आज भल्या पहाटेच जाग आली.मी बेडवर उठून बसले.एवढ्यात खिडकीतून वाऱ्याची हलकीशी झुळूक आली. पण ती गंधित होती. मला जाणवले हा तर मदनबाणचा गंध. अरे वा, माझा मदनबाण फुलला का? थोड्या वेळाने उजाडलं आणि पाहिलं माझ्या बाल्कनीत मी हौसेनं लावलेला मदनबाण फुलू लागला होता. आता चार फुले फुलली. मला फार आनंद झाला आणि प्रकर्षानं एक गोष्ट जाणवली अरे वैशाख मास अगदी जवळ आला.
मदनबाण हा वैशाख महिन्याचा मानबिंदू.मोगरा, सायली जाई जुई, चमेली आणि हा मदनबाण या महिन्यात उच्च कोटीच्या सुंगधाची उधळण करीत असतात.
वास्तविक या महिन्यात कडक उन्हं असतात.सूर्याचे तीव्र तेजस्वी शर बरोबर आपल्यावर संधान साधून असतात. रवीराजाचं हे तेजस्वी रुप फार प्रखर तेजानं झळकत असते.दिवस मोठे होऊ लागतात. कडक उन्हं. त्यात गंधाची उधळण. रंगांची आपसातील चढाओढ. काय कमालीचं रंगतदार वातावरण असते.गुलमोहोर अगदी आतून रंगबावरा होतो. तर बहावा सोनपिवळ्या कळ्याफुलांची झुंबरं अंगांगावर मिरवत असतो. अगदीबांधा वरच्या बाभळीला ही फुलायचे वेड लागते.तिची गोंड्यासारखी पूर्ण केसरयुक्त गोल गोंडस फुलं अंगभर लेवून ती अगदी पूर्ण सौंदर्यानिशी दिमाखात उभी असते.
या सर्व गडबडीत पक्षीही मागे नसतात.कारण काही घरटी बांधण्यात मग्न,काही घरट्यातील पिलांना भरवण्यात दंग.कोकिळा बरोबर आता वैशाखात बुलबुल पक्ष्यांचा गळा खुला झालेला असतो आणि त्यांच्या सुरेल मनभावन ताना मनाला तरतरी देतात.खरंतर बुलबुल पक्ष्यांच्या मुखातून वसंतच गातो असे वाटते.
वैशाख महिन्यात निसर्ग गंधाळतो,रंगतो,तसाच हा व्रतस्थ महिनाही आहे. परम पावन असा हावैशाख महिना पुण्यप्रद आहे.या महिन्यात भगवान विष्णू, परशुराम यांचा जन्मझालाअसेम्हणतात.म्हणून या महिन्यात भगजोवान, विष्णू लक्ष्मी, भगवान परशुराम यांचे पूजन केले जाते.पूर्ण वैशाख महिना सूर्याला अर्घ्य (जल)देतात, नदी, सरोवरात स्नान करतात.तसेच उत्तराखंड येथील परमपावन बद्रिनाथ मंदिराचा दरवाजा या महिन्यात वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेला उघडला जातो.जगन्नाथ पुरी येथील रथयात्रा याच महिन्यात शुद्ध व्दितीयेला निघते.शुध्द नवमीला सीता भूमीतून प्रकट झाली अशी मान्यता आहे.या महिन्यात पौर्णिमेला अनन्यसाध़ारण महत्व आहे. तो दिवस बुध्द जयंती म्हणूनच साजरा केलाजातो.वैशाखातील एकादशी ही मोहिनी कादशी. समुद्रमंथनावेळी अमृत निघाले. त्यावेळी विष्णूंनी मोहिनी रुप घेतले ते याच दिवशी.अशा रीतीने वैशाख हा व्रतांचा, दानाचा सुद्धा महिना आहे. या महिन्यात जलदानाचे महत्त्व आहे. वाटसरूंसाठी रस्त्याच्या कडेला मातीच्या घड्यात पाणी ठेवले जाते. तसेच पाणपोया सुरु केल्या जातात. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून हे जलदान करण्यात येते.
वैशाखातील रात्री या हव्याशा वाटतात. चांदण्यांचे तेज जरी थोडेफार मंदावले असले तरी दिवसभराच्या तलखी नंतर गारवा देणाऱ्या रात्री सुखद वाटतात.पण पौर्णिमेला तर सौंदर्याचा अत्युच्च बिंदू चंद्राच्या चांदण्यानं गाठलेला असतो.अगदी अंतर्गर्भाला सादावणारी ही प्रसन्न पौर्णिमा म्हणजे स्वर्गीय सुख. रातराणी, मोगऱ्याच्या गंधानं भारावलेली, शांत हवीशी.
वसंताच्या गंधसृष्टीचे पूर्ण वैभव वैशाखातच असते.अगदी फुलांच्या गंधाचा परम उत्कर्ष याच महिन्यातला.जे जे वसंत ऋतूचे आहे त्याला पूर्णत्व आणि विराम देण्याचे कामही चैत्र सखा या नात्याने वैशाखास पूर्ण करावे लागते. वास्तविक सौंदर्याची ही विकलावस्था धीरोदात्तपणे वैशाख पाहतो. त्यामानाने चैत्र हा मनाने अतिशय हळवा वाटतो. सौंदर्याची ही अवस्था, ही विपन्नावस्था चैत्र बघू शकणार नसतो पण ते काम वैशाख पूर्ण करतो कारण त्याला ज्येष्ठाच्या मदतीने सृष्टीचा नूर आणि तोल सांभाळायचा असतो. अगदी झाडाची पाने सुद्धा टपटप गळताना तो पाहतो.तर असा हा गंधवेडा,सुरम्य आणि रुपरंगाचा चाहता,सौंदर्यासक्त, तसाच व्रतस्थ,आणि धीरगंभीर स्वभावाचा कर्तव्यदक्ष वैशाख.याचं मोठेपण अगदी मनाला भावून जातं.
☆ देणाऱ्याने देत जावे…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
सुजाता दारातच उभी राहून कुणाशी तरी बोलत होती, “काय काम काढलंस? त्यांनी बोलवलं होतं काय?” तिच्या या प्रश्नावर दबल्या आवाजात तो माणूस काही तरी सांगत होता.
“ते बॅंकेतून रिटायर झाले म्हणून काय झालं, एवढे पैसे काय घरात असतात होय?” सुजाताचं बोलणं तेवढं सतीशच्या कानावर आलं.
“ठीक आहे वहिनी, फक्त साहेबांना एकदा भेटून जातो.” असं म्हटल्यावर सुजाताने त्या गृहस्थाला आत बसायला सांगून सतीशला आवाज दिला, “अहो, ऐकलंत काय, जावेद आला आहे तुम्हाला भेटायला.” सुजाता आत निघून गेली.
सतीश दिवाणखान्यात येताच जावेद पटकन उठून उभा राहिला. सतीशने त्याला खुणेनंच बसायला सांगितलं आणि लगेच विचारलं, “किती पैसे हवे आहेत तुला?”
त्यानं चमकून वर पाहिलं. सतीश हळूच म्हणाला, “मी ऐकलं आहे सगळं. किती हवे आहेत सांग.”
इकडे तिकडे पाहत तो हळूच बोलला, “साहेब, पाच हजार रूपयाची नड आहे. मुलाला दवाखान्यात अॅडमिट करावं लागेल. तापानं फणफणला आहे तो. काल भारत बंद असल्याने माझा चेक वटला नाही. उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचे पैसे परत करतो.”
सतीश पटकन आत गेला. पैसे आणून त्याने जावेदच्या हातात ठेवले. जावेदही तेवढ्याच घाईत निघून गेला.
हा सगळा प्रकार सुजाताच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती कमरेला पदर खोचत बाहेर येत म्हणाली, “काय हो, हा जावेद चार वर्षापूर्वी आपल्याकडे फर्निचरचं काम करून गेला होता ना ! त्यानंतर आजच दिसला. आजवर त्याने कितीतरी ठिकाणी कामं केली असतील. पण पैशासाठी त्याला तुमचाच भाबडा चेहरा बरा आठवला. आणि बघाच तुम्ही, उद्या तो तुमचे पैसे परत करायला फिरकणारच नाही. मी अगदी खात्रीने सांगते.” सतीशने तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
सतीशच्या फ्लॅटमध्ये जेव्हा फर्निचरचं काम करायचं होतं, तेव्हा जावेद पहिल्यांदा सतीशला भेटला होता. त्यानं एकंदर पंचेचाळीस हजाराचं एस्टिमेट सांगितलं होतं. काटेकोर मोजमापासहित आयएसआय मार्कचा कुठला प्लाय, कुठले लॅमिनेशन वापरणार हे सगळं सतीशला त्यानं समजावून सांगितलं. जावेद त्याच्या एस्टिमेटवर ठाम होता. सतीशला बजेट जास्त वाटत होतं म्हणून विचार करीत होता.
जावेद म्हणाला, “साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काम अगदी चोख करून देईन. दोन चार हजाराकडे पाहू नका. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून हेच काम तीस हजारात देखील होईल. मला क्वालिटीत तडजोड करायला आवडत नाही. या उपर तुमची मर्जी !”
सतीश पटकन म्हणाला, “अरे त्याचं काही नाही. माझं बजेटच तीस हजाराचं आहे.”
“साहेब उरलेले पंधरा हजार दोन चार महिन्यानंतर तुमच्या सवडीने द्या, मी अॅडजस्ट करीन.”
फर्निचरच्या कामामुळे सतीशच्या घरातल्यांची कसलीही गैरसोय झाली नाही. जावेदने सगळी मापं काटेकोरपणाने घेतलेली होती. त्यानं सगळं वूडवर्क बाहेरच करून घेतलं. एका रविवारी येऊन फिटींग आणि लॅमिनेशन करून गेला. सतीशने देखील राहिलेले पैसे जावेदला लगेच देऊन टाकले. जावेदने काम सुरेखच केलं होतं.
थोड्याच वेळात सुजाता सतीशच्या समोर चहाचा कप ठेवत म्हणाली, “तुम्हाला आठवतं का, मध्यंतरी तुमच्या नात्यातला कुणी तरी आठवड्यात देतो म्हणून दोन हजार रूपये घेऊन गेला, परत फिरकलाच नाही. आता कुठल्याही कार्यक्रमात दिसला तरी तो न तुम्हाला ओळख दाखवतो न मला. तुमच्या एका मित्राचा जावई ‘लगेच परत करतो’ म्हणून एक हजार रूपये घेऊन गेला. फिरकला का तो इकडे?”
सतीश शांतपणे सुजाताला म्हणाला, “हे बघ, हे पैसे परत येणार नाहीत, हे समजून उमजूनच मी दिले होते. आपल्याकडून त्यांना केलेली ही एक नगण्य मदत आहे असं समज, हे तुला त्यावेळीच बोललो होतो. तुला ती कविता आठवतेय का? ‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे !’”
सुजाता पटकन म्हणाली, “ते कवी महाशय असं का म्हणाले मला मुळात तेच कळलेलं नाहीये. देणारा देतो आहे तर घेणाऱ्याने त्याचे हात सुद्धा कशाला घ्यावेत? त्याचे हात त्यालाच राहू द्यावेत ना !”
सतीश हसत हसत म्हणाला, “अगं, देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्या देणाऱ्या माणसाची दानत घ्यावी आणि घेणाऱ्यांनी देखील कुणाला तरी देत जावे असा त्याचा अर्थ आहे.”
“ते असू द्या, पण हा जावेद तुमचा कोण लागतो बरं?”
या तिच्या प्रश्नावर सतीश म्हणाला, “अग, जावेद आणि माझ्यात कसलंही नातं नाही हे खरं असलं तरी किमान माणुसकीचं नातं तरी आहे ना? तूच म्हणालीस ना, त्याला तुमचाच भाबडा चेहरा का आठवला म्हणून? कदाचित जावेदने माझ्यात माणुसकीचा ओलावा पाहिला असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय…
सुजा, अग पैसे उसने मागण्यासाठी मुलगा आजारी आहे असं कारण कुणी सांगेल का? क्षणभर समज, तो खोटेही सांगत असेल. ते खोटंच आहे असं मी कशाला समजू? कदाचित खरं देखील असेल. एक वेळ बेगडी श्रीमंती दाखवता येईल पण सच्चेपणा कसा दाखवता येईल? ती सिध्दच करावी लागते. गरिबांच्यावरच विश्वास टाकता येतो याचा प्रत्यय मला खूप वेळा आलेला आहे….. एका कवीने किती छान सांगितले आहे, ‘ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत. आभाळाएवढी ज्यांची उंची, त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांना थोडे उचलून घ्यावे !’ .. कळलं?”
“सगळ्यांना मदत करायला आपण काही धनाढ्य लागून गेलो नाही. जग हे या कवींच्यामुळे चालत नाही. माणूस थोडा व्यवहारीदेखील असावा लागतो.” असं बडबडत सुजाता आत गेली.
☆ सोनेरी शिक्षा… सुश्री संजीवनी बोकील☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते.मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.
स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या.चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या गप्पाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. “बोकील बाई कुठेत?” असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं.तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.
हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्यापुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण विचारल्यावर मला कळले की ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली .नंतर आणायला गेली तेव्हा काही मुले तिच्या डब्याचा फूटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील ,दहावीतील मुले होती. म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती.
हे सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. “आता माझी आई मला मारेल बाई, मी आईला काय सांगू?” असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटले,” आईला सांग की डबा बोकील बाईंकडे आहे आणि जमले तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन.”
प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली.
माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्यात याचं आश्चर्य सगळ्या चेह-यांवर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती.
कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून म्हटलं ,” हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. माझा विश्वास आहे की यात सामील असलेले सगळे जण तिथे येतील.”
मुलांच्या हातून घडतात त्या बव्हंशी चुका असतात,गुन्हे नाहीत हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधी कधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडू द्यायला हवी.मग काय तो न्यायनिवाडा! आवाज चढवून डाफरण्याऎवजी, आपण कुठे चुकलो हे मुलांना आतून स्वत:ला कळायला,पटायला,मान्य व्हायला हवं. ते झालं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मूठभर मुलांना झापण्यात वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे.त्यानुसारच सारं काही झालं.
शाळा सुटली.स्टाफरूम ब-यापॆकी रिकामी झाली मग मी बाहेर उभ्या असलेल्या पाच जणांना आत बोलावलं,डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का विचारलं .ते कबूल झाले पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं,”तुम्ही तो उचलून ऑफिस मध्ये का ठेवला नाहीत? या गोष्टीने मला फार दु: ख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी हे वाईट कृत्य करावं.तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्याने घाम गाळून मिळवली असेल त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे,एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत! आणि इथे अन्नाला लाथा मारल्यात तुम्ही?
मला भीती या गोष्टीची वाटते की आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागेपुढे बघणार नाहीत. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणे नाहीत? इतका दुष्टपणा आला कुठून? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्याऎवजी शिक्षा मीच घ्यायला हवी.”
माझं शेवटचं वाक्य ऎकल्यावर मुले हलली. सगळ्यांच्याच तोंडून ‘ सॉरी बाई,तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा पण असं नका म्हणू’ असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले.
मी म्हटलं,” तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का?” मुलं क्षणभर गप्प बसली मग एकजण म्हणाला ,
“आम्ही भरून देऊ तिचा डबा.”
” कसा? पालकांकडून पॆसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली.”
” नाही बाई आम्ही काम करू काही तरी.”
मी म्हटलं ,” ठीक आहे पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे.?”सगळ्यांनी माना डोलावल्या. ” आणि एक,आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही.” त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी.
तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान प्रेझेंटेशन पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पॆसे कुठून आणलेत असे ती त्यांना आज विचारायला आली होती. तिला कळले ते असे की त्यांच्यापॆकी एकाच्या काकांचे जवळच लहानसे घर होते. घराभोवती वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ करायचे काम माळ्याऎवजी मुलांनी रविवारी केले होते.मुले १५-१६ वर्षांची होती त्यामुळे काही अडचण नव्हती. अल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पॆसे सहज मिळवता आले होते त्यांना तास- दोन तास काम केल्यावर.
मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवले होते. ” हे काय आहे “विचारल्यावर एकाने उभे राहून सांगितले की-” डबा घेऊन झाल्यावर पॆसे उरले. मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणले.”
“माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे.” मी असं झटकून टाकताच पाचांचे चेहरे गोरेमोरे झाले. एकजण उठून हळूच म्हणाला,” मॅम तुम्ही या पेनने रोज प्रेजेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही.”मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला,” बाई,आता तुम्ही आमच्याशी बोलणार ना?”
ते प्रामाणिक,भाबडे शब्द ऎकून मला भरून आले. मग “बाई, उघडा ना पेन.” असा आग्रह सुरू झाला.सोनेरी रंगाच्या त्या पेनने मी रोज हजेरी मांडली.तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला
लेखिका :- सुश्री संजीवनी बोकील
प्रस्तुती : श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे☆
I want to be able to be alone, to find it nourishing- not just waiting. –SUSAN SONTAG
साधारणपणे साठपासष्ठीच्या वयाच्या व्यक्ती कोणत्याही कारणाने एकत्र आल्या तरी त्यांच्या बोलण्यात एकटेपणाचा विषय आल्याशिवाय राहत नाही. —- या दृष्टीने सध्याचे समाज जीवन पाहिले तर त्यात सरळ सरळ दोन गट दिसून येतात. वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीची नवी मूल्ये, नवे विचार अगदी सहजी आत्मसात करून, भावनिक गोष्टींमध्ये न गुंतता स्वतःला जो विचार सोयीचा आणि फायद्याचा वाटतो तो पटकन स्वीकारून पुढे चालणारा एक गट- तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा !…… तर झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती समजत असली, अनुभवाला येत असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, पुढे सर्व काही ठीकच होणार आहे -असणार आहे असा सोयीचा विचार करून, काळाची पावले न ओळखता, बेसावधपणे जगणारा एक गट— अर्थातच वृद्धांचा !
हे प्रकर्षाने जाणवण्याचे कारण म्हणजे, ६ मे २०२३ च्या टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख ! विषय आहे– एकाकीपणा —- Loneliness. संपादकीयामधे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, ‘ Young people prefer new age autonomy over some idealised intergenerational families cohesion’.
वृद्ध, मुले आणि नातवंडे सगळ्यांनी एकत्र बरोबर राहणे आता जवळजवळ नाहीसे होताना दिसते. एवढेच नव्हे तर एका शहरात किंवा एका देशात पण ज्येष्ठांबरोबर रहात असणारे तरुणांचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होताना दिसते आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जो फायदा देशाला आणि मुलांना होतो आहे, त्याच्या चर्चा होताना आपण वाचतो आणि ऐकतो आहे. तरुणांची, काम करणाऱ्यांची संख्या इतर देशांमध्ये खूप कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना अक्षरशः रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर मनाने अजूनही भूतकाळातच राहणाऱ्या, आपले म्हातारपण विनात्रासाचे जाणारच आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या वृद्धांनी खरोखरीच जागे होण्याची गरज आहे. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती म्हणजे US Surgeon General. सध्याचे सर्जन जनरल विवेक मूर्ती (एम.डी) यांनी एक ॲडव्हायझरी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, धूम्रपानासारखाच आणि तितकाच, एकाकीपणाही धोकादायक आहे. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार, अर्धांग वायू, डिमेन्शिया यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. पण सध्या घरात बोलायला माणसे नाहीत आणि असली तरी त्यांना गप्पा मारायला वेळ नाही अशी परिस्थिती ! मग वेळ घालवण्यासाठी वृद्ध मोबाईलच्या विळख्यात सापडतात. अशा व्यक्तींना मानसिक रोग होण्याचा धोका अधिक आहे हे स्वतः ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे.
घरात माणसे उपलब्ध नसतील तर आपल्याला चार चौघांमध्ये सुरक्षितपणे राहता येण्यासाठी निवासाचे काही वेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे. तसेच जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनीही वृद्धांना ती जाणीव प्रकर्षाने करून द्यायला हवीच आहे. ही जाणीव केवळ आर्थिकच नाही, तर अनेक स्तरावर करून घेणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बरोबर कोणीतरी असणे, किंवा अशी व्यक्ती वेळेवर उपलब्ध होणे, ही आजची मोठी गरज आहे. पण त्याची शक्यताही कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सुरक्षितता आणि सोय यांची सांगड घालून पुढची वाटचाल करायला हवी आहे. यासाठीचा सध्या उपलब्ध असलेला एक मार्ग म्हणजे ‘ वृद्ध – निवास ! ‘ पूर्वी त्याला वृद्धाश्रम म्हणत. पण आता मात्र वृद्धाश्रमापेक्षा वृद्धनिवासच म्हणणे योग्य ठरेल…. वृद्धनिवासांबद्दल एक नकारात्मक अशी भावना सर्वांच्याच मनात आहे. वृद्धांच्या , मुलांच्या आणि समाजाच्याही मनामध्ये ! त्याचं कारण म्हणजे वृद्धाश्रमात राहिले तर मुले काळजी घेत नाहीत असा अर्थ काढून जगाकडून आपल्या मुलांना/कुटुंबाला नावे ठेवली जातील अशी भीती वृद्धांना वाटते. ही भीती खरी आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहण्याची गरज कोणाला वाटत नाही..
यासाठी खरंतर वृद्ध- निवासाचा पर्याय नेमका कसा आहे?..तो जास्त सुखकर आणि सोयीचा कसा होऊ शकतो? ते समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मिळाली तर वेळ आल्यावर असा निर्णय घेणेही सोपे होऊ शकते ..
(हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन यासाठी ‘वृद्धनिवास‘ या विषयावर ‘सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स‘ या संस्थेतर्फे दि. २६ मे २०२३ रोजी पुण्यामध्ये सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. —
मार्गदर्शक:-वृद्ध कल्याण शास्त्र तज्ञ, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन.—- स्वतः वृद्धांनी, पन्नाशीच्या पुढच्या होऊ घातलेल्या वृद्धांनी, वृद्ध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ही माहिती जाणून घेणे नक्कीच उपयुक्त ठरेल.)
☆ कावळा— लेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.
पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.
आमच्या एका मित्राची आजी एकदा (एकदा म्हणजे एकदाचीच) वारली.
आता तिच्या पिंडाला न शिवायचं कावळ्याला काहीही कारण नव्हतं. अहो, चांगले नव्वद वर्षे पाहून म्हातारीने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली.
तुझ्या मुला-बाळांची काळजी घेऊ म्हणावं, तर मुलगाच बावीस वर्षे पोस्टातून पेन्शन घेऊन अजून बावीस वर्षे जगेल इतका टुणटुणीत. जगो बुवा! आपल्याला त्याचं काही नाही.पण लेकी होत्या, सुना, नातू , पणतू..
सगळं काही अगदी यथासांग होतं.
मग कोणीतरी उठलं आणि म्हणालं- ” आजीबाई, एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला. “
.
.
.
पटकन् कावळा शिवला…
कावळा हा पक्षी कौटुंबिक गोष्टीत इतका बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नव्हती मला…
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – याद तुम्हारी…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 140 – याद तुम्हारी…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है आपका एक अभिनव गीत “इधर सूर्य की किरणें…”)
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
श्री हनुमान साधना संपन्न हुई साथ ही आपदां अपहर्तारं के तीन वर्ष पूर्ण हुए
अगली साधना की जानकारी शीघ्र ही आपको दी जाएगी
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈