(पूर्वसूत्र-ताईच्या संसारात आता खऱ्या अर्थाने स्वास्थ आणि विसावा सुरू होईल असं वाटत असतानाच नेमक्या त्या क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच आलेलं असावं तसं ताईचं हे कॅन्सरचं दुर्मुखलेलं आजारपण समोर उभं राहिलं होतं!
“तुला आणखी एक सांगायचंय” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहीण मला म्हणाली.
पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसं उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो.)
“तुला सांगू? ऐकशील?” ती म्हणाली. मी होकारार्थी मान हलवली. “तू खरंच काळजी करू नकोस. मी तुझ्या लाडक्या ताईशीही बोललीय. “
” होय? काय सांगितलंस तिला? आणि ती काय म्हणाली?” मी उत्सुकतेनं विचारलं.
” ‘तू फक्त लवकरात लवकर बरी हो. बाकी कसलीही काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुझ्यासोबत. ‘ असं मी म्हटलं तेव्हा ती समाधानानं हसली होती. आणि ‘काळजी कसली गं? तुम्ही एवढी मायेची सगळी माझ्यासोबत असताना काळजी कसली?’ असंही म्हणाली. ”
मोठी बहिण बोलली ते ऐकून खूप बरं वाटलं खरं पण ते समाधान तात्पुरतंच ठरणार होतं.
तसं पाहिलं तर ताईनं खरंच सगळं शांतपणे स्वीकारलं होतं. पण मीच तिच्यात एवढा गुंतून गेलो होतो कीं मनाला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अस्वस्थतेचं हे मनावरचं ओझं कांही झालं तरी मला उतरवायचं होतं. अनायसे दिवाळी जवळ आली होती. भाऊबीजेला नेहमीप्रमाणे तिच्याकडे जायचं हे तर ठरलेलंच होतं. पण यावेळी मी गेलो, ते हे मनावरचं ओझं उतरवूनच परत यायचं असं स्वतःशी ठरवूनच.
मी गेलो तेव्हा मला वाटलं ताई झोपलेली असेल. म्हणून मग आईलाच हांक मारत मी स्वयंपाकघरात डोकावलो. पाहिलं तर ताई देवासमोर बसलेली. खूप थकल्यासारखी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज नाहीसंच झालं होतं जसंकांही. तिला पाहून मला कसंतरीच झालं. कांही न बोलता मी हातपाय धुवून आलो. आई मला ‘बैस’ म्हणाली पण माझं लक्ष मात्र ताईकडेच. तिने श्रद्धेने हातातली पोथी मिटून कपाळाला लावली आणि आपल्या थरथरत्या हाताने ती देवघरांत ठेवून दिली.
“हे काय गं ताई? तुला इतका वेळ एका जागी ताटकळत बसवतं तरी का गं आता? कशाला उगीच ओढ करतेयस?”
“इतका वेळ कुठे रे? विचार हवं तर आईला. रोज मी नेहमीसारखा संपूर्ण अध्याय नाही वाचू शकत. म्हणून मग थोड्याच ओव्या कशाबशा वाचते. बसवेनासं झालं कीं थांबते. होय कीं नाही गं आई?”
हे बोलत असतानाच तिने आईकडे पाहिलं. तिचा आधार घेण्यासाठी आपला थरथरता हात पुढे केला. आई तत्परतेने तिच्याजवळ गेली. तिला आधार देत उठवू लागली. ताई तोल सावरत कशीबशी उभी रहाताच माझ्याकडे पहात म्हणाली, “इथं आई आल्यापासून घरचं सगळं तीच बघते. एकाही कामाला मला हात लावून देत नाही. सारखं आपलं ‘तू झोप, ‘ ‘तू आराम कर’ म्हणत असते. कंटाळा येतो रे सारखं पडून पडून.. ” तिचं हे शेवटचं वाक्य इतकं केविलवाणं होतं कीं मला पुढं काय बोलावं सुचेचना. मी लगबगीने उठून पुढे झालो.
“आई.. , थांब. मी नेतो तिला.. ” म्हणत ताईला आधार देत मी हळूहळू तिला तिच्या काॅटपर्यंत घेऊन आलो. तिथं अलगद झोपवलं तशी माझ्याकडे पाहून म्लानसं हसली.
“बैस.. ” काॅटच्या काठावर हात ठेवत ती म्हणाली. मी तिथेच तिच्याजवळ टेकलो. तिच्या कपाळावरून अलगद हात फिरवत राहिलो. तिने अतीव समाधानाने शांतपणे डोळे मिटून घेतले. तिला थोडं थोपटून, ती झोपलीय असं वाटताच मी माझा हात हळूच बाजूला घेतला आणि उठलो.
“का रे ? बैस ना.. ” तिला माझी चाहूल लागलीच. ” जायची गडबड नाहीय ना रे? रहा आजचा दिवस तरी… ” ती आग्रहाने म्हणाली.
माझाही पाय निघणार नव्हताच. पण जाणं आवश्यक होतंच.
“मी नेहमीसारखं जेवल्या जेवल्या निघणार नाहीय, पण संध्याकाळी उशीरा तरी निघायलाच हवं गं. परत येईन ना मी… खरंच येईन. “
“कधी? एकदम पुढच्या भाऊबीजेलाच ना?” उदास हसत तिनं विचारलं.
“कां म्हणून? मुद्दाम रजा घेऊन येत राहीन. बघच तू. मी थोडावेळ आईशी बोलतो. चालेल?”
तिने होकारार्थी मान हलवली. आई न् मी स्वैपाकघरांत बोलत बसलो. तेवढ्यांत केशवराव, अजित, सुजित सगळे आपापली कामं आवरून घरी आले. दिवाळीचा उत्साह असा कुणाला नव्हताच, पण ताईनंच आग्रह केलान् म्हणून आईनं नेवैद्यापुरतं गोडधोड केलं होतं. जेवणं झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या, पण विषय मात्र सारखा ताईभोवतीच घुटमळत राहिला.
दुपार उलटली तसं आईनं चहाचं आधण स्टोव्हवर चढवलं. ते पाहून मी बॅग भरायला घेतली. ताईकडे भाऊबीजेला मुद्दाम येऊनही तिच्याकडून ओवाळून न घेता परत जायची अशी पहिलीच वेळ हे जाणवलं आणि मन कातर झालं. तेवढ्यांत..
“अहोs.. आत या बघू जरा.. ” ताईनं आतून आपल्या खोल गेलेल्या आवाजात केशवरावांना हांक मारली. ते लगबगीने उठले तसा तिचा पुन्हा तोच क्षीण रडवेला आवाज… “आईलाही घेऊन याs.. “
आईही केशवरावांच्या पाठोपाठ घाईघाईने आंत गेली. या अनपेक्षित कलाटणीने मी चरकलो. थोड्या वेळाने केशवराव बाहेर आले.
“क.. काय झालंय?.. ” मी घाबरून विचारलं.
” नाही अरे… कांही नाही.. काय झालंय ते तूच बघ आता.. ” केशवराव कसनुसं हसत म्हणाले.
तेवढ्यांत ताईला आधार देत आई तिला बाहेर घेऊन आली. भिंतीला हात टेकवत ताई जवळच्या खुर्चीवर कशीबशी टेकली. तेवढ्या श्रमानेही ती दमली होती. तिने आवर्जून नेसलेल्या जरीच्या साडीकडे लक्ष जाताच मी थक्क होऊन पहातच राहिलो. तिचा विस्कटलेला चेहरा, विरळ होत चाललेले केस आणि अशा अवस्थेत कशीबशी नेसलेली ही जरीची साडी.. !
“काय ग हे.. ?”
मी न समजून विचारलं. तिने न बोलता हळूच आईकडे पाहिलं.
“मी सांगते. ” आई म्हणाली, “मघाशी हिनं अजितच्या बाबांना आंत बोलावलं होतं ना ते मुद्दाम काॅट खालची ट्रंक बाहेर ओढायला. त्यातली ही साडी मागून घेतलीन्. आणि मला बोलावून माझ्याकडून नेसवून घेतलीयन. ” आई कोतुकाने म्हणाली.
” काय गं हे ताई? कशाला अशी ओढ करायची.. ?”
“कशाला काय? आज ओवाळायला हवं ना तुला, म्हणून रे. ” तिचं हे उसनं अवसान पाहून मलाच भरून आलं. घशाशी आलेला आवंढा मी कसाबसा गिळला आणि घट्ट मनानं सगळं हसून साजरं करायचं ठरवलं.
“वा वा.. चला.. मीही तयार होतो… ” म्हणत पटकन् उठलो. कपडे बदलून आलो. तोवर घाईघाईने ओवाळणीची तयारी करुन आई पाटाभोवती रांगोळीची रेघ ओढत होती.
इथे येताना मी जे मनात ठरवून आलो होतो ते हातून असंच निसटून जाणार असं वाटत असतानाच ताईनेच आवर्जून माझा तो हरवू पहाणारा आनंद असा जपलेला होता! मी हसतमुखाने पाटावर बसलो. निरांजनाच्या प्रकाशात ताईचा सुकलेला चेहराही मला उमलल्यासारखा वाटू लागला. अजित-सुजितनी तिला दोन्ही बाजूंनी आधार देत उभं केलं. आईने ताम्हण तिच्या हातात दिलं. दोन्ही मुलांच्या आधाराने कसंबसं ताम्हण धरून ती मला ओवाळू लागली. मी आवर्जून आणलेलं नव्या कोऱ्या नोटांचं मोठं पॅकेट व्यवस्थित ठेवलेलं एन्व्हलप पॅंटच्या खिशातून बाहेर काढलं… आणि.. ते पाहून ताई गंभीर झाली. ओवाळणारे तिचे थरथरते हात थबकले. ओवाळताना थोडी वाकलेली ती महत्प्रयासाने ताठ उभी राहिली.
” ए.. काय आहे हे? इतकी मोठी ओवाळणी मी घेणार नाही हं.. “
“आई, ऐकतेयस ना ही काय म्हणतेय ते? मी ओवाळणी काय घालायची हे ही कोण ठरवणार? ते भावानंच ठरवायचं असतं आणि घातलेली ओवाळणी बहिणीनं गोड मानून घ्यायची असते, हो कीं नाही गं?” आईला कानकोंडं होऊन गेलं आणि ताईने नकारार्थी मान हलवली.
“तू दरवर्षी घालतोस तेवढीच ओवाळणी घाल. ऐक माझं. मी तेवढीच घेईन. “
“कां पण?”
” हेच मी तुला विचारतेय. याच वर्षी एवढी मोठी भाऊबीज कां? कशासाठी?”
“अगं पण… एवढं तरी ऐक ना गं माझं… “
मी अजीजीने म्हणालो.
“मला सांग, आज सकाळी कोल्हापूरहून पुष्पाताईकडची भाऊबीज आवरून आलायस ना?”
“हो. “
“तिलाही एवढीच ओवाळणी घातलीयस कां?.. ” मी गप्प.
“मग? दोघींनाही नेहमीप्रमाणे सारखीच ओवाळणी घालायची. मी जास्त घेणार नाही. तू लहान आहेस माझ्यापेक्षा आणि माझं ऐकायचंयस.. “
मला यावर काय बोलावं तेच समजेना. सगळं बोलणंच खुंटलं होतं. मी गप्प बसलेलं पाहून तिलाच रहावेना…
“मला खूप ताटकळत उभं रहावत नाहीये रे… “
ती काकुळतीने म्हणाली. मी नाईलाजाने माझा हात मागं घेतला. माझा हट्ट संपला. मी ते एन्व्हलप बाजूला पाटावर ठेवलं. खिशातून दुसऱ्या नोटा काढून नेहमीएवढी ओवाळणी तिला घातली.
तिने अखेर तिचंच म्हणणं असं खरं केलं होतं. मी निघण्यापूर्वी कुणाचं लक्ष नाहीय असं बघून आईला बाजूला बोलावून घेतलं.
“आई, हे एन्व्हलप इथं तुझ्याजवळ ठेव. यात अकरा हजार रूपये आहेत. हे पैसे इथे या घरी लागतील तसे तिला न सांगता तू खर्च कर. “
ऐकलं आणि आईने डोळ्याला पदर लावलान्.
“अरे दोन महिने होऊन गेलेत मी इथे येऊन. माझे सगळे
पेन्शनचे पैसेही तस्सेच पडून आहेत माझ्याजवळ. देवदर्शनाला बाहेर गेल्यानंतर संपत आलेलं किरकोळ जरी माझ्या पैशातून कांही आणलं सवरलं तरी केशवरावांकडून हिशेबाने ते पैसे ती मला द्यायला लावते. एकदा मी तिला समजावलंसुध्दा.
‘अगं मी तर इथंच रहाते, जेवते, मग हक्काने थोडे पैसे खर्च केले तर बिघडलं कुठं? ‘ म्हटलं तर म्हणाली, ‘तुझे कष्ट आणि प्रेम हक्कानं घेतेच आहे ना गं आई मी? मग पुन्हा पैसे कशाला?’
मी एक दिवस हटूनच बसले, तेव्हा म्हणाली, ‘आई, मला माहिती आहे, तू माझ्या भावांकडे रहातेस तेव्हा ते कुणीच तुझे पेन्शनचे पैसे घरांत खर्चाला घेत नाहीत. अगं मग ते इथेच कशासाठी? इथे मला कुठं काय कमी आहे?’ याच्यापुढे काय बोलू मी? कसं समजावू तिला? हे बघ, नेहमीची गोष्ट वेगळी. आता तिला दुखवून नाही चालणार. तिच्या मनाप्रमाणे, ती म्हणेल तसंच वागायला हवं ना? हे पैसे तू परत घेऊन जा. वाईट वाटून घेऊ नको. तिच्या कलानं मी बोलीन, समजावीन तिला, तेव्हा दे हवंतर. ” आई म्हणाली.
मी नाईलाजाने ते पैसे खिशात ठेवले. पूर्वीपेक्षाही त्या पैशांचं ओझं मला आता जास्त जाणवू लागलं. हे ओझं हलकं केल्याशिवाय मला चैन पडणार नव्हती. मी सर्वांचा निरोप घेतला. जाताना केशवरावांना म्हणालो, “माझ्याबरोबर कोपऱ्यावरच्या रिक्षा स्टॉपपर्यंत चला ना प्लीज… ” ते लगेच तयार झाले. मी मनाशी ठाम निश्चय केला. मनातली गदगद आता थेट त्यांच्यापुढंच मोकळी करायची. अगदी मनाच्या तळातलं जे जे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं असं ठरवूनच बाहेर पडलो खरा, पण ते सगळं बोलणंच नंतर पुढचं सगळं अतर्क्य घडायला निमित्त ठरणार होतं हे तेव्हा मला कुठं माहित होतं… ?
☆ एक नंबर शिवणार… भाग-२ – लेखक – श्री राजेंद्र परांजपे ☆ सौ.प्रभा हर्षे ☆
(तिथून जेवून परत घरी येताना, हॉल स्टेशनजवळ होता, म्हणून जेवण जिरवायला चालत स्टेशनकडे निघालो. नेमकं त्याचवेळी माझ्या बुटाच्या सोलने मला दगा दिला. बुटाला सोडून सोल लोंबकळू लागला.) इथून पुढे —
मात्र माझ्या नशिबाने तिथून पन्नास फुटावरच मला एक चांभाराचं दुकान दिसलं. कसातरी खुरडत मी त्या दुकानापर्यंत पोचलो. तिथला चांभार खालमानेने काहीतरी शिवत होता. मी त्याच्या पुढ्यात माझा सोल सुटलेला बूट टाकला.
“सोल सुटलाय का, आत्ता शिवतो बघा. ” तो म्हणाला.
“दादा, जरा चांगला शिवा हं. मला लांब जायचंय. ” मी म्हणालो.
“साहेब, अगदी एक नंबर शिवणार बघा. काळजीच नको. ” त्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी चमकलो. हा राजाराम तर नव्हे?
“राजाराम?” मी सरळ हाकच मारली.
हाकेसरशी त्याने वर बघितलं. तो राजारामच होता. माझ्याकडे त्याने दोन मिनिटं बघितलं आणि म्हणाला, “साहेब, तुम्ही ते अंधेरीचे इतिहास संशोधनवाले ना?”
मी हो म्हणालो. पठ्ठ्याच्या लक्षात होतं तर. मला बरं वाटलं.
एकमेकांना ओळखल्यावर साहजिकच आम्ही गप्पा मारु लागलो. बोलता बोलता तो म्हणाला, “आता मी कामासाठी पूर्वीसारखा फिरत नाही. हे खोपटं भाड्याने घेतलय. रोज इथे मी आणि मुलगा येतो, आणि काम करतो. माझ्या फिरण्यामुळे आणि चोख कामामुळे बरेचजण मला ओळखतात. ते फाटकी पुस्तकं, वह्या वगैरे इथे घेऊन येतात. माझा मुलगा ते शिवतो आणि मी चपला, बूट वगैरे शिवतो.”
मुलगा? मी चमकलो. माझ्या आठवणीप्रमाणे राजारामला मूलबाळ नव्हतं, मग हा मुलगा कुठून आला? माझ्या चेहऱ्यावरील प्रश्न ओळखून राजारामच पुढे म्हणाला,
“साहेब, माझा सख्खा मुलगा नाही. त्याचं काय झालं, सात आठ वर्षांपूर्वी एक दिवशी मी ठाण्याला स्टेशनवर उतरलो, तेव्हा पुलाखाली मला एक लहान पांगळा मुलगा दिसला. कुठल्या तरी भिकाऱ्याचा असावा. चेहऱ्यावरून उपाशी दिसत होता. मला त्याची दया आली म्हणून मी एक बिस्कीटचा पुडा घेऊन त्याला द्यायला गेलो, तेव्हा तो गुंगीत आहे असं लक्षात आलं. मी त्याच्या अंगाला हात लावून बघितलं, तर अंग चांगलंच गरम लागलं. सणकून ताप भरला होता. मग मी तसाच त्याला उचलला आणि स्टेशनजवळच्या एका ओळखीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून त्याला औषध दिलं. तोपर्यंत हे सगळं ठीक होतं. त्यानंतर आता ह्या मुलाचं काय करायचं हा विचार माझ्या मनात आला. पण मी धाडस करुन आणि काय होईल ते बघू असं ठरवून त्याला थेट माझ्या घरीच घेऊन गेलो. बायकोने आणि आईने त्या मुलाला बघून बरेच प्रश्न विचारले. मी त्यांना काय घडलं ते सविस्तर सांगितलं. आधी त्यांनी दुसऱ्याच्या अनोळखी मुलाला घरात घ्यायला काचकूच केलं. पण नंतर त्याची अवस्था बघून त्या तयार झाल्या. थोड्या दिवसांनी औषधांनी आणि चांगल्या खाण्यापिण्याने तो मुलगा बरा झाला. म्हणून मी त्याला, ‘परत होता तिथे सोडून येतो’ म्हणालो, पण तोपर्यंत त्या दोघींना त्याचा लळा लागला. त्यांनी नेऊ दिलं नाही. तसंही आम्हाला मूलबाळ नव्हतं आणि इतक्या दिवसात त्याची चौकशी करायला कुणीही आलं नव्हतं. हा अपंग मुलगा कुणाला तरी जड झाला असेल, म्हणून दिला असेल सोडून. दुसरं काय? राहू दे राहील तितके दिवस. माझ्या आईने त्याचं नाव किसन ठेवलं. आधी आम्हाला तो नुसता पांगळाच वाटला, पण नंतर त्याची जीभही जड आहे, हे लक्षात आलं. तो तोतरा बोलतो. पण ह्या दोन गोष्टी सोडल्या तर अगदी हुशार आहे. घरी मी पुस्तकं शिवायचं काम करायचो, तेव्हा माझ्या बाजूला बसून माझं काम तो लक्षपूर्वक बघायचा. तीन चार वर्षातच त्याने माझं काम आत्मसात केलं. आता तो लिहा वाचायला पण शिकतोय.
साहेब, आमचं हातावर पोट आहे. त्याला घरी ठेवला तर माझ्या बायकोला किंवा आईला त्याच्यासाठी घरी थांबायला लागतं, त्यांचा कामावर खाडा होतो. त्यात त्याच्या तोतरेपणामुळे आजूबाजूची मुलं त्याला चिडवून बेजार करतात, म्हणून मी त्याला पाठुंगळीला मारुन रोज इथे माझ्या मदतीला घेऊन येतो. ” एका दमात राजारामने सगळं कथन केलं.
“अरे पण आहे कुठे तो? मला तर दिसत नाही. ” सगळं ऐकून आणि आश्चर्यचकित होऊन मी म्हणालो.
“या, दाखवतो, ” असं म्हणून राजाराम मला त्याच्या दुकानाच्या मागच्या बाजूला घेऊन गेला.
तिथे कंपाऊंडची भिंत आणि राजारामचं दुकान याच्या मधल्या, प्लॅस्टिकचं छप्पर असलेल्या छोट्याश्या जागेत एक पांगळा मुलगा अगदी तन्मयतेने एक जुनं पुस्तक शिवत बसला होता. राजारामने उजेडासाठी तिथे एका बल्बची सोय केली होती. त्या मुलाच्या आजबाजूला काही फाटकी आणि काही शिवलेली वह्या, पुस्तकं होती. कामातली त्याची सफाई अगदी राजारामसारखीच वाटत होती. राजारामने त्याची आणि माझी ओळख करुन दिली. माझ्याकडे बघून त्याने हात जोडले व तो छान हसला. मला राजारामचं आणि त्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. त्याचबरोबर मला त्या मुलाची दयाही आली, म्हणून मी राजारामला विचारले,
“राजाराम, तू ह्याला मागे का बसवतोस? पुढे तुझ्या बाजूला बसव. तिथे उजेड चांगला आहे आणि जागाही मोठी आहे. ”
“साहेब, आधी त्याला मी पुढेच बसवायचो. पण नंतर लक्षात आलं, की लोकं एकाच ठिकाणी चपला आणि पुस्तकं शिवायला द्यायला बिचकतात. त्यातूनही काहींनी काम दिलं तर ते पैसे किसनच्या कामाकडे न बघता त्याच्या पांगळेपणाकडे बघून द्यायचे. ते मला आवडत नव्हतं. म्हणून मग मी त्याला मागे बसवायला लागलो. त्या अरुंद जागेची त्याला आता सवय झालीय. आता तो कुणाला दिसत नाही. त्यामुळे सगळेच प्रश्न सुटले. साहेब, तो त्याच्या पांगळ्या पायांवर कधीच उभा नाही राहिला तरी चालेल. पण आपल्या हिमतीवर उभा राहीला पाहिजे. कुणाच्या दयेवर नको. ” राजारामने स्पष्टीकरण दिलं.
राजारामच्या ह्या विचारांनी मी थक्क झालो. अश्या विचारांची माणसं आजच्या जगात खरंच दुर्मिळ आहेत.
राजारामचं आणि किसनचं पुन्हा एकदा कौतुक करुन, त्यांचा निरोप घेऊन मी निघणार, इतक्यात राजाराम म्हणाला,
“साहेब आणखी एक सांगू? आजवर आम्ही तिघांनी चपला, वह्या, पुस्तकं, गोधड्या, पिशव्या ह्या निर्जीव वस्तू खूप शिवल्या, त्यावर आमचं पोट भरलं. पण आता आम्ही ह्या पांगळ्या मुलाचं फाटलेलं आयुष्य शिवणार आणि अगदी एक नंबर शिवणार बघा. हे देवाने दिलेलं काम आहे, ते करायलाच पाहिजे. “
राजारामचं ते वाक्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं, आणि माझ्या मनातली त्याची प्रतिमा शतपटीने उंचावली.
– समाप्त –
लेखक : श्री राजेंद्र परांजपे
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
९८६०००६५९५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “गुजराण ते समृद्धी…” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“तुला काय हवंय -गुजराण, उपजीविका, चरितार्थ, सुखवस्तूपण, संपन्नता, वैभव की समृद्धी?“
— गेली १२ वर्षं हा प्रश्न मी विद्यार्थ्यांना विचारत आलो आहे. मी हा प्रश्न विचारला की, मुलंच काय पण पालकांचीही दांडी गुल होते.
१) अमुक व्यक्तीची कशीबशी गुजराण चालायची.
२) अमक्या व्यक्तीचा पडेल ते काम हाच काय तो उपजीविकेचा मार्ग होता.
३) दिवसभर काम करून जे काही पैसे मिळत त्यावरच त्याचा चरितार्थ चालायचा.
४) नोकरी चांगली असल्यामुळे खाऊन-पिऊन सुखी आहे.
५) घसघशीत पगारामुळे अमक्याच्या घरी संपन्नता आहे.
६) उत्तम करिअर झाल्यामुळे अमुक अमुक माणूस वैभवात राहतोय.
७)योग्य शिक्षण आणि कष्ट यांच्यामुळेच अमक्याच्या घरी समृद्धी नांदतेय.
ही वाक्यं आपण अनेकदा ऐकली असतील आणि वापरलीही असतील. पण या वाक्यांच्या मधून जो अर्थ ध्वनित होतो, त्याच्या खोलात जाण्याचे कष्ट आपण सहसा घेत नाही.
आपली मराठी भाषा तर इतकी समृद्ध आहे की, ‘आर्थिक परिस्थिती चांगली नाही’ या करितासुद्धा अठरा विश्वे दारिद्र्य, विपन्नावस्था, दरिद्रीनारायण, बेताची परिस्थिती, हातातोंडाची गाठ, कोंड्याचा मांडा करून खाणे, खिसा कायम फाटकाच, दोनवेळची चटणीभाकरी खाऊन राहणे असे अनेक शब्दप्रयोग वापरले जातात. पण शिक्षण, जीवन जगण्याचा मार्ग आणि हे शब्दप्रयोग यांचा फार घनिष्ठ संबंध आहे, असं माझं मत आहे.
“इंजिनिअर, डाॅक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, आर्किटेक्ट हेच पर्याय करिअर म्हणून का हवे आहेत?” असा बाॅल टाकला की, बहुतेकांचा कल हा आर्थिक परिस्थितीच्याच गणितांकडे झुकलेला दिसतो. पालक आणि मुलं दोघांनाही ‘पॅकेज’ या शब्दाची मोहिनी पडलेली आहे, हे स्पष्ट जाणवतं. पॅकेजचं हे मोहिनीअस्त्र फार फसवं आणि घातक असतं.
‘सायन्सला न जाणं म्हणजे महापापच आहे’ ह्या विचारसरणीची मुळं किती खोलवर गेली आहेत, हे जवळपास रोजच दिसत राहतं. काॅमर्स ला जाऊन सीए किंवा सीएस झाला नाही म्हणजे तो माणूस आयुष्यातच अपयशी आहे, असं माणसं अगदी सहजपणे बोलतात. शाळेतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातली संतवाणी सरळसरळ ऑप्शनला टाकून द्यायची आणि आर्ट्सच्या विषयांना काडीचाही स्कोप नाही, असं गावभर सांगत फिरायचं, असाही उद्योग अनेकजण करतात.
दहावी-बारावीच्या मुलांचं करिअर आणि त्यांच्या पालकांची मतं यांचा धांडोळा घेतला की, मला हत्ती आणि सात अंधांची गोष्ट आठवते. गोष्टीतले सातही जण पूर्ण अंध असतात. पण करिअरची निवड करण्याच्या बाबतीत फरक फक्त इतकाच आहे की, मुलं आणि त्यांचे पालक दोघंही विनाकारणच स्वत:च्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेऊन हत्तीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक पाहता, ह्या पट्ट्या डोळ्यांवर बांधून घेण्याची गरजच नाही. पण तरीही हे घडतंच. आपल्याला दृष्टी असूनही अंध करणाऱ्या ह्या पट्ट्या कुठल्या?
पहिली पट्टी म्हणजे अज्ञान..
काहीही माहिती नसतानासुद्धा केवळ कल्पनेच्या आधारावरच स्वत:ची पोकळ, भ्रामक मतं तयार करणारी आणि निर्णय घेणारी मुलं-पालक या वर्गात मोडतात. अज्ञानामुळे यांचे निर्णय चुकतात आणि करिअरमध्ये अपयश येतं.
दुसरी पट्टी म्हणजे अर्धवट माहिती..
ह्या प्रकारची मुलं-पालक माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. पण, सविस्तर आणि खरी माहिती घेत नाहीत. त्यामुळे, खरं जग त्यांना दिसतंच नाही.
तिसरी पट्टी म्हणजे धनाढ्यतेचा अतिलोभ.. पैसा आणि त्यातून मिळणारी सुबत्ता एवढाच काय तो विचार करून कोर्स निवडणारे मुलं-पालक ह्या वर्गातले. ह्यांच्या लेखी ‘सब से बडा रूपैय्या’ हेच एकमेव सत्य असतं. त्यामुळेच, ह्यांना जगात केवळ श्रीमंत माणसंच दिसतात आणि श्रीमंत माणसांचं राहणीमानच दिसतं. पण त्या मागचे कष्ट, मेहनत जाणून घेण्याचा प्रयत्नसुद्धा न करण्यामुळे करिअरविषयक निर्णय सपशेल फसतात आणि ह्यांचं नुकसान होतं.
चौथी पट्टी म्हणजे अंधानुकरण..
‘अमुक एकानं असं केलं आणि तो मोठा झाला म्हणून मीही तसंच करणार’ ही विचारसरणी केवळ धोकादायकच नाही तर मूर्खपणाची आहे. करिअरचा निर्णय घेताना अनुकरण आणि अंधानुकरण यांतला फरक न कळण्याएवढं कुणीच अपरिपक्व नसतं. पण तरीही स्पर्धेचं आणि स्टेटसचं भूत डोक्यात शिरलं की, विवेकबुद्धीचा पराजय होतोच.
पाचवी पट्टी म्हणजे स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे गैरसमज..
गैरसमज हे गैरच असले आणि अवास्तव असले तरीही ते निर्माण होणं थांबलेलं नाही. आपल्या लेखी एखादं क्षेत्र कमी महत्वाचं असू शकतं, पण याचा अर्थ ते खरोखरच तसंच आहे, असं नसतं. पुरणाच्या पोळ्या करून विकणं हे आपल्या लेखी लो प्रोफाईल असेल, पण वर्षाकाठी ५०₹ नग यानुसार दोन-दोन लाख पुरणपोळ्यांची विक्री करणाऱ्या उद्योजकांना लो प्रोफाईल कसं आणि कोणत्या आधारावर म्हणायचं? आपले गैरसमज आपलं प्रचंड नुकसान करत असतात, हे लोकांच्या लक्षातच येत नाही.
सहावी पट्टी म्हणजे दुराग्रह..
‘माझंच खरं’ ही धारणा यशस्वी करिअरच्या वाटेतला फार मोठा अडसर आहे. ‘सत्य काहीही असलं तरी मी मात्र बैलाचं दूध काढणारच’ या हट्टापायी चुकीचे निर्णय खरे करून दाखवण्याच्या नादात वेळ, पैसा, उमेद, कष्ट या सगळ्याच गोष्टी पणाला लावल्या जातात. हरल्यानंतर जो वनवास भोगावा लागतो त्याला अंत नसतो. योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन आणि व्यक्तीनं केलेलं योग्य मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी निरनिराळ्या असल्या तरी सारख्याच महत्त्वाच्या असतात.
गुजराण ते समृद्धी…
आधीचा घेतलेला निर्णय फसला किंवा चुकीचा ठरला हे कितीतरी आधी लक्षात येऊनसुद्धा जो वेळकाढूपणा होतो, तो अक्षम्य असतो. निर्णय घाईने घेणं जसं चूक तसंच त्यात नको तितका वेळ काढणंही चूकच.. !
अशा सात-सात पट्ट्या एकावर एक चढवून वावरायला लागल्यानंतर अपयशाशिवाय काय पदरात पडणार? अज्ञान, अर्धवट माहिती, धनाढ्यतेचा अतिलोभ, अंधानुकरण, स्वत:विषयीचे आणि जगाविषयीचे गैरसमज, दुराग्रह आणि आळस या सात पट्ट्या एक-एक करून उतरवायला सुरूवात केलीत की फरक दिसायला लागेल.
गुजराण, उपजीविका, चरितार्थ, सुखवस्तूपण, संपन्नता, वैभव आणि समृद्धी या सात अवस्थांमधला फरक करिअरची निवड करण्याआधीच समजून घेतला पाहिजे. डोळ्यांवरच्या सात पट्ट्या तशाच ठेवल्यात तर वरच्या चार अवस्था केवळ स्वप्नं पाहण्यापुरत्याच राहतील. आणि गुजराण, उपजीविका किंवा चरितार्थ एवढ्यापुरताच आपल्या आयुष्याचा आवाका मर्यादित राहील.
स्वत:करिता योग्य अभ्यासक्रम निवडला म्हणजे उत्तम करिअर झालंच, असं होत नाही. स्वत:मध्ये बदलही करावे लागतात. आतापासूनच स्वत:मधले दोष ओळखून त्यात सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू करा. जसजशा तुम्ही डोळ्यांवरच्या पट्ट्या उतरवत जाल तसतसा तुमचा ‘गुजराण ते समृद्धी’ हा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होत जाईल.
☆ “मृत्यूमुखातील ते पंधरा दिवस !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
त्यांना त्याच्यावर संशय होताच… पण त्यांच्या संशयाबाबतच ते काहीसे साशंक होते! कारण तो तर त्यांच्यासारखाच.. नखशिखांत अतिरेकी. भारतीय सैनिकांच्या रक्ताची तहान असलेला नवतरुण. त्याच्या भावाचा इंडियन आर्मीच्या गोळ्यांनी खात्मा झाला होता म्हणून त्याचा त्याला सूड उगवायचा होता. त्याच्याकडे हल्ल्याची संपूर्ण योजना कागदावर आणि डोक्यात अगदी तयार होती. कुणाचाही या योजनेवर विश्वास बसावा अशी ती योजना होती. भारतीय सैनिकांचा तळ नेमका कुठे आहे, तिथे एकावेळी किती सैनिक असतात, शस्त्रास्त्रे कोणती वापरली जातात… त्यांच्या गस्तीचे मार्ग कोणते इ. इ. सारी माहिती नकाशांसह अगदी अद्ययावत होती. फक्त योग्य वेळ साधून हल्ला चढवायचा अवकाश…. निदान त्यावेळे पुरती का होईना… भारतीय सेना हादरून जावी! पण या कामासाठी त्याला आणखी मदत हवी होती. म्हणून त्याने या दोघांना भेटण्याचा गेली दोन वर्षे प्रयत्न चालवला होता. शेकडो खब-यांच्या माध्यमातून या दोघांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला होता… आणि आता कुठे त्यात त्याला यश आले होते! हे दोघे होते पाकिस्तानी हिज्बुल मुजाहिदीन नावाच्या कुप्रसिद्ध अतिरेकी संघटनेचे कमांडर… अबू तोरारा आणि अबू सब्झार. या दोघांनी अनेक अतिरेकी कारवाया करून अनेकांचे बळी घेतले होते आणि शेकडो काश्मिरी तरुणांना अतिरेकाच्या मार्गावर ओढले होते. त्याची आणि या दोघांची भेट झाली आणि त्याच्या चेह-यावर एक निराळाच आनंद पसरला… मक्सद सामने था! त्यांना वाटले आणखी एक बळीचा बकरा गवसला.. याला तर भडकावण्याची गरज नाही… याच्या डोक्यात तर भारताविषयी पुरेपूर द्वेष भरलेला आहे आधीच. त्यांनी त्याचे स्वागत केले. तो त्यांच्यासमवेत डोंगरात, जंगलात लपून राहिला. भारतीय सैनिक आपला नेमका कुठे शोध घेत आहेत, हे त्याला पक्के ठाऊक होते. त्यांच्या हाती लागू नये, म्हणून त्याने या आपल्या नव्या दोस्तांना उत्तम मार्गदर्शनही केले. त्यामुळे तो त्यांच्या आणखी मर्जीत बसला.
इफ्तेखार… त्याच्या या नव्या नावाचा अर्थच मुळी होता महिमा! अर्थात कर्तृत्वातून प्राप्त होणारे महात्म्य.. मोठेपणा! हे नाव स्वीकारून त्याला फार तर आठ पंधरा दिवस झाले असतील नसतील… पण या अल्पावधीत त्याने त्याचे कुल, त्याचा देश आणि त्याच्या गणवेशात असणाऱ्या आणि येऊ पाहणाऱ्या लाखो लोकांच्या मनात कायम आदराचे स्थान मिळेल अशी कामगिरी केली. त्याचे पाळण्यातलं नाव मोहित… म्हणजे मन मोजणारा श्रीकृष्ण. तो होताच तसा राजस.. खेळकर आणि खोडकर.
खेळात प्रवीण आणि अभ्यासात हुशार. घराण्यात सैनिकी सेवेची तशी कोणतीही ठळक परंपरा नसताना या पोराने घरी सुतराम कल्पना न देता सैन्याधिकारी सेवेत प्रवेश करण्यासाठीचा अर्ज भरला.. परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. तोपर्यंत घरच्यांनी त्याला दिल्लीतून थेट महाराष्ट्रात श्री गजानन महाराजांच्या शेगाव नगरीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात धाडून दिले होते. वर्ष होते १९९५. सैन्याधिकारी पदासाठी होणार असलेल्या मुलाखतीचे पत्र त्याच्या घरच्यांच्या हाती पडले.. पण त्यांनी त्याला काहीही कळवलं नाही! पोराने सरळ आपलं इंजिनिअर व्हावं आणि आपली म्हातारपणाची काठी व्हावं असा त्यांचा उद्देश असावा. पण आपण परीक्षा तर दिली आहे.. उत्तीर्ण तर होणारच असा त्याला इतका विश्वास होता की त्याने थेट संबंधित कार्यालयात दूरध्वनी करून निकालाची माहिती मिळवली… भोपाळ येथे होणार असलेल्या मुलाखतीसाठी त्याला बोलावणं आलं होतं. श्री संत गजानन महाराज इंजीनियरिंग कॉलेजातून बेडविस्तर गुंडाळून साहेब थेट घरी आले. आणि तेथून भोपाळची रेल्वे पकडली. आपल्या आत्मविश्वासपूर्ण वागण्या बोलण्याने त्याने मुलाखतीत बाजी मारली. त्याला पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळाला होता… एक उमदा प्रशिक्षणार्थी सज्ज होता. एन. डी. ए. मधली कारकिर्द तर एकदम उत्तम झाली. घरी चिंटू असलेला मोहित इथे ‘माईक’ बनला! मोहित यांनी बॉक्सिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग मध्ये सर्वोत्कृष्ट पातळी गाठली. नर्मविनोदी स्वभाव आणि दिलदार असल्याने मोहित एन. डी. ए. मध्ये मित्रांचे लाडके बनले होते.
एन. डी. ए. दीक्षान्त समारंभात देशसेवेतील प्रथम पग पार करून मोहित शर्मा आपल्या अंतिम ध्येयाकडे निघाले. इंडियन मिलिटरी अकादमी मध्ये दाखल होताच मोहित यांनी आपले नेतृत्वगुण विकसित करायला आरंभ केला. त्यांना Battalion Cadet Adjutant हा सन्मान प्राप्त झाला. तत्कालीन राष्ट्रपती महामहीम श्री. के. आर. नारायनन साहेबांना भेटण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली होती. इथले प्रशिक्षण पूर्ण करून साहेब सेनेत दाखल झाले.
मोहित हे १९९९ मध्ये लेफ्टनंट मोहित शर्मा म्हणून हैदराबाद येथील ५, मद्रास मध्ये दाखल झाले. येथील कार्यकाळ यशस्वी झाल्यानंतर मोहित साहेब पुढे ३३, राष्ट्रीय रायफल्स मध्ये कर्तव्यावर गेले. तेथेही त्यांनी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडशन अर्थात सेनाप्रमुखांचे प्रशस्तीपत्र पटकावले… एक उत्तम अधिकारी आकार घेत होता!
अतिरेकी विरोधी मोहिमेत त्यांना स्पेशल फोर्सेस सोबत काम करायची संधी मिळाली आणि ते त्या कामावर मोहित झाले… तिथे प्रत्यक्ष कारवाई करण्याची जास्त संधी होती… त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्पेशल फोर्सेस मध्ये प्रवेश मिळवून अतिशय आव्हानात्मक Para Commando पात्रता प्राप्त केली. वर्ष २००४ उजाडले. काश्मीर खो-यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आता समोरासमोरची लढाई उपयोगाची नव्हती… गनिमी कावा करावा लागणार होता. यासाठी सेनेने मोहित यांना पसंती दिली. मोहित साहेबांनी दाढी, केस वाढवले. काश्मिरी, हिंदी भाषा तर त्यांना अवगत होत्याच. अतिरेक्यांची बोलीभाषा त्यांनी आत्मसात केली. खब-यांचे जाळे विणले गेले. अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत यांनी त्या दोघांचा अर्थात तोरारा आणि सब्झारचा माग काढलाच… आणि मेजर मोहित शर्मा भूमिगत होऊन इफ्तेखार भट बनून अतिरेक्यांच्या गोटात सामील झाले… कुणाला संशय येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होतीच… पण जीव मात्र धोक्यात होता…. किंचित जरी संशय आला असता तर गाठ मृत्यूशी होती. अबू तोरारा आणि अबू सब्झार यांनी या त्यांच्या नव्या शिष्याची इफ्तेखार बट ची योजना समजावून घेतली आणि तयारीसाठी ते तिघे भारत-पाक ताबा रेषेच्या पार, पाकिस्तानात गेले. तिथून सारी सूत्र हलवायची होती. त्यादिवशीची सायंकाळ झाली आणि काहवा (काश्मिरी चहा) पिण्याची वेळसुद्धा. इफ्तेखार त्यांच्यात ज्युनिअर. त्यानेच चहा बनवणे अपेक्षित असल्याने त्याने तीन कप कहावा बनवला आणि ते तीन कप घेऊन तो या दोघांच्या समोर गेला. थंडी मरणाची असल्याने इफ्तेखारने अंगभर शाल लपेटली होती. अबू तोरारा याने इफ्तेखारकडे रोखून पाहिले… भारतीय सेनेची इतकी सविस्तर माहिती याला आहे यात त्याला काहीतरी काळेबेरे वाटत होते… त्याने थेट विचारले… तुम कौन हो असल में? हा एकच प्रश्न जीवन आणि मरणाची सीमारेषा ओलांडणार होता.. इफ्तेखारणे तोराराच्या डोळ्याला थेट नजर भिडवली… कितनी बार बताना पडेगा? अगर यकीन न होता हो तो उठा लो अपनी रायफल और मुझे खतम कर दो! असं म्हणत त्याने त्याच्या खांद्यावर लटकवलेली एके ४७ खाली आपटली. या त्याच्या बेबाक उत्तरावर ते दोघेही सटपटले! आपला संशय खोटा निघाला आणि या गड्याला राग आला तर एवढी मोठी मोहीम रद्द करावी लागेल.. पाकिस्तानी मालक नाराज होतील, अशी भीती त्यांना वाटणे साहजिकच होते! त्या दोघांनी कहावा चे कप उचलले आणि ते मागे वळण्याच्या बेतात असताना काहीसे बेसावध होते.. त्यांच्या खांद्यांवर एके ४७ होत्याच…. त्या खाली घेऊन झाडायला त्यांना काही सेकंद लागले असतेच… ही संधी गमवाली तर पुन्हा कधी मिळेल ते सांगता येणार नाही… इफ्तेखार याने विचार केला…. क्षणार्धात आपल्या शालीखाली कमरेला लावलेले पिस्टल बाहेर काढले… ते आधीच लोड होते… आणि para commando चे प्रशिक्षण प्रत्यक्ष व्यवहारात वापरून दाखवले… दोन गोळ्या छाताडात आणि एक डोक्यात.. अचूक. काही सेकंदात दोन अतिशय खतरनाक अतिरेकी त्यांच्या शेवटच्या प्रवासाला निघून गेले! इफ्तेखार निवांतपणे तिथल्या बाजेवर बसले… कहावा संपवला. आणि रात्र होण्याची वाट पाहू लागले… त्यांनी भारतीय सेनेच्या इतिहासातील एक आगळेवेगळे अभियान यशस्वी पार पाडले होते! रात्रीच्या अंधारात हे इफ्तेकार भारतीय सीमेमध्ये सुखरूप परतले. या त्यांच्या अजोड कामगिरीबद्दल सेनेने त्यांचा विशेष सन्मान केला. दोन मोठे अतिरेकी गमावल्यावर आणि ते अशा रीतीने गमावल्यावर पाकिस्तानी हिजबुल मुजाहिदीन पुरते हादरून गेले होते… यह इंडियन आर्मी है! ही घोषणा त्यांच्या कानांमध्ये खूप दिवस घुमत राहिली. आणि इकडे अवघ्या भारतीय सेनेते आनंदाची एक लाट पसरली होती. मेजर मोहित शर्मा यांची ही कामगिरी न भूतो अशीच होती. मोहित साहेबांना यासाठी सेना मेडल देण्यात आले.
ते जेंव्हा सुट्टीवर घरी पोहोचले तेंव्हा रेल्वे स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला आलेले त्यांचे बंधू आणि आई-वडील त्यांना ओळखू शकले नव्हते… एवढा एखाद्या अतिरेक्यासारखा त्यांचा शारीरिक अवतार झाला होता!
पुढे त्यांची बदली बेळगावच्या आर्मी कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये कमांडो इंन्स्ट्रक्टर म्हणून झाली… एवढ्या कमी सेवाकाळात या पदावर पोहोचणे एक मोठी बाब होती. दरम्यानच्या काळात रीशिमा यांचेशी मोहित विवाहबद्ध झाले. रीशिमा त्या वेळी आर्मी सप्लाय कोअर मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे वडील, भाऊ हे सैन्यात आहेत.
२००८ मध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोके वर काढले. एकावेळी सुमारे दहा अतिरेकी भारतात घुसल्याची खबर आपल्या सुरक्षा दलांना मिळाली. त्यांच्याविरोधात तातडीने ऑपरेशन हाती घेणे गरजेचे होते. अशावेळी अनुभवी अधिका-याची आवश्यकता ओळखून सैन्याने मेजर मोहित साहेबांना काश्मिरात बोलावणे धाडले. प्रत्यक्ष रणभूमीवर मोहित साहेब जास्त रमत असत. त्यांच्यासाठी ही तर एक चांगली बातमी होती. सेनेची योजना आकार घेत होती. मोहित साहेबांच्या पुतणीचा वाढदिवस आणि अशाच काही कारणासाठी साहेबांना घरी जाण्यासाठी रजा मंजुर झाली होती. पण त्याच वेळी त्यांच्या एका कनिष्ठ अधिका-याच्या भावाचा अपघाती मृत्यू ओढवला. पण मोहीम अगदी तातडीने हाती घेण्याची वेळ असल्याने त्या कनिष्ठ अधिका-याची रजा मंजूर होण्यात समस्या आली. ही बाबत मेजर मोहित यांना समजताच त्यांनी स्वत:ची रजा रद्द करून त्या कनिष्ठ अधिका-यास रजा मिळेल अशी तजवीज केली आणि स्वत: मोहिमेवर निघाले.
उत्तर काश्मीर खो-यातील कुपवारा सेक्टरमधील हापरुडा जंगलात दहा अतिरेकी टिपायचे आहेत… कामगिरी ठरली… मेजर साहेबांनी आपली सैन्य तुकडी सज्ज केली. योजना आखून त्या सैनिकांची वेगवेगळ्या तुकड्यांत विभागणी केली आणि स्वत: नेतृत्व करीत रात्रीच्या अंधारात ते त्या जंगलात शिरले. अतिरेकी मोक्याच्या जागा धरून लपून बसले होते. तरीही मेजर साहेब पुढे घुसले… रात्रीचे बारा वाजले असावेत. त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. अतिरेकी शस्त्रसज्ज होते. साहेबांसोबतचे चार कमांडो गंभीर जखमी झाले. साहेबांनी गोळीबार अंगावर झेलत दोन जखमी सैनिकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यांनी हातगोळे फेकत आणि अचूक गोळीबार करीत दोन अतिरेक्यांना यमसदनी धाडले. परंतू अतिरेक्यांच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराचा वेध घेतला होता. पण मेजर साहेबांनी जखमांकडे साफ दुर्लक्ष केले आणि ते अतिरेक्यांच्यावर चालून गेले. उरलेले आठ अतिरेकी गोळीबार करीत होतेच… साहेबांनी त्यांना सामोरे जात त्यांच्यावर हल्ला चढवला… साहेबांच्या शरीरावर बुलेट प्रुफ jacket होते, परंतू हे jacket फक्त पुढून आणि मागून सुरक्षितता देते… त्याच्या बाजूच्या भागांतून गोळ्या आत शिरल्याने ते जबर जखमी झाले होते. पण त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला… आपल्या इतर साथीदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी आपली जागा सोडली नाही. एक जवान rocket डागण्याच्या तयारीत असताना त्याच्या हाताला गोळी लागल्याने त्याचा हात निकामी झाला. मोहित साहेबांनी कवर फायर घेत तिथपर्यंत पोहोचून ते rocket फायर केले. त्यामुळे अतिरेकी पुढे येऊ शकले नाहीत. यात खूप वेळ गेला… छातीत गोळ्या घुसलेल्या असतानाही साहेबांनी आणखी अतिरेक्यांचा खात्मा केला… आणि मगच देह ठेवला. त्यांच्यासोबत हवालदार संजय भाकरे (1 PARA SF, SM), हवालदार संजय सिंग (1 PARA SF, SM),
हवालदार अनिल कुमार (1 PARA SF, SM), पॅराट्रूपर शबीर अहमद मलिक (1 PARA SF, KC) आणि पॅराट्रूपर नटेर सिंग (1 PARA SF, SM) हे देशाच्या कामी आले. या मोहिमेत अतिरेक्यांकडून 17 असॉल्ट रायफल, 4 अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचर, 13 एके मॅगझिन, 207 AK ammunition, 19 UBGL ग्रेनेड, 2 ग्रेनेड, 2 ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, 1 थुराया रेडिओ सेट आणि भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या… यावरून अतिरेकी किती तयारीने आले होते, हे समजू शकते!
मेजर मोहित शर्मा यांच्या असीम पराक्रमासाठी देशाने त्यांना शांतता काळातील सर्वोच्च सैन्य पुरस्कार, अशोक चक्र (मरणोत्तर) प्रदान केले. त्यांच्या पत्नी, ज्या आता मेजर पदी आहेत, त्यांनी २६ जानेवारी, २०१० रोजी तत्कालीन राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अशोक पुरस्कार स्वीकारला. मेजर मोहित यांच्या भावाची मुलगी, अनन्या मधुर शर्मा त्यांचे बलिदान झाले तेंव्हा एक दोन वर्षांची होती. तिने त्यांच्यापासून पुढे प्रेरणा घेत एन. डी. ए. मध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळवले. मेजर साहेबांचे वडील राजेंद्रप्रसाद आणि मातोश्री सुशीला शर्मा यांना त्यांच्या लेकाचा खूप अभिमान वाटतो. दिल्लीतील राजेन्द्रनगर मेट्रो स्टेशनला मेजर मोहित शर्मा यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. २१ मार्च हा त्यांचा बलिदान दिवस. त्यानिमित्त ह्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न.
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष— सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “खोज रहा सुख को दर-दर है…” ।)
☆ तन्मय साहित्य #276 ☆
☆ खोज रहा सुख को दर-दर है… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “जाएँ तो कहाँ?” ।)
जय प्रकाश के नवगीत # 100 ☆ जाएँ तो कहाँ? ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆