सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ वर्षारंभ ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
वसंत ऋतुच्या आगमने
शक संवत्सर सुरू होते
मरगळ झटकून सारी
निसर्गात चैतन्य फुलते ||
वर्षारंभी नवलाई होते
निसर्ग किमया बहरते
पानगळीच्या जागेवरती
नवी पालवी नाचू लागते ||
पळस पांगारा बहव्याला
गुलमोहरा येई फुलोरा
निसर्गाची रंगपंचमी ही
अदभूत रंगीत नजारा ||
मोगऱ्याचा गंध धुंदावतो
सुटे आंब्याचा घमघमाट
सजे चैत्रागौरीची आरास
आंब्याची डाळ पन्ह्याचा थाट ||
ठायी ठायी रंगांची आरास
फळा फुलांना बहर भारी
सृजनोत्सवाने सुरू होई
नववर्षाची नवी भरारी ||
दु:खावरती माती सारत
आनंदाचे ते बीजारोपण
नवीन स्वप्ने नवीन आशा
घेऊन येतील नवे शुभ क्षण ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈