☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… पंढरीचे वर्णन – भाग – २८ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
पंढरीचे वर्णन
भूतलावरील वैकुंठ, पंढरपूर या श्रीक्षेत्राचे वर्णन आणि महात्म्य सांगणाऱ्या गाथेतील अभंगांचे आपले विवेचन चालू आहे. आज आणखी काही अभंग पाहूया.
पंढरपूर कसे आहे, तेथे काय काय चालते याचे वर्णन करणारा हा एक फार सुंदर अभंग पहा.
जववरी नाही देखिली पंढरी/
वर्णीशील थोऱी वैकुंठीची//
मोक्ष सिद्धी तेथे हिंडे दारोदारी/
होऊनी कामारी दीनरूप//
वृंदावन सडे चौक रंगमाळा/
अभिनव सोहळा घरोघरी//
नामघोष कथा पुराण कीर्तनी/
ओवीया कांडणी पांडुरंग//
सर्व सुख असे तेथे सर्वकाळ/
ब्रह्म ते केवळ नांदतसे//
तुका म्हणे जे न साधे सायासे/
प्रत्यक्ष ते दिसे विटेवरी//
तुकाराम महाराज भक्ताला सांगतात, ” जोपर्यंत तू पंढरपूर पाहिले नाहीस, तोपर्यंत तू वैकुंठाची थोरवी वर्णन करशील. या पंढरपुरात सिद्धी आणि मोक्ष सांगकामे(कामारी) होऊन दारोदार दीनपणे हिंडत असतात. अर्थात ज्याचे पाय पंढरपुरास लागतात, त्याला मोक्षप्राप्ती नक्की होते. इथे घरोघरी तुळशी वृंदावने आहेत, रस्ते झाडून जागोजागी सडासंमार्जन आणि रांगोळ्या घातलेल्या दिसतात. घरोघरी अभिनव सोहळे चालू आहेत. कथा, पुराणे, कीर्तने, नामघोष होत आहेत. दळण- कांडण करताना स्त्रिया पांडुरंगाला आळवून ओव्या गात आहेत. या इथे सर्वकाळ सर्व सुखे असून मूर्तीमंत ब्रह्माचा वास आहे. मोठ्या कष्टाने जे प्राप्त होऊ शकत नाही, ते ब्रह्म या ठिकाणी प्रत्यक्ष विटेवर उभे आहे.
होय होय वारकरी/ पाहे पाहे रे पंढरी//
काय करावी साधने/ फळ अवघेची येणे//
अभिमान नुरे/ कोड अवघेची पुरे//
तुका म्हणे डोळा/ विठोबा बैसला सावळा//
पुढे महाराज भक्तांना सांगतात की, वारकऱ्यांनो पंढरीचे दर्शन घ्या. बाकीच्या साधनांची काही जरुरी नाही. सर्व फळ या पंढरपुरातच मिळते. अभिमान राहत नाही.
(या ठिकाणी अभिमानाचा अर्थ देहाभिमान असा आहे) सर्व मनोकामना पूर्ण होतात. डोळ्यामध्ये सावळ्या विठ्ठलाचे रूप भरून राहते, त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो.
पंढरीसी जाये/ तो विसरे बाप माय//
अवघा होय पांडुरंग/ राहे धरुनिया अंग//
नलगे धन मान/ देह भावे उदासीन//
तुका म्हणे मळ/ नाशी तात्काळ ते स्थळ//
यासाठी वारकऱ्यांनो पंढरपुरी जा, तेथील पांडुरंगाचे दर्शन घेतल्यावर तुम्ही तुमचे मायबाप विसराल. याचाच अर्थ असा तुम्हाला प्रापंचिक आसक्ती राहणार नाही. तुम्ही स्वतःच पांडुरंग रुपी व्हाल आणि त्याच स्थितीत राहाल. कसलाच अभिमान न राहता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. धनद्रव्य, मानसन्मान याची इच्छा तुमच्या ठिकाणी राहणार नाही, कारण देहाविषयी तुम्ही उदास व्हाल. पंढरपूर हे क्षेत्र त्रिगुणरूपी मळाचा विनाश करणारे आहे.
पंढरीचा महिमा कसा अगाध आहे, याचे वर्णन तुकाराम महाराज या खालील अभंगात करतात.
पंढरीस दुःख न मिळे ओखदा/
प्रेम सुख सदा सर्वकाळ//
पंढरपुरात निरंतर पांडुरंगाचे प्रेम सुख असल्यामुळे दुःख औषधालाही (ओखदा) मिळत नाही.
पुंडलिके हाट भरियेली पेठ/
अवघे वैकुंठ आणियेले//
पंढरपुरीची पेठ भक्त पुंडलिकाने वसविली असल्यामुळे त्याने तेथे संपूर्ण वैकुंठ आणले आहे.
उदीमासी तुटी नाही कोणा हाणी/
घेउनिया धणी लाभ घेती//
या ठिकाणी व्यापार-उदीमात खोट कधीच येत नाही. नुकसान जराही नसून फायदाच फायदा आहे.
पुरले देशाशी भरले सिगेसी/
अवघी पंचक्रोशी दुमदुमित//
या पेठेत विठ्ठल हाच माल आहे. देशाला पुरेल एवढा माल शिगोशीग भरला आहे. पंढरीची पंचक्रोशी अशी या मालाने दुमदुमून गेली आहे.
तुका म्हणे संता लागलीसे धणी/
बैसले राहोनी पंढरीस//
सर्व संतांना येथे फार तृप्ती, समाधान लाभले आहे. कारण विठू माऊली त्यांना भेटली आहे, म्हणून ते पंढरीतच वास करून राहिले आहेत.
सुरवर येती तीर्थे नित्य काळ/
पेठ त्या निर्मळ चंद्रभागा//
साक्षभूत नव्हे सांगितली मात/
महिमा अत्यद्भूत वर्णवेना//
पंचक्रोशीमाजि रीघ नाही दोषा/
जळती आपैसा अघोर ते//
निर्विषय नर चतुर्भुज नारी/
अवघा घरोघरी ब्रह्मानंदू//
तुका म्हणे ज्यापे नाही पुण्यलेश/
जारे पंढरीस घेई कोटी//
चंद्रभागारुपी ही पेठ अतिशय शुद्ध आहे म्हणून इथे देवही येतात आणि सारी तीर्थेही येतात. ही गोष्ट नुसती ऐकीव नाही किंवा सांगोवांगी नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेली आहे असे तुकाराम सांगत आहेत. या पेठेचा अद्भुत महिमा वर्णन करण्यास शब्द नाहीत.
या पंचक्रोशी मध्ये कोणत्याही दोषांना प्रवेश नाही. संचितात जे काही मोठे दोष असतील ते येथे आपोआप गळून जातात. या ठिकाणी स्त्रिया- पुरुष चतुर्भुज निर्विषय देवाप्रमाणे विषयहीन आहेत. त्यांच्या काम- वासना जळून गेल्या आहेत. घरोघरी ब्रह्मानंद आहे. ज्यांच्यापाशी पुण्याचा लवलेश नाही, त्यांनी पंढरीस जाऊन लागेल तेवढे पुण्य प्राप्त करून घ्यावे.
या अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?
अवघीच तीर्थे घडली एक वेळा/
चंद्रभागा डोळा देखिलिया//
अवघीच पापे गेली दिगंतरी/
वैकुंठ पंढरी देखिलिया//
अवघिया संता एक वेळा भेटी/
पुंडलिक दृष्टी देखिलिया//
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक/
विठ्ठलची एक देखिलिया//
ज्याने चंद्रभागेचे दर्शन घेतले, त्याला सकल तीर्थांचे स्नान घडले. एवढे हे दर्शन पुण्यकारक आहे. भूतलीचे हे वैकुंठ, पंढरपूर पाहिले असता सर्व पातके नाहीशी होतात, दिगंतरात जातात. एका पुंडलिकाचे दर्शन घेतले की सर्व संतांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि एका विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आपण जन्माला आल्याचे सार्थक होते.
असा आहे हा पंढरीचा महिमा. चला तर मग पंढरीसी जाऊ /विठू माऊलीला/
देणगीलंच ब्रेकनंतरच्या सुस्तावलेल्या वेळेत ऑफिसचा लँडलाईन वाजायला लागला… कुणीच जागचं हललं नाही म्हणून मग नाईलाजानं फोन घेतला.
“नमस्कार!! ”_
“हॅलो, xxx xxx सामाजिक संस्थेत फोन लागलाय का? ”
“हो, बोला… काय काम होतं? ”
“संस्थेला देणगी द्यायचीय. कुणी घरी येऊ शकेल का?”
“सर, तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. डिटेल्स पाठवतो.”
“अहो, मी म्हातारा माणूसयं. ऑनलाइन-फिनलाईन काही समजत नाही. घरी येत असाल तर देतो, नाहीतर सोडून द्या…”
“ओके, सर… मी स्वतः येतो. पत्ता सांगा…”
दुपारी चार वाजता दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बेल वाजवल्यावर दोन दारांपैकी एक उघडलं. ओळख सांगितल्यावर आजोबांनी दुसरं लोखंडी दार उघडून घरात घेतलं.
“बसा… माफ करा तुम्हांला त्रास झाला. ” पाण्याचा ग्लास पुढं करत आजोबा म्हणाले.
“असं काही नाही. इट्स ओके. आमचं कामच आहे. तुम्ही मदत करताय हे महत्त्वाचं!”
“संस्थेच्या कामाविषयी थोडी माहिती देता येईल का?”
“अवश्य…” मी माहिती सांगायला सुरुवात केल्यावर आजोबांचे प्रश्न सुरू झाले… पुढचा अर्धा-पाऊण तास यातच गेला. आजोबांचं समाधान झाल्यासारखं वाटलं. तोपर्यंत चहा आला.
“तुमच्या कार्यात खारीचा वाटा म्हणून आजपासून दर महिन्याच्या याच तारखेला देणगी द्यायचीय. एकच विनंती की इथं येऊन चेक घ्यावा लागेल. ”
रेग्युलर डोनेशन मिळणार म्हणून खूश झालो.
“काळजी नको. दरवेळेला मीच येईन. प्रॉमिस” चेक हातात घेत म्हणालो.
नवीन डोनर आणला म्हणून ऑफीसात आपला भाव वाढणार. कौतुक होणार, अशा कल्पनेच्या भराऱ्या मारणारं माझं विमान चेकवरची रक्कम पाहून धाडकन जमिनीवर येऊन पंक्चर झालेला टायरसारखा चेहरा झाला… आजोबांनी फक्त अकरा रुपयाचा चेक दिला होता! खूप चिडचिड झाली तरी नॉर्मल रहायचा प्रयत्न करत होतो.
“देणगीची पावती?” आजोबांनी विचारलं.
“पोस्टानं पाठवतो. ”
“कशाला उगीच खर्च करता? पुढच्या महिन्यात चेक न्यायला याल तेव्हा दिली तरी चालेल. तुमचा मोबाईल नंबर द्या. दर महिन्याला आठवणीसाठी फोन करेन.”
इच्छा नसताना मी मान डोलावली. पंधरा किलोमीटर अंतर तुडवत आलो. तासभर तोंड वाजवलं आणि हातात काय पडलं तर अकरा रुपये! मनात विचित्र असं फिलिंग होतं. निघताना आजोबांनी तोंडभर हसून निरोप दिला.
पुन्हा तासभर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोचलो. झालेला प्रकार कळल्यावर सगळे खो खो हसायला लागले. त्यानंतर दोन दिवस ‘माझं डोनेशन’ हा ऑफिसमध्ये चर्चेचा विषय होता. त्यावरून चिडवाचिडवी सुरू होती. प्रत्येकी अकरा रुपये काढून चहा-बिस्किटची पार्टी झाली. नंतर कामाच्या गडबडीत डोनेशनचा विषय मागे पडला. सगळे आपापल्या कामात गुंतलो.
काही दिवसानंतर कामात असताना मोबाईल वाजला… अनोळखी नंबर पाहून दुर्लक्ष केलं पण त्याच नंबरवरुन पुन्हा पुन्हा कॉल येत होता म्हणून फोन रिसिव्ह केला.
“मी xxx xxxx बोलतोय. ओळखलं का? मागच्या महिन्यात देणगीसाठी आला होतात.”
“हं, बोला आजोबा…” तुटकपणे म्हणालो.
“आपलं बोलणं झाल्याप्रमाणं आठवणीसाठी फोन केलाय… उद्या चेक घ्यायला आलात तर बरं होईल.”
दुसऱ्या दिवशी तीच परवड सहन करत अकरा रुपयांचा चेक घेऊन आलो. पुन्हा ऑफिसमध्ये मनोरंजनाचा भाग झालो. प्रत्येक महिन्याला हा प्रकार सुरू झाला. आजोबांचा फोन आला की जाऊन अकरा रुपयांचा चेक आणायचा, हे नवीन रुटीन झालं. नंतर नंतर तर चेक न बघताच बॅगेत ठेवायला लागलो.
आठ महिने हाच प्रकार चालू होता. ऑफिसमधल्यांनी जाऊ नको सांगितलं. खूपदा वाटलं की आजोबांना स्पष्ट सांगावं की परवडत नाही, परंतु स्वतःला आवरलं, कारण सामाजिक कामात डोनेशनचा एक रूपयासुद्धा अमूल्य असतो.
मोठी रक्कम देत नसले, तरी आजोबांचा संस्थेवरचा विश्वास बहुमोलाचा होता. म्हणूनच कितीही त्रास झाला तरी महिन्यातून एकदा होणारी भेट चुकवायची नाही हे मनाशी पक्कं केलं. चिडचिड कमी झाली. दर महिन्याला होणाऱ्या भेटीत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना आजोबांशी छान स्नेह जुळला.
—*—
ऑक्टोबर महिना… धो धो पाऊस पडत होता. आजोबांचा चेकसाठी फोन आल्यावर घरी गेलो.
थोडंफार बोलणं झाल्यावर आजोबांनी चेक दिला. न पाहता बॅगेत ठेवून मागच्या देणगीची पावती दिली. पुन्हा पावसात गाडी दामटत ऑफिसला आलो. अकाऊंटला चेक देऊन लॅपटॉपवर काम करत बसलो. तितक्यात मित्र धावत आला…
“मित्रा, अभिनंदन, पार्टी पाहिजे! ”
“कशाबद्दल? ”
“जसं की तुला माहीतच नाही! ”
आमचं बोलणं ऐकून बाकीचे टेबलाभोवती जमा झाले.
“काय आणि कशाबद्दल बोलतोयेस. काही कळत नाही. जरा नीट सांग. ”
“म्हणजे आजोबांनी दिलेला चेक बघितला नाहीस? ”
“त्यात काय बघायचंय. सगळं तर माहितेय. ”
“धन्य आहे तुझी… हे बघ! ”
चेक हातात घेतला आणि डोळेच विस्फारले… आश्चर्याचा प्रचंड मोठा धक्का बसला. चेकवर रक्कम होती अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये!
सगळ्यांनी मोठा जल्लोष केला. जो तो माझं अभिनंदन करत होता. मी फक्त चेककडे एकटक पाहत होतो. अनपेक्षितपणे भला मोठा आनंद मिळतो तेव्हा शब्द मुके होतात. माझीही अवस्था तशीच झालेली. खूप भावुक झालो. टचकन डोळ्यात पाणी आलं. ताबडतोब आजोबांना फोन केला पण उचलला नाही म्हणून डायरेक्ट घरी गेलो.
“तुम्हांला खूप छळलं. माझ्याविषयी आलेला राग कधी दाखवला नाहीत. इतरांपेक्षा वेगळे आहात. ”
“थॅंक्यू! ”
“मोठी देणगी द्यायचीच होती, पण कुणावरही पटकन भरवसा ठेवता येत नाही. खरं काम करणारे कोण अन् नुसता देखावा करणारे कोण, हे ओळखणं फार अवघड झालंय! आजकाल प्रत्यक्ष कामापेक्षा चकाचक प्रेझेंटेशन करून डोनेशन मिळवायचं हा नवीन ट्रेंड आलाय. ”
“शंभर टक्के बरोबरयं. यात प्रामाणिकपणे काम करणारे बाजूला पडतात. ”
“पण चांगलं काम कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करता येत नाही. गरजेच्या वेळी तळमळीनं काम करणारेच उपयोगाला येतात. ”
“मनातलं बोललात.”
“सामाजिक काम अजिबात सोप्पं नाहीये. गरीब, गरजूसाठी काम करताना स्वभावात लवचिकपणा आणि प्रचंड संयम असावा लागतो. तो तुमच्याकडे आहे. तो तपासण्यासाठी परीक्षा घेतली, त्यात पहिल्या नंबरनं पास झालात. म्हणून हे बक्षीस. शाबास! ”
आजोबांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं. फक्त “थँक्यू, थॅंक्यु” म्हणत राहिलो.
निरोप घेताना पुन्हा एकदा आजोबांना नमस्कार केला.
“खूप खूप आशीर्वाद! असंच छान काम करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो…!! आणि हो, दर महिन्याला नेहमीचा चेक घ्यायला यायचं… ती प्रथा बंद करायची नाही.” अकरा रुपयाचा अजून एक चेक पुढे करत आजोबा मिश्किलपणे हसले.
चाळीस – पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यात लक्ष्मी क्रीडा मंदिरात, एका पावसाळ्यातल्या शनिवारी रात्री ९ वा. पंडित भीमसेन जोशींचा “पावसाळी राग”हा गायनाचा कार्यक्रम ठरविला होता. प्रवेश मूल्य रु ३/-फक्त!
शुक्रवार सकाळपर्यंत केवळ बावीस तेवीस प्रवेशिका विकल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात आपण सपाटून मार खाणार याचा अंदाज ठेकेदाराला आला. त्याने दुपारीच आण्णांचे घर गाठले. मी त्याच्याबरोबर होतो. आण्णांच्या अंगात ताप होता. गाणं होईल की नाही अशी शंकाच होती. ठेकेदाराने त्यांना रडून परिस्थिती सांगितली. “गाऊ शकाल का उद्या? ” विचारले. मानधन कमी करण्याची विनंती केली. त्यावर आण्णा म्हणाले, ” हो रे हो, नक्की गाईन आणि ते मानधनाचे नंतर बघू आपण. आधी गाणे तर ठरल्याप्रमाणे होऊ दे. “
शनिवारी संध्याकाळपर्यंत काही तिकीट विक्री झाली.
कार्यक्रम रात्री ९चा. पंडितजींना घ्यायला मी त्यांच्या घरी रात्री आठ वा. पोहोचलो. ते जेवायला बसतच होते. घरात जाताच ते म्हणाले, “बसा. दोन घास जेवून घेतो. म्हणे रात्री xxxxx मोकळा. “
पावणे नऊ वा. त्यांना घेऊन हॉलवर आलो. तिकीट विक्रीच्या टेबलाभोवती काही रसिक उभे दिसले. आत गेलो. साथिदार आधीच येवून बसलेले. वाद्ये लावायला आरंभ केला. पेटीवाल्याने सूर दिला. पंडितजींनी एकेक तंबोरा लावायला सुरवात केली. बाहेर हॉलमधे रसिक जमायला लागले. पंडितजींच्या अंगात कणकण होतीच. साडेनऊ वाजले.
पंडितजी खांद्यावर शाल पांघरून स्वरमंचावर अवतरले. रसिकांना अभिवादन करून बसले. पुन्हा एकदा वाद्ये लावण्याचे सोपस्कार झाले. श्रोतेही जमायला लागले. चित्र बदलत होते.
आण्णांनी आपला धीर गंभीर आवाज लावला आणि काय, सगळा आसमंत क्षणात त्यांच्या भारदसत, गंभीर षड्जाने भरून गेला! बुवांनी मिया मल्हार गयला आरंभ केला.
पंडितजींनी अंगावरची शाल मांडीवर आंथरली. आणि पुढे रात्री अडीच पर्यंत असे काय गायले की बस्. श्रोते ते गाणं अवाक् होऊन ऐकत होते. एक एक रचना रंगत होती.
रामदासी मल्हार नंतर बुवांनी श्रोत्यांना विचारले, ” आता पुरे ना? अडीच वाजले आहेत रात्रीचे” ते पुणेरी रसिक. नाही कशाला म्हणतायत. पुन्हा एक छोटीशी रचना गाऊन पंडितजींनी गाणे थांबविले. ती बैठक भैरवी शिवाय संपली!
फक्त मल्हार आणि मल्हारचे विविध प्रकार संपन्न हाले आणि श्रोते अक्षरशः त्या सुरांच्या वर्षाधारात नखशिकांत नाहून निघाले. पंडितजींचे सर्वांग घामाने डबडबले होते, घामच्या धारा अंगांगातून निथळत होत्या!
श्रोते निघून गेले. स्वरमंच आणि प्रेक्षागार सुने सुने झाले.
आता व्यवहारपूर्तीचा क्षण आला. ठेकेदार द्रव्याचे पाकीट आणि नारळ घेऊन उभा ठाकला. पंडितजींच्या हातात मानधनाचे पाकीट ठेऊन त्याने बुवांना खाली वाकून नमस्कार केला. बुवा त्याला खांद्याला धरून उठवीत म्हणाले, “पाकीट तेवढेच आहे ना रे? जीव ओतून गायलोय आज. ” तू समजत होतास तसे काही झाले नाही. पुणेकरांनी गर्दीच केली होती नेहमीप्रमाणे”.
ठेकेदार काय बोलणार! त्यानेही समजून दोन नोटा अधिकच ठेवल्या होत्या मानधनाच्या पाकिटात.
चक्क पूर्ण २२००/- रुपये
– – खरं सांगू, केवळ पुण्यात वास्तव्य असल्यामुळे पं. भीमसेन, वसंतराव, छोटा गंधर्व, हिराबाई, पु. ल. राजा परांजपे, अभिनेते विवेक, नृत्यांगना रोहिणी भाटे, चित्रकार रवी परांजपे, शि द फडणीस, मंगेश तेंडुलकर, रोहिणी हट्टंगडी, मोहन आगाशे, मोहन गोखले, ग वा बेहेरे, सी रामचंद्र, आबासाहेब मुजुमदार, बाबासाहेब पुरंदरे, गो नि दा, इ इ. इ…
– – अशा अनेक गुणीजनांचे प्रत्यक्ष सहवास लाभले. रँ परांजपे, महर्षी आण्णा कर्वे, स्वा सावरकर, बालगंधर्व, मा कृष्णराव, मेहेरबाबा, स्वामी माधवनाथ, गुळवणी महाराज, स्वामी विद्यानंद, सूफी संत बियाबानी, मामा दांडेकर, बॅ जयकर, इ. इ. थोरांची प्रत्यक्ष दर्शने घडली. या विषयी मी भाग्यवान तर आहेच!
☆ “म्हणूनच आहे वर्दीवर ‘विश्वास’!”☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदे
२६, ११, २००८ हे आकडे भारतीयांच्या मनावर जणू तापलेल्या सळईने डागण्या देऊन कोरलेले आहेत. यातील २००८ ही खूण काळाच्या ओघात काहीशी बुजून गेलेली असली तरी २६/११ चा दाह मात्र शमलेला नाही. आणि एका अर्थाने ते चांगलेही आहे. भूतकाळ आणि भूतकाळातील चुकांबद्द्ल जे अनभिज्ञ असतात त्यांच्या हातून त्याच चुका होणे, हे अटळच असते, असे एका तत्ववेत्त्याने म्हटलेले आहे, त्याला काही विशिष्ट असा अर्थ आहे. २६ ते २९ नोव्हेंबर हे चार दिवस तर आपण विसरताच कामा नये. म्हणूनच ह्या चारही दिवशी माझ्या मगदुराप्रमाणे या काळात घडलेल्या काही घटना लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.
१९७१ च्या भारत-पाक युद्धात राजस्थान सीमेवरील लोंगोवाला चौकी मेजर कुलदीपसिंह चांदपुरी यांनी केवळ १२० सैनिकांच्या जीवावर रात्रभर झुंजवत ठेऊन पाकिस्तानला वाळवंटातील धूळ चारली ही कथाही अनेकांना माहीत असेल. तशीच काहीशी ही घटना.
२६ नोव्हेंबरच्या रात्री ९. ४० वाजता पाकिस्तानी गावठी कुत्री ताजमध्ये घुसली आणि त्यांनी दिसेल त्यांचे लचके तोडले. जास्तीत जास्त माणसांना, त्यातल्या त्यात परदेशी नागरिकांना ओलिस ठेवायचे, भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव आणायचा आणि त्यांच्या सुटकेच्या बदल्यात आपल्या अनेक मागण्या मान्य करायला भारत सरकारला भाग पाडायचे, असा फार मोठा कट शत्रूने आखला होता. प्रत्येक अतिरेक्याकडे एके-47 रायफल्स आणि तिच्या ६०० गोळ्या, २०-२५ हातबॉम्ब्स आणि आर. डी. एक्स. चे एक पुडके एवढी युद्धसामुग्री होती. आणि ताजमधील सर्व नि:शस्त्र माणसांना संपवायला ती पुरेशी होती. बऱ्याच लोकांना ठार मारल्यानंतर (यांनी ताज मधील श्वानांनाही (स्नीफर डॉग्ज) गोळ्या घातल्या! ) त्यांनी मग लोकांना धमकावून, त्यांचे हात बांधून एका जागी गोळा करायला सुरूवात केली.
दक्षिण मुंबई-झोन 1 चे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस या पदावर कार्यरत असलेल्या श्री. विश्वास नांगरेपाटील साहेबांना दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. श्री. के. व्यंकटेश्वरम साहेबांचा संदेश आला.. कॅफे लिओपोल्ड मध्ये गोळीबार झाला आहे.. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.
नांगरेसाहेब तातडीने घटनास्थळाकडे जायला निघाले. मेट्रो चित्रपटगृहाजवळ पोहोचतात न पोहोचतात तोच त्यांचे मोबाईल, रेडिओ, वॉकी-टॉकी खणखणायला सुरूवात झाली. पोलिस कमिशनर हसन गफूर, आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस ए. एन. रॉय यांनी नांगरेपाटलांना त्वरीत हॉटल ताज मध्ये जाण्याचे आदेश दिले.
या प्रवासात असतानाच पाटील साहेबांना विविध स्त्रोतांकडून फोनवर मिळत असलेली माहिती गोंधळात टाकणारी आणि काही बाबतीत तर अफवांवर आधारीत होती. ताजवर सुमारे १०० लोकांनी हल्ला चढवला आहे अशी अफवेवर बेतलेली बातमीही त्यांना दिली गेली.
लिओपोल्डच्या आधी ताजकडे जाणारा मार्ग आहे, बरोबर ११व्या मिनिटाला नांगरेसाहेब ताजमध्ये होते. बहुदा हा टोळीयुद्धाचा प्रकार असावा असे सर्वांनाच वाटत होते. पण ताज मध्ये शिरताच मारल्या गेलेल्या लोकांचे मृतदेह, एके-४७ रायफलच्या गोळ्यांच्या पुंगळ्या, त्यातून बाहेर पडलेले शार्पनेल्स, काचांचे तुकडे इत्यादी पाहून हा नक्कीच अतिरेकी हल्ला आहे, हे त्यांच्या लक्षात आले.
सुमारे १००० खोल्यांचे अवाढव्य ताज हॉटेल, त्यातील अनेक मजले, आणि त्यांच्याकडे जाणाऱ्या शेकडो पायऱ्या.. अतिरेकी नेमके कुठे लपले आहेत, हे समजणे कठीण होते. पण सुदैवाने नांगरे साहेबांनी दीड महिन्यापूर्वीच ताजचे सेफ्टी ऑडीट स्वत: केले होते, त्यामुळे त्यांना ताजची आतली रचना माहित होती.
त्यांच्या कमरेला एक पिस्टल, अंगरक्षक अजित खेतले यांचेकडे एक पिस्टल, ताज चे सिक्युरीटी चीफ सुनील कुडीयादी (नि:शस्त्र), राज्य राखीव पोलिस दलाचा एक हत्यारी जवान, काही पोलिस अधिकारी, रस्ता दाखवण्यासाठी ताज हॉटेलचे दोन कर्मचारी, अशा फक्त बारा जणांची ही तुकडी तयार झाली. बुलेटप्रुफ जॅकेट्स नाहीत, जादाची काडतुसे नाहीत, फक्त सहा गोळ्या झाडू शकणारी तीन-चार पिस्टलस, जुन्या पद्धतीची साधी. ३०३ बंदूक एवढीच शस्त्रे विरूद्ध आधुनिक शस्त्रे, अतिरेकी कारवायांचे दोन वर्षांचे प्रशिक्षण मिळालेले, ब्रेनवॉश करण्यात आलेले, मरण्याच्या तयारीने आलेले, धर्मवेडे मनोरूग्ण तरूण दहशतवादी, त्यात त्यांना पाकिस्तानातून सॅटेलाईट फोनवरून मिळणारी अचूक माहिती, अशी विषम परिस्थिती होती. पण मुंबई पोलिसांच्या वीरांनी पाऊल पुढे टाकले होते… आता माघार नाही!
नांगरे साहेब एस. आर. पी. एफ. जवान राहुल शिंदेला म्हणाले, ”देशाचे रक्षण करण्याची अशी संधी आयुष्यात केंव्हा तरीच आणि नशीबवानालाच प्राप्त होते.. आता माघारी फिरता येणार नाही!
त्यावर २२ वर्षे वयाचं ते कोवळं पोरगं म्हणाले, ”अंगावर ही वर्दी त्यासाठीच तर चढवलीय! ” आणि त्याने पाऊल पुढे टाकले. तेवढ्यात नांगरेसाहेबांचे बॅचमेट आणि नक्षलवाद्यांशी लढण्याचा अनुभव असलेले डी. सी. पी. राजवर्धन सिन्हा हे ताजवर पोहोचले. त्यांनाही ताजवरील हल्ल्याची खबर मिळाली होती. हे सर्व मिळून अतिरेक्यांच्या मागावर निघाले.
अतिरेक्यांना लिफ्टचा उपयोग करता येऊ नये म्हणून सर्व लिफ्ट्स बंद करण्यात आल्या. आपले बहादूर त्यांना शोधत होते. पण अतिरेकी दुसऱ्या विंग मध्ये होते तर नांगरे साहेबांची टीम पहिल्या विंगमध्ये होती. अशा परिस्थितीत प्रसंगावधान राखून नांगरे साहेबांनी चतुराईने सीसीटीव्ही रूममध्ये जाऊन अतिरेक्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा निर्णय घेतला. आणि ते चौघे त्यांना दिसले.
वरच्या मजल्यावर असलेले अतिरेकी नजरेच्या टप्प्यात येताच त्यांच्यावर पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या. अतिरेक्यांना इतक्या लवकर प्रतिहल्ला होईल याची कल्पना नव्हती. त्यांना वाटले की पोलिसांची मोठी तुकडी आपल्यामागे लागली आहे. ते गोळीबार करीत आणखी वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी ग्रेनेड्स फेकले. आपल्या लोकांनी फक्त एक-एक फैर झाडली. कारण गोळ्या पुरवून पुरवून वापरायाच्या होत्या. नांगरेसाहेबांच्या एका गोळीने एका अतिरेक्याच्या पायांचा वेध घेतला पण ते सर्व अतिरेकी इमारतीच्या दुसऱ्या भागात पळून गेले.
तळहातावर शीर घेऊन हे वीर तयार होते. यांच्याकडे खूप कमी संख्या आहे, शस्त्रे नाहीत हे अतिरेक्यांना समजू देणे धोक्याचे होते, जवळ असलेली प्रत्येक गोळी जपून झाडावी लागत होती, बाहेरून जादा पोलिसांची मदत पोहोचण्यास उशीर होता.
अतिरेक्यांना भारतात घुसवणाऱ्या दहशतवादी संघटनांनी दूरवर पाकिस्तानात बसून इथे ताजमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना सॅटेलाईट फोन वरून सुचना देण्याची चोख व्यवस्था केली होती. त्यांनी या अतिरेक्यांना सीसीटीव्ही कॅमरे फोडा, सीसीटीव्ही रूमवर हल्ला करा असा आदेश दिला.
तोपर्यत सावध झालेल्या भारतीय तपास यंत्रणांनी पाकिस्तानातून होणारे सॅटेलाईट फोन संभाषण अचूक टिपायला सुरूवात केली होती. त्यांनी अतिरेकी सीसीटीव्ही रूमकडे येताहेत असा संदेश डीसीपी राजवर्धन यांच्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचवला. त्यामुळे पुन्हा सीसीटीव्ही रूमचा आश्रय घेतलेल्या पोलिसांना त्या रूममधून बाहेर निघावेच लागले.
तेवढ्यात अतिरेक्यांनी सीसीटीव्ही रूमवर गोळीबार सुरू करत एक स्फोट घडवला. त्यामुळे त्या रूमचे सिलिंग खाली कोसळले, नांगरेसाहेबांचे अंगरक्षक अजित खेतले गोळ्या लागून जखमी झाले. सर्व टीमला आता जिन्यावरून खाली जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हे सर्व आता अतिरेक्यांच्या गोळीबाराच्या टप्प्यात आलेले होते..
राहूल शिंदे आपल्या रायफलमधून अतिरेक्यांवर गोळ्या झाडत असताना त्यांना अतिरेक्यांच्या एके-४७च्या अनेक गोळ्या लागल्या… वीर खाली कोसळला… तशाही स्थितीत त्यांनी जळत असलेल्या सीसीटीव्ही रूम मध्ये सरपटत जाऊन तेथून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण एके-४७च्या जहाल गोळ्यांनी या वीराचे रक्त जाळून टाकले होते… नंतर जेंव्हा राहुल शिंदे यांचा निष्प्राण देह दृष्टीस पडला तेंव्हा त्यांचे डोळे अतिरेकी ज्या मजल्यावरून गोळीबार करीत होते, त्या दिशेला रोखून पहात होते, संगीन त्या दिशेला रोखलेली होती… ट्रिगरवर बोट होते… रायफलमध्ये गोळी नव्हती तसे कुडीत प्राणही नव्हते!
श्री. विश्वास नांगरे पाटील साहेब, श्री. हर्षवर्धन सिन्हा साहेब आणि त्यांच्या सोबतच्या शूरवीरांनी नौदलाचे कमांडो पोहोचेपर्यंत प्राणपणाने खिंड रोखून धरत शत्रूला थोपवून ठेवले होते, अन्यथा किती भयावह परिस्थिती ओढवली असती, देव जाणे!
ही एक अविश्वसनीय, अलौकीक आणि अगदी विपरीत परिस्थिती असताना केली गेलेली शौर्यपूर्ण कामगिरी होती! … म्हणूनच वर्दीवर ‘विश्वास’ आहे. आणि हा विश्वास बहादूर पोलिस टिकवून ठेवतील अशी खात्री आहे! धन्यवाद मुंबई पोलिस! राहुल शिंदे यांच्या बलिदानाला शतश: वंदन!
माढा तालुक्यातील सुलतानपूर हे राहुल शिंदे यांचे जन्मगाव. या गावाचे नाव आता राहुलनगर असे करण्यात आले आहे.
गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते..!
अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला तर राधा शांत-चित्त होती..!
गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वदनाने राधा म्हणाली…
“कसे आहात ‘द्वारकाधीश’..? “
जी राधा त्याला कान्हा-कान्हा म्हणायची तिने ‘द्वारकाधीश’ असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला…
“राधे, मी आज देखील तुझा ‘कान्हा’च आहे..! तू तरी मला ‘द्वारकाधीश’ म्हणू नकोस गं ss..!
खूप दिवसांनी भेटतो आहोत.. एकमेकांशी सुख-दुःखाच्या गप्पा मारू… एवढ्या धावपळीत मला जेव्हां जेव्हां तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती.. * राधा म्हणाली.. “खरं सांगू..? मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही..! कारण, तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही..! आणि माझ्या नजरेत तूच होतास.. फक्त तू..! त्यामुळे माझ्या अश्रूंबरोबर तू वाहून जावू नयेस म्हणून मी कधी रडलेच नाही..!
प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू..? “
श्रीकृष्ण ऐकतच राहिला..
राधा म्हणाली..
“तुला कदाचित कटू वाटेल पण हे सत्य आहे..! गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणालाही कधीच भेटला नाहीस..! तू खूप मोठा झालास.. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली..!
पण ह्या प्रगतीमध्ये तुझी अधोगती किती झाली..! यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरु झाले.. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी थेट द्वारकेस जावून पोहोचलास..!
एका बोटावर फिरणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरवसा ठेवलास.. पण दहा बोटांनी वाजणाऱ्या बासरीला तू विसरलास..!
कान्हा, जेव्हा तू प्रेमाच्या सान्निध्यात होतास, तेव्हा एका बोटावर गोवर्धन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस..!
‘कान्हा’ आणि ‘द्वारकाधीश’ ह्यांत काय फरक आहे सांगू…?
तू ‘कान्हा’ असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास.. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं..!
प्रेम आणि युद्ध ह्यांत हाच मोठा फरक आहे..!
‘युद्धात’ जीव घेतला जातो..!
आणि..
‘प्रेमात’ जीव ओवाळून टाकला जातो..!
कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो पण दुसऱ्याला दुःखी करु शकत नाही..!
तू तर ‘त्रैलोक्याचा स्वामी’ आहेस.. महान अशी ‘भगवद्गीता’ तू जगाला सांगितलीस..! पण तू स्वतः काय निर्णय घेतलास..?
तू राजा होतास.. प्रजेचा पालक होतास आणि तुझेच सैन्य तू कौरवांना देवून टाकलेस..?
तू स्वतः अर्जुनासारख्या ‘महारथी’चा सारथी बनलास, अर्जुनाचा ‘मार्गदर्शक’ झालास.. त्याच अर्जुनाने तुझेच सैन्य तुझ्याच नजरेसमोर मारून टाकले..?
कृष्णा, अरे तुझे सैन्य तुझीच प्रजा होती ना..? आणि प्रजा तर स्वतःच्या मुलांप्रमाणे असते..! तुझ्यातील प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाश बघू शकलास..!
इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा..? मग जा, पृथ्वीवर जाऊन बघ.. तुझी ‘द्वारकाधीश’ वाली प्रतिमा शोध..!
नाही सापडणार तुला शोधूनही..!
जिथे जाशील तिथे.. घरांत, मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेन..!
होय कान्हा, मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आज देखील पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्ग दाखवते..! समाज गीतेला पूज्य मानतो..! पण भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका-नरेश श्रीकृष्णावर नाही तर प्रेम करणाऱ्या ‘कान्हा’वर ठेवतो..!
गीतेमध्ये राधेचा तर दुरून देखील उल्लेख नाही..! पण आजही लोक गीतेचा – तुझ्या महान भगवद्गीतेचा – समारोप करताना ‘राधे-कृष्ण राधे-कृष्ण’ असाच जप करतात..!
हीच ती खऱ्या प्रेमाची खरी ताकद..!
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : शामला पालेकर
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈