प्रा. सुनंदा पाटील
विविधा
☆ कवी आणि काव्य… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
कवितेविषयी माझंही एक छोटंसं स्फुट -***
✍ “ कवी व काव्य”
✍ गद्य विद्वत्तेची रांग
पद्य तुक्याचा अभंग
अगदी मोजक्या शब्दात काव्याची केलेली व्याख्या. सर्वांना पटेल आणि रुचेल अशीच,.
कोण असतो कवी ?
काय असतं काव्य ?
व्हिक्टर ह्युगो म्हणतात, त्याप्रमाणे कवी म्हणजे एका देह कोशात सामावलेली समग्र सृष्टी.
एखाद्याला जे काही सांगायचंय ते गद्यात चार पाने किंवा चारशे पाने होईल. आणि तेच काव्यात फक्त चार ओळीत सांगता येईल,. ही आहे ताकद कवितेची.
सुख दुःख, प्रेम विरह, श्रीमंती गरिबी, आई वडिल, परमेश्वर, पंचमहाभुते, भूत भविष्य वर्तमान, कुठलाही विषय कवीला आणि पर्यायाने काव्याला वर्ज्य नाही.
एकाच कवितेतून प्रत्येक रसिक वेगवेगळा अनुभव घेऊ शकतो.
कसं असतं काव्य?
अक्षरे सांधुनी ओली
शब्दांचे राऊळ झाले
अर्थाच्या गाभाऱ्याशी
कवितेचे विठ्ठल आले
आणि अशा काव्याला म्हणावंच लागत नाही की,
” माझे काव्य रसाळ रंजक असे
ठावे जरी मन्मना
” द्याहो द्या अवधान द्या ” रसिकहो
का मी करू प्रार्थना ? “
रसिकहो, कवी या शब्दाच्या भोवती किती आवरणं असावीत? आणि काव्याचे तरी किती प्रकार?
ओवी, अभंग, श्लोक, भूपाळी, आरती, वेचे, कविता, गझल, अष्टाक्षरी, भावगीत, भक्तीगीत, बालगीत, बडबडगीत, बोलगाणी, पाळणे, डोहाळे, उखाणे, लावणी, पोवाडे ‘, समरगीत, स्फूर्ती गीत, देशभक्ती गीत, प्रार्थना अबबब. आणखी कितीतरी आहेत. तरीही कवीची ही काव्यकन्या दशांगुळे उरलेली असतेच.
जवळजवळ प्रत्येक कवीने काव्या विषयी खूप काही लिहून ठेवलंय
केशवसुत तर साभिमान म्हणतात
आम्हाला वगळा गतप्रभ झणी होतील तारांगणे
आणि हे खरं आहे. श्री रामप्रभू घराघरात पोहचले कारण, वाल्मिकी, तुलसीदास आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांच्यामुळे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही.
कवी हा आपल्याच एका विश्वात रमणारा प्राणी असतो. त्याच्या आनंदात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवं. कवीला येणारा अनुभव हा साधुसंतांना येणाऱ्या आध्यात्मिक आनंदाच्याच जातीचा असतो.
कवितेवर जो प्रेम करू शकतो, काव्यानंदाचा जो उपभोग घेऊ शकतो, त्याचा आत्मा कधीही मलीन होणे शक्य नाही. त्याच्या ठायी मानवी दोष, उणिवा, दुबळेपणा, असेलही कदाचित, पण त्याचा आत्मा मात्र सदैव एका तेजोमय वातावरणात भरारी घेत असतो. प्रत्येक कवी हा ” ज्ञानोबामाऊली तुकाराम ” या मध्यमपदलोपी समासा इतकाच मोठा आहे.
उंची इमला शिल्प दाखविल
शोभा म्हणजे काव्य नव्हे
काव्य कराया जित्या जिवाचे
जातीवंत जगणेच हवे
राहिला प्रश्न रासिकाचा
रसिकहो थोडेसे तरी काव्य आपल्या वृत्तीत असल्याखेरीज तुम्हाला खऱ्या काव्याचा साक्षात्कार कुठेही होणार नाही.
शेवटी काय ?
कवी मनमोहन म्हणतात
शव हे कवीचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतची होता
फुले त्यावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतची होता.
धन्यवाद!
© प्रा.सुनंदा पाटील
गझलनंदा
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈