सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ रोमांचक असे काही… ☆ सुश्री त्रिशला शहा 

निवांत क्षणी काही ऐकलेल्या, अनुभवलेल्या, पाहिलेल्या अनेक गोष्टी मनात खिळून रहातात, मनावर अगदी अधिराज्य गाजवतात. त्याचा आनंद, दुःख त्या गोष्टीवर अवलंबून असले तरी त्या परतपरत आठवतात. मनावर मोहिनी घालतात. कधीकधी मनाचा अगदी ताबा घेतात. अशाच उत्कंठा वाढवणाऱ्या, रोमांचित करणाऱ्या अनेक गाण्यांमध्ये आपण हरवून जातो. अशाच काही रोमांचक वाटणाऱ्या, मनच नव्हे तर देहभान हरवून टाकणाऱ्या, मन उल्हसित करणाऱ्या अनेक आठवणीत रमायला आपल्यालाही नक्कीचं आवडते. मंडळी, हा आठवणींचा खजिना उलगडत जाताना आपल्यालाही मनस्वी आनंद वाटल्याशिवाय रहाणार नाही.

भारतीय संगीत म्हणजे एक अतिशय भावनाप्रधान आणि मन मोहवून टाकणारे, पिढीजात चालत आलेले अजब रसायन आहे, मनातील आनंद, दुःख, प्रेम, विरह यातील कोणत्याही भावनेवर गाणे गाऊन त्याचे प्रकटीकरण केले जाते. मनातील भावनांचा कल्लोळ गाण्यांच्या माध्यमातून मांडताना अभिनयाचा कस लागतो. म्हणूनचं ते गाणे सर्वच द्रुष्टीन अजरामर ठरते. अशीच काही अप्रतिम अशी गाणी आपल्यालाही रोमांचित करुन जातातच आणि परतपरत ते गाणे ऐकताना तोच अनुभव येत रहातो. निव्वळ काही विशिष्ट जागांसाठी ते गाणे पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते, अगदी त्यात हरवून जायला होते. अशीच काही गाणी त्यांच्या शब्दांमुळे, चालीमुळे किंवा त्यातील उत्कंठ अभिनयामुळे, भावभावनेतील तरंगामुळे मनात घर करुन बसतात. अशाच उत्कंठावर्धक अशा काही गाण्यांबद्दल, त्याच्या सुमधूर चालींबद्दल, त्यातू़न अजरामर झालेल्या भूमिकेमध्ये आपणही त्यात किती समरसून जातो त्याविषयी;-

एक अनाडी असलेला नावाडी असा नायक आणि शिकलेली नायिका यांच्या प्रेमकथेतून साकारलेला, सुनील दत्त आणि नूतन यांच्या सजग अभिनयाने नटलेला सुंदर चित्रपट म्हणजे मिलन. यातील सर्वच गाणी अप्रतिम आहेतच, त्यातीलच अतिशय सुंदर असे गाणे म्हणजे सावन का महिना पवन करे सोर. या गाण्याची सुरवात म्हणजे नायक नायिकेला गाणे शिकवित असतो असा प्रसंग पण गाण्याच्या सुरवातीचे शब्द म्युझिक शिवाय येतात. ‘सावन का महिना, पवन करे सोर, जियरारे झुमे ऐसे जैसे बनमां$नाचे मोर. या  नाचे मोर या शब्दांवर पडणारी तबल्यावरची थाप ऐकताना अवघा देह कानात गोळा होतो आणि अंगावर रोमांच उभे रहातात जणू बनात आता मोरच नाचतोय कि काय असे वाटावे इतका सुरेखसा गाणे आणि वाद्यांचा मिलाफ साधलाय त्या संगीताच्या माधुर्यात आपणही रममाण होऊन जातो आणि लता – मुकेशच्या आवाजातील गाण्याचा मनापासून आनंद घेत रहातो. 

असाच छानसा परिणामकारक ठेका पडलाय देवदास या चित्रपटातील गाण्यात. माधुरी दिक्षीत, ऐश्वर्या रॉय आणि शाहरुख खान यांच्या दमदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटातील गाणीही त्यांच्या अविट चालींमुळे कर्णमधुर आहेत. या चित्रपटातील एका गाण्यात, प्रियकराची वाट पहात नायिका श्रुंगार करुन मैफिल सजवण्याच्या तयारीत असते पण प्रियकराच्या आगमनाशिवाय ती मैफिल खोळंबून ठेवते आणि त्याची चाहुल घेत असताना एकदम तो समोर दिसतो तेव्हा भावविभोर होऊन ती गाते, नाचते हमपें ये किसने हरा रंग डाला. रसिकहो यातील हम या शब्दावर पडणारी तबल्यावरची थाप केवळ अवर्णनीयच. हा ठेका आपल्याच काळजाचा ठोका चुकतोय कि काय, इतका परिणामकारक साधला गेलाय. इतका सुरेख मिलाफ या न्रुत्य, शब्द आणि वाद्यांचा साधलाय म्हणूनच तो नक्कीचं रोमांचकारी वाटतो. संगीतकाराच्या या कौशल्यपुर्ण ठेक्याला खरोखर मनपसंत दाद द्यावीशी वाटते. असाचं अतिशय मनोहारी, श्रवणीय नमुना म्हणजे गाईड या चित्रपटातील गाण्याचा. वहिदा रहेमान आणि देवानंद यांच्या बहारदार अभिनयाने परिपुर्ण असा, यातील असेच एक न्रुत्य संगीताचा सुरेख संगम साधणारे गीत म्हणजे पिया तोसे नैना लागे रे वहिदा रहेमानच्या अप्रतिम अशा न्रुत्याचा एक सुंदर आविष्कार. आपल्या लाडिक आवाजात ‘पिया तोसे नैना लागे रे’ असे म्हणताना वाद्यांचा सुरेखसा पीस वाजतो आणि त्या तालावर अतिशय लालित्यपूर्ण असे वहिदाचे न्रुत्य आणि लतादिदींचा मधुर आवाज यांचा डोळ्याचे पारणे फिटणारा मनोहारी संगम पहायला मिळतो तेव्हा आपण स्वतःला हरवून त्या रमणीय कलेचा आस्वाद घेतो तोच खरा रोमांचकारी क्षण. यावेळी वहिदाच्या अदा पाहू कि लतादिदींचा स्वर मनात साठवू की एस्. डी. बर्मन यांचे संगीत ऐकू, प्राधान्य कोणाला देऊ असा प्रश्न नक्कीच पडतो. भारतीय संगीताचा असा मिलाफ पहाण्याचा आनंद आगळाच.

जुन्या चित्रपटांपैकी संगीताभिनयाने सजलेला आणखी एक चित्रपट म्हणजे मीनाकुमारी, राजकुमार आणि राजेंद्रकुमार यांच्या सम्रुध्द अभिनयाने, लतादिदींच्या अविट गाण्यांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला दिल एक मंदिर. 

आजारपणामुळे जन्म-म्रुत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या नायकाच्या जीवनातील ती रात्र. उद्याच्या ऑपरेशनमध्ये काय होईल याची चिंता, त्यामुळे मनात दाटलेले काहुर आणि अस्वस्थता दाखवणारी पतीपत्नीच्या जीवनातील तगमग वाढवणारी ती बैचैनीची रात्र. गतजीवनातील घालवलेले पत्नीसमवेतचे आनंदाचे क्षण आठवताना आपल्या पत्नीला परतत एकदा नववधूच्या रुपात पहाण्याची इच्छा तो बोलून दाखवतो तेव्हा मनात चाललेल्या वादळाला थोपवून धरुन नायिका यासाठी तयार होते. आजची रात्र फक्त आपल्या दोघांची आहे. उद्याचा विचारच नको या भावनेतून नायिका, मीनाकुमारी सारा साजश्रुंगार करुन नववधूच्या वेशात येते आणि खिडकी उघडून निरभ्र आकाशातील चंद्रमालाच म्हणते रुक जा रात ठहर जा रे चंदा, बिते ना मिलन की बेला. 

आपल्या मनातील भावनांचा कल्लोळ डोळ्यातून चेहऱ्यावरुन साकारणाऱ्या या अभिनेत्रीला पहाताना आपल्याही अंगावर रोमांच आल्याशिवाय रहात नाहीत. राजकुमार, मीनाकुमारीचा अतिशय दर्दभरा उत्कट प्रेमाचा अभिनय आणि त्याला साजेसा लतादिदींचा करुण स्वर हे सारेच अतुलनीय, अवर्णनीय.

शब्दप्रभू गजानन दिगंबर माडगूळकर म्हणजेच आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर. अनेक चित्रपट गीतांच्या माध्यमातून त्यांना आपण जाणत असलो तरी गीतरामायण या महाकाव्याची रचना करून त्यांनी मराठी माणसाच्या मनामनात अढळस्थान निर्माण केलयं. गदिमा आणि बाबुजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या निर्मीतीतून साकारलेले गीतरामायण श्रवणीय, वंदनीयही आहेच. अनेक उपमा, अलंकारात्मक शब्दांची अक्षरशः उधळण करणारे गदिमा आणि अविट अशा चाली लावून स्वरबध्द करुन आकाशवाणीवर सादर करणारे बाबूजी यांची ही अजरामर कलाकृती. अनेक कलाकारांच्या माध्यमातून गायलं गेलेलं हे महाकाव्य जरासुद्धा कंटाळवाणे वाटत नाहीच उलट ते पुन्हापुन्हा ऐकावेसेच वाटते. गीतशब्दांची ही मोहिनी अनुपम्य अशीच आहे. म्हणूनचं गीतरामायणाच्या कार्यक्रमात कलाकारांकडून पहिलच गीत जेव्हा गायलं जात स्वये श्री रामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती या शब्दांबरोबर नकळतच श्रोते ठेका धरुन डोलायला लागतात आणि इथून पुढचे दोन तास या मैफिलीत आपण आकंठ बुडणार आहोत या जाणिवेतून मन रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या अजोड आणि अनमोल कलाकृतीच्या माध्यमातून गदिमा आणि बाबूजी़नी एक महान ठेवा रसिकांसाठी निर्माण करुन ठेवलाय.

अनेक रागांवर आधारित असलेली ही आणि अशीच अनेकानेक गाणी चित्रपटांच्या, भावभक्ती गीतांच्या रुपाने आपण रोज ऐकतो, त्याला अभिनयाची जोड देऊन अनेक कलाकारांनी ती सम्रुध्द करुन ठेवलेली आहेत. त्यातून साकारलेल्या अशा कलाकृतींमुळे आपणही भावविभोर होऊन जातो. कान, डोळेच नव्हेतर अवघे तनमन रोमांचित करुन जातो हीच भारतीय संगीताची जादू म्हणता येईल यात शंकाच नाही. काल, आज आणि उद्याही या संगीताची जादू आपणा सर्वांच्या मनावर मोहिनी घालतच रहाणार आहे हे नक्कीच.

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments