सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ११) – मारवा ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
‘निरोपाच्या क्षणातही सौख्याचा सहभाग आहे
आत्ता दूर गेलो तरी पुनर्मिलनाची आस आहे’….
असं कधीतरी लिहून गेले होते. तार्किकदृष्ट्या लिहायला सोपं आणि सत्यही, मात्र प्रत्यक्ष असे क्षण निभावणं हे फार कठीण, आतून हलवून सोडणारे! एक काहीतरी जे काही काळ आपल्यासोबत असतं ते मागे सुटत चाललंय ही आर्तता आणि नवीन काहीतरी आपल्याशी जोडलं जाणार असल्याची जाणीव असं काहीतरी पराकोटीच्या वेगळ्या गोष्टींच्या संमिश्रतेत भरून गेलेले हे क्षण… म्हणूनच मन कातर करणारे! निसर्गसुद्धा ह्याला अपवाद नाही… म्हणून तर अशा वेळेला कातरवेळा म्हटलं जातं! आपल्या जाणिवा जागृत असतील तर ‘संधिप्रकाशातील’ ह्या क्षणांत मनाचं आपसूक कातर होणं जाणवतंच! मानवाच्या अशा सूक्ष्म जाणिवांच्या आधारेच रागगायनाच्या शास्त्रनिर्धारित वेळा निश्चित केल्या गेल्या आहेत.
वातावरणातली ही जिवाला वेड लावणारी ‘अपूर्णतेची गोडी’ घेऊनच अवतरणारा ‘मारवा’… कातरवेळचा म्हणजे संध्याकाळचा संधिप्रकाशी राग! षाडव जातीचा हा राग… पंचमवर्जित… नि (रे) ग म(तीव्र) ध नि सां, (रें) नि ध म(तीव्र) ग (रे) सा असे मारव्याचे आरोह-अवरोह आहेत… अर्थातच आपण मारवा थाटाचे सूर पाहिलेत त्यानुसार रे कोमल आणि म तीव्र आहे आणि थाटाचंच नाव रागाला आहे त्यामुळं हा मारवा थाटाचा जनकराग आहे…
ह्या रागाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण रागाचा डोलारा हा रिषभ व धैवत ह्या दोन सुरांच्या आधारे पेलला जातो… रे व ध च्या तुलनेमधे आधारस्वर षड्जालाही कमी महत्व असणारा असा हा राग म्हणूनच अत्यंत आर्तभावना जागृत करतो… म्हणूनच कदाचित मनाची कासाविशी जशीच्या तशी उतरते ती मारव्याच्या सुरांतून! अर्थातच दोनच सुरांनी राग नाही उभा राहू शकत त्यामुळं इतर सुरांना टाळता येत नाहीच, परंतू विशेषत: ह्या रागात इतर सूर हे फक्त रे आणि ध ला जोडण्याइतपतच वापरले जातात म्हटलं तर वावगं ठरणार नाही… थांब्याची जागा ही फक्त रे आणि ध हेच सूर आणि अर्थतच हेच त्याचे अनुक्रमे वादी आणि संवादी सूर आहेत.
सुमन कल्याणापुरांचं ‘शब्द शब्द जपुन ठेव बकुळिच्या फुलापरी’ हे गीत त्यातला नेमका भावार्थ ज्या सुरांतून स्पष्ट होईल त्या मारव्याच्या सुरांतच विश्वनाथ मोरे ह्या संगीतकारांनी बांधलेलं आहे आणि जीवनातलं एक मोठं तत्वज्ञान अधोरेखित करणारं ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ हेही हृदयनाथांनी मारव्याच्या सुरांत चपखलपणे सजवलं आहे. ‘मावळत्या दिनकरा’ किंवा ‘मायेविण बाळ क्षणभरी न राहे’ ही गीतं मात्र मारव्याची आठवण करून देतादेता पुढे इतर सुरांना सामावून घेत वेगळा रंग निर्माण करतात.
साज और आवाज ह्या चित्रपटातलं ‘पायलिया बावरी’ आणि कोतवाल साब मधलं ‘ना फूलों की दुनिया’ ही गीतंही वेगळ्या ढंगानं जवळपास ह्याच सुरांत रंगलेली! साथी रे भूल ना जाना मेरा प्यार हे गाणं मात्र मारव्याच्या सुरावटीतून उमलताना पुढे मात्र इतर सुरांच्या सोबतीने इतकी प्रचंड वेगवेगळी वळणं घेतं कि गायकासाठी ते ‘चॅलेंज’ ठरावं!
सुरवातीच्या भागांमधे चर्चा केल्यानुसार भारतीय शास्त्रीय संगीताची सूक्ष्मतेतून उलगडत जाणारी महानता आपल्याला मारवा, पुरिया आणि सोहनी ह्या तीन रागांमधूनही जाणवेल. तीनही रागांचे आरोह अवरोह अगदी तेच, मात्र प्रत्येक राग संपूर्ण वेगळा दिसतो.
मारव्याचा संपूर्ण डोलारा पेलून धरणारा रे व ध हे पुरियामधे अगदी दुर्बल होऊन जातात, ग वरून सा वर येताना आणि नि वरून म वर येताना अनुक्रमे रे आणि ध ला अलगद स्पर्श करायचा इतकंच त्यांचं स्थान! प्रवासात काही गावांच्या नावाची पाटी दिसते पण आपली गाडी त्या गावाकडे वळून तिथे थांबत नाही, फक्त मधे ते गाव लागतं म्हणून तिथून गाडी न्यावी लागते तसाच हा प्रकार! ग आणि नि हे पुरियाचे वादी संवादी स्वर! थोडक्यात दोंहीतले महत्त्वाचे आणि दुर्बल स्वर हे अगदी विरुद्ध आहेत.
सोहनीचं चलन तर आणखीनच वेगळं! त्याचं केंद्रस्थान हे वरचा म्हणजे तारषड्ज आणि विस्तारक्षेत्रही मुख्यत्वे त्याच्या आसपासच! शिवाय रागाच्या चलनामधेही मारवा व पूरियापेक्षा भिन्नता आहेच. ह्या तीनही रागांचा थाट मारवाच आहे मात्र मारवा व पुरिया हे संध्याकाळचे संधिप्रकाश राग तर सोहनी हा मध्यरात्री नंतरचा राग आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतातील हे बारकावे अनुभवता आले तर त्याहून मोठा आनंद नाही.
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈