सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
मराठीतील आपल्या पहिल्याच पौराणिक कादंबरीने इतिहास घडविणारे सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणजे शिवाजीराव सावंत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावी ३१ ऑगस्ट १९४० ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीरावांचे शालेय शिक्षण गावातच झाले. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते कोल्हापूरात नोकरीला लागले.
कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत काही वर्षे अध्यापनाचे काम केले. तेथून पुण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या ‘ लोकशिक्षण ‘ मासिकाचे सुरवातीला सहसंपादक आणि नंतर संपादक म्हणून काम पाहिले.
भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल त्यांना सुरुवातीपासून सार्थ अभिमान होता. ‘ माझा भारत म्हणजेच महाभारत’, हे समीकरण एकदा मनात रुजल्यावर अभ्यासूवृत्तीने त्यांनी महाभारताचा सखोल व्यासंग सुरू केला.या अभ्यासातून अस्मिता विसरू पहात असलेल्या समाजपुरुषाला सूर्यपुत्र, ‘ मृत्युंजय ‘ कर्ण आपत्तीतही धैर्यशाली आणि तेजस्वी बनवेल असे उत्तर त्यांना मिळाले. मग प्रदीर्घ संदर्भशोधन, सखोल व उलटसुलट चिंतन-मनन आणि डोळसपणे टिपलेले निरीक्षण यातूनच रससंपन्न अशा प्रदीर्घ कादंबरीचा जन्म झाला . मृत्युंजयच्या लिखाणासाठी त्यांनी थेट कुरूक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. अत्यंत सत्प्रवृत्त,समर्पणशील, स्वाभिमानी अशा कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाची तितकीच गौरवास्पद प्रकाशमय बाजू या कादंबरीत मांडली आहे.
‘मृत्युंजय ‘ही १९६७ साली लिहिलेली त्यांची पहिलीच कादंबरी.या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि ‘ मृत्युंजयकार ‘ हीच ओळख कायम झाली.
कादंबऱ्यात मानदंड ठरलेल्या या कादंबरीला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. १९८६ साली कलकत्त्याच्या ‘ विवेक संस्थान ‘ या बंगाली वाचकांच्या संस्थेने ‘ पूनमचंद भुतोडिया ‘ हा सर्जनशील साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला. दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने १९९५ सालचा बारावा ‘ मूर्तिदेवी पुरस्कार ‘भारताचे उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते देऊन सावंतांना सन्मानित केले.हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवणारे सावंत हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.
‘ मृत्युंजय ‘ च्या एकतिस आवृत्त्या निघाल्या. हिंदी, कन्नड, गुजराथी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.इंग्लिशमधील भाषांतराने मूळ मराठी कर्णगाथा आंतरराष्ट्रीय साहित्यात समाविष्ट झाली. तिच्या गुजराथी भाषांतराला ‘गुजराथ साहित्य अकादमी’ पुरस्कार आणि पुढे ‘केंद्रीय साहित्य अकादमी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
सावंतांनी कादंबरी, चरित्रलेखन, व्यक्तिचित्रे, ललित निबंध असे विविध प्रकारचे कसदार लेखन केले.
सावंतांची छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर लिहिलेली ‘ छावा’ ही कादंबरी पण खूपच वाचकप्रिय ठरली.तिचाही हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला.ही कादंबरी पण महाराष्ट्र राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.
सावंतांनी लिहिलेले ‘मृत्युंजय’ नाटक चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर पुरे एक तप सादर केले. तसेच ‘ छावा’ हे नाटकही त्यांनीच सादर केले.दोन्हीही नाटके खूपच रसिकप्रिय होती.
भारतीय समाजमनातीला एक आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘ युगंधर ‘ ही कादंबरी त्यांनी सिद्ध केली.या कादंबरीचाही हिंदी अनुवाद प्रकाशित झाला.
भव्योदात्त जीवनाबद्दल त्यांना वाटणारा आदर आणि ओढ मृत्युंजय, युगंधर,छावा या पुस्तकातून उत्कटतेने प्रकट होते. शब्दब्रह्माचे वरदान लाभलेल्या त्यांच्या लेखणीतून अत्यंत ओजस्वी शब्द सुमनांनी ही व्यक्तिमत्त्वे साकारताना हिऱ्याला जणू सुवर्ण कोंदणच लाभले.
त्यांनी लिहिलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची ‘ लढत ‘ ही चरित्र कहाणी, भाई मनोहर कोतवाल यांची ‘ संघर्ष ‘ ही चरित्र कहाणी आणि माननीय पी. के. अण्णा पाटील यांच्यावरील ‘पुरुषोत्तम नामा ‘ ही चरित्र कहाणी प्रकाशित झालेली आहे.
‘अशी मने असे नमुने ‘, ‘मोरावळा’ ही व्यक्तीचित्रे प्रसिद्ध आहेत. १९८३ साली ते बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
असा हा सिद्धहस्त लेखक दि.१८सप्टेंबर २००२ ला आकस्मिकपणे आपल्यातून निघून गेला. तरीही त्यांच्या अजरामर कलाकृतीतून ते सदैव साहित्य दरबारात वास करणार आहेत. त्यांना विनम्र अभिवादन. ?
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈