सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत (भाग – १४) – ‘भावाभिव्यक्ती’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆  

मागच्या भागात यमन रागाचं पूर्वीचं नांव ‘एमन’ आणि त्याच्या सुरांतून सहजी प्रकट होणाऱ्या मानवी मनाच्या कोणत्याही भावाभिव्यक्तीशी जोडला गेलेला ह्या नावाचा अर्थ आपण पाहिला. कोणत्याही मनोवस्थेतील भाव चपखलतेने प्रकट करणारा म्हणून जणू आपल्याच मनाशी संवाद साधणारा ह्या अर्थाने ‘ए मन’ असं दिलं गेलेलं नांव म्हणजे मानवानं त्याच्याकडच्या शब्दसंपत्तीचा केलेला चपखल वापर असं म्हणावं लागेल. मात्र काही संशोधकांच्या मते मानवाच्या आयुष्यात शब्दांची भाषा येण्यापूर्वीही संगीत काही प्रमाणात अस्तित्वात होतं. ह्याचाच अर्थ संगीताचा उगम हा आदिमानवासोबतच झाला असं म्हणायला हरकत नाही. पुढं जसजसा मानव उत्क्रांत होत गेला तसतसं संगीतही विकसित होत गेलं असावं.

विचार करता लक्षात येईल कि पूर्वीचा रानटी अवस्थेतील मानव हा निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारा होता. आपल्या गरजा भागवण्याचे आणि सुख मिळवण्याचे मार्ग त्याने निसर्गातूनच शोधून काढले. अत्यंत बुद्धिमान, कल्पक व प्रगल्भ मेंदू लाभलेल्या मानवाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्रमुख गरजांसोबतच ‘कोणकोणत्या गोष्टींतून आपल्याला सुख मिळतं’ हे लक्षात येत गेलं असावं आणि संगीत हा प्रत्येकच माणसाला सुखी करणाऱ्या सर्वोच्च मार्गांपैकी एक आहे हेही जाणवलं असावं. कारण संगीताचा संबंध थेट मनाशी आहे.

मागे ‘सप्तककथा’ ह्या लेखात आपण पाहिलं होतं कि काही विचारवंतांचं आणि शास्त्रज्ञांचंही मत आहे कि संगीत ही मानवाकडून उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली गोष्ट आहे, ती माणसाची सहजनिर्मिती आहे. माणूस जसं हसणं, रडणं, बोलणं, चालणं-फिरणं आपोआप शिकतो तसंच मनातले भाव व्यक्त करायलाही आपोआपच शिकतो की! किंबहुना तो शिकतो म्हणण्यापेक्षा ते प्रत्येक माणसाकडून सहजपणेच घडतं. संगीताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्याचं सहज गुणगुणणं हा त्याच्याकडून होत असलेल्या संगीताच्या सहजनिर्मितीचा भरभक्कम पुरावा आहे! म्हणजे संगीत ही एक स्वाभाविक क्रिया आहे.

आदिमानव अन्न ही गरज भागविण्यासाठी जंगलात हिंडून प्राण्यांची शिकार करत असे. त्यावेळी कानांवर पडलेल्या पशु-पक्षांच्या आवाजाची नक्कल करण्याचा तो प्रयत्न करी. हळूहळू त्यानं आत्मसात केलेल्या ह्या नादांचा वापर तो आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करताना करू लागला असावा आणि हाच संगीताच्या उत्पत्तीचा पहिला अविष्कार असल्याचं मानलं जातं. सप्तककथेमधेच ‘पशु-पक्षांच्या आवाजातून झालेली सप्तकनिर्मिती’ हाही भाग आपण पाहिला. सप्तकनिर्मिती ही संगीतशास्त्र प्रगत होण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा भाग आहेच, मात्र त्याचं उगमस्थान हे मानवानं सहजपणे त्या आवाजांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात दडलेलं आहे असं म्हणाता येईल.
अर्थात ती नक्कल ह्याला संगीत म्हणता येईल का? किंवा संगीत म्हणून मानवाने तो अविष्कार केला असेल का? ह्याचं उत्तर ‘नाही’ असंच येईल. परंतू निसर्गातील ह्या आवाजाची नक्कल करण्याचं उत्क्रांत स्वरूप आदिवासी संगीतात आढळतं. आपण ऐकलेलं एखादं आदिवासी गीत आणि त्यांतल्या हुंकारयुक्त नादांचा अविष्कार आठवून पाहिलात तर ह्या वाक्याचा अर्थ सहजी लक्षात येईल.

खरंतर अवघं चराचर नादमय आहे. अवघ्या निसर्गात लयदार संगीत भरून राहिलेलं आहे. निर्झरांतलं संगीत, धबधब्यांचं ओसंडणं, लाटांचा खळाळ, पक्षांची किलबिल, प्राण्यांचे आवाज, वाऱ्याची झुळूक किंवा घोंघावणंही, पानांची सळसळ हे सगळं निसर्गाचं संगीतच आहे. ह्या सृष्टीचा निर्माता असलेल्या ब्रम्हदेवानं संगीतकलेची निर्मिती केली, त्यांनी ही कला भगवान शंकरांना दिली, शंकरांनी मग ही कला सरस्वती देवीला दिली. पुढं देवी सरस्वतीनं ही कला देवर्षी नारदांना सुपूर्द केली आणि नारदांनी संगीतकलेचं ज्ञान स्वर्गातील गंधर्व (गायन करणारे), किन्नर (वादन करणारे) व अप्सरा (नर्तिका) यांना दिलं. त्यानंतर संगीतकलेत पारंगत झालेले ऋषी नारद, भरत, हनुमान हे भूलोकी ह्या कलेचा प्रसार करण्यासाठी आले, हा संगीतकलेचा इतिहास सर्वज्ञात आहे.

मात्र ह्या सृष्टीचा एक घटक असलेल्या आणि निसर्गाला आपला मित्र मानणाऱ्या किंबहुना आपल्या संस्कृतीचं देणं म्हणून निसर्गाचा अत्यादर करणाऱ्या मानवानं निसर्गात असलेलं हे संगीत कसं शोधून काढलं? सृष्टीनिर्मात्यानं त्याला दिलेल्या बुद्धीचा वापर करून ह्या सहजनिर्मित प्रक्रियेला ज्ञान, विद्या ह्या संज्ञेपर्यंत नेत पुढं संगीतशास्त्र म्हणण्याइतका त्याचा विकास कसा केला? हे जाणून घेताना त्यातला पहिला टप्पा वरती सांगितल्यानुसार निसर्गातील नादांची नक्कल करून पाहाणे हा येतो. पुढं ह्या निरनिराळ्या नादांतून आपल्या विविध भावनांचं प्रकटीकरण होऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं… इथं मानवी जीवनाशी संगीताचा थेट संबंध जोडला गेला.

पुढं मानवाला भाषिक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तो शब्दसंपत्तीचा धनी झाल्यानंतर शब्द आणि नाद/स्वर ह्या दोहोंचा वापर तो भावनांच्या व्यक्ततेसाठी करू लागला आणि ज्याला आपण आज लोकसंगीत म्हणतो ते असं शब्द-सुरांच्या संगमातून निर्माण झालं… जे मानवी जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या भावाभिव्यक्तीला पोषक ठरत राहिलं आहे आणि सृष्टीच्या अंतापर्यंत कायम राहील.

पुढील काही लेखांमधे मानवाने निसर्गातून शोधलेलं हे संगीत मानवी जीवनाशी कसं एकरूप होत गेलं ह्याचा म्हणजे लोकसंगीताचा संक्षिप्त धांडोळा आपण घेणार आहोत.

लोकसंगीतावर लिहिण्याची कल्पना मला सुचविल्याबद्दल उज्वलाताईंचे मन:पूर्वक आभार! त्यानिमित्ताने माझ्या कुवतीनुसार आजवर केलेल्या अल्प अभ्यासाचा नेमकेपणी मागोवा घेत त्यावर चिंतन करण्याची सुवर्णसंधी आपोआप मिळेल ह्यात शंका नाही.

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 3 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments