सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ प्रतिक्षा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात कठीण वा परीक्षा बघणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वाट बघणं,प्रतिक्षा. कुठलीही आनंदाची गोष्ट अगदी अचानक मिळाली तर आपण ह्या “वाट बघणं”वा “प्रतिक्षा”फेजला सरळसरळ मुकतो. पण एखाद्या आनंदाच्या गोष्टीची मिळण्याची खात्री असेल तर ह्या फेजमधून आपल्या प्रत्येकाला हे जावंच लागतं. ह्या फेजला आपल्याआपल्या गमतीच्या भाषेत “धाकधूक वा पाकपुक होणं” असं म्हंटतो. पण खर सांगायच़ तर ह्या फेजमधून जाणं तसं अवघड असतं बघा. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे असं वाटतं ही फेज मेली संपता संपत नाही लवकर. असं वाटतं हा कालावधी खूप प्रदीर्घ आहे. असो

ही फेज आत्ता आठवायचं कारण म्हणजे आता नुकताच पावसाळा सुरू होतोय. तमाम शेतकरी वर्ग चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असतो.पावसाळा सुरू झाला म्हणजे पाऊस हा येणारच नक्की. त्यामुळे तमाम शेतकरी वर्ग घरातील,स्वतः जवळील असेल नसेल ते पणाला लावून पेरणी,मशागत करायला लागतो. त्याचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले असतात आणि मन चित्त सगळं वाट बघण्यात,पावसाच्या प्रतिक्षेत,अगदी चातक पक्षासारखं.

हल्लीची पिढी सुदैवी म्हणावी की नाही ह्या बाबतीत संभ्रमच आहे. कारण नशीबाने ह्या पिढीवर कुठल्याही बाबतीत वाट बघण्याची वेळ फार कमी येते,नशीबाने त्यांनी तोंडातून काढताक्षणी हवे ते मिळण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी असतं. पण त्यामुळेच का होईना त्यांना वाट बघणं माहित नसल्याने कदाचित त्या मिळणाऱ्या गोष्टीची खरी किंमत ही कळतच नाही हे खरं. आणि ती गोष्ट मिळवितांना देणा-याला आणि घेणाऱ्या ला काय काय कष्ट पडतात हे त्यांचं त्यांनाच माहित.

प्रतिक्षा,सहनशक्ती,धीर संयम ही सगळी सख्खी भावंडच.कुठलिही गोष्ट मिळवितांना जरा प्रतिक्षा करावी लागली तर तिची किंमतही कळते आणि गोडीही जाणवते.ती गोष्ट मिळेपर्यंत धीर धरला,संयम बाळगला,तर आपल्याला पुढील वाटचालीत खूप लाभ हा होतोच.गोष्ट सहजासहजी मिळाली नाही तरी नाउमेद न होण्यासाठी सहनशक्ती कामी येते.

आताही पेरणी झालेल्या शिवारात आभाळाकडे डोळे लावून बसणा-या बळीराजाला बघितले की खरंच पोटात कालवाकालव होते.म्हणूनच त्याला एकाअर्थी बळीराजा हे नाव सार्थ ही वाटतं. असं वाटतं त्याची ही प्रतिक्षा लौकर संपावी व सगळी भुमी सुजलाम सुफलाम व्हावी.

आताही विदर्भात खास करून अमरावती जिल्ह्यात कडक उन्हाचा सामना करतांना अक्षरशः नाकी नऊ येणं म्हणजे नेमके काय हे समजले. परंतू आता कालपासून असं वाटतंय आता एक दोन दिवसांत प्रतीक्षा संपून पावसाच्या जलधारा नक्कीच बरसणार. त्याप्रमाणेच गुरुवारी पहाटे पहाटे थोडा का होईना पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळाला.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments