सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती..’ म्हणत दोन्ही हातांची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्..’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हातांनी आपण नमस्कार करतो!

‘ओंजळ’ म्हंटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण!

सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्ध्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रिती राहात नव्हती! गंगास्नाना नंतर तो हा दान यज्ञ करीत असे ओंजळीने! त्याची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते  देण्यात व्यस्त असे. त्यामुळे कर्णा कडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवचकुंडले ही अशाच वेळी मिळवली!  ओंजळ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू!

दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्याले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते! तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखे वाटते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दाना साठी हाताचे महत्व आपण सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हातांनी काही देण्यासाठी असते!

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते! सकाळच्या वेळी कोणी जर सुवासिक जाई ,जुई, प्राजक्त ,मोगरा,बकुळी या सारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभार्‍यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हार्‍यात सजलेली पहाताना ते फुलांनी सजलेले रूप पाहून मन भरून येते!

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते! ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते!

भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न किंवा तृषार्त असताना मिळालेलं ओंजळभर पाणी याचे महत्व माणसाला खूपच असते! अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय राहात नाही! जे मिळते ते समाधानाने घ्यावे त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते!

ओंजळ भरुन लाहया जेव्हा पती-पत्नी लाजाहोमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात. जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकांसाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी  घेतात, जणूं आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते!

‘ओंजळभर धान्य’ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे  रूपांतर एका खूप मोठ्या धान्य साठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही पण अशा  असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते.

गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेलेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये, त्यांना फारतर पैसे  देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी! त्या काळी अन्नदानाचे पुण्य  मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण  लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत आहे आणि तिची ओंजळ सतत भरभरून वहात आहे असे असते! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येतं!यावरून सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते! त्या कमनीय देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की ते चित्र नक्कीच सर्वांच्या स्मरणात असेल!

आपल्या दोन हातांवरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो! जेव्हा हे दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते!

अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडतेय असं मला वाटतंय! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळी ला सतत ओतत रहाण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळी साठी मला वाटतंय!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments