मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तळ मात्र ठरलेलाच ! ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तळ मात्र ठरलेलाच ! ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

अस्वस्थतेची नदी दुथडी भरून वाहत असताना

चालावे का तिच्या काठाकाठाने

जराही स्पर्श न होऊ देता?

की घुसावे तिच्या पात्रात

आणि जावे बुडून तिच्यात गटांगळ्या खात?

*

नदीचा प्रवाह अखंड वाहत असताना

नकळतपणे अडकतोच आपण

एखाद्या भोव-यात !

वरुन खाली, खालून वर

घुसळून निघताना

पुढच्या क्षणाची नसते हमी

कधी वाहत जातो, कधी वाहवत जातो

हातापायांची धडपड,

केविलवाणी—

केवळ समाधानासाठी

*

काठ सापडेल, न सापडेल,

तळ मात्र ठरलेलाच

तळ मात्र ठरलेलाच !

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हनुमान जयंती विशेष – रामभक्त हनुमान…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ हनुमान जयंती विशेष – रामभक्त हनुमान…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कपी केसरी अंजनी,

करी शिव आराधना.

जन्मा यावे महादेव,

करी दांपत्य याचना…!१

*

वानरांचे रुपांमध्ये,

शिव पार्वती गमन.

माता पार्वतीचा गर्भ,

वात केसरी वहन..!२

*

अंजनीचे  पोटी आले,

शक्तीशाली शिवरुप.

वायुदेव केसरीचे,

भक्तीमय निजरूप..!३

*

भक्ती शक्तीचा वारसा,

रुप वानराचे घेई.

अंजनेरी पर्वताते,

शिवतेज जन्मा येई…!४

*

शारीरिक मानसिक,

धैर्य सामर्थ्य अफाट.

रामभक्त‌ मारुतीचे ,

शौर्य,साहस,अचाट…!५

*

त्याग,शौर्य सेवा,भक्ती ,

आले जेव्हा मूर्त रुप.

वायूपुत्र मारुती हा,

बजरंग निजरुप..!६

*

दैवी शक्ती वरदाने,

झेप घेई अकल्पित.

सूर्य बिंब गिळंकृत.

बाललीला संकल्पित…!७

*

सूर्य देव संकटात,

इंद्रदेव सजा देई.

वज्राघाते हनुवरी,

बालकांते दूर नेई…! ८

*

हनुर्भंग होता क्षणी,

नाम झाले हनुमंत.

असा बलशाली पुत्र,

चिरंजीवी गुणवंत…!९

*

गुण खोडकर वृत्ती,

देई त्यास अभिशाप.

पडे शक्तीचा विसर,

भोगीतसे भवताप…! १०

*

राजा सुग्रीवाचे धामी,

सेवा कार्य ते अर्पित.

राम भेट होता क्षणी,

केला देह समर्पित…!११

*

रामायणी हनुमान,

रामभक्त रामदूत

झाला भक्त बजरंग

महाबली कपीसूत…!१२

*

शक्ती सामर्थ्याची शक्ती,

नामातून चेतविली.

विस्मरणे गेली शक्ती,

जांबुवंते जागविली…!१३

*

जिथे जिथे राम नाम,

तिथे हनुमंत जागा.

चिरंजीव होऊनिया,

जोडी कैवल्याचा धागा…!१४

*

हाती आली दिव्य गदा,

शक्ती‌बल सामर्थ्याने.

पराभूत होणे नाही,

वीर अजिंक्य शौर्याने…!१५

*

निष्ठा आणि पराक्रम,

युद्ध कौशल्य विपुल.

दास रामाचा निस्वार्थी,

बुद्धी चातुर्य अतुल…!१६

 

*

कैक योजने उड्डाण,

सप्त सागर लांघन.

गदाधारी हनुमान,

साध्य शक्ती संघटन..!१७

*

इच्छाधारी लाभे रुप,

पिता देई वरदान.

सूक्ष्म विराट रुपात,

विहरतो हनुमान…!१८

*

त्याच वरदाने त्याने,

शोधियली सीतामाई.

साक्ष मुद्रिका घेऊनी,

दिली सुरक्षेची ग्वाही..!१९

*

राम नामाची महती,

कृतीतून दाखविली.

एका राम सेवकाने,

झणी लंका पेटविली…!२०

*

सीतामाई शोधताना,

केले लंका निरीक्षण.

हेर रामाचा होऊन,

केले गुप्त सर्वेक्षण…!२१

*

सीतामाई संवादात

सिंदुराचा लागे शोध

दीर्घायुष्य आरोग्याचा

रामभक्त घेई बोध…! २२

*

झाला भगवा केशरी,

सर्वांगासी विलेपन.

पाहुनीया हनुमंता,

संतोषले राममन…! २३

*

बजरंग दिले नाम,

जाणियली दिव्य शक्ती.

बजरंग बली रुप,

दर्शविते राम भक्ती…! २४

*

रामसेतू बंधनात,

बजरंग दावी दिशा.

राम जयघोषी सरे,

तमोमय दुःख निशा..! २५

*

राम रावण युद्धात,

हनुमान अग्रेसर.

दृढ विश्वास निष्ठेचा.

हाची एक रत्नाकर…!२६

*

कौमोदकी दिली गदा,

कुबेराचे वरदान.

हाती असेल जोवरी,

अजिंक्यसा बहुमान..!२७

*

वायु देवतेच्या कृपे,

प्राप्त झाल्या सिद्धी शक्ती.

रामायण प्रसंगात,

दृढ झाली राम भक्ती…! २८

*

सप्त सिंधू उल्लंघन,

घर्मबिंदू गर्भ रुप.

तोची हनुमंत सूत,

मगरीचे निजरूप..!  २९

*

करी घात कलंकीत,

काल नेमी एक पूत.

मामा असे रावणाचा,

दैत्य मारिचाचा सूत…!३०

*

रुप साधुचे घेउन‌,

हनुमंता अडविले.

द्रोणागिरी आणताना,

कार्य थोर थांबविले…!३१

*

ओळखून खरे रूप,

दिली सजा योग्य ठायी.

तोच दैत्य कालनेमी,

दिसे मारुतीच्या पायी..!३२

*

शनी पिडा निवारण,

करा मारुतीचे ध्यान.

भूत प्रेत सरे बाधा,

रक्षीतसे पंचप्राण..!.३३

*

जिथे जिथे राम नाम,

तिथे तिथे उभा दास.

यांच्या अंतरात आहे,

राम सीता सहवास…!३४

*

देव शक्तीशाली असा,

चिरंजीव भक्त रूप .

सेवा भक्ती साधनेत,

जळे रामनाम धूप..!.३५

*

आहे वज्र याचे करी,

मुष्ठीमधे आहे शक्ती.

बलशाली‌ हनुमान ,

शिकवितो दास्य भक्ती…!३६

*

तेज तत्व जिंकणारा,

वायु पुत्र हनुमान .

शक्ती,स्फूर्ती नी उर्जेचे,

आहे मारुती प्रमाण…!३७

*

शंकराचे पाशुपत,

वरदान अजेयाचे  .

शूल त्रिशुलादी शस्त्रे,

शक्ती सामर्थ्य दासाचे…! ३८

*

नखाग्राने रामनाम,

केळीच्याच पानावरी.

लिहितसे बजरंग ,

रामनाम वर्णाक्षरी…!३९

*

स्वामी निष्ठ‌ सेवकाला,

तेल शेंदूर अर्पण.

माळ रुईच्या पानांची,

भक्ती भावे समर्पण.४०

*

असा बजरंग बली,

बलोपासनेचे धाम.

होई हजर सत्वर,

उच्चारता राम नाम…!४१

*

कविराजे ‌वर्णियेला

यथाशक्ती हनुमान

शब्द शारदा पुरवी

अनुभूती वरदान..!४२

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “विश्वास….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “विश्वास ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

दिवसामागून दिवस जातात

ऋतू मागून ऋतू सरतात

प्रत्येकासाठी ते सारखेच असतात

तरीही वेगवेगळे का भासतात….

*

कधी हवेहवेसे कधी नकोसे

दिवस नसतात सगळे सारखे

नाही पाहत आपण जसेच्या तसे

म्हणूनच होतो सुंदरतेस पारखे….

*

एकच ऊर्जा सगळीकडे

सर्वांसाठी सारेच खुले

आपल्यालाच असते कोडे

काय आणि किती निवडावे…

*

खरे तर काहीच नसते अवघड

आपलीच असे आपल्यासाठी निवड

दृष्टीकोन असतो ज्याचा त्याचा

जग दुनियेकडे पाहण्याचा…..

*

अगाध, अथांग, अपरंपार

परमेश्वर देत आहे अपार

मानूया त्याचे मनापासून आभार

विश्वास हाच जगण्याचा आधार….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ४ – संत सोयराबाई…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ४ – संत सोयराबाई… ☆ सौ शालिनी जोशी

संत सोयराबाई या संत चोखोबांची पत्नी होत्या. १४ व्या शतकातील मंगळवेढ्याचे हे कुटुंब. नवऱ्याबरोबर ग्राम स्वच्छतेत काम करणाऱ्या सोयराबाई पण त्यानी सांगितलेले तत्त्वज्ञान अचंबित करते. जातीव्यवस्थेला प्रश्न विचारून दलीतांच जगणं त्यांनी वेशीवर मांडलं. त्यांना चोखोबा गुरुस्थानी होते. चोखोबांची सगुणभक्ती, नामभक्ती, अभंग रचना या अध्यात्मिक जगाबरोबर त्यांच्या गरिबीतल्या संसारातही त्या अर्धांगिनी होत्या. नामस्मरणातून त्यांनी भक्तीयोग सांगितला. त्या म्हणतात,

नामेची पावन होती जगी जाण l नाम सुलभ म्हणा विठोबाचे ll

संसार बंधने नामेचि तुटती l भक्ती आणि मुक्ती नामापाशी ll

त्यांची नामभक्ती हे त्यांचे स्वतःचे अनुभव आहेत. असे ९२ अभंग त्यांनी लिहिले आणि अभिमानाने स्वतःचा उल्लेख ‘महारीचोखियाची’ असाच केला. त्यांच्या अभंगांची भाषा साधी, सरळ, सोपी पण रसाळ आहे. हळूहळू सगुणाच्या वाटेकडून निर्गुणाच्या वाटेकडे त्या चालू लागल्या आणि मग शब्द स्फुरु लागले.

अवघा रंग एक झाला l रंगी रंगला श्रीरंग ll १ ll

मी तू पण गेले वाया l पाहता पंढरीच्या राया ll. २ ll

नाही भेदाचे ते काम lपळून गेले क्रोध काम ll ३ ll

देही असोनि विदेही l सदा समाधिस्थ पाही ll ४ ll

पाहते पाहणे गेले दूरी l म्हणे चोखियाची महारी ll५ ll

किती सोप्या भाषेत सोयराबाईनी आपला अनुभव सांगितला. शेकडो वर्षे लोटली तरी आजही ते शब्द आपलं मन हळव करतात, मंगल करतात. किशोरीताईंच्या स्वर्गीय आवाजाने हा अनुभव अमर केला आहे.

शूद्रांच्या सावलीचाही विटाळ मानण्याचा तो काळ होता. तरीही त्यांनी भागवतांच्या मांदियाळीत मानाचे स्थान मिळवले. समाजाने त्या कुटुंबाचा छळ केला. खालची म्हणून नुसता अपमान नाही तर मारही खावा लागला. ती व्यथा सोयराबाईंच्या अभंगातून दिसते. त्या म्हणतात, ‘हीन हीन म्हणूनी का ग मोकलिये l परि म्या धरिले पदरी तुमच्याl’ विठोबाच्या दर्शनाची आज धरली म्हणून बडव्यांनी चोखोबाना कोंडून मारले. इच्छा असूनही देवाची भेट झाली नाही.

सोयराबाईनी शरीराच्या विटाळा संबंधी धर्मशास्त्रने निर्माण केलेल्या कल्पना साफ नाकारल्या. देहापासून निर्माण झालेली आणि देहात गुंतून पडलेली विटाळाची संकल्पना त्या स्पष्ट करतात. देहाच्या निर्मितीमध्ये विटाळ ही सक्रिय सहभागी झालेला असतो. म्हणून देह आहे तेथे विटाळ असणारच. मग कोणताही वर्ण विटाळातून अलिप्त राहू शकत नाही. असे असेल तर सर्व मानव जातच विटाळलेली, अपवित्र, अस्पृश्य म्हटली पाहिजे. म्हणून स्त्रिया आणि शूद्र यांच्यावर केलेला विळालाचा आरोप मानवनिर्मित आहे. असा तर्कशुद्ध युक्तिवाद सोयराबाईनी केला. त्या थेट पांडुरंगालाच प्रश्न विचारतात,

देहासी विटाळ म्हणती सकळ l आत्मा तो शुद्ध बुद्ध ll

देहाचा विटाळ देहीच जन्मला l सोवळा तो झाला कवण धर्म ll

विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान l कोणी देह निर्माण नाही जगी ll

म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी l विटाळ देहांतरी वसतसे ll

 देहीचा विटाळ देहीच निर्धारी l म्हणतसे महारी चोखियाची ll

यातून विटाळाची संकल्पना जीवशास्त्रीय असल्याचे त्या स्पष्ट करतात.

उशीराने पुत्र प्राप्ती झाल्यावर आनंदीत झालेली सोयरा बारशासाठी विठ्ठलरखमाईला आमंत्रण देते. ‘विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी’ असे ती म्हणते. असे म्हणतात की विठ्ठल तिचे बाळंतपण करण्यासाठी तिच्या नणंदेचे, निर्मलेचे रूप घेऊन एक महिना तिच्या घरी राहिला होता. शेवटी देव भावाचा भुकेला. कर्ममेळा हा सोयराबाईं चा मुलगा. निर्मळा ही नणंद तर बंका हा निर्मळेचा नवरा. हे सर्व कुटुंब विठ्ठल भक्त. सर्वांनी चोखोबांना गुरुस्थानी मानलं होतं. सर्वांच्याच अभंग रचना अर्थपूर्ण व परिस्थितीचे चित्र उभे करणाऱ्या आहेत. पराकोटीचे दारिद्र्य, अपमान, अवहेलना व्यक्त करण्याचे अभंग हेच एकमेव साधन त्यांच्याकडे होते. संतांच्या मांदियाळीत हे कुटुंब वेगळे उठून दिसते.

सोयराबाईंची समाजाचे उपेक्षा केली. त्यांना लिहिला वाचायला येत नव्हतं म्हणून त्या निरक्षर असल्या तरी त्याच खऱ्या सुशिक्षित, सुसंस्कृत ठरतात.

चित्र साभार – संत सोयराबाई अभंग – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana – संत साहित्य 

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ त्या परदेशी पाहुण्याच्या आठवणीत…! ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

?जीवनरंग ?

त्या परदेशी पाहुण्याच्या आठवणीत…! ☆ श्री संदीप काळे ☆

मुंबईला 23 फेब्रुवारी रोजी “व्हाईस ऑफ मीडिया” आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी दरवर्षी मी आशितोष कांबळे या चित्रकाराकडून मोमेंटो तयार करून घेतो. यावर्षी देखील कार्यक्रमाच्या निमित्ताने मोमेंटो तयार करण्यासाठी मी आशितोषला भेटण्यासाठी वाशीला गेलो.

घराची कडी वाजवल्यावर आशितोषच्या बहीणीने दरवाजा उघडला. ती म्हणाली, “दादा खाडीवर गेला आहे. ”

मी विचारले, “खाडी किती दूर आहे आणि तो तिथे का गेला आहे?”

त्यावर तिने उत्तर दिले, “खाडीवर परदेशी पाहुणा आला आहे. त्याला पाहण्यासाठी दादा तिथे गेला आहे. ”

मी आश्चर्याने विचारले, “परदेशी पाहुणा म्हणजे कोण?”

ती म्हणाली, “एक परदेशी पक्षी आहे, जो आपल्या भारतीय मैत्रिणीला भेटण्यासाठी दरवर्षी वाशीच्या खाडीवर येतो. काही दिवस इथे राहतो आणि मग परत जातो. त्याच पाहुण्याला पाहण्यासाठी दादा गेला आहे. ”

ज्या दिशेने खाडी आहे, तिकडे मी निघालो. थोडं अंतर चालल्यावर, पक्ष्यांच्या थव्याजवळ काही लोक उभे असलेले दिसले. मी थोडं पुढे गेल्यावर आशितोष मला दिसला. तिथे दोन पक्षी होते—एक, जो मी कधीच पाहिला नव्हता आणि दुसरा, जो सातत्याने खाडीच्या कडेला असतो. आशितोष आणि त्याचे दोन-तीन मित्र त्या दोन्ही पक्ष्यांच्या भोवती ये-जा करत होते.

तो कधीही न पाहिलेला पक्षी थोडासा पुढे जायचा, मग मागे यायचा आणि आपले पंख पसरून त्या दुसऱ्या पक्ष्याला सामावून घ्यायचा. मी आशितोषला विचारलं, “घरी ताई ज्या पक्ष्यांच्या प्रेमाविषयी बोलत होती, हेच ते दोन पक्षी आहेत का?”

आशितोष माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, “चूप बस, बाबा!” माझ्या जवळ येत त्याने हळू आवाजात सांगितलं, “अरे संदीप, हळू बोल! इथल्या लोकांना याबद्दल फार काही माहिती नाही. नाहीतर उद्यापासून हे पक्षी बघायला येथे गर्दी जमेल. ”

मी त्याला विचारलं, “नेमका प्रकार काय आहे, ते सांग. काही अडचण नाही. ”

त्यावर आशितोष म्हणाला, “मागच्या सात वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा नर परदेशी पक्षी दुसऱ्या देशातून या मादी पक्ष्याला भेटायला इथे येतो. परवा तो इथून परत जाणार आहे. माझे काही मित्र आले होते, त्यांना हे दाखवण्यासाठी मी आलो होतो. ”

मी विचारलं, “हा पक्षी दरवर्षी याच वेळी इथे येतो आणि किमान दहा दिवस थांबतो हे तुम्हाला कसं समजलं?”

आशितोष म्हणाला, “सतीश राजन नावाचे माझे एक पक्षी निरीक्षक मित्र आहेत. त्यांनी मला पक्ष्यांच्या हालचाली, त्यांचे वर्तन, आणि पक्ष्यांमधील प्रामाणिक नात्यांविषयी महत्त्वाची माहिती दिली होती. त्यामुळे मीही पक्ष्यांचे निरीक्षण करायला सुरुवात केली. एकदा मी आणि सतीश खाडीच्या कडेला बसलो होतो, तेव्हा आम्हाला हे दोन पक्षी वेगळेच वाटले.”

आशितोष पुढे म्हणाला, “खाडीमधल्या बाकीच्या पक्ष्यांमध्ये असलेला एक पक्षी एका वेगळ्या परदेशी पक्ष्याबरोबर काय करतोय, हे आम्हाला आश्चर्य वाटलं. सतीशने अनुमान काढलं आणि मला सांगितलं की, हा नर परदेशी पक्षी दरवर्षी याच मादीला भेटायला इथे येतो. पुढच्या वर्षीही लक्ष ठेवून राहा, तो नक्कीच परत येईल.”

मी त्याला विचारलं, “हेच ते दोन पक्षी आहेत, हे आपण नेमकं ओळखायचं कसं?”

त्यावर सतीश म्हणाला, “यासाठी आपल्याला दोन-तीन दिवस त्यांचं निरीक्षण करावं लागेल. त्यांच्या हालचाली, एकमेकांशी असलेलं प्रेम, आणि त्यांचे वेगळेपण ओळखलं की आपल्याला खात्री पटते.

सतीशने ज्या पद्धतीने मला सांगितलं, त्या पद्धतीने आम्ही दोघांनीही त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पटवण्यासाठी एक युक्ती लढवली. आम्ही दिवसभर त्या पक्ष्यांना दोन-तीन वेळा अन्न देत असू. दोन-तीन दिवस हे सलग सुरू राहिल्यावर त्या पक्ष्यांना आमच्यावर विश्वास वाटायला लागला. ते पक्षी हळूहळू आमच्याकडे येऊ लागले आणि आम्हाला स्पर्शही करू लागले.

ते दोघं एकमेकांच्या समवेत राहायचे, एकमेकांकडे सतत पाहायचे आणि एकमेकांना सातत्याने स्पर्श करत राहायचे. नित्यनेमाने बागडणं, उड्या मारणं, आणि एकमेकांच्या अंगावरून फिरणं हे सारं त्या दोघांमध्ये होत होतं. आम्ही अनेक वेळा त्यांना हातात घेऊन पुन्हा खाली सोडायचो.

त्या दोन्ही पक्ष्यांची ओळख पक्की करण्यासाठी आम्ही त्यांच्या शरीरावर, पंखाच्या वरच्या आणि खालच्या भागात गडद रंग लावला. चौथ्या दिवशी आम्ही खाडीवर गेलो, तेव्हा त्या दोघांपैकी एकच पक्षी तिथे बसलेला होता. तो परदेशी पक्षी त्या दिवशी आलाच नव्हता. दुसऱ्या दिवशीही तो दिसला नाही.

सतीशने यावर अनुमान काढलं की, दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा परदेशी पक्षी त्याच्या प्रिय पक्षी मादीला भेटण्यासाठी येतो. मला तेव्हा यावर फारसा विश्वास बसला नाही. पण दुसऱ्या वर्षीही, अगदी याच वेळेत आम्ही त्या परदेशी पक्ष्याला त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलेलं पाहिलं. आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं.

त्या पक्ष्यांचा पाहुणचार करण्यासाठी आम्ही त्यांना रोज धान्य खायला घालत असू. ठरलेल्या वेळेत तो परदेशी पक्षी पुन्हा उडून जात असे. अनेक वर्षांपासून आम्ही त्या दोघांमधलं प्रेम पाहात आलो आहोत. मी एकदा सतीशला विचारलं, “जर तो पक्षी तिला इतकं प्रचंड प्रेम करतो, तर तिला सोबत घेऊन परदेशी का जात नाही?”

यावर सतीश म्हणाला, “प्रत्येक पक्ष्याची उड्डाण क्षमता वेगळी असते. काही पक्ष्यांना त्यांच्या मर्यादा माहीत असतात. माणसांप्रमाणे अतिविश्वासाने त्यांचं आयुष्य चालत नाही. पक्ष्यांची जगण्याची पद्धत जरा वेगळी असते. ” सतीशने त्या एकट्या मादी पक्ष्याला “देशी मैना” असं नाव दिलं होतं. “

आता आज ना उद्या, यावर्षीसुद्धा तो प्रियकर परदेशी पक्षी आपल्या मायदेशी, त्याच्या प्रेयसीला इथेच सोडून जाणार होता. आशितोष त्या दोन्ही पक्ष्यांना दाणे भरवत होता. त्याचे पाय आणि हात चिखलाने माखले होते. एका परदेशी पाहुण्याचा आपण पाहुणचार करतोय, याचा आनंद त्याच्या मनामध्ये होता. उद्या खाडीवर पाहिलं तर, तो परदेशी पाहुणा उद्याही इथे राहील का नाही, याची खात्री नव्हती. मात्र, तो परदेशी प्रियकर कधी जाणार आहे, याची माहिती मात्र देशी मैनाला नक्की असावी.

त्या दिवशी आम्ही घरी परतलो. कामाविषयी चर्चा सुरू होती, पण माझं लक्ष मात्र त्या परदेशी पक्षी आणि देशी मैनेकडेच होतं. घरी जेवायला बसल्यावर मी आशितोषला विचारलं, “वहिनी कुठे आहेत? दिसत नाहीत. ”

पण आशितोष काहीच बोलला नाही. मला काहीतरी खटकलं.

मी पुन्हा वहिनीचा विषय काढला. यावर त्याची बहीण म्हणाली, “काय सांगावं दादा, सध्या सगळं नवलाईचं आहे. कॉलेजमध्ये असताना दादाच्या मैत्रिणीने दादाला दिलेलं एक ग्रीटिंग पाहिलं. त्यावरून वहिनी रागारागाने माहेरी निघून गेली. ”

तिच्या जाण्याला आता एक वर्ष झालं. कसं असतं बघा माणसाचं प्रेम—थोडासा गैरसमज झाला की सगळं संपतं.

बोलता बोलता आशितोषने त्यांच्या बहिणीविषयीही सांगितलं. ताईचा नवरा, जो उच्च शिक्षण घेतलेला होता, नोकरीनिमित्त परदेशात गेला आणि तिथेच त्याने ऑफिसमधील एका प्रचंड श्रीमंत सहकाऱ्याशी दुसरं लग्न केलं. याला आता दहा वर्षे झाली.

मला त्या दोघांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. माझ्या डोक्यात तीन वेगवेगळ्या कथा एकाच वेळी सुरू होत्या—दोन्ही पक्ष्यांची प्रेमकहाणी, आशितोष आणि त्याची बहीण यांची कथा. त्या दिवशी मी घरी निघालो. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी पुन्हा आशितोषकडे गेलो. घरी गेल्यावर समजलं की आशितोष वाशीच्या खाडीवर गेला आहे.

मी खाडीवर गेलो तर मला दिसलं की आशितोष त्या एकट्या देशी मैनेला जवळ घेऊन तिचे अश्रू पुसत होता. मला पाहताच आशितोषला डोळ्यांतले अश्रू आवरले नाहीत. तो म्हणाला, “परदेशी पाहुणा बिचारीला सोडून गेला रे, संदीप. आता वर्षभर ती वाट पाहणार. पुन्हा तो वर्षभरानेच येईल. ”

आशितोषने मुठीत असलेले उर्वरित दाणे देशी मैनाच्या समोर टाकले आणि आम्ही जड पावलांनी घरी निघालो. काम करताना आशितोषचा मूड अजिबात नव्हता. तो जे चित्र काढत होता, त्यात नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते.

मी आल्या पावलानेच परत घरी निघालो. वाटेने जाताना माझ्या मनात प्रश्न उभा राहिला—खरं प्रेम कोणतं? घर सोडून जाणारी पत्नी, पैशासाठी दुसरं लग्न करणारा ताईचा नवरा, की दरवर्षी न चुकता त्याच वेळेला आपल्या प्रेयसीला भेटायला परदेशातून येणारा प्रियकर पक्षी? हल्ली माणसांना पक्ष्यांसारखं वागा असं म्हणायची वेळ आली आहे—ते पक्षी पहा कसं नि:स्वार्थीपणे एकमेकांवर प्रेम करतात, असे म्हणायची वेळ आली आहे. बरोबर ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘Busy’ असलेला आईवर्ग… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आजच्या ६५, ७०, ते ७५ वयोगटाचा जो आईवर्ग आहे तो प्रचंड व्यस्त आहे. खरतर हा आनंदाचा भाग आहे तरी चिडचिड होते.

आईचा योगवर्ग, भिशी, मदत सप्ताह, सत्संग, पूजा, महत्वाच्या भेटी गाठी, बँकेच्या फेऱ्या, वाढदिवस, नाटक अशी एक ना अनेक कामं यामध्ये हा आइवर्ग खूप व्यस्त असतो. आईला फोन केला तरीही वेळ बघा, तिला वेळ आहे का विचारा… आईला आपल्या घरी राहायला बोलवलं तरी तिला Time table बघून मगच एखाद दिवस वेळ असतो. इकडे आल्यावर पण मैत्रिणीचा फोन येणार, ” लेकिकडे गेलात का, उद्या येता ना पण, आपलं हळदीकुंकू ठरलं आहे. ग्रुप वर टाकलंय “

झालं.. आईची लगबग सुरू… शेवटी मला म्हणणार, तूच ये गं निवांत तिकडे रहायला..

आईला आता वेळच नाही आपल्यासाठी? हे मनात येऊन जातं. पण दुसऱ्या क्षणी वाटतं. या किती आनंदी राहतात! यांच्या ग्रुपला एकदा भेटायला गेले होते, मस्त धमाल असते. Gossip वैगेरे काही नाही, सूना बिना सगळं विसरून एक एक उपक्रम चालू असतात. हसणं, चिडवणं, गाणी म्हणणं, वाचन चालू असतं. त्यांचे ते काही तास मस्त जातात. आर्थिक स्वातंत्र्य आणि तब्येतीची काळजी घेतल्याने त्यांची सेकंड इनिंग मनासारखी चालू आहे. उगाच कुठल्याही गोष्टीत अडकत नाहीत. समविचारी, समदुःखी आणि सम वयस्कर लोकांमध्ये राहणे जास्त आनंद मिळतो.

मला आठवतं माझ्या आजीला असा ग्रुप नव्हता. मंदिरात वैगेरे थोडा वेळ जायचा. त्यामुळे सूना नणंद नातवंडं मुलं इतकंच जग. घरात तेच तेच विषय.. आर्थिक स्वातंत्र्य ही नव्हतं. पण आता काळ बदलतोय. नवे विचार येत आहेत. मोकळीक मिळत आहे हे पाहून आनंद वाटतो.

आनंदी आणि समाधानी आई पाहणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. त्यामुळे ही बिझी आई स्वीकारायला हवी. तिची वेळ पाळून तिच्या सोबत मिळतील ते आनंदाचे क्षण रहायला हवं. चला आई आता दुपारी फ्री असेल फोन करून घेते पटकन……

लेखक : अज्ञात 

प्रस्तुति : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “तात्यांची अंत्ययात्रा…”  – लेखक – श्री विश्वास सावरकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

तात्यांचे प्राणोत्क्रमण झाल्याची दुःखद वार्ता सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने पसरली. वृत्तपत्रांनी दुपारीच विशेष अंक काढले. नभोवाणीने दुपारी साडेबारा वाजता वृत्त प्रसृत केले. वृत्त ऐकताच अंत्यदर्शनासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रांतसंघचालक कै. काशीनाथपंत लिमये आणि आचार्य अत्रे आले. त्यांनी तात्यांच्या खोलीत जाऊन अंत्यदर्शन घेतले. आता अंत्ययात्रा काढण्यासाठी प्राथमिक सिद्धता करण्याचे दायित्व सर्वच कार्यकर्त्यांवर-विशेषतः हिंदूसभेच्या कार्यकर्त्यांवर पडले. त्यांनी यात्रेसाठी एक लष्करी गाडा शव वाहून नेण्याकरता मिळवण्याचा प्रयत्न केला. संबंधित अधिका-यांना तशी विनंती करण्यात आली. परंतु ती नाकारण्यात आली.

ही वार्ता आचार्य अत्रे यांना समजल्यावर त्यांनी, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना विनंती केली की, शासनाकडून आपली मागणी पुरी होत नसल्याने व्ही. शांताराम यांनी त्यांच्या चित्रनगरीतून तोफा व बंदुका घेऊन बसलेले सैनिकांचे चित्रफलक लावलेला ट्रक सिद्ध करून द्यावा. त्यांच्या या विनंतीला मान देऊन व्ही. शांतारामांनी अवघ्या -एक तासांत लष्करी गाड्याप्रमाणे एक ट्रक सिद्ध करून धाडला. अंत्ययात्रा सावरकर सदनपासून निघून गिरगावातल्या चंदनवाडी विद्युत्वाहिनीत जाणार होती. म्हणजे तब्बल ६-७ मैलांचे अंतर होते. तरीही सहस्रावधी स्त्री-पुरुष आरंभापासून यात्रेत सामील झाले होते. त्या यात्रेची व्यवस्था आचार्य अत्रेही पाहत असल्याने ते प्रथमपासून उपस्थित होते.

त्याआधी दर्शनासाठी शासनाच्या वतीने मंत्री मधुसूदन वैराळे, व्ही. शांताराम व संध्या, लता मंगेशकर आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती येऊन आपली श्रद्धांजली वाहून गेल्या होत्या. शासनाच्या वतीने मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा दुखवट्याचा संदेश माझ्या नावे सर्वप्रथम सचिवालयातून आला. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्री शासकीय दौ-यावर मुंबईबाहेर गेले होते. यात्रेतील जनता ‘सावरकर अमर रहे’, ‘सावरकरांच्या राजकारणाचा विजय असो’, ‘हिंदू धर्म की जय’, ‘हिंदू राष्ट्र की जय’ आदी घोषणा देत होते. एका गाडीत ‘नंदादीप समिती’ च्या कार्यकर्त्या सावरकरांची पदे गात होत्या, तर दुसच्या गाडीत भजनी मंडळाच्या स्त्रिया भजने म्हणत मिरवणुकीच्या अग्रभागी जात होत्या. वाटेत ठिकठिकाणी कमानी, फुलांच्या परड्या रस्त्यांवर उभारल्या होत्या आणि तात्यांचे शव ठेवलेला लष्करी गाडा जसा पुढे जात असे तशी त्यावर परड्यांतून पुष्पवृष्टी केली जात होती.

यात्रा जेव्हा आर्थर रोड तुरुंगापाशी आली, त्या वेळी एक आगळे दृश्य दिसले. तुरुंगाच्या बाहेरच्या मुख्य दारावर पहारा करणारे पोलीस शवगाडा समोर येताच त्यांचा फिरता पहारा थांबवून खांद्यावरच्या बंदुका खाली उलट्या धरून दक्ष स्थितीत नतमस्तक होऊन उभे राहिले होते, तर त्या चार भिंतीच्या मागे असलेल्या चाळीच्या वरच्या मजल्यावरून जमलेल्या कैद्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे’, ‘स्वा. सावरकर की जय’ अशा घोषणा देऊन श्रद्धांजली वाहिली. वरील हृदयस्पर्शी दृश्य शव-गाड्यावरून मला स्पष्ट दिसत होते.

पार्थिव देहाची मिरवणूक बॉब सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपाशी आली. त्या वेळी संघाच्या गणवेषधारी स्वयंसेवकांनी तात्यांना सैनिकी पद्धतीने मानवंदना दिली. मिरवणूक जेव्हा भडकमकर मागनि जाऊ लागली तशी घराघरातून लोक येऊन मिरवणुकीत सामील होत होते. पुढे गिरगाव रस्त्यावरून शवयात्रा चंदनभूमीकडे सरकू लागली त्या वेळी रस्ता शोकाकूल जनतेच्या अलोट गर्दनि व्यापून गेला होता. घराघराच्या गच्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या.

त्या वेळची आठवण झाली की, पुढे साप्ताहिक ‘मार्मिक’ च्या व्यंगचित्राखाली जी ओळ प्रसिद्धली होती त्याचे स्मरण झाल्यावाचून राहत नाही. तात्यांच्या ‘सागरा, प्राण तळमळला’ ह्या काव्यपंक्तीप्रमाणे रचलेली ती ओळ म्हणजे ‘प्राणा, (जन) सागर तळमळला!!’ 

शेवटी अंत्ययात्रा चंदनवाडीत पोचली. त्या वेळी भाषण करताना आचार्य अत्रे यांनी निदर्शनास आणले की, स्वा. सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताला श्रद्धांजली वाहण्यास महाराष्ट्र शासनाचा एकही मंत्री उपस्थित असू नये, ही शरमेची गोष्ट आहे. त्या वेळी समाजातूनही ‘शेम’ ‘शेम’ च्या आरोळ्या उठल्या. नंतर अनेक मान्यवर वक्त्यांनी श्रद्धांजली वाहिल्यावर सुधीर फडके यांनी ‘श्रीराम, जयराम जय जय राम! चा गजर सुरू केला, आणि तो चालू असताना तात्यांच्या अचेतन शरीराला विद्युत्दाहिनीत अग्नी दिला गेला.

या क्रांतीसूर्याच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏

(संदर्भ- आठवणी अंगाराच्या, पृष्ठ- २६-२८, विश्वास सावरकर © सावरकरी_विचाररत्ने फेसबुक पेज) 

लेखक : श्री विश्वास साव

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देव… – कवी : कुसुमाग्रज ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ देव… – कवी : कुसुमाग्रज  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

देव मानावा की मानू नये

या भानगडीत मी पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

ज्यांना देव हवा आहे

त्यांच्यासाठी तो श्वास आहे,

ज्यांना देव नको आहे

त्यांच्यासाठी तो भास आहे,

आस्तिक नास्तिक वादात

मी कधीच पडत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

हार घेऊन रांगेत कधी

मी उभा रहात नाही,

पाव किलो पेढ्याची लाच

मी देवाला कधी देत नाही,

जो देतो भरभरून जगाला

त्याला मी कधी देत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

जे होणारच आहे

ते कधी टळत नाही,

खाटल्यावर बसून

कोणताच हरी पावत नाही,

म्हणून मी कधी

देवास वेठीस धरीत नाही,

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

 

देव देवळात कधीच नसतो…

तो शेतात राबत असतो,

तो सीमेवर लढत असतो,

तो कधी आनंदवनात असतो,

कधी हेमलकसात असतो,

देव शाळेत शिकवत असतो,

तो अंगणवाडीत बागडत असतो,

तो इस्पितळात शुश्रूषा करीत असतो,

म्हणून…

ह्यांच्यातला देव मी कधी नाकारत नाही.. !

 

आपल्या मान्यतेवाचून

देवाचं काही अडत नाही.. !

कवी: कुसुमाग्रज

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “येसूबाई” – लेखिका : सुश्री सुलभा राजीव ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : येसूबाई

लेखिका : सुलभा राजीव

प्रकाशन:उत्कर्ष प्रकाशन

चौथी आवृत्ती 

पृष्ठ:४९३ 

मूल्य:६००/

कितीही संकटं आली तरीही खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणारे चरित्र! महाराणी येसूबाई!

पती छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुध्द कट शिजला. घरच्याच मंडळींनी कारस्थानं केली!सासूबाईंनी शंभुराजांना कैद करण्यासाठी सैन्य पाठवले होते!स्वराज्याचे निम्म्याहून अधिक कारभारी कारस्थानात गुंतलेले! माहेर वतनदारीसाठी विरोधात गेलेलं……… सासर आणि माहेर दोन्ही परके!तरीही संभाजी महाराजांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या! नऊ वर्षांचा तो संभाजी महाराजांच्या राज्याचा झांजवती काळ, रोजच लढाई!

आप्तांच्या फितुरीने केलाला घात!पती छत्रपती संभाजी महाराजांना झालेली कैद आणि पतीची क्रूर हत्या!छत्रपती संभाजी महाराजांची जिवंतपणी आणि बलिदान झाल्यानंतरची विटंबना! रायगड स्वराज्याची राजधानी! राजधानीवर चालून आलेला शत्रू!रायगड शर्थीने झुंजायचा….. पतीच्या निधनाचे दुःख करत बसायला ही वेळ मिळाला नाही!

रायगडाचा पराभव! आणि तब्बल २९ वर्षांची कैद!ज्या स्वराज्यासाठी हे सर्व भोगलं त्यासाठी परत भाऊबंदकी आणि ताराराणी यांच्याशी कलह… तरीही येसूबाई उभ्या राहिल्या! त्यांच्यावर आलेली संकटं इतिहासातील कोणत्याही स्त्रीवर आलेली नाहीत, इतकी वाईट आणि भयंकर! तरीही त्या लढत राहिल्या… आपल्यासाठी एक आदर्श जीवन उभे राहिले…. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण प्रत्यक्ष जीवनात उतरणार ही महान त्यागमूर्ती “महाराणी येसूबाई”!

महाराणी येसूबाई!छ्त्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना कुळमुखत्यार म्हणून नियुक्त केले होते! श्री सखीराज्ञी जयति!

छ्त्रपती संभाजी महाराजांसारख्या परम प्रतापी राजपुत्रासोबत ज्यांचा विवाह झाला आणि गाठ बांधल्या गेली स्वराज्याच्या रक्षणाची! त्या सोबत येणाऱ्या अग्नीदिव्यांशी! त्यागशी आणि हौतम्याशी!

आयुष्याची २९ वर्षे कैद! त्या आधीचा गृह कलह! कट आणि कारस्थाने! पतीची, स्वराज्याच्या छत्रपतींची क्रूर हत्या! त्यात ही खचून न जाता नऊ महिने रायगड लढविणाऱ्या येसूबाई! धोरणी मुत्सद्दी आणि त्यागाची मूर्ती म्हणजे येसूबाई! पोटाचा पुत्र लहान असल्याने राजाराम महाराज यांना छ्त्रपती म्हणून अभिषिक्त करणाऱ्या त्यागमुर्ती! राजाराम महाराजांना रायगडावरून सुखरूप जिंजी कडे पाठवून देतात आणि स्वतःला मात्र जन्माची मोगली कैद!

डॉ सदाशिव शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेली ही भव्य कादंबरी!

तब्बल ४२ संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन लिहिलेली ही कादंबरी वाचताना वाचक इतिहासाचा भाग होऊन जातो ! लेखिकेने अतिशय नेकिने आणि मेहनतीनं आणि मोठ्या कष्टानं ही कादंबरी लिहून पूर्ण केली आहे. कादंबरी लेखन चालू असतानाच लेखिका स्वतः ही कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी लढत होत्या. प्रचंड वेदना आणि भयंकर असे उपचार चालू असताना अभ्यास आणि लेखनात खंड पडणार नाही याची काळजी घेत होत्या. त्यांनी त्या दुर्धर रोगावर यशस्वी मात केली. आपल्याला ही अमूल्य अशी कादंबरी मिळाली….. नियतीशी झुंज देण्याची प्रेरणा मात्र त्यांना झुंजार येसूबाई यांच्याच जीवनातून मिळाली !२९ वर्षे कैदेत राहूनही त्यांनी हार मानली नाही! कदाचित लेखिकेच्या या परिस्थितीमुळे पुस्तकात मुद्रणदोष शिल्लक राहिले असतील असं वाटतं. हे मुद्रण दोष असूनही कादंबरीची साहित्य म्हणून जी उंची आहे ती अतिशय भव्य आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा, संभाजी सारख्या मैलाचा दगड ठरलेल्या लोकप्रिय कादंबऱ्या असताना महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील कादंबरी लिहिणं खूप आव्हानात्मक काम होतं… जे लेखिकेने पूर्ण केलं आहे.

प्रत्येकाने हे चरित्र वाचून आत्मसात केलं तर आयुष्यातील संकटाना सामोरे जाण्याची तयारी होईल… लहान लहान संकटाना सामोरे जाताना मोडून पडणारी आपली पिढी खंबीर होऊन उभी राहील !

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #271 ☆ सोSहम् शिवोSहम्… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख सोSहम् शिवोSहम्। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 271 ☆

सोSहम् शिवोSहम्… ☆

Sहम् शिवोSहम्…जिस दिन आप यह समझ जाएंगे  कि ‘मैं कौन हूं’  फिर जानने के लिए  कुछ शेष नहीं रहेगा। इस मिथ्या संसार में मृगतृष्णा से ग्रसित मानव दौड़ता चला जाता है और उन इच्छाओं को पूर्ण कर लेना चाहता है, जो उससे बहुत दूर हैं। इसलिए वे मात्र स्वप्न बन कर रह जाती हैं और उसकी दशा तृषा से आकुल-व्याकुल उस मृग के समान हो जाती है, जो रेत पर विकीर्ण सूर्य की किरणों को जल समझ भागता चला जाता है और अंत में अपने प्राण त्याग देता है। यही दशा आधुनिक मानव की है, जो अधिकाधिक सुख-संपदा पाने का हर संभव प्रयासरत रहता है; राह में आने वाली आपदाओं व दुश्वारियों की परवाह तक नहीं करता और संबंधों को नकारता हुआ आगे बढ़ता चला जाता है। इस स्थिति में उसे दिन-रात में कोई अंतर नहीं भासता। वह अहर्निश कर्मशील रहता है और एक अंतराल के पश्चात् बच्चों के मान-मनुहार, पत्नी व परिजनों के सान्निध्य  से  वंचित रह जाता है। वह उसी भ्रम में रहता है  कि पैसा व सुख-सुविधाएं स्नेह व प्रेम का विकल्प हैं। परंतु बच्चों को आवश्यकता होती है…माता के स्नेह, प्यार-दुलार व सानिध्य-साहचर्य की, पिता के सुरक्षा-दायरे की, जिसमें बच्चे स्वयं को सुरक्षित अनुभव करते हैं और माता-पिता के संरक्षण में वे ख़ुद को किसी बादशाह से कम नहीं समझते। परंतु आजकल बच्चों व बुज़ुर्गों को एकांत की त्रासदी से जूझना पड़ रहा है, जिसके परिणाम-स्वरूप  बच्चे ग़लत राहों पर अग्रसर हो जाते हैं और टी• वी•, मोबाइल व मीडिया की गिरफ़्त में रहते हुए कब अपराध-जगत् में प्रवेश कर जाते हैं;  जिसका ज्ञान उनके माता-पिता को बहुत देरी से होता है। घर के बड़े-बुज़ुर्ग भी अक्सर स्वयं को असुरक्षित अनुभव करते हैं। वे आंख, कान व मुंह बंद कर के जीने को विवश होते हैं,  क्योंकि कोई भी माता-पिता अपने व अपने बच्चों के बारे में, एक वाक्य भी सुन कर हज़म नहीं कर पाते। इतना ही नहीं, यदि वे बच्चों के हित में भी कोई सुझाव देते हैं, तो उन्हें उसी पल उनकी औक़ात का अहसास दिला दिया जाता है। अपने अंतर्मन में उठते भावोद्वेलन से जूझते हुए, वे मासूम बच्चे अवसाद के शिकार हो जाते हैं और बच्चों के माता-पिता भी आत्मावलोकन करने को  विवश हो जाते हैं; जिसका ठीकरा वे एक-दूसरे पर फेंक कर अर्थात् दोषारोपण कर निज़ात पाना चाहते हैं। परंतु यह सिलसिला थमने का नाम ही नहीं लेता। अक्सर ऐसी स्थिति में वे अलगाव की स्थिति तक पहुंच जाते हैं।

संसार में मानव के दु:खों का सबसे बड़ा कारण है… विश्व के बारे में पोथियों से ज्ञान प्राप्त करना, क्योंकि यह भौतिक ज्ञान हमें मशीन बना कर रख देता है और हम अपनी हर हसरत को पूरा कर लेना चाहते हैं – चाहे हमें उसके लिए बड़ी से बड़ी कीमत ही क्यों न चुकानी पड़े तथा बड़े से बड़ा त्याग ही क्यों न देना पड़े। यह मानव-जीवन की त्रासदी है कि हम अंधाधुंध बेतहाशा दौड़ते चले जाते हैं, जबकि हम अपने जीवन के लक्ष्य से भी अवगत नहीं होते। सो! यह सब तो अंधेरे में तीर चलाने जैसा होता है। हमारा दुर्भाग्य है कि हम यह जानने का प्रयास ही नहीं करते कि ‘मैं कौन हूं, कहां से आया हूं और मेरे जीवन का प्रयोजन क्या है?’

वास्तव में इस आपाधापी के युग में, यह सब सोचने का समय ही कहां मिलता है… जब हम अपने बारे में ही नहीं जानते, तो जीव-जगत् को समझने का प्रश्न ही कहां उठता है? आदि-गुरु शंकराचार्य पांच वर्ष की आयु में घर छोड़ कर चले गए थे… इस तलाश में कि ‘मैं कौन हूं’ और उन्होंने ही सबसे पहले अद्वैत दर्शन अर्थात् परमात्मा की सत्यता से अवगत कराया कि ‘ब्रह्म सत्यम्, जगत् मिथ्या’ है।  संसार में जो कुछ भी है…माया के कारण सत्य भासता है और ब्रह्म सृष्टि के कण-कण में व्याप्त है। केवल वह ही सत्य है, निराकार है, सर्वव्यापक है, अनादि है, अनश्वर है। परंतु समय अबाध गति से निरंतर चलता रहता है, कभी रुकता नहीं। प्रकृति के विभिन्न उपादान सूर्य, चंद्रमा, तारे व पृथ्वी आदि सभी निरंतर क्रियाशील रहते हैं। इसलिए सब कुछ निश्चित है; समयानुसार निरंतर घटित हो रहा है और वे सब नि:स्वार्थ व निष्काम भाव से दूसरों के हित में कार्यरत हैं। वृक्ष अपने फल स्वयं नहीं खाते; जल व वायु प्राणदायक हैं…अपने तत्वों का उपयोग व उपभोग स्वयं नहीं करते। श्री परमहंस योगानंद जी का यह सारगर्भित वाक्य ‘खुद के लिए जीने वाले की ओर कोई ध्यान नहीं देता; परंतु जब आप दूसरों के लिए जीना सीख लेते हैं, तो वे आपके लिए जीते हैं’ बहुत सार्थक संदेश देता है। ‘आप जैसा करते हैं, वही लौट कर आपके पास आता है।’ नि:स्वार्थ भाव से किया गया कर्म सर्वोत्तम होता है। गीता के  निष्काम कर्म का संदेश मानवतावादी भावनाओं से ओत-प्रोत व आप्लावित है।

स्वामी विवेकानंद जी का यह वाक्य हमें ऊर्जस्वित करता है कि ‘किस्मत के भरोसे न बैठें, बल्कि पुरुषार्थ यानि मेहनत के दम पर ख़ुद की किस्मत बनाइए।’  परमात्मा में श्रद्धा, आस्था व विश्वास रखना तो ठीक है, परंतु हाथ पर हाथ धर कर बैठ जाने का औचित्य नहीं है। अब्दुल कलाम जी के विचार विवेकानंद जी के उक्त भाव  को पुष्ट करते हैं कि ‘जो लोग परिश्रम नहीं करते और भाग्य के सहारे प्रतीक्षारत रहते हैं, तो उन्हें जीवन में उन बचे हुए फलों की प्राप्ति होती है, क्योंकि पुरुषार्थी व्यक्ति तो अपने अथक परिश्रम से यथासमय उत्तम फल प्राप्त कर ही लेते हैं।’ सो! आलसी लोगों को मन-चाहा फल कभी भी प्राप्त नहीं होता।

‘अपने सपनों को साकार करने का सर्वश्रेष्ठ तरीका यही है कि आप जाग जाएं’— पाल वैलेरी का यह कथन बहुत सार्थक है और अब्दुल कलाम जी भी मानव को यह संदेश देते हैं कि ‘खुली आंखों से सपने देखो, अर्थात् यदि आप सोते रहोगे, तो परिश्रमी, पुरूषार्थी लोग आप से आगे बढ़कर वांछित फल प्राप्त कर लेंगे और आप हाथ मलते रह जायेंगे।’ समय बहुत अनमोल है, लौट कर कभी नहीं आता। सो! हर पल की कीमत समझो। ‘स्वयं को जानो और पहचानो।’ जिस दिन आप समय की महत्ता को अनुभव कर स्वयं को पहचान जाओगे…अपनी बलवती इच्छा से वैसे ही बन जाओगे। सो! आवश्यकता है–अपने अंतर्मन में निहित सुप्त- शक्तियों को जानने की, पहचानने की, क्योंकि पुरुषार्थी लोगों के सम्मुख, तो बाधाएं भी खड़ा रहने का साहस नहीं जुटा पातीं…इसलिए अच्छे लोगों की संगति करने का संदेश दिया गया है, क्योंकि उस स्थिति में बुरा वक्त आएगा ही नहीं। जब आपके विचार अच्छे होंगे, तो आपकी सोच भी  सकारात्मक होगी और आप सत्य के निकट होंगे। सत्य सदैव कल्याणकारी होता है, शुभ होता है, सुंदर होता है और सबका प्रिय होता है। दूसरी ओर सकारात्मक सोच आपको निराशा रूपी गहन अंधकार में भी भटकने नहीं देती। आप सदैव प्रसन्न रहते हैं और खुश-मिज़ाज लोगों की संगति सबको प्रिय होती है। इसलिए ही रॉय गुडमैन के शब्दों में ‘हमें हमेशा याद रखना चाहिए कि खुशी जीवन की यात्रा का  एक तरीका है, न कि जीवन की मंज़िल’ अर्थात् खुशी जीने की राह है; अंदाज़ है, जिसके आधार पर आप अपनी मंज़िल पर सहजता से पहुंच सकते हैं।

मानव व प्रकृति का निर्माण पंच-तत्वों से हुआ है…  पृथ्वी, जल, आकाश, वायु व अग्नि और अंत में मानव इनमें ही विलीन हो जाता है। परंतु दुर्भाग्यवश, वह आजीवन काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार के  द्वंद्व से मुक्ति नहीं प्राप्त कर सकता तथा इसी ऊहापोह में उलझा रहता है। हमारे वेद, उपनिषद्, शास्त्र, तीर्थ-स्थल व अन्य धार्मिक – ग्रंथ समय-समय पर हमारा ध्यान जीवन के अंतिम लक्ष्य की ओर दिलाते हैं… जिसका प्रभाव स्थायी होता है। कुछ समय के लिए तो मानव निर्वेद अथवा निरपेक्ष भाव से इनकी ओर आकर्षित होता है, परंतु फिर माया के वशीभूत होने के पश्चात् सब कुछ भुला बैठता है। जीवन के अंतिम पड़ाव में वह प्रभु से ग़ुहार लगाता है कि वह उसका नाम-सिमरन व ध्यान करना चाहता है, परंतु उस स्थिति में पांचों कर्मेंद्रियां आंख, कान, नाक, मुंह, त्वचा उसके नियंत्रण में नहीं होतीं। उसका शरीर शिथिल हो जाता है, बुद्धि कमज़ोर पड़ जाती है तथा नादान मानव सबसे अलग-थलग पड़ जाता है, क्योंकि वह अहंनिष्ठ  स्वयं को आजीवन सर्वश्रेष्ठ समझता रहा। आत्मचिंतन करने पर  ही उसे अपनी ग़लतियों का ज्ञान होता है और वह उस स्थिति में प्रायश्चित करना चाहता है। परंतु उसके परिवार-जन भी अब उससे कन्नी काटने लग जाते हैं। कुछ समय गुज़र जाने के पश्चात् उन्हें उसकी आवश्यकता अनुभव नहीं होती और वे सब उसे नकार देते हैं। सो! अब उसे अपना जीवन रूपी बोझ स्वयं अकेले ही ढोना पड़ता है।

बेंजामिन फ्रैंकलिन का यह कथन ‘बुद्धिमान लोगों को सलाह की आवश्यकता नहीं होती और मूर्ख लोग इसे स्वीकार नहीं करते’ विचारणीय है। इसके माध्यम से मानव में आत्मविश्वास की महत्ता का प्रतिपादन किया गया है। यदि वह बुद्धिमान है, तो शेष जीवन का एक-एक पल स्वयं को जानने-पहचानने में लगा देता है… और प्रभु का नाम-स्मरण करने में रत रहता है। ‘हरि अनंत, हरि कथा अनंता’ अर्थात् प्रभु की सत्ता व महिमा अपरंपार है। मानव चाह कर भी उसका पार नहीं पा सकता। उस स्थिति में उसे प्रभु-कथा सत्य और शेष सब जग-व्यथा प्रतीत होती है। सो! मानव सदैव मौन रहना अधिक पसंद करता है और वह निंदा-स्तुति, स्व-पर व राग-द्वेष से बहुत ऊपर उठ जाता है। उसे किसी से कोई शिक़वा व शिकायत नहीं रहती, क्योंकि उसकी भौतिक इच्छाओं का तो पहले ही शमन हो चुका होता है। इसलिए वह सदैव संतुष्ट रहता है… स्वयं में स्थित रहता है और प्रभु को प्राप्त कर लेता है। वह कबीर की भांति संसार में उस सृष्टि-नियंता की छवि के अतिरिक्त किसी अन्य को देखना नहीं चाहता…’नैना अंतर आव तू, नैन झांप तोहि लेहुं/ न हौं देखूं और को, न तुझ देखन देहुं’ अर्थात् वह प्रभु को देखने के पश्चात् नेत्र बंद कर लेता है, ताकि वह उसके सानिध्य में रह सके। यह है प्रेम की पराकाष्ठा व तादात्म्य की स्थिति…जहां आत्मा-परमात्मा में भेद समाप्त हो जाता है। सूरदास जी की गोपियों का कृष्ण को दिया गया उपालंभ भी इसी तथ्य को दर्शाता है कि ‘भले ही तुम नेत्रों से तो ओझल हो गए हो और गोकुल से मथुरा में जाकर बस गए हो, परंतु उनके हृदय से दूर जाकर दिखलाओ, तो मानें’ गोपियों के प्रगाढ़ प्रेम व अगाध विश्वास को दर्शाता है। ‘प्रेम गली अति सांकरी, जा में दो न समाय’ अर्थात् प्रेम की तंग गली में उसी प्रकार दो नहीं समा सकते, जैसे एक म्यान में दो तलवार। अत: जब तक आत्मा-परमात्मा का मिलन नहीं हो जाता, तब तक वह कैवल्य की स्थिति को प्राप्त नहीं कर सकता, क्योंकि जब तक मानव विषय-वासनाओं…काम, क्रोध, लोभ, मोह व अहंकार का त्याग कर, ‘मैं और तुम’ की स्थिति से ऊपर  नहीं उठ जाता…वह ‘लख चौरासी अर्थात् जन्म- जन्मांतर तक आवागमन के चक्कर में फंसा रहता है।’

अंत में मैं यह कहना चाहूंगी कि सोSहम् शिवोSहम् अर्थात् मैं ही ब्रह्म हूं और सम्पूर्ण प्राणी-जगत् सत्यम्, शिवम्, सुंदरम् की भावनाओं से ओत-प्रोत है। सो! उस सृष्टि-नियंता की सत्ता को जानना-पहचानना ही मानव का प्रथम उद्देश्य होना चाहिए। मानव जब स्वयं को जान जाता है…समस्त सांसारिक बंधन व भौतिक सुख- सुविधाएं उसे त्याज्य प्रतीत होती हैं। वह पल भर भी उस प्रभु से अलग रहना नहीं चाहता। उसकी यही कामना, उत्कट इच्छा व प्रबल आकांक्षा होती है कि एक भी सांस बिना प्रभु-सिमरन के व्यर्थ न जाए और स्व-पर व आत्मा-परमात्मा का भेद समाप्त हो जाए। यही है–मानव जीवन का प्रयोजन व अंतिम लक्ष्य… सोSहम् शिवोSहम्– जिसे प्राप्त करने में मानव को जन्म-जन्मांतर तक प्रतीक्षा करनी पड़ती है।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares