श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ तांडव… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त: बालानंद)
मात्रा: ८+६
कोसळली कडकड वीज
दूभंग मंदिरी देव
कळवळला दैवी टाहो
मर्मावर झाला घाव !
चांदणे क्षमेचे अंधुक
सूडाची पेटत ज्वाला
हे घाव घातले ज्यांनी
त्यांच्यास्तव हाती भाला !
सूडाचा पेटत वणवा
बेचिराख हिरवळ सारी
क्षणभरात झाली वाफ
ह्रदयीची झुळझुळ सारी !
नटराज सुडाचा उघडी
प्रलयंकर तिसरा डोळा
निखळले दिशांचे खांब
अढळातुन ढळला तारा !
सृजनाचे रचिले सरण
तिमिरात बुडविले तारे
रूपरंग रसगंधांची
कुलुपबंद केली दारे !
शमल्यावर तांडव सारे
सांबाचे काळिज हलले
अपराधी होते कोण
उद्ध्वस्त कुणाला केले !
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈