या धनी असलेल्या प्रसिद्ध गायिका चारुशीला बेलसरे. त्यांच्या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. आई-वडिलांच्या असलेल्या संगीताचा वारसा घेऊन हे रोप वयाच्या अकराव्या वर्षीच बहरलं आणि मग पुढे त्याचा वटवृक्ष होऊन रसिकांवर सूर-सुमनांचा वर्षाव करू लागला.

गाणं चारुशीलाच्या रक्तातच होतं. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी आपल्या बोबड्या बोलात ‘ विठ्ठला समचरण तुझे धरिते ‘ हे गीत ती गुणगुणायला लागली. या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम केलं ते तिच्या आई-वडिलांनी आणि त्यातून एवढी सुंदर मूर्ती घडवली की प्रत्यक्ष हृदयनाथ मंगेशकरांनी तिला ‘ बाल लता ‘ असं संबोधलं. आई वडील हे तिचे आद्य गुरु झाले. आपली नोकरी सांभाळून त्यांनी स्वतःची गायनकला जोपासली आणि विकसित तर केलीच पण या आपल्या चिमुकलीला गान कलेचा वसा आणि वारसा दिला. ‘ बोलात बोबडीच्या संगीत जागविले. ‘ आणि मग एक एक सूर अमृतात न्हावून येऊ लागला.

वयाच्या केवळ ११ व्या वर्षीच तिने आपला स्वतंत्र संगीताचा कार्यक्रम केला. १५ फेब्रु. १९७० या दिवशी हा कार्यक्रम झाला. तो ही तिकीट लावून. अर्थात आई-वडील साथीला होतेच. या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी हजर होती. तिच्या गायनाला बाल लता म्हणून दाद देणारे स्वतः हृदयनाथ मंगेशकर, पंडित सी आर व्यास, शिरीष पै, गायक अरुण दाते, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग. या कार्यक्रमात शाळकरी विद्यार्थिनी असलेली चारुशीला एवढ्या आत्मविश्वासाने आणि तन्मयतेने गायली की श्रोत्यांसह या मान्यवरांची दाद तिला मिळाली.

मग तिचे एकेक पाऊल पुढे पडत गेले. प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी तिचे गाणे ऐकले आणि तिला आपल्या चित्रपटात संधी देण्याचे मान्य केले. तसेच प्रख्यात गायक आणि संगीतकार बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनीही तिचे गायन ऐकून तिला शाबासकी दिली आणि मग ‘ कार्तिकी ‘ या चित्रपटासाठी तिचं पहिलं गीत रेकॉर्ड झालं. त्यानंतर १९७५ पर्यंत आहुती, बाईने केला सरपंच खुळा, पाच रंगाची पाच पाखरं, चंदनाची चोळी अंग अंग जाळी या पाच चित्रपटातील गीते गाण्याची संधी मिळाली या काळात राम कदम, सुधीर फडके, एल बी सारंग, विश्वनाथ मोरे, यशवंत देव, शांकनिल, शशिकांत राजदेरकर यांच्यासारख्या विविध संगीतकारांकडून त्यांना गायनातील बारकावे शिकता आले. केवळ नववीत असताना प्रख्यात संगीतकार सी रामचंद्र यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गीते त्यांनी गायली.

याच काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी गीत रामायणाचे आणि सुगम संगीताचे कार्यक्रम करण्याची संधी त्यांना मिळाली यातूनही त्यांच्या गायनात परिपक्वता येत गेली. मराठी चित्रपटांप्रमाणेच अनेक नाटकांमध्ये पार्श्वगायनाची संधीही त्यांना मिळाली. त्यामध्ये यज्ञ, दुभंग, प्रतापगड, भक्तीमहिमा, दुर्गा झाली गौरी, वृक्षवल्ली आम्हा, सत्य महाभारत अशा नाटकांचा समावेश आहे. १९७५ च्या सुमारास दूरदर्शनवर झालेल्या ‘ किलबिल ‘ या कार्यक्रमात त्यांनी काही बालगीते गायली. याच कालावधीत प्रसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ‘ रिमझिम झरती श्रावणधारा.. ‘ हे गीत गायले. काही गीते सुरेश वाडकर यांबरोबर गायली. दिल्ली दूरदर्शनवरही कार्यक्रम झाले. मुंबई आकाशवाणीवर भावसरगम या कार्यक्रमात गजानन वाटवे, श्रीनिवास केसकर, प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगम यांच्यासारख्या संगीतकारांनी त्यांच्याकडून विविध लोकप्रिय गीते गाऊन घेतली आणि एक गायिका म्हणून चारुशीला बेलसरे हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र बाहेरही रसिकमान्य झाले.

पं सी आर व्यास हे शास्त्रीय संगीतातील मोठे व्यक्तिमत्व ! त्यांनी चारुशीला यांना सहा वर्ष शास्त्रीय संगीत शिकवले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी आणि बसंत, मालकंस, अहिरभैरव, यमन आदी विविध राग त्यांनी शिकवले. ‘फुल खिले है गुलशन गुलशन ‘ हा लोकप्रिय कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर सादर करणाऱ्या बेबी तबस्सुम यांच्याबरोबर चारुशीला यांनी अनेक ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम ‘ तबस्सुम हिट परेड ‘ या नावाने केले केवळ पाच वर्षात जवळपास २००० कार्यक्रम संपूर्ण भारतभर त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये नामवंत कलाकारांची हजेरी असायची.

कोणाही व्यक्तीला आपला शिष्य म्हणून सहजपणे न स्वीकारणारे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी जेव्हा चारुलता यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना शिकवण्याचे मान्य केले आणि पंडितजींनी कडून त्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या. या काळात त्या एसएनडीटी महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात संगीत शिकवत होत्या. परंतु गायन शिकायचे तर त्यासाठी वेळ दिला पाहिजे असे पंडितजींनी सांगितल्यावर त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला. आणि पूर्ण वेळ संगीताला वाहून घेतले. पंडितजींनी जवळपास दहा वर्षे त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि त्यांची अवस्था ‘ देता किती घेशील दो करांनी ‘ अशी झाली.

आपणा सर्वांना मोहन जोशी हे नाव उत्तम अभिनेते म्हणून माहिती आहे परंतु ते उत्तम गातातही हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. त्यांच्यासोबत चारुशीला यांनी ‘ गोविंदा आला रे ‘ या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमामध्ये अनेक गीते गायली. साक्षात स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमोर त्यांची गाणी त्यांनी गाऊन दाखवली आणि लतादीदींनी त्यांचे खूप कौतुक केले. मॉम कॅसेट कंपनीने त्यांची ‘ हिट्स ऑफ लता ‘ ही कॅसेट प्रसारित केली. ती अतिशय लोकप्रिय ठरली.

पुढे त्या पुण्याला स्थायिक झाल्या. योगायोगाने त्यांची संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ अरविंद नेरकर यांच्याशी भेट झाली. मग त्यांच्या दोघांच्या सहकार्यातून अनेक सुंदर कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यामध्ये मन हे राम रंगी रंगले, पांडुरंगी मन रंगले, दिंडी चालली चालली, अमृतवाणी ज्ञानियांची, रंग भक्तीचे यासारखे अनेक कार्यक्रम सादर झाले. या कार्यक्रमांना डॉ अरविंद नेरकर यांचे रसाळ निवेदन आणि चारुशीला यांचे सुश्राव्य गायन असा सुरेख संगम असायचा. हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. २४ गायत्री मंत्रावर आधारित २४ गायत्री मंत्राचा लाभ सांगणारा ‘ स्वरगायत्री ‘ हा आगळावेगळा कार्यक्रमही त्यांनी सादर केला. त्यासोबतच स्वरांच्या हिंदोळ्यावर सप्तसूर रंगले, चांदणे शिंपीत जाशी, रागांचे रंग यासारखे अनेक सुगम संगीताचे अनेक कार्यक्रम त्यांनी डॉ नेरकरांसोबत सादर केले आहेत आणि ते रसिकांचे अतिशय आवडते आहेत. केवळ इथेच त्या थांबल्या नाहीत तर साहित्यातील शब्द आणि संगीतातील गांधार असा विचार डोळ्यासमोर ठेवून या दोघांनी ‘ शब्दगांधार ‘ या दिवाळी अंकाची निर्मिती केली आणि गेल्या पंधरा वर्षापासून दर्जेदार दिवाळी अंक वाचकांना हे दोघे सादर करीत आहेत.

संगीत क्षेत्रात जवळपास ५० वर्षानूनही अधिक काळ साधना, तपश्चर्या करणाऱ्या आणि आपले अमूल्य योगदान देणाऱ्या चारुशीला यांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा अनुभव या क्षणी येतो आहे. यापुढील आयुष्यात समाजातील उपेक्षित घटकांची जास्तीत जास्त सेवा करायची आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम करायची असे त्यांनी ठरवले आहे. विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. विजया फाउंडेशनच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार त्याचप्रमाणे मॉम इंडिया कंपनीतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे इतरही अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना लाभले आहेत. नुकताच स्वरगायत्री प्रतिष्ठान या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. या गानतपस्विनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments