प्रा. सौ. सुमती पवार

? विविधा ?

☆ रस्ते… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

रस्ते, अनेक असतात वाट वळणाचे वाकडे तिकडे सरळ दिशाभूल करणारे आपल्या नशिबी कोणता आहे, हे माहित नाही म्हणून गप्प बसायचे नसते, वाट जरी लहान असली तरी ती मुख्य रस्त्याला मिळणार आहे हे ध्यानी ठेवायचे असते… 

पाहिजे ती दिशा दाखवणारेही भेटतात, नाही असे नाही, चांगुलपणा पार संपला असे मानण्याचेही कारण नाही, आमच्या पिढीत अशी चांगला रस्ता दाखवणारी महान माणसे होती, म्हणून मूठ मूठ धान्य जमवून वसतीगृहे काढून, घरादारावर तुळशीपत्र ठेवून कर्वे, व कर्मविरांसारख्यांनी अनेक रस्ते दाखवून उपकृत केले व साने गुरूजींसारखे महात्मे शिकून देशासाठी समर्पित झाले.

राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मियांसाठी वसतीगृहे स्थापन करून कागल सारख्या छोट्या रस्त्यावरून डॅा. आनंद यादव पुण्याच्या रस्त्याला लागून माय मराठीची सेवा करण्यासाठी पुणे येथे डीन झाले, अन्यथा रोज भाकरीची भ्रांत असणाऱ्या अशा कुटुंबातील किती मुले रस्ता चुकून त्यांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.

म्हणून रस्ते लहान असले तरी त्यांना जोडणारे हमरस्ते असतात हे लक्षात घेऊन आपण चालत रहायचे असते म्हणजे आपण बरोबर इच्छित स्थळी पोहोचतो. ध्येय आणि निष्ठा मात्र प्रामाणिक हवी. वाट कितीही लहान असली तरी ती वाट असते सतत पुढे पुढे जाणारी व आपली ताकद संपली की चालणाऱ्याला महान रस्त्यावर सोडून महान बनवणारी त्या अर्थाने वाटही महानच असते ना?

ती सांगते, जा बाबांनो पुढे, माझे काम संपले, मी पुढचा मार्ग दाखवला आहे, तो थेट शिखरावर जातो, तुमच्या पायात मात्र बळ हवे, ते वापरा व इच्छित स्थळी पोहोचा. सारेच महान, लहान वाटेवरून चालतच महान झाले हे आपण विसरता कामा नये. आंबेडकरही आंबेवडीहून चालत(कोणी बैलगाडीत बसवेना)थेट संसदेत पोहोचत संविधान कर्ते झाले, “ आचंद्रसूर्य” तळपण्यासाठी. म्हणून आधी त्या वाटेला वंदन करा ज्यामुळे तुम्ही हमरस्त्याला येऊन मिळालात. रस्ते उपलब्ध असले तरी ते कसे वापरायचे याचे ज्ञान हवे नाहीतर सारीच गणिते फसतात. दिशाभूल करणाऱ्या पाट्या व चकवे ज्यांना ओळखता आले ते थेट मुक्कामी पोहोचतात बाकी मग आयुष्याची संध्याकाळ झाली तरी चाचपडत वेड्यामुलासारखे गोल गोल त्याच रस्त्यावर फिरत राहतात. रस्ते असले तरी अंगभूत शहाणपणा हवाच ना? तो नसेल तर शंभर रस्ते असले काय नि नसले काय? तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. रस्ते दिशादर्शक व शहाण्या मुलासारखे असतात. विना तक्रार घेऊन जातात, काटेकुटे वादळवाऱ्याची पर्वा न करता न थांबता…

कारण.. ” रस्ता कधीही थांबत नसतो, क्षितिजा पर्यंत”…

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments