जेव्हा मोठ्या प्रमाणात प्राणी, पक्षी, जलचर, उभयचर एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातात, तेव्हा आपण म्हणतो, ते स्थलांतर करतात आणि त्या प्रवासाला स्थलांतर असे म्हणतात. आपली मूळची जागा सोडून ते काही काळापुरते दुसर्या ठिकाणी जातात. काहींच्या बाबतीत स्थलांतर हा खूप लांबचा प्रवास असतो, तर काहींच्या बाबतीत तो जवळचा असतो.
स्थलांतर कशा प्रकारचं?
काही प्राणी एकाच मार्गाने, एकरेशीय स्थलांतर करतात. इतर काही वर्तळाकार प्रवास करतात. म्हणजे ते स्थलांतर करतात आणि काही काळानंतर पुन्हा आपल्या पहिल्या घरी परत येतात. काही प्राणी स्थलांतर करतात. तिथे आपल्या छोट्या बाळांना जन्म देतात आणि मरतात. नंतर त्यांची आपत्य, त्यांच्या मूळ जागी एकटीच परततात.
कोणत्या प्रकारे प्राणी स्थलांतर करतात?
प्राणी विविध प्रकारांनी स्थलांतर करतात. बेडूक अंडी घालायच्या वेळी नद्या, तळी वगैरे पाण्याचे स्त्रोत असलेल्या जागी स्थलांतर करतात. रॉबीन उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात. सालमन समुद्राच्या पाण्यातून पोहत नदीच्या गोड्या पण्यात येतात. विशिष्ट प्रकारच्या फुलपाखरांचा थवा वर्षातील विशिष्ट काळात ठरावीक ठिकाणी जातो.
प्राणी स्थलांतर का करतात?
एकाच ठिकाणी न राहता प्राणी स्थलांतर करतात. का? प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांनी त्याची अनेक कारणे शोधून काढली आहेत.
१. थंड हवेपासून दूर जाण्यासाठी
२. काही प्राणी दुसर्या जोडीदाराबरोबर एकत्र येऊन नवीन आपत्यांना जन्म देण्यासाठी
३. काही जण आपल्या अन्नाच्या शोधात
४. काहीजण आपल्या घरात गर्दी होऊ नये म्हणून.
स्थलांतर कसं करायचं हे प्राण्यांना कसं कळतं?
आपण काळ आणि वेळ बघण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळाचा उपयोग करतो, पण प्राण्यांना कसं कळतं, की आता स्थलांतराची वेळ झाली आहे. शास्त्रज्ञांना असं वाटतं, की दिवसाचा काळ, हे प्राण्यांचे कॅलेंडर असावे दिवसाचा प्रकाश कमी जास्त होणं, ही त्यांच्यासाठी खूण असावी. काहींसाठी तापमानातला फरकही खूण असावी.
स्थलांतर कसं करायचं, हे प्राण्यांना कसं माहीत होतं?
स्थलांतर करताना पक्षी आपल्या प्रवासात काही परिचित खुणांकडे लक्ष ठेवतात. उदा. नद्या किंवा समुद्र किनारे. सूर्य, तारे यांचाही मार्गदर्शक म्हणून ते उपयोग करतात. पण इतर प्राण्यांचं काय? ती कशाचा उपयोग करतात? आपल्याला माहीत नाही, पण स्थलांतर ही त्यांच्या आयुष्यातली आश्चर्यकारक आणि अद्भुत अशी गोष्ट आहे.
मोनार्क जातीच्या फुलपाखरांचं स्थलांतर
काही प्रकारची स्थलांतरे सहजपणे लक्षात येतात. पानगळीच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला मोनार्क जातीच्या फुलपाखरांच्या लांबच लांब ओळी दिसतात. दक्षिणेकडे ती उडत जातात. त्यांच्यापैकी काही तर ३२००कि. मी. चा प्रवास करतात. ते त्यांचा हिवाळा कॅलिफोर्निया किंवा मेक्सिकोच्या गल्फच्या भागात व्यतीत करतात. ते विशिष्ट झाडांच्या फांद्यांवर गोळा होतात. फूटभरच्या अंतरात शंभर शंभर फुलपाखरे बसलेली शास्त्रज्ञांना आढळली आहेत. इतक्या मोठ्या संख्येने एकत्र गोळा झालेली फुलपाखरे बघितल्यावर त्या झाडाला जसा फुलपाखरांचाच बहर आल्यासारखे दिसते. वसंत ऋतू आला, की मोनार्क फुलपाखरे आपला उत्तरेकडचा परतीचा प्रवास चालू करतात. वाटेत फुलपाखरांच्या माद्या अंडी घालतात आणि मरून जातात. जेव्हा अंडी फुटतात, तेव्हा नवजात फुलपाखरे आपला उत्तरेकडचा प्रवास चालू करतात. पुढच्या पानगळीच्या काळात आपल्या आई-वडलांप्रमाणे ती पुन्हा दक्षिणेकडे येतात. आई-वडील ज्या झाडावर बसले होते, त्याच झाडावरती ही बसतात.
काही विशिष्ट जातीच्या भुंग्यांचं स्थलांतर
ज्या प्रदेशात अत्यंत थंडी असते, हिमवर्षाव होतो, आणि थंडीत गवताचं पातंसुद्धा कुठे दिसत नाही, अशा युरोपमधील देशात लेडी बग नावाचे भुंगे बागेतून कंपाऊंडवॉलच्या ऊबदार फटीत जातात. ते त्यांचे स्थलांतर असते. काही जण आणखी पुढचा प्रवास करतात. एखाद्या टेकाडाकडे तेउडत जातात. तिथे अनेक लेडी बग एकत्र गोळा होतात. अगदी जवळ जवळचिकटून मोठा गट करून, एकमेकांना ऊब देत ते थंडीचे दिवस घालवतात. वसंत ऋतू आला, की ते पुन्हा आपल्या मुळच्या घरी परत येतात.
या प्रकारच्या आणि इतरही अनेक प्रकारच्या स्थलांतरामुळे शास्त्रज्ञ गोंधळात पडतात. प्राण्यांना, पक्षांना, कीटकांना कसं कळतं, की त्यांना कुठं जायचं आहे? आता हे ठिकाण सोडायची वेळ झाली आहे, याची उत्तरे अद्याप कुणालाच कळलेली नाहीत.
मुंग्यांची फौज
दक्षिण अमेरिकेत अमीझॉन जंगलातील मुंग्या विशिष्ट काळानंतर स्थलांतर करतात. पण त्या तसं का करतात, हे कुणालाच माहीत नाही. त्या काही अन्नाचा शोध घेण्यासाठी स्थलांतर करत नाहीत. कारण खूपसं अन्न त्यांनी मागे ठेवलेलं असतं. त्या विशिष्ट दिशेने जाताहेत, असंही दिसत नाही. कुठल्या तरी अज्ञात कारणाने त्या स्थलांतर करतात. स्थलांतर करताना त्या लष्करी शिस्तीने ओळी करून जाताना दिसतात. जेव्हा त्यांचं लष्कर स्थलांतर करतं, तेव्हा रस्त्यात जर एखादा सजीव दिसला, तर सैनिक मुंग्या त्याच्यावर हल्ला चढवतात आणि त्याला खातात. घनदाट जंगलातून आणि जाळ्यांच्या गुंत्यातून लढाऊ मुंग्या पुढे पुढे जातात. ही फौज जेव्हा नदीच्या अरुंद पात्राजवळ येते, तेव्हा त्या पानाच्या देठावरून किंवा गवताच्या पात्यावरून पलिकडे जातात. किंवा मग त्या पळत पळत येऊन प्रवाहात एकमेकिंना चिकटून राहून पूल तयार करतात. अर्थात् त्यांच्यातील काही काही मुंग्या पाण्यात पडतात. पण त्या लष्करात इतक्या मुंग्या इतक्या मुंग्या असतात. की अखेर त्या सजीव पूल बनवण्यात यशस्वी होतात आणि उरलेली फौज त्या पुलावरून पुढे जाण्यात यशस्वी होते. जर नदी रुंद असेल, तर मुंग्या एकत्र गोळा होऊन मुंग्यांचा बॉलच बनवतात. या बॉलच्या मधे राणी मुंगी आणि अंडी सुरक्षित ठेवली जातात. बॉल पाण्यातून घरंगळतो आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो. तळाकडच्या मुंग्या वर येत राहतात. या सततच्या हालचालीमुळे काही मुंग्या पाण्यात पडतात, पण अखेर बॉल नदीच्या दुसर्या तिरालापोचतो, तेव्हा मुंग्या पुन्हा सुट्या सुट्या होऊन त्यांची पुन्हा फौज बनते व त्यांची आगेकूच पुन्हा सुरू होते. त्यांचं हे स्थलांतर बघायला अनेक लोक जमतात. पुढे एखाद्या पडलेल्या झाडाचा कुजलेला ओंडका किंवा झाडाची पोकळ ढोली असेल, तिथे त्या थांबतात. तिथे राणी मुंगी अंडी घालते. ३०,००० पर्यंत ती अंडी घालते. त्यानंतर ती मरते. बाकीची मुंग्यांची फौज ती अंडी घेऊन पुन्हा कूच करते. त्या सतत कूच का करतात? त्या कुठे जातात? आपल्याला माहीत नाही. कदाचित् ते त्यांनाही माहीत नसेल. हे अद्याप न सोडवलं गेलेलं कोडं आहे.
रात्रीचे साडे अकरा वाजले तरी श्रीकांत लॅपटॉपवर काम करत होता. रूमचा लाइट पाहून आईनं दार वाजवलं.
“आई, काय काम आहे. झोप ना”नेहमीप्रमाणे श्रीकांत खेकसला.
“ए, विनाकारण ओरडू नकोस”
“सॉरी!! मातोश्री. प्रोजेक्टचं काम चालूयं. ते झालं की झोपतो”
“आधी दार उघड”
“काय कटकट ये”चडफडत श्रीकांतनं दार उघडलं.
“प्रोजेक्ट किती अर्जंट आहे”
“विशेष नाही”
“मग लवकर झोप”
“का?”
“सकाळी लवकर उठायचं आहे”
“सुट्टी आहे. मी निवांत उठणार”
“उद्या गुढीपाडवा पण आहे”
“सो व्हॉट…”
“सकाळी तुला गुढी उभारून पूजा करायचीय.”
“हे कधी ठरलं”श्रीकांत वैतागला.
“आत्ताच”
“गप ना. उगीच छळू नकोस.”
“आठ वाजेपर्यंत गुढी उभारु.”
“इतक्या सकाळी? ”जांभई देत श्रीकांत म्हणाला.
“खरंतर सात वाजताच उभारली पाहिजे पण उशीर झालाय म्हणून तुला सवलत. ओके!!”
“नॉट ओके, मला एक कळत नाही जर संध्याकाळी काढूनच टाकायची तर गुढी उभारायची कशाला?”
“शास्त्र असते ते! ! ”आई हसत हसत म्हणाली.
“बघ. तुझ्याकडे उत्तर नाहीये आणि हसलीस म्हणजे माझं म्हणणं तुला पटलं.”
“अजिबात नाही. आपला सण परांपरेनुसारच साजरा करायचा.”
“गुढी उभरण्या मागंच लॉजिक काय?”
“तू नवीन पिढीतला आजच्या भाषेत बोलायचं तर झेड जनरेशन मधला ना..”
“त्याचं इथं काय संबंध?”
“तुम्ही लोक खूप हुशाssssssर. मग गुढीचं उभरण्यामागचं लॉजिक गुगल कर. चॅट जीपीटी ला विचार.”
“ते तर करणारच आहे. सकाळी तुला सांगतो!!” श्रीकांत.
“चला त्यानिमित्तान तुला सणांची माहिती होईल.”
“येस. माहिती असणं केव्हाही चांगलं ना. नवीन पद्धतींचा स्वीकार करावा. स्वतःला अपडेट करावं”
“शंभर टक्के मान्य पण हा सिलेटीव्ह अप्रोच नको.”
“म्हणजे”
“सोकोल्ड मॉडर्न आणि झेड जनरेशनमध्ये भारतीय सणांना नावं ठेवण्याचा ट्रेंड आहे. प्रत्येक सणाविषयी काही ना काही तक्रारी असतातच. हे कशाला? असंच कशाला? हेच का करायचं? वगैरे वगैरे…”
“अच्छा म्हणजे प्रश्न विचारायचे नाहीत. ”श्रीकांत.
“जरूर विचारा परंतु १४ फेब्रुवारी, ३१ डिसेंबर, वर्षभर साजरे केले जाणारे ‘डे’, त्याच त्या पार्ट्या आणि अजून काही.. साजरे करताना चकारही शब्द तोंडातून निघत नाही मात्र भारतीय सणांमध्येच लॉजिक शोधता. माझा आक्षेप त्यावर आहे.”
“कुठचा विषय कुठं नेतेयेस”
“बरोबर बोलतेय. सणवार आले की हे कशासाठी? का? असं तुझ्या तोंडून बऱ्याचदा ऐकलयं.”
“परत तेच. यात काहीच चुकीचं नाही. तुझ्याकडे उत्तर असेल तर कनव्हीन्स मी.”
“मला एवढचं सांगायचं की सरसकट नावं ठेवणं सोप्पंयं त्याऐवजी आपले सण, ते साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी नीट माहिती घे. मग बोल. खात्रीने सांगते की प्रत्येक ठिकाणी लॉजिक सापडेल. ” श्रीकांत विचारात पडला.
“आई, यावर नंतर बोलू. आता रात्र खूप झालीय. तू म्हणशील तसं करतो. सकाळी सातला गुढी उभारू हॅपी!! ”
“ठीकयं पण आधी माहिती घे आणि मनापासून वाटलं तर कर उगीचच जुलमाचा रामराम नको.” आई
“दोन्ही बाजूनं कसं काय बोलतेस”
“बोलाव लागतं. विनाकारण सणांना टार्गेट केल्यावर राग येणारच.”
“आय एम सॉरी! ! तुला दुखवायचं नव्हतं”
“प्रश्न माझ्या दुखवण्याचा नाहीये. झपाट्यानं बदलणाऱ्या जगात सगळंच तात्पुरतं झालेलं असताना वर्षानुवर्षे हे सण, परंपरा आजही उत्साहात, जल्लोषात, आनंदात साजरे केले जातात. ही बाब खरंच अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे झोप आता, बाकी उद्या बोलू. गुड नाइट”.
बरोब्बर सात वाजता अत्यंत उत्साहात श्रीकांतनं गुढी उभारली तेव्हा आईच्या चेहऱ्यावर प्रचंड कौतुक होतं. श्रीकांतनं कडुलिंबाचं एक कोवळ पान खाल्लं अन एकेक आई-बाबांना दिलं.
“अरे वा, गुढीपाडव्याचा अभ्यास केलेला दिसतोय.” आई
“हो, थॅंकयू आई”
“तुलासुद्धा थॅंकयू”
“का?”
“माझं ऐकलं म्हणून”आई.
“तुझं ऐकल्यानं माझाच फायदा झाला. पाडवा म्हणजे गुढी अन गोड पदार्थाचं जेवण आणि सुट्टी एवढचं माहिती होतं. आपलं बोलणं झाल्यावर इंटरनेटवर गुढीपाडव्याविषयी चांगली, नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती मिळाली आणि आपल्या प्रत्येक सण का? आणि विशिष्ट पद्धतीनेच साजरा करण्यामागचं लॉजिक समजलं.”
“म्हणूनच तर पिढ्या बदलल्या तरी सण दिमाखात साजरे होतायेत. ”आई.
“मी ठरवलयं की माहिती नसताना किवा अर्धवट माहितीच्या आधारे व्यक्त होणाऱ्या जमान्यात यापुढे प्रत्येक सण का? साजरा करायचा याविषयी सोशल मिडियावर लिहिणार. याची सुरुवात आजपासून…”
“चांगल्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा!! आता नवीन परंपरेचे पालन करू” आई.
☆ माझी जडणघडण… वासंती – भाग – ३७/१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
वासंती – भाग -१
गुलाब मावशीचा ज्येष्ठ सुपुत्र, पप्पांचा मावसभाऊ आणि माझा काका ज्याला आम्ही “भाऊ” अशी हाक मारत असू. आमचा आणि गुलाबमावशीचा परिवार हा संयुक्त परिवारासारखाच होता. एकमेकांच्या कुटुंबामध्ये घडणाऱ्या सर्वच चांगल्या- वाईट, सुख- दुःखांच्या घटनांमध्ये आमची खोलवर गुंतवणूक असायची. “भाऊचं लग्न” ही एक अशीच घटना होती की ज्यामुळे औत्स्युक्य आणि चिंता आमच्या घरात पसरली होती. औत्स्युक्य अशासाठी की आता भाऊचे लग्न होणार घरात सून येणार, काकी मामी येणार, काहीतरी कौटुंबिक बदल घडणार म्हणून आणि चिंता अशासाठी की भाऊ कोणतीच मुलगी पसंत करत नव्हता. त्याला सुंदरच मुलगी हवी होती बायको म्हणून. तसा भाऊसुद्धा गोरा, देखणा होताच. हसरा, मिस्कील होता. त्याचे शिक्षण मात्र तुलनेने कमी होते. खरं म्हणजे तो हुशारही होता, त्याचं गणित फार चांगलं होतं शिवाय आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक, राजकीय घटनांचे त्याला ज्ञान होते. त्यावर तो सफाईदारपणे बोलू शकायचा. आपली मते मांडू शकायचा पण तो शिकू शकला नाही कारण त्याच्यावर अचानक कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच्यावर पाठच्या दोन भावांचे शिक्षण आणि भविष्य घडवण्याची जबाबदारी होती. भाऊ तसा कर्तव्यदक्ष होताच आणि त्याचे त्याच्या भावांवर अपार प्रेम होते. , ज्या संधी आपल्याला मिळाल्या नाहीत त्या भावांना मिळाव्यात ही त्याची मनापासून इच्छा होती आणि तशी त्याची धडपड होती आणि खरोखरच त्याने त्यासाठी त्याची स्वतःची घडण बाजूला ठेवून आई-वडिलांच्या संसाराची जबाबदारी कर्तव्यपरायणतेने खांद्यावर पेलली.. त्यात तो यशस्वी झाला. सत्यरंजन ज्याला आम्ही “पपी” म्हणत असू आणि सुभाष ज्याला आम्ही “बाळू” म्हणत असू, त्या दोघांची शिक्षणं विनाअडथळा पार पडली. दोघांनाही उत्तम पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या. “पपी” तर शिक्षण आणि नोकरीत अधिक सरस ठरला. भविष्यात त्याला अनेक संधी उपलब्ध झाल्या. हे फक्त “भाऊ” मुळे शक्य झाले याची जाणीव मात्र दोघांनाही होती. भाऊ जरी जिथे होता तिथेच राहिला पण त्याची कारणे या दोघांनी कधीही स्मृतीआड केली नाहीत. त्यांनी भाऊविषयी सदैव आदरच बाळगला.
मग लग्न ठरवताना आज पर्यंत स्वतःसाठी कुठलंही स्वप्न न पाहणाऱ्या भाऊने सुंदर मुलीशी विवाह करायचा निर्धार केला तर गैर काय होते? म्हणूनच सारे जण याबाबतीत.. जरी ही बाब फारशी कुणाला रुचत नसली तरी भाऊसोबत राहिले.
भाऊने अक्षरश: नव्व्याणव मुलींना नकार दिले. कोण सावळी, कोण बुटकी, कुणी अधिक उंच, कुणाचे दात किंचित पुढे, कोणाचे केस पातळ, कुणी जाडी कुणी लुकडी अशा विविध कारणांनी भाऊने धडाधड विवाहयोग्य वधूंवर फुल्या मारल्या. माझे पप्पा आणि आप्पा (भाऊ चे वडील) कधी कधी त्याला समजावण्याचा प्रयत्नही करायचे.
“अरे या मुलीला नाकारतोस? काय खोड दिसते तिच्यात तुला? शरीरयष्टी थोडी किरकोळ आहे पण लग्नानंतर होईल की ती भरदार आणि शिवाय तिचे वडील सचिवालयात मोठ्या पदावर आहेत. नाही म्हटलं तरी तुझ्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. तुलाही ते पुढे आणतील.”
पण या कशाचाही होकारार्थी परिणाम भाऊवर व्हायचा नाही. झालाही नाही.
भाऊची स्त्रीसौंदर्यविषयीची नक्की काय कल्पना होती तेच कुणाला कळत नव्हते. सारेच हैराण होते. जिजी मात्र म्हणायची, ” योग यावा लागतो. वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. आता भाऊ साठी मुली बघूच नका, ”
कधी कधी ती असेही म्हणायची, ” बघ हं भाऊ! “चापू चापू दगड लापू” असं व्हायचं तुझ्या बाबतीत,”
पण जिजीचे पहिले म्हणणे खरे ठरले. अखेर भाऊचे लग्न जुळण्याचा योग आला. वासंतीला भाऊने बिनतक्रार, कसलीही खोड न काढता क्षणात पसंत केले. वासंती ही शंभरावी मुलगी होती आणि भाऊच्या स्त्रीसौंदर्य कल्पनेत ती १००% उतरली. दोघांनीही एकमेकांना पसंत केले आणि भाऊचे लग्न जमले. गंगेत घोडं नहालं!
मोरेश्वर ढगे (मला नक्की नाव नीट आठवत नाही) यांची वासंती ही ज्येष्ठ कन्या. तिला अनिल नावाचा एकच भाऊ होता. वासंतीची आई जाडजूड, लठ्ठ, चष्मेवाली, थोडं अंगाशी सैल झोळ असलेलं नऊवारी लुगडं नेसणारी पण बोलण्यात स्पष्ट, ठणठणीत आणि काहीशी चतुर, चौकस होती. त्या मनाने वासंतीचे वडील मात्र शांत, गरीब, सरळ स्वभावाचे वाटले. अनिल उंच, मिस्कील आकर्षक असला तरी थोडासा कलंदर, बढायाखोर, उनाड असावा असा आपला एक अंदाज. अर्थात पहिल्याच भेटीत जजमेंटल कशाला व्हावे?
पण वासंती मात्र खरोखरच सुंदर होती. नाकी डोळी नीटस, रंग जरी सावळा असला तरी कांती सतेज होती. तिचे डोळे तर फारच सुंदर होते. मोठे पिंगट रंगाचे आणि पाणीदार, बोलके. केसही सरळ आणि लांब सडक. बांधा थोडा बसका आणि स्थूल असला तरी तिच्या एकूण व्यक्तीमत्वाला तो शोभून दिसत होता आणि बोलताना तिच्या पातळ ओठांची सुरेख हालचाल व्हायची. थोडक्यात काय वासंती सगळ्यांनाच आवडली. भाऊला हवी तशी मनासारखी जोडीदार मिळाली म्हणून सारेच खुश झाले. थोडं दडपण होतं ते म्हणजे गुलाबमावशीच्या स्टेशन रोडवरच्या राहत्या घराचं. घराला काहीच रेखीवपणा, सुविधाबद्ध आराखडा नव्हता. मुळात शयनगृह हा प्रकारच तिथे नव्हता. कशाही एकमेकांना जोडलेल्या, अर्थहीन, हेतूशून्य खोल्या. पाठीमागच्या बाजूने जिना उतरून खाली गेल्यावर कॉमन पद्धतीचे संडास तेही त्यावेळच्या टोपली पद्धतीचे. कॉमन अशासाठी की खालच्या मजल्यावर एक दोन भाडोत्री राहत होते आणि त्यांच्यासाठी वेगळी सोय नव्हती.
वासंती ही मुंबईत ग्रँटरोड सारख्या भागात राहणारी. त्यांचंही घर मोठं नसलं तरी मुंबईच्या वेगळ्याच शहरी वातावरणात वाढल्यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीत फरक नक्कीच होता पण लग्न जमण्याच्या आनंदात काही बाबी किरकोळ ठरतात किंवा “पुढचं पुढे बघू” अशा सदरात जाऊन बसतात हेही तितकंच खरं.
वासंती आणि भाऊचे लग्न झाले. “लक्ष्मी नारायणाचा जोडा जणूं” म्हणून सारे नावाजले. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. गृहप्रवेशाच्या वेळी वासंतीने लाजत मुरकत सुरेख शब्दांची गुंफण करून नावही घेतले. भाऊ तर काय हवेतच होता.
जिना चढून वर आल्यानंतर झोपाळा असलेल्या बाहेरच्या जागेच्या उजव्या बाजूच्या काहीशा काळोख्या खोलीचे रूपांतर भाऊ आणि वासंतीच्या शयनगृहात झाले. पूर्वी त्या खोलीतून पापड लोणच्याचे वास यायचे पण आता पावडर, परफ्युमचे सुगंध यायला लागले. काही आधुनिक, छान छान वस्तू तिथे दिसू लागल्या, सुंदर चादरी, पडदे झळकले. एक वेगळाच साज त्या खोलीला चढला आणि हे सारं केवळ वासंतीमुळे.
शक्यतो तिच्या आवडीनिवडी जपण्याचा भाऊ बऱ्याच वेळा रिकाम्या खिशाचा विचार न करता प्रयत्न करायचा. घरात वापरायची एक खोली नकळतपणे कमी झाली तरी बाकीच्या सर्व सदस्यांनी सांभाळून घेतले. याच घराच्या माळ्यावरच्या दोन खोल्यात कुमुदआत्या आणि तिचे कुटुंब राहत होते. गुण्यागोविंदाने सारे नांदत होते. सारी प्रेमाची, अत्यंत घट्ट जुळलेली नाती. याच नात्यात वासंती नावाचा एक नवा धागा सुंदर रित्या विणला जावा हीच साऱ्यांची अपेक्षा असणार ना? पण तसे झाले नाही. का? कुठे बिनसले? नक्की काय चुकले? कलहाची सुरुवात कशी कधी झाली हे कळलंच नाही. भाऊने पसंत केलेली शंभरावी, सुंदर वासंती आज पर्यंत ज्या कुटुंबात फक्त प्रेमाचीच कारंजी उसळली, एकमेकांसाठी कठीण परिस्थितीतही सारी भक्कमपणे उभी राहिली त्या कुटुंबात वासंतीचे अस्तित्व एका उसवू पाहणाऱ्या ठिगळासारखे जाणवायला लागलं.
☆ “खुश है जमाना आज पहिली तारीख है” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
फार पूर्वी महिन्याची एक तारीख म्हणजे सगळ्यात आनंदाचा दिवस असायचा, कारण त्या दिवशी पगार मिळायचा आणि तो पण चक्क कॅश.
१ तारीख आणि पगार हा विचार मनात आला, आणि मी चक्क १९७१ सालामध्ये नाशिकला पोहोचलो.
उत्तम मार्काने इंजिनिअरिंग पास केले होते, पण कुठेही नोकरी लागत नव्हती. जवळजवळ पन्नास एक ठिकाणी तरी अर्ज केले असतील, कुठूनही उत्तर नाही. अचानकपणे नशिबाने साथ दिली आणि चक्क नाशिकला हिंदुस्थान एरोनॉटिक्स, मिग विमान तयार करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी लागली. पगार होता २२५ प्लस महागाई भत्ता ४०.
दर एक तारखेला दुपारी पगाराचे पैसे २६५ रुपये हातामध्ये मिळायचे. पैसे नंतर बँकेत भरायचे. आणि लागतील तसे २० रुपये, कधी ४० रुपये बँकेतून काढायचे. मजा असायची.
कंपनी मधला मित्र सिद्धांति याच्याबरोबर एका खोलीत भाड्याने राहत होतो.
खोलीचे भाडे होते प्रत्येकी १५ रुपये, बाहेर चहा प्यायला गेलो तर भोसले टी हाऊस चा चहा होता १२ पैसे, संध्याकाळी बाहेर जेवायला जायचो, तिथे साधे जेवण १ रुपया आणि स्वीट डिश आणि दह्याची वाटी घेतली तर जेवण दीड रुपया. सकाळचे जेवण कंपनीमध्येच व्हायचं, आणि चार्जेस अगदीच किरकोळ असायचे.
रात्रीचे जेवण झाल्यावर मित्राबरोबर फिरायला जायचो. एका छोट्या हॉटेलच्या समोर मोठी शेगडी ठेवलेली असायची आणि त्यावर कढईमध्ये दूध उकळत असायचे. आणि एकीकडे गरम गरम जिलब्या तळणे चालू असायचे. जिलबी मिळायची ३ रुपये किलो. गरम दुधाचा ग्लास वरती साय टाकून किंमत ३० पैसे (या किमतींवर आता विश्वास बसणार नाही). तिथे मस्त बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचं, इकडे तिकडे बघत बघत गप्पा मारायच्या, ५० ग्रॅम जिलबी आणि मस्त ग्लासभर दूध प्यायचो. नंतर फिरत फिरत खोलीवर परतून मस्त झोपायचो.
अशा रीतीने पगाराचे पैसे कॅश मिळणे, आणि कॅश खर्च करणे यात एक वेगळीच मजा असायची.
साधारण ११ महिन्यानंतर नाशिकची नोकरी सोडून पुण्याला टाटा इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये आलो, आणि एक तारखेला पगाराचे पैसे हातात मिळणे हा प्रकार संपला.
पण अजूनही महिना संपल्यानंतर कॅलेंडरचं पान उलटलं आणि एक तारीख बघितली की नाशिकची आठवण हमखास येतेच येते. आणि एक छान गाणं पण आठवतं किशोर कुमारचं – खुश है जमाना आज पहिली तारीख है…
(तेलंगणात IT park साठी 400 एकर जंगल जाळलं आणि तिथल्या प्राण्यांचा आक्रोश ऐकवणारा व्हिडिओ कुणीतरी पाठवला. तो तुम्ही शोधा. पण त्यामुळं झालेल्या दुःखातून जे स्फुरले ते पाठवतो आहे. वाचा!)
निश्चिंत उभ्या जंगलाला…
अरण्य जाळायचा विचार समजला तेव्हा…
त्यानं संदेश पाठवले अश्राप पक्षांना आणि श्वापदांना…
थांबू नका नका इथं, कारण तो चिता रचणार आहे त्याचीच…!
निश्चिंत प्राण्यांनी चेष्टा केली जंगलाची…
उपदेश सुद्धा केला जंगलाला, म्हणाली आठव त्याचा वानप्रस्थाश्रम…
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशी नातीगोती सांगणाऱ्या तुक्याचे दाखले सुद्धा दिले…
खो खो हसत गिरक्या घेतल्या माकडांनी झांडां भोवती…
सर्व म्हणाले, He is a jolly good fellow, he is a jolly good fellow…!
जंगलाला नव्हती काळजी, आपण बेचिराख होण्याची…
दिसत होती त्याला राख रांगोळी, पंख न फुटलेल्या पिल्लांची…
आणि ढुशी मारून दूध पिणाऱ्या पाडसांची…
जंगलाला आधीच ऐकू येऊ लागल्या, किंकाळ्या त्या अश्राप जीवांच्या…
माजला होता कोलाहल त्याच्या अंतरंगात…
आणि इच्छा झाली त्याला, सर्व अश्रापांना घेऊन पळून जाण्याची…
पण पाय नसल्यानं पळूनही जाता येत नव्हतं…
म्हणून त्यानं फांद्या मारल्या आपल्याच कपाळावर…!
आज मात्र दुःख झालं त्याला…
साधं दुःखही साजरं करता येऊ नये, आपल्याला उन्मळून पडण्याचं…?
का आणि कुणी दिला मला असला वर…?
आदिम संस्कृती जपण्यासाठी तुझी पाळं मुळं जातील खोलवर…!
जंगलाच्या त्या असहाय उद्विग्न अवस्थेत, जेव्हा सर्व संज्ञा लुप्त झाल्या होत्या…
तेव्हा कानांवर आले सूर अश्वत्थाम्याच्या करुणघन विराणीचे…
कर्णानं अबोध गहन शापानं भोगलेल्या निःश्वासाचे…
हायसं वाटलं त्याला, कोणीतरी सोबत आहे म्हणून…
धुरामुळं नाही, पण डोळे घट्ट मिटून सामोरं गेलं ते आगीला…
तरीही प्राक्तन कुणाला चुकलं नाही म्हणून, किंकाळ्या मात्र ऐकाव्याच लागल्या…!
चैत्र येतो तोच एक वेगळीच ऊर्जा घेऊन. अजून वैशाखवणवा दूर असला तरी उन्हाच्या झळा जाणवायला सुरवात झालेली असते. वाराही गरम झुळका घेऊन येतो बरोबर, पण त्याच बरोबर येतात सृजनाचे सुवास, मोगऱ्याचा मंद गंध, वाळ्याची सुगंधी थंडाई, पिकत आलेल्या आंब्या-फणसांचा गोड घमघमाट आणि कडुनिंबाच्या पानांची गर्द हिरवी सळसळ. झाडांच्या पानांमध्ये, फुलांच्या सुगंधांत, आणि अगदी आपल्या मनातही काही नवंनवंसं चेतत असतं आणि अगदी ह्याच वेळेला आपल्या अंगणात उतरतं चैत्रांगण—एका प्राचीन, पण अजूनही जिवंत असलेल्या संस्कृतीची स्वस्तिचिन्हे.
माझं बालपण गोव्यात गेलं. तिथं गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही गुढी उभारायचो, आमरस, मणगणे असे गोड पदार्थ करायचो, कैरीचं पन्हं करायचो, पण चैत्रांगण कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे माझ्या आठवणीतल्या चैत्रांगणाला आई-आजीच्या बोटांचा स्पर्श नाही. मी चैत्रांगण पहिल्यांदा पाहिलं ते पुण्याला शिक्षणासाठी आल्यानंतर, एका मैत्रिणीच्या घरी. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सावरकरांच्या स्वतंत्रता भगवतीप्रमाणे मलाही सदैव भुरळ घालत असल्यामुळे मी त्या मैत्रिणीच्या आजीला खूप प्रश्न विचारले, हीच चिन्हे का काढायची? ह्याच मांडणीत का काढायची, पाडव्याच्याच दिवशी का काढायची, वगैरे वगैरे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे काही त्यांना देता आली नाहीत, पण त्या म्हणाल्या ते एक वाक्य मला अजूनही आठवतं, ‘अग, शुभ चिन्हं असतात ती, छान, उत्सवी दिसतं घर. आपली संस्कृती मुळात सौंदर्यपूजक आहे म्हणून करायचं’!
त्यांच्या ‘आपली संस्कृती मुळात सौंदर्यपूजक आहे’ ह्या वाक्याचा तर मला पदोपदी प्रत्यय येतो भारतात फिरताना. साधं केळीच्या पानावर जेवण वाढताना सुद्धा किती रंगसंगतीचा विचार करतात लोक भारतात! मातीने सारवलेल्या अंगणात काढलेलं चैत्रांगण किती सुंदर दिसतं. चैत्रांगण म्हणजे केवळ रांगोळी नव्हे—ती तर तब्बल ५१ शुभ चिन्हांची एक स्तोत्रमालाच आहे. गौरी-शंकर किंवा विठोबा-रखुमाई, गणपती, गुढी, भगवा ध्वज, आंब्याच्या पानांचे तोरण, शंख, चक्र, गदा, पद्म, सरस्वती, गाय-वासरू, नाग, मोरपिस, बासरी, ओंकार, स्वस्तिक, गो-पद्म, गरुड, हत्ती, तुळस, शिवलिंग, कैरी, केळीचे झाड, कलश, हळद कुंकवाचे करंडे, त्रिशूळ, परशू, चंद्र-सूर्य, फणी, आरसा, कासव, सनई-चौघडे, कमळ, धनुष्यबाण, पाळणा. प्रत्येक चिन्हाला काहीतरी अर्थ आहे, प्रत्येकामागे एक कथा आहे. कुठे पावित्र्य आहे, कुठे शांती. कुठे मांगल्य आहे, कुठे समृद्धी, कुठे निसर्गाचं गूढ सौंदर्य, तर कुठे संस्कृतीची स्वस्तीचिन्हे, कुठे दैवी वरदहस्त तर कुठे आपल्याच माणूसपणाची ओळख.
ह्या मागची कथा शोधताना मी कुठेतरी अशी कथा वाचली की देवी गौरीने स्वतः पहिल्यांदा ही चिन्हं रेखाटली—शंकराच्या मनातली वादळं शांत करण्यासाठी. किती सुंदर कल्पना! आपल्या हातून, आपल्या नजरेतून, आपल्या मनातून निर्माण होणाऱ्या या शुभ प्रतिमा म्हणजे देवत्वाचं, मातृत्वाचं आणि पती-पत्नींच्या प्रेमाचं प्रतिक आहेत हा विचारच किती देखणा आहे.
माझी मुलं लहान होती तेव्हा मला मदत करायला ज्योती नावाची एक मुलगी मदतनीस म्हणून होती. तिच्या बोटात विलक्षण कला होती. तिला खूप हौस होती म्हणून ती होती तोपर्यंत दोन-तीन तास खपून पाडव्याला चैत्रांगण काढायची. माझी चित्रकला दिव्य असल्यामुळे ह्या कामात केवळ तिची मदतनीस म्हणून तिच्या बाजूला बसून तिला हवे ते रंगांचे डबे उघडून देणे इतकंच माझं काम होतं. पण ती इतकी तल्लीन होऊन चैत्रांगण काढायची की ती स्वतःच एक चित्र वाटायची. तिच्या बोटांमधून सरसर झरणाऱ्या पांढऱ्या पिठाच्या रेघा पाहताना मला सतत जाणवायचं, चैत्रांगण म्हणजे फक्त कला नाही, ती एक नम्रपणे केलेली प्रार्थना आहे.
ही शुभचिन्हे काढताना ती काढणारी व्यक्ती काही मागत नाही—फक्त जोडत राहते स्वतःला, भारतीय संस्कृतीच्या प्राचीन प्रवाहाशी, निसर्गाशी, देवत्वाशी, माणसांशी आणि स्वतःतल्या मूळ कोंभाच्या शांततेशी. आजच्या या धावपळीच्या जगात, ज्योतीला रांगोळी काढण्यात तल्लीन झालेलं पाहिलं की मला हेवा वाटायचा तिचा थोडा, वाटायचं असे काही मंतरलेले, भारलेले क्षण असेच जपून ठेवायला हवेत. एक छोटीशी चंद्रकोर रेखताना, तुळशी वृंदावन साकारताना ती जणू काळालाच थांबवत होती त्या काही क्षणांपुरती.
आता माझ्याकडे ज्योती नाही, आणि माझ्या हातात तिच्यासारखी कला नाही, पण माझ्यासारख्या कलाकार नसलेल्या व्यक्तींसाठी, आजकाल चैत्रांगणाच्या रांगोळीचे साचे मिळतात—त्यातूनही ही परंपरा टिकवता येते. फरशी मातीने सारवताना मऊसूत कालवलेल्या मातीचा तो मायाळू स्पर्श, साचे उमटवताना हळूहळू त्या तांबड्या कॅनव्हासवर उमटत जाणाऱ्या तांदळाच्या पीठाच्या रेघा आणि त्या पांढऱ्याशुभ्र रेघांमधून हळूहळू साकार होणारी शुभ चिन्हं—एकामागोमाग एक अशी उमटताना बघणं हाही एक विलक्षण सौंदर्यपूर्ण आणि शांतवणारा अनुभव आहे.
चैत्ररंगण म्हणजे रेषांनी गुंफलेली प्रार्थना आहे. ती केवळ चैत्रगौरीसाठी नसते, ती आपल्यासाठीही असते – आपल्या आतल्या अस्वस्थतेला, गोंधळाला, आणि कोलाहलाला शांत करण्यासाठी.
लेखिका : सुश्री शेफाली वैद्य
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈