सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “सुख…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
मुक्त विहरती कशी पाखरे.. किलबिल किलबिल आकाश भरे
ऐकला परी कुणी कधी का, कलरव त्यांचा उसासे भरे
*
खळखळ झरझर पाणी वाहे, स्वतःच शोधे वाट नि वाहे
दिसले का परि कधी कुणाला. वैतागून ते थांबून राहे
*
वृक्षवेली अन बागा फुलत्या, वाऱ्यासंगे नितचीडोलत्या
दिसल्या का पण कुणा तरी हो, कंटाळून कधी चिडलेल्या त्या
*
राग लोभ अन मोह नि मत्सर, त्यांच्या वाटे कधी न जाती
विश्वच त्यांचे किती वेगळे.. सुख-दु:खाची मुळी न गणती
*
वाटे मजला रोजच त्यांना पहाटेच तो देव भेटतो
षड्रिपू त्यांचे बांधून ठेवून मुक्त तयांना करून जातो
*
आम्ही माणसे पाखंडी किती.. सुखनिधान ते उरी गाडतो
षड्रिपू सारे मुक्त सोडूनी.. सुख शोधत अन वणवण फिरतो
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान