सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

विवाहाचा इतिहास आणि आजची विवाह स्थिती… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

विवाह विधी हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा विधी मानला जातो. हा विधी अतिप्राचीन काळापासून देवी-देवतांपासून चालत आलेला आहे. या विधीत अग्नीस साक्षी मानून वधू वरास आणि वर वधूस एकमेकांना अनेक वचनात बांधून घेतात. एका दृष्टीकोनातून पाहिले तर वचने पूर्ण करण्याचा हा एक करारनामाच असतो. तसे पहाता विवाह हा धर्म आणि समाज यांच्याशी अधिक संबंधित आहे. ‘ एका विशिष्ट हेतूने केलेले वहन म्हणजेच विवाह ‘

 फार प्राचीन काळी लोक समूह करून एकत्र रहात होते. समूहातील पुरुष शिकारीस जात असे. आणि समूहातील स्त्रिया मांस भाजून देत असत. पण तेंव्हा समूहामध्ये एकत्र रहात असताना पुरूषाचे स्त्रीवर अथवा स्त्रीचे पुरूषावर वर्चस्व नक्कीच नव्हते. पण पुढे पुढे एकाकीपणा, तणाव दूर करण्यासाठी सोबतीची आवश्यकता भासू लागली. अतिप्राचीन काळात सुरूवातीस समाजाची निर्मिती नसावी. त्यामुळे कोणतीच बंधने नव्हती. पुढे स्त्री -पुरूषाच्या आकर्षणातून प्रेमाची निर्मिती झाली. नंतर दोघे एकमेकांसोबत आपला वेळ घालवू लागले. जन्मास येणाऱ्या संततीवर आणि संततीस जन्म देणाऱ्या स्त्रीवर षुरूष नितांत प्रेम करू लागला. त्यांच्याच सोबत राहू लागला. अशाप्रकारे कुटुंबाची निर्मिती झाली असावी. नंतर स्त्रीनेच शेतीचा शोध लावला. समूह-समूह एकाच ठिकाणी स्थानिक होऊ लागले. पुढे समाज निर्माण झाला असावा. सुरक्षेसाठी एका समुहाला दुसर्‍या समुहाची गरज भासत होतीच. अशाप्रकारे जुळत गेलेल्या नातेसंबंधातून विवाहाची निर्मिती झाली असावी.

 पुढे जसजसा समाज प्रगत होत गेला तसे विवाहविधीचे स्वरूप बदलत गेले. वेगवेगळ्या चालीरूढी, समाजानुसार विवाहाचे अनेक प्रकार पडत गेले. विवाह हा पूर्वीपासूनच मुलगा आणि मुलींकडून अशा दोन्ही परिवारात विचारविनिमय होऊन पार पडत आला आहे. मग त्यामध्ये परिवारातील जेष्ठ सदस्य असतील, आजूबाजूचे समाजातील प्रतिष्ठित असतील अथवा कूणी इतर नातेवाईक असतील या सर्वांचा सहभाग सक्रीय होता. मुला-मुलीचे मत दोघांची विचारधारा अशा सर्व बाबींचा विचार होत असे. म्हणजे विवाहविधीची परंपरा जपत, जास्तीत जास्त विवाह पारंपारिक पद्धतीने जुळत होते.

 विवाह निर्मिती पासून ते आजचे विवाहाचे स्वरूप पाहिले तर आजची वैवाहिक स्थिती तर खूपच बिकट आहे. एके काळी विवाह हा एक विधी माणसाची गरज म्हणून निर्माण झाला. आणि आज हाच विवाह म्हणजे तरुणांसाठी एक आव्हान ठरले आहे. खासकरून मुलांकरीता. आई-वडिलांसाठी देखिल चिंतेचा घनभारी विषय ठरला आहे. आज मुलांना लग्नाकरता मुलीच मिळत नाही ही विवाहासंदर्भाची फार मोठी समस्या आहे. याला बरीच कारणे देखील आहेतच. एक तर मुलींचे घटते प्रमाण. दुसरे आज मुलांच्या तुलनेत मुली जास्त प्रमाणात शिक्षित झाल्या आहेत. तिसरे कारण मुलींचा कल हा शहराकडे अधिक आहे. गावाकडील मुलांना सरासर मुली, मागचा पुढचा विचार न करता रिजेक्ट करत आहेत. मुली आज पुणे, मुंबई सारख्या शहरात नोकरीसाठी स्थायिक असणाऱ्या मुलांना जास्तीत जास्त पसंती दाखवत आहेत. त्यामुळे गावकडे शेती अथवा व्यवसायामध्ये उत्तमात उत्तम असणाऱ्या मुलांना विवाहाच्या बाबतीत खूपच अडचणी येत आहेत. लग्न हा त्यांच्यासाठी मोठा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकरी मुलांना तर मुलगी मिळणेच अवघड झाले आहे.

 लग्न न जुळण्याचे अजून महत्त्वाचे कारण म्हणजे पुर्वी प्रथम मुलगा, मुलीच्या घरी आपल्या नातेवाईकांसोबत येत असे. तिथे मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम होत असे. एकमेकांची पसंती होत असे. नंतर पंचांग जुळते का पाहिले जायचे. मुला-मलीचे जात, कुळ, गाव, घरदार, शेतीवाडी रहाणीमान इत्यादीबद्दल सर्व बाबींवर दोन्ही परिवारात चर्चा, विचारविनिमय होत असे. आज या विवाह संदर्भातील चालीरूढी समाजातून तळागळाशी गेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्वतंत्र वाटांवरून धावणाऱ्या आजच्या तरूणाईलाच हे सगळे मान्य नाही. तसेच आज गल्लीबोळातून वधूवर सुचक मंडळ आहेत. तेथे विवाह संदर्भातील नाव नोंदणी होते.

मुला-मुलींचा बायोडेटा आणि फोटो दिले- घेतले जातात. बायोडेटा वरती मुला-मुलींची अपेक्षा नमुद केलेल्या असतात. सरासरी मुलींच्या बायोडाटावरती टिप असते… मुलगा शहरात राहणारा असावा. सरकारी नोकरीत असावा. शहरात स्वतःचे घर असावे. खरोखर पहायला गेले तर मुलींच्या या अपेक्षा विहित आहेत का?

मुलांचा विचार केला तर आज समाजात तिसी ओलांडलेली कितीतरी मुले आहेत जी आपले लग्न जुळवण्यात अपयशी ठरत आहेत. आणि ही सगळी मुले शेती अथवा व्यवसाय संभाळणारी आहेत. शहरात जावून तुटपुंज्या पगाराची नोकरी करण्यापेक्षा मुलांनी शेती अथवा व्यवसाय करणे यामध्ये गैर काय आहे ?हा प्रश्न आज कित्येक पालकांच्या मनाला भेडसावत आहे. आज कित्येक तरुण लग्न ठरावे म्हणून गावाकडे बसलेला जम सोडून शहराकडे धावत आहेत. अशीच स्थिती राहिली तर शेतीला कोणी वाली रहाणार नाही.

 ‘ आज लग्न जुळत नाही. ‘हा प्रश्न परिवारासाठी मर्यादित राहिलेला नाही. तो एक समाजिक चर्चेचा विषय झाला आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या ओळखी, मैत्री, प्रेम, विवाह याचा देखिल परिणाम आजच्या विवाहावर होत आहे. आज प्रेम विवाहाचे प्रमाण सुध्दा वाढले आहे. काळानुरूप बदलत चाललेली ही विवाह स्थिती समाज आणि परिवारासाठी गंभीर विषय झाली आहे शोशल मिडियाच्या अधिन होऊन आपल्या स्वतंत्र मार्गावरून धावणारी आजची तरुणाई करियर सोबत, आपल्या भावी जीवनाचे इतर निर्णय स्वतःच घेत आहेत.

आजकाल आई-वडील आपल्या मुला -मुलींवर आपली मते लादू शकत नाहीत. इतकेच नाही तर आपले विचार आजच्या तरुण पिढीला समजून देण्यात पण कित्येक पालक असमर्थ ठरत आहेत. मुलांच्या आयुष्यातील आता आई-बाबांची जागा मोबाईलने, शोशल मिडीयाने घेतली आहे. घरातील नात्यात होणारे संवाद विस्कळीत झाले आहेत. लग्नासारख्या महत्त्वाच्या विषयांवर देखिल चर्चा होत नाहीत. घरातून एकमत राहिले नाही. ऑनलाईनच मुले-मुली नको त्या व्यर्थ कारणासाठी एकमेकांस रिजेक्ट करत आहेत. लग्न हा जीवनाला वेगळे वळण देणारा एक महत्वपूर्ण विधी आहे. लग्नानंतर एका चांगल्या जीवनसाथी मुळे जगण्याच्या वाटा आनंददायक आणि सुखकर सोप्या होतात. प्रत्येकाच्या वाट्याला विवाहाचा महत्वपूर्ण क्षण येतोच. शहर काय आणि गाव काय जीवन म्हटले की, सुख-दुःख, संकटे आलीच. पण सोबतीत एखादा विश्वासू हात, भक्कम आधार असेल, परस्परांना सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याची दोघांतही क्षमता असेल तर खडतर वाटेवरचे सुध्दा मार्ग सोपे होत जातात. मुले असोत अथवा मुली त्यांना आपल्या परिस्थितीचे भान असले पाहिजे. आपल्या पालकांबद्दल मनात आदर पाहिजे. आपल्या आयुष्यात विवाह करून येणारा तो किंवा ती यामुळे जीवनात बराच बदलाव येतो. लग्नानंतर नवी नाती, नवा परिवार भेटतो. मग आपली निवड फक्त मुलगा किंवा फक्त मुलगी हा एकांगी विचार करून नक्कीच नसावी. त्यामध्ये आई-वडिलांबरोबर कुटुंब कल्याणाचा विचार असावा. शहर पाहिजे गाव नको या गोष्टींना काहीच अर्थ नाही.

 विवाहासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर समाजातून गांभीर्याने विचारविनिमय व्हावा. वधूवर सुचकमंडळांनी सुध्दा आजची विवाहस्थिती पाहता या विषयाकडे आपला फक्त बिझनेस म्हणून न पाहता ‘एक गंभीर सामाजिक प्रश्न’ म्हणून पहावे. समाजसेवेचा भाग म्हणून शक्य त्यांनी मुलांचे विवाह जुळवून देण्यात सक्रिय सहभागी व्हावे. कारण मुलांची लग्ने वेळेत होत नाहीत म्हणून कितीतरी कुटुंब आज मानसिक तणावात आहेत. चला शक्य असेल तर आपण ही समस्या सोडविण्याचा जरूर प्रयत्न करूया.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा, जि. सांगली, दुरभाष्य क्रमांक-९९२२७३०८१५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments