श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक होतं गाव…. “महाराष्ट्र ” त्याचं नाव.

– – गाव खूप छान होतं, लोक खूप चांगले होते. “मराठी” भाषा बोलत होते, गुण्यागोविंदानं नांदत होते.

त्यांचं मन खूप मोठ्ठं होतं. वृत्ती खूप दयाळू होती. दुखलं- खुपलं तर एकमेकांच्या हाकेसरशी धावून जायचे.

आल्यागेल्याला सांभाळून घ्यायचे. एकमेकांना साथ देऊन जगण्याचं गाणं शिकवायचे..

 

महाराष्ट्रात होता एक भाग… “मुंबई” त्याचं नाव… 

मुंबईसुद्धा छान होती; महाराष्ट्राची शान होती. सर्वांच्या आकर्षणाची बाब होती. आजूबाजूचे सगळेच मुंबईसाठी धडपडत होते. इथं आले की इथलेच होऊन राहत होते.

“अतिथी देवो भव… !” या उक्तीनुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वांचं आदरातिथ्य केलं. पाहुण्यांचा मान म्हणून मागतील ते देऊ लागले.

हळूहळू परिस्थिती बदलू लागली.

“अतिथी” जास्त आणि “यजमान” कमी झाले.

मुंबई कमी पडू लागली, आजूबाजूला पसरू लागली.

सगळ्यांचीच भाषा वेगवेगळी होती. – – मराठी आपली वाटत नव्हती.

 

प्रश्न मोठा गहन होता, पण माणसं मात्र हुशार होती, दूरदृष्टीची होती.

त्यांना एक युक्ती सुचली… दूरदेशीची परदेशातील भाषा त्यांना जवळची वाटली.

त्यांना वाटलं आपली मुलं शिकतील, परदेशात जातील, उच्चशिक्षित होतील.

सर्वांचाच, अगदी “महाराष्ट्राचा” ही विकास होईल,

म्हणून त्यांनी याच भाषेतील शिक्षणाची सोय केली.

आजूबाजूला या भाषेत बोलणारे पाहून मराठी माणसंही खंतावली.

आपल्यालाही हे आलंच पाहिजे म्हणून याच भाषेत शिकू लागली, शिकवू लागली.

…. मग हळूहळू मराठी कोणीच शिकेना.. मराठी कोणीच बोलेना.. बोलीभाषा ही बदलली.

सगळ्याचा नुसता काला झाला… शुद्ध सुंदर मराठीचा लोप झाला.

 

अशा या महाराष्ट्रातील एक छोटा मुलगा आपल्या आईबरोबर.. माफ करा हं… आपल्या ‘मम्मी’ बरोबर एकदा वाचनालयात गेला. चुकून त्याचा हात पुस्तकावर पडला. त्यानं ते उघडलं…..

…. पुस्तक शहारलं, पानं फडफडली, आनंदित झाली.

त्यांना वाटलं निदान आज तरी आपल्याला कोणी वाचेल.

 

इतक्यात त्या मुलानं विचारलं,

“Which language is this? “

 

‘मम्मी’ खूप सजग होती, मुलाचं हित जाणत होती, सगळं ज्ञान पुरवत होती.

पुस्तक जागेवर ठेवत म्हणाली,

“अरे, खूप पूर्वी म्हणजे तुझ्या आजोबांच्या वेळेस “मराठी भाषा” प्रचलित होती;

आता कोणी नाही ती बोलत. ” 

 

पुस्तक कोमेजलं, पानं आक्रसली, पानांपानांतून अश्रू ठिबकले; पण – –

हळहळ वाटण्याचं काही कारण नव्हतं… कारण आता मराठीसाठी दुःखी होणारं काळीज कोणाचंच उरलं नव्हतं!

 

महाराष्ट्राची शान “मराठी” भाषा!

मला एकाने विचारले “ तू मराठीत का ‘पोस्ट’ टाकतोस? “

आणि, मी त्यांना एवढंच म्हटलं – – 

 

– – “ आमच्या घरात “तुळस”आहे, ‘Money plant’नाही.

आमच्या स्त्रिया “मंदिरात” जातात, ‘PUB’ मध्ये नाही.

आम्ही मोठ्यांच्या पायाच पडतो, त्यांच्या गळ्याला मिठी मारत नाही.

आम्ही “मराठी” आहोत, आणि मराठीच राहणार !

तुम्ही English मध्ये मेसेज केलात तरी मी रिप्लाय मराठीतूनच देतो,

याचा अर्थ असा नाही की, मला English येत नाही. ” 

 

अरे गर्व बाळगा तुम्ही – – मराठी असल्याचा.

“काकी” ची जागा आता ‘Aunti’ घेते

‘वडील’ जिवंतपणीच “डेड” झालेत.

“भाऊ” ‘Bro’ झाला… !!

आणि “बहीण ” ‘Sis’… !!!

दुध पाजणारी “आई” जिवंतपणीच ‘Mummy’ झाली.

घरची “भाकर” आता कशी आवडणार हो.. ५ रु. ची ‘Maggi’ आता किती “Yummy” झाली.

 

मराठी माणूसच “मराठी” ला विसरू लागलाय…. आपली संस्कृती लोप पावण्यापुर्वी ती जपण्याचा निदान प्रयत्न तरी करावा… 

*आजपासूनच शक्‍यतोवर मराठी लिहिण्याचा प्रयत्न करूया. *

 

आज २७ फेब्रुवारी.. आज मराठी भाषा दिवस आहे.

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments