श्री जगदीश काबरे

☆ “आदर फक्त उच्चारी नको, मनापासून हवा–☆ श्री जगदीश काबरे ☆

परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी जेव्हा अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, “मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. ” त्यांच्या ह्या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्क बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण ह्या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखावालाच पाहीजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असे नाही वाटत?

वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पध्दतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का मजवातो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे!

कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एकाप्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनीचतेची सुरुवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला आती महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा.

वाचकहो, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, नेमके आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचे असे झाले की, नुकताच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काँ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ दिला म्हणून एका प्राध्यापिकेवर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे अवमान केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारले गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिले. त्या पत्रातही मराठी भाषेच्या व्याकरणातील त्याने असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचे व्याकरण कळते का हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलिस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचले आहे काय? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहित आहे काय?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरे झाले.

हे ‘उच्चारी आदर’ देण्याचे प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सअप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेले दिसतेय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगायला लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. इ. इ. त्यावेळी मला हसू येते. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरावणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजींचा अपमान करत नाही असे त्यांना वाटते काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचे राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणेच महत्वाचे वाटते. पण खरेतर शब्दांपेक्षा त्याच्या मागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. पण आपल्याकडे आपण उच्चारवाने काय बोलतो यालाच महत्व दिले जाते, आणि हे आपल्या दांभिक संस्कृतीला साजेसेच आहे.

विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान कारतात असे होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसेच देवी आणि आईला सुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा जर अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजीचा एकेरी उल्लेख का खटकावा?

‘शिवाजी कोण होता?’ या पानसरे लिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यात आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून नॉन ईश्शुचा ‘ईश्शु’ करणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातील मतितार्थ बदलणार आहे का? 

तसेही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस म्हणून उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणे आवश्यक आहे. पण ज्यांचे भाषेचे ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तींच्या आदर्श आचारणापेक्षा नुसते नामस्मरणच महत्वाचे वाटते. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचे काहीच नसते. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून…

1) कोणाला एकेरी नावाने संबोधले तर त्यांचे मोठेपण कमी होते असे मला वाटत नाही. त्यांचे मोठेपण त्यांच्या कर्तृत्वात असते… नावात नाही.

2) पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” वा प्रा. नामदेवराव जाधव लिखित “खरा संभाजी” अशी कितीतरी पुस्तके आहेत जिथे एकेरी उल्लेख आढळेल. पण याचा अर्थ हा नक्कीच नाही की या लेखकांचा दोन्ही छत्रपतींचा अवमान करण्याचा उद्देश होता. उलट ही दोन्ही पुस्तके वाचल्यावर कळेल की, वास्तववादी चरित्रे तर याच पुस्तकात आहेत.

3) याशिवाय प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘दगलबाज शिवाजी’ हेही एक पुस्तक आहे. नाव वाचून तेव्हाही लगेच लोक असेच भडकत होते. पण जेव्हा हे पुस्तक बाजारात आले, लोकांनी वाचले आणि “दगलबाज” या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तेव्हा टीका करणार्‍या लोकांनीच प्रबोधनकार ठाकरे यांचे कौतुक केले.

4) सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. एवढेच काय पण मागच्या शतकातील अनेक इतिहासकारांनी – अगदी सेतू माधवराव पगडी यांच्यापासून अनेकांनी शिवाजी राजांचा एकेरीच उल्लेख केला आहे. याचा अर्थ या सगळ्या थोर माणसांना शिवाजी राजांचा अपमान करायचा होता असे म्हणता येईल का?

स्वतःच्या नावापुढे शिवभक्त लावणे, गळ्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा अथवा राजमुद्रा यांचे लॉकेट घालणे ही तर हल्ली फॅशन झाली आहे. पण काय या गोष्टी करून महाराजांवर आपलाच हक्क प्रस्थापित झालाय असे ते समजतात का? खरे पहाता जो कोणी शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवत असेल तर तो जातपात पाळूच शकत नाही. कारण स्वतः महाराज धर्मनिरपेक्ष (secular) म्हणजेच त्या काळाततील 18 पगड जातीतील सर्वांना एक साथ घेऊन स्वराज त्यांना एकसमान मानणारे होते… ते मुस्लिम द्वेष्टे तर नव्हतेच नव्हते. पण हे सर्व शिवभक्त मानतात का? नाही. त्यामुळे असे खोटे शिवभक्त होण्यापेक्षा, आणि एकेरी उच्चारामुळे राजांचा अपमान होतो, असे समजण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलेली थोडी तरी पुस्तके मन लावून त्यांनी वाचली पाहिजेत आणि त्याप्रमाणे आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराज बऱ्यापैकी समजतील. तसेही महाराष्ट्र सोडून सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करूनच त्यांचा इतिहास शिकवला जातो, त्यामुळे एकेरी नावाने त्यांचे कर्तृत्व तसूभरही कमी झाले आहे असे मला तरी वाटत नाही. तेव्हा राजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शंख करण्यापेक्षा स्वतःला शिवभक्त समजणाऱ्यांनी राजांना ‘डोक्यावर न घेता डोक्यात घ्यावे’, हेच एक मागणे.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments