श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘दैव देतं आणि कर्म नेतं…’ – भाग- २ – (अनुवादित) मूळ इंग्रजी लेखक– अनामिक ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
(गुंतवणूकदार कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावू लागले, पण या घटनेला जबाबदार लोक तोंड लपवून बसले. शेवटी वैतागून मनीषने सर्व काही विकले आणि कर्जदारांचे पैसे फेडले. तरी अजूनही काही देणे बाकी होतेच.) – इथून पुढे
मनीष सर्वकाही हाताळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सर्वकाही परत सुरळीत करायचे होते. पण त्याला कल्पना नव्हती की त्याची पत्नी या परिस्थितीत त्याला सोडून निघून जाण्याच्या विचारात आहे.
या भाड्याच्या घरात राहायला आल्यापासून परिस्थिती आणखी बिकट झाली होती. मीनलला नोकरांची सवय झाली होती, त्यामुळे घरातील कामे ती करत नव्हती. आई तिला सर्व काही मदत करण्याचा प्रयत्न करत असे, पण ती छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करायची. लव्हलीला सांभाळतही नव्हती. आता तर असे दिवस आले की ती मनीषशीही भांडायला लागली. ती म्हणायची की “अशा भिकार परिस्थितीत मला अजून किती काळ जगावे लागेल. मी घरातील कामे करू शकत नाही. किमान एक तरी नोकर लव्हली ला सांभाळण्यासाठी ठेवा. मी हे सर्व कसे हाताळू? मी यापूर्वी मुलं सांभाळलेली नाहीत.”
“अगं तू असं कसं बोलतेस? मीनल, आई लव्हली वर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करते, आणि लव्हली तुझी मुलगी आहे. तू तीला सांभाळू शकत नाहीस म्हणजे काय?”
“आता हेच माझे आयुष्य असणार आहे का? तू मला पैशांची सवय लावली व तुझ्यावर अवलंबीत बनवले आहेस. तुमची श्रीमंती पाहूनच माझ्या माहेरच्यांनी माझे येथे लग्न लावले ना?”
तिचे बोलणे ऐकून मनीष स्तब्ध झाला. “तू ज्या घरातून या घरात आलीस, त्या घरात काहीच सोयीसुविधा नव्हत्या. आता जर आपले चांगले दिवस नसतील तर वाईट दिवसही जास्त दिवस रहाणार नाहीत. कृपया मला थोडा वेळ दे. मी ऑफिसमधून त्रासून घरी येतो. आणि तू पुन्हा कटकट सुरू करतेस. “
मीनल तिच्या खोलीत जाऊन बसायची. जेवण सुद्धा वाढत नव्हती, ना इतर काही काम करायची. फक्त आईच लव्हलीला प्रेमाने खायला घालायची आणि झोपवायची.
पण आज मीनल एवढं मोठं पाऊल उचलेल, हे त्याला अपेक्षित नव्हतं. आज ती मनीषच्या घराचा उंबरठा ओलांडून कायमची निघून गेली होती.
मनीषने धाडस करून तिच्या आईला फोन केला तेव्हा त्याला कळलं की ती तिथेही गेलेली नव्हती. तिच्या काही मित्रांना विचारलं, तेव्हा त्याला कळालं की तरुण नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यासोबत ती गेली आहे. हे ऐकलं तर मनीषच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुलीच्या अशा कृतीने तिच्या आईलाही धक्का बसला. मीनलच्या अशा वागण्याची त्यांना अपेक्षा नव्हती. तिच्या मुलीच्या डोळ्यांवर पैशांचा असा काय पडदा पडला होता की ती कुटुंबाला कुटुंब मानत नव्हती. अगदी एक वर्षाच्या मुलीलाही सोडून निघून गेली.
पण आयुष्य कुणासाठीही थांबून रहात नाही. इकडे आईने लव्हली आणि घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. मनीषने सर्वकाही परत मिळवण्याचा जोमाने प्रयत्न करायला सुरुवात केली. आता त्याचा फक्त एकच उद्देश होता की त्याला भरपूर पैसे कमवायचे आहेत. शेवटी त्याच्या कष्टांना फळ मिळाले. दोन महिन्यांनंतर मनीषने कारखान्याच्या विम्याची केस जिंकली आणि विम्याचे पैसे मंजूर झाले.
क्लेममधून आलेल्या पैशातून सर्वात आधी कर्ज फेडले. उरलेल्या पैशातून एक घर खरेदी केले आणि तिथे रहायला गेले. उरलेल्या पैशातून नवीन व्यवसाय सुरू केला. व्यवसायाचे चांगले ज्ञान आणि बाजारपेठेतील त्याची पत यामुळे मनीषचा हा व्यवसाय ही चांगला चालला. आपल्या व्यवसायात हळूहळू तो प्रगती करत होता आणि एके दिवशी अचानक मीनल परत आली.
तिला अचानक आलेलं पाहून मनीषला आश्चर्य वाटले. आता सहा महिन्यांनी परत येण्याला काय अर्थ होता? मीनलला आता त्याच्या आयुष्यात पुन्हा तिचे स्थान हवे होते आणि ती त्याची माफी मागत होती. पण मनीषने तिचा स्विकार करण्यास ठामपणे नकार दिला.
मीनलने तिच्या आई वडिलांना मनीषच्या घरी बोलावले. ती लोकं घरी आली, पण त्यांनी मनीषचीच बाजू घेतली.
“पण आता मी कुठे जाऊ? माझ्याकडे काहीही नाही. तरुणनेही मला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. आणि मी लव्हलीची आई आहे. तिच्यावर माझा अधिकार आहे”
मीनल अचानक लव्हलीवर बोलली आणि तिला उचलून घेतले. पण लव्हली मीनलपासून सुटका करण्यासाठी धडपडू लागली. दीड वर्षांची मुलगी तिला ओळख देत नव्हती व स्वतःला सोडवता न आल्याने ती जोरजोरात रडू लागली.
मनीष तिरस्काराने म्हणाला, “तू आणि लव्हलीची आई ? माफ कर, तुला मुलांना कसं सांभाळायचं तेही माहित नाही. बघ ती लहान मुलगीही तुझ्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत आहे. तु कधी तिला प्रेमाने जवळ तरी घेतले होते का? तु ज्या मार्गाने आलीस त्याच मार्गाने चालती हो. आता या घराशी तुझा काहीही संबंध नाही. आणि आमच्या आयुष्यात तुला कुठलीही जागा नाही. “
मीनलने मोठ्या आशेने तिच्या आईवडिलांकडे पाहिले. पण यावेळी तिचे बाबा म्हणाले, “आमच्याकडून काहीही अपेक्षा धरू नकोस. तु आधीच हा विचार करायला हवा होतास. तुला कुणी फसवावं एवढी काही लहान मुलगी नव्हती तू. तू एका मुलीची आई होतीस. अगं, कुटुंबाला, तुझ्या बाळाला तू कसे सोडून जाऊ शकतेस, हा साधा विचार करूनही तुझ्या हृदयाला पाझर फुटला नाही ?”
शेवटी, जेव्हा कोणीही तीची बाजू घेतली नाही, तेव्हा मीनलला तिथून गुपचूप निघून जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. काही दिवसांनी तिचा आणि मनीषचा घटस्फोट झाला. मीनल, आता एक छोटीशी नोकरी करून कशीतरी जगते, तोच मनीष आता त्याच्या आई आणि मुलीसोबत आनंदी जीवन जगत आहे.
– समाप्त –
मूळ इंग्रजी कथालेखक : अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈