श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “महाभारत युद्धकाळ” – लेखक : श्री नीलेश ओक — भावानुवाद – सुश्री अलका गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली  

पुस्तक: महाभारत युद्ध काळ

लेखक : नीलेश ओक 

मराठी अनुवाद:अलका गोडबोले

पृष्ठ:२१६ मोठा आकार

मूल्य:४५०₹

रामायण आणि महाभारत यांची ऐतिहासिक सत्यता सिद्ध करणारे अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी लिहिलेला हा ग्रंथ!

‘ऐतिहासिक राम‘ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक निलेश ओक यांचे हा महाभारताची ऐतिहासिकता सिद्ध करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः त्यांनी खगोलीय घटना यांना केंद्रीभूत धरून लिहिला असला तरीही महाभारताचा कल्पना विलास म्हणून उपहास करणाऱ्यांना सप्रमाण उत्तर आहे.

(महाभारताचे युद्ध दिनांक १६ ऑक्टोबर ५५६१ ते २ नोव्हेंबर ५५६१ दरम्यान झाले आहे…. पण हा कालखंड Before Common Era असा वाचावा !) 

आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करणाऱ्यांना हा ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे…. पण ज्या वाचकांना दृश्य खगोलशास्त्राचा परिचय नाही अशांसाठी प्रकरण तीन आणि चार मदत करतात आणि वाचकाला याबत साक्षर करतात.. विविध आकृत्या, तक्ते आणि कोष्टकांनी भरून गेलेला ग्रंथ!

महाभारत आणि रामायण यांचा जगावर प्रचंड प्रभाव आहे. या ग्रंथांनी भारतीय जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा पाया घातला आहे. हा आपला अभिमानास्पद इतिहास आहे….. पण भारतीयांची अस्मिता पुसून टाकण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रामायण महाभारत सारख्या इतिहासाला कल्पना विलास म्हणून हिणवलं गेलं. ही एक बाजू जरी खरी असली तरीही महाभारत वास्तवात होऊन गेलं आहे, असे म्हणणाऱ्यांनी देखील खगोलशास्त्रीय निरीक्षणं दुर्लक्षित केली आहेत. त्यात सर्वात महत्वाचं निरीक्षण म्हणजे “अरुंधती तारा !”

लेखक निलेश ओक म्हणतात, ” महाभारत युद्धाची तारीख निश्चित करण्यात जर अरुंधती हा सर्वात असंदिग्ध खगोलशास्त्रीय पुरावा म्हणून पात्र ठरत नसेल तर महाभारतातील खगोलशास्त्रीय पुराव्यांबद्दल बोलणेच थांबवले पाहिजे. “

पुस्तकातील उत्कंठावर्धक भागाची सुरुवात पाचव्या प्रकरणापासून होते. पण पहिली चार प्रकरणही तितकीच महत्त्वाची आहे. ही प्रकरणे खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी फार मदत करतात. ज्यांना यात रस आहे, अशांना हा ग्रंथ फार मोठी मेजवानी!

प्रस्तुत ग्रंथ हा महाभारताची कथा सांगणारा नसून महाभारताचा कालावधी आणि तो कालावधी सिद्ध करणारा संशोधनात्मक अभ्यास आहे. ज्यांना कालगणना, अवकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र…. आदी गोष्टींची किमान तोंडओळख आहे, खगोलशास्त्र, ज्योतिष शास्त्र यांची तोंडओळख आहे, अशा वाचकांसाठी हा ग्रंथ म्हणजे एक पर्वणी!

पहिल्या प्रकरणात लेखक मुख्य समस्या आणि विशिष्ट ध्येयांची यादी देतो. मुख्य समस्या म्हणजे “महाभारत युद्ध केव्हा झाले?”

दुसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाच्या सिद्धांताच्या पार्श्वभूमीवरील गृहीतकांची यादी आहे. काही सिद्धांतांचा डळमळीतपणाही लेखकाने ठळकपणे मांडला आहे. याच प्रकरणात लेखकाचा सिद्धांत आणि तो सिद्धांत तपासून पाण्याची कार्यपद्धती दिली आहे.

तिसऱ्या प्रकरणांमध्ये लेखकाने खगोलशास्त्रीय निरीक्षणे आणि त्यांची स्पष्टीकरणे समजावीत या दृष्टीने खगोलशास्त्रातील मूलभूत गोष्टी दिल्या आहेत. जसे की पृथ्वीचे चलन संपातबिंदूची घटना, संपातबिंदूमुळे घडणारी उत्तर ध्रुवाची हालचाल, सूर्य आणि चंद्रग्रहणे, ग्रेगोरियन आणि ज्युलियन दिनदर्शिका… इत्यादी.

प्रकरण चार हे अद्वितीय अशी भारतीय आणि महाभारतातील खगोलशास्त्र आणि दिनदर्शिका यांच्या संकल्पना समजावून सांगते. या प्रकरणात भारतीय दिनदर्शिकेचे चांद्र सौरस्वरूप समजावले आहे. मास, पक्ष, तिथी आणि नक्षत्र समजून घेणे सोपे होते.

प्रकरण पाच मध्ये महाभारतातील अनेक निरीक्षणांपैकी एकाचा विचार केला आहे.

प्रकरण सहावे अरुंधतीच्या निरीक्षणाची समस्या आणि त्या समस्येवरील लेखकाचे उत्तर याची चर्चा करते.

सातव्या प्रकरणांमध्ये अरुंधती निरीक्षणाने परिभाषित केलेल्या कालखंडाचा शोध घेतला जातो. त्यासाठी महाभारतातील ग्रह आणि धूमकेतू यांच्या वर्णनाची मदत घेता येते.

आठव्या प्रकरणात महाभारतातील निरीक्षणे विशेषता महाभारत युद्धाच्या 18 दिवसातील चंद्राच्या कला आणि स्थिती यांचा उपयोग केला आहे.

नव्या प्रकरणात लेखकाच्या सिद्धांताच्या आणि त्यात केलेल्या अंदाजाच्या विरोधात असणाऱ्या महाभारतातील निरीक्षणांचा विचार केला आहे आणि पर्यायी स्पष्टीकरणे सुचवली आहेत.

दहाव्या प्रकरणांमध्ये स्वयंभूचे लेखक प. वि. वर्तक यांच्या सिद्धांताची रूपरेषा मांडली आहे.

अनुक्रम:

१. समस्या

२. सिद्धांत अनुमान आणि पार्श्वभूमीवरील ज्ञान

३. खगोलशास्त्राची तोंड ओळख

४. महाभारतातील खगोलशास्त्र

५. मत्सरी बहीण आणि अभिजीत चे पतन

६. अरुंधतीचे युग

७. ३६ गुण जुळले महाभारत युद्धाच्या वर्षाचा शोध

८. महाभारत युद्धाचा पहिला दिवस चंद्राच्या कला आणि स्थिती

९. परस्पर विरोधी निरीक्षणे

१०. प वि वर्तक यांचा सिद्धांत

११. अधिक चांगला योग्य सिद्धांत

१२. परिणाम भाकीते अंदाज आणि नवीन समस्या

१३. टिपणे, निवडक संदर्भ ग्रंथ, तक्ते आणि आकृत्या

लेखक परिचय : अमेरिकेतील इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सायन्समध्ये कार्यरत खगोलविज्ञान अभ्यासक आणि अतिप्राचीन भारतीय संस्कृतीचे संशोधक असलेल्या नीलेश ओक यांनी रामायणासह महाभारताच्या कालनीश्चितीसंदर्भाने संशोधन केले असून सिद्धांत मांडला आहे. आपल्या सिद्धांतातून समोर आलेली माहिती या दोन ग्रंथात त्यांनी मांडली आहे. रामायणाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण १२, २०९ वर्षे आहे, तर ऋग्वेदाचा काळ चालू कालगणनेच्या आधी साधारण २४ हजार वर्षे असल्याचे त्यांनी खगोलशास्त्रीय पुराव्याच्या आधारे दाखवून देतात.

महाभारतासंबंधाने नीलेश ओक सांगतात “महाभारताची कालनीश्चिती करण्यासाठी मी जवळपास ३०० हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचा अभ्यास केला. माझ्या संशोधनानंतर महाभारताचा काळ आजपासून ७५०० वर्षे आधीचा असल्याचे सिद्ध झाले. परंतु, आपल्यापैकी अनेकजण भारतीय संस्कृतीचा उल्लेख करताना ५ हजार वर्षे आधी असा करतात, जे चुकीचे आहे. कारण भारतीय संस्कृती त्याआधीपासून अस्तित्वात आहे. ”

यामध्ये अजून एक मुद्दा आहे आजवर आपल्या भारताचा इतिहास हा आधी इंग्रजांनी आणि त्यानंतर आलेल्या कम्युनिस्ट प्रणित इतिहास करते आणि आपला इतिहास हा हजार पंधराशेच्या वर्ष मागे नेला नाही आणि म्हणून आम्ही सगळे मागासलेले असं ठरवण्यात असा शिक्का मारण्यात ते पटाईत झाले आणि त्यांची ओढणारे इथले तथाकथित इतिहास तज्ञ त्यातच धन्यता मानू लागले. या सगळ्याला आता एक निश्चितच आळा बसून आपला इतिहास असंख्य हजार वर्ष जुना आहे आणि तो अतिशय समृद्ध असा आहे हे आपल्याला जाणून घेता येईल. या दृष्टीने या पुस्तकाचे खूप अतिशय महत्त्वाचं महत्त्व आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments