मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगात रंगले मी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगात रंगले मी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

तू शाम तव मी राधा

खेळली रास होरी

रंगात रंगले मी

केलीस कशी बळजोरी

*

तुझी रंगभरी पिचकारी

भिजविली चोळी अन सारी

तुझी राधा भोळी बिचारी

श्रीरंगा कृष्ण मुरारी

*

गेलासी गोकुळ त्यजुनी

तू नृपाल द्वारकेचा

मागे वळून पहा रे

विरह तुझ्या राधेचा

*

रंगू कशी मी रंगी

तुजविण बा सख्या रे

येशील का पुन्हा तू

रंगात भिजविण्या रे

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- जोशीकाकांना भेटण्यासाठी अशोक जोशी आग्रहाने मला प्रवृत्त करतात काय आणि स्थलांतराचा योग नसल्याचा दिलासा देत, माझ्या आयुष्यात अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांची काहीही पूर्वकल्पना नसतानाही

जोशीकाका समीरच्या जन्म आणि मृत्यूची सांगड सहजपणे घालत असतानाच त्यातून माझ्या बाबांच्या पुनर्जन्माचे सूचन करुन मला विचारप्रवृत्त करतात काय,… सगळंच अघटित, अतर्क्य आणि मनातल्या अनुत्तरीत प्रश्नांची नकळत उत्तर देतादेताच मनात नवीन प्रश्न निर्माण करणारंही! हे सगळं मला दिलासा देण्यासाठी ‘त्या’नेच घडवून आणल्याचं मला लख्खपणे जाणवलं आणि मनातलं मळभ हळूहळू विरु लागलं!!)

जोशी काकांकडून परतल्यानंतर त्या रविवारी घरी अर्थातच चर्चेला विषय होता तो हाच. पण तिथं काय घडलं, ते काय म्हणाले या सगळ्याची मला सविस्तर चर्चा करणं नकोसंच वाटलं. कारण ते जुन्या जखमांवरची खपली काढल्यासारखंच झालं असतं. पण कांही न सांगणं, गप्प बसणं योग्यही वाटेना आणि शक्यही. कारण पत्रिका आणि ज्योतिष यावर आरतीचा कितीही विश्वास नाही असं म्हंटलं तरी तिथं नेमकं काय झालं याबद्दल तरी तिला उत्सुकता असणं स्वाभाविकच होतं.

“आपलं रुटीन फारसं डिस्टर्ब होणार नाही असं त्यांचं रिडिंग आहे” असं मोघम सांगून मी विषय सुरु होताच संपवायचा प्रयत्न केला खरा पण तो संपला नव्हताच.

” तुम्हाला खरंच पटतंय हे? खरंच वाटतंय असं होईल?”

“माझ्यापुरतं म्हणशील तर केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही हेच खरं. ” मी हसत म्हंटलं. या संदर्भातील सगळ्याच चर्चांना पूर्णविराम देऊ शकेल असं हेच एकमेव समर्पक उत्तर माझ्याजवळ होतं!

खरं सांगायचं तर जोशीकाकांनी जे सांगितलं त्यात माझ्यापुरतं तरी न पटण्यासारखं कांही नव्हतंच. याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यातल्या भूतकाळातल्या घटनांचे त्यांनी अंदाज घेत कां असेना पण दिलेले अचूक संदर्भ! माझ्या अंतर्मनाने ते केव्हाच स्विकारले होते खरे, पण त्यावरही खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार होतं ते माझी प्रमोशन पोस्टींगची आॅर्डर आल्यानंतरच!

पण त्यासाठी फार काळ वाट पहावी लागलीच नाही. सगळ्याच रहस्याचा भेद चार दिवसांत लगोलग झालाच. त्या दिवशीच्या इनवर्ड मेलच्या गठ्ठयांत सेंट्रल आॅफीसकडून आलेलं एक एन्व्हलप माझ्या नावावर होतं! मनात चलबिचल नव्हती, साशंकता नव्हती, जे होईल ते चांगलंच होईल हा विश्वास होता आणि जोशी काकांकडून मिळालेले संकेतही या सगळ्याला पूरकच होते.. आणि तरीही.. ते बंद एन्व्हलप हातात घेताच माझे हात थरथरू लागले… ! ती थरथर भीतीची होती कि उत्सुकतेची हे त्या क्षणी जाणवलंच नाही लगेच कारण मन त्या क्षणांत कणभरही रेंगाळलं नव्हतंच. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखं वरवर शांत पण आतून उतावीळपणानं ते एन्व्हलप मी घाईघाईने फोडलं आणि पाहिलं तर आत माझ्याच नावाची पोस्टींग कम ट्रान्सफरची ऑर्डर होती! त्यातल्या चार ओळी माझं रुटीन पूर्णत: उलथंपालथं तरी करणार होत्या किंवा सावरणार तरी…. !

मी ती आॅर्डर वाचताच ‘त्या’नेच घडवून आणलेल्या त्या अद्भूत चमत्काराने मनोमन सुखावलो. ‘त्या’नेच जोशीकाकांच्या तोंडून वदवलेलं माझं भविष्य त्या ट्रान्स्फर आॅर्डरमधील शब्दरुपात माझ्या नजरेसमोर जिवंत झालेलं होतं!!…. होय. माझं पोस्टिंग लखनौला नव्हे तर आमच्या याच

रिजनमधल्या इचलकरंजी मुख्य शाखेत ‘हायर ग्रेड ब्रॅंच मॅनेजर’ म्हणून झालेलं होतं! ‘त्या’च्या आशीर्वादांच्या त्या

शब्दरूपावरून फिरणारी माझी नजर आनंदाश्रूंच्या ओझरत्या स्पर्शानेच ओलसर झाली… ! स्वप्नवतच वाटत राहिलं सगळं !! पण…. मी स्वतःला क्षणार्धात सावरलं. शांतपणे डोळे मिटून घेतले… ‘त्या’ला मनोमन नमस्कार केला… डोळ्यातून वाहू पहाणारा आनंद डोळे क्षणभर तसेच मिटून आतल्या आत जिरवला. अलगद डोळे उघडले न् त्या क्षणी आठवण झाली ती मला मनापासून सहकार्य करणाऱ्या, माझ्या भवितव्याची चिंता लागून राहिलेल्या माझ्या ब्रॅंचमधील स्टाफमेंबर्सची! ते सर्वजण आपापल्या कामांत व्यस्त होते तरीही माझा आनंद आत्ताच सर्वांमधे वाटून मला द्विगुणित करायचा होता! त्याच असोशीने दुसऱ्याच क्षणी मी केबिनचं दार ढकलून बाहेर आलो.. !

त्यादिवशी लंचटाईममधे डायनिंग टेबलवर आणि पुढे दिवसभरही ‘ हे आक्रित घडलं कसं?’ हाच सर्वांच्या चर्चेचा मुख्य विषय होता! माझ्यापुरता तरी तो चमत्कारच होता पण तो घडला होता तो मात्र कुणी घडवल्यासारखा नाही तर सहज घडल्यासारखा!! यामागील कार्यकारणभावाची जी उकल पुढे एक दोन दिवसातच झाली, तीही कुणालाही अगदी सहजपणे पटावी अशीच होती!

खरंतर यावेळच्या प्रमोशन पोस्टींगसाठी सेंट्रल-ऑफिसने ठरवलेल्या पाॅलिसीनुसार सर्वच प्रमोटी-आॅफिसर्सची पोस्टींग्ज कोणताही अपवाद न करता आऊट आॅफ स्टेटच होतील असेच ठरले होते. त्यानुसार कुणाचे पोस्टींग कुठे करायचे याबाबतच्या निर्णयावर जी. एम्. नी सह्याही केल्या होत्या. त्याप्रमाणे कोल्हापूर रिजनमधील आम्हा सर्व प्रमोटीजची उत्तर-प्रदेश मधील शाखा किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसेसमधे ट्रान्स्फर करण्याचा निर्णय झालेला होता आणि त्यानुसारच माझं पोस्टींग रिजनल ऑफिस, लखनौला होणार असल्याची ती बातमी अशी पूर्णत: सत्याधिष्ठीतच होती! असं असतानाही पुढच्या चार सहा दिवसात अशा कांही घटना आकस्मिकपणे घडत गेल्या की सेंट्रल ऑफिसला या प्रमोशन ट्रान्सफर पॉलिसीबाबत तडजोड करणे भाग पडले होते. कारण इकडच्या रिजन्सच्या तुलनेत बॉम्बे रिजनमधील प्रमोटिजची संख्या कितीतरी पटीने जास्त होती. त्या मुंबईस्थित सरसकट सगळ्यांनाच प्रदीर्घ काळासाठी घरापासून परप्रांतात एकटंच निघून जाणं केवळ गैरसोयीचंच नव्हे, तर अनेक दृष्टीने अडचणीचेही ठरणारे होते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन युनियनकडे लेखी तक्रारी दिल्या. आणि अर्थातच त्यामुळे युनियन हेडक्वाॅर्टर्ससाठी हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला. त्यांनी बॅंकेच्या सेंट्रल-मॅनेजमेंटकडे हा विषय लावून धरला आणि त्यांच्या मिटिंगमधे झालेल्या चर्चांमधे ही पॉलिसी कांही प्रमाणात शिथिल करण्याची मॅनेजमेंटने तयारी दाखवली. त्यानुसार ऑलओव्हर इंडियाच्या, मेरीटनुसार बनवलेल्या हजारभर प्रमोटींच्या लिस्टमधे पहिल्या शंभरात नावे असणाऱ्या प्रमोटीजना त्यांच्या सध्याच्या रिजनमधेच पोस्टिंग द्यायचे आणि बाकी सर्वांचे मात्र ठरल्याप्रमाणे आऊट ऑफ स्टेट पोस्टींग करायचे अशी तडजोड मान्य झाली. आश्चर्य हे कीं त्या मेरिट-लिस्टमधे माझा नंबर ९८ क्रमांकावर होता! म्हणूनच केवळ माझं लखनौचं पोस्टिंग रद्द होऊन ते इचलकरंजी (मुख्य) ब्रँचला झालं!!

माझा पौर्णिमेचा नित्यनेम आता निर्विघ्नपणे सुरु रहाणार असल्याचा खूप मोठा दिलासा मला प्रमोशन नंतरची नवीन जबाबदारी स्वीकारण्यासाठी अतिशय आवश्यक असं मानसिक स्वास्थ्य देणारा ठरला ही ‘त्या’चीच कृपा होती हे खरंच पण त्यापेक्षाही माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं ते जन्म आणि मृत्यू या दोन्हींकडे वेगळ्या आणि अधिक समतोल नजरेने पहायची मला मिळालेली नवी दृष्टी! अर्थात जोशीकाका याला निमित्त झाले होते हे खरेच पण त्यामागचा कर्ता-करविताही ‘तो’च होता आणि हे माझ्यासाठी अधिक मोलाचं होतं! म्हणूनच जन्म आणि मृत्यूला जोडणाऱ्या पुनर्जन्माच्या बंद दरवाज्याची दारं कांही अंशी तरी किलकिली झाल्याचा आभास माझ्या मनात कांहीकाळ निर्माण झाला तरी त्यात मी फार काळ रुतून बसलो नाही. यातून समीर गेल्याचं दुःख बऱ्याच प्रमाणात बोथट झालं हे एक आणि या ना त्या रुपांत बाबांची दिलासा देणारी सावली सिलिंडरच्या रूपात माझ्यासोबत आहे ही कधीच न विरणारी भावना आजही तितक्याच अलवारपणे माझी सोबत करते आहे हेही माझ्यासाठी फार मोठा दिलासा देणारेच ठरले आहे.

माझ्या आयुष्यात त्या त्या क्षणी मला अतीव दु:ख देऊन गेलेले, माझे बाबा आणि समीरबाळ यांचे क्लेशकारक मृत्यू त्यांच्याशीच निगडीत असणाऱ्या या सगळ्या पुढील काळांत घडलेल्या घटनांमुळे माझं उर्वरीत जगणं असं अधिकच शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारेच ठरले आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?

हे सगळं त्याक्षणी पूर्ण समाधान देणारं असलं तरी हा पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण आपली वाट पहातायत याची मला कल्पना नव्हती एवढंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(यावेळी एका सुटकेसमध्ये वरखाली भेटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला. ) – इथून पुढे 

यावेळी गाडीत गर्दी नव्हती. गाडी सुटल्यावर बाकी प्रवासी डुलक्या घेऊ लागले, तसे भटजीनी सोबतच्या किल्लीने बॅग उघडली… आपले कपडे बाहेर घेतल्यावर त्याना भले मोठे पुडके दिसलें.. त्यानी ते हळूहळू उघडले तर आत नोटांची बंडले होती. भटजीचे हात थरथरू लागले… त्यानी परत ते पुडके बांधले.. एव्हडीमोठी रक्कम आपल्या ताब्यात.. आणि काय झाले तर? कोणी चोरले तर? कुणी इनकमटॅक्सवाल्याला तक्रार दिली तर?

रात्रभर भटजी झोपले नाहीत.. टक्क जागे होते..

सकाळी उतरताच ते बहिणीकडे गेले आणि अर्ध्यातासात भुलेश्वरला पोचले आणि त्यानी ती रक्कम शेटजीच्या साडूकडे दिली… साडू खूष झाले, त्यानी पाच हजार भटजींच्या खिशात ठेवले.

परत येताना साडूनी दिलेले पार्सल त्यानी ब्यागेत ठेवले आणि ते एसटीत बसले… त्याना कुतूहल होत, साडू काय पाठवतात शेठजीना… त्यानी गाडी सुरु असताना हळूच उघडले, आत कसलीतरी पावडर होती. कसली पावडर असावी ही.. त्यानी हुंगून पाहिली.. त्यानी कुठेतरी वाचले होते, ते आठवले.. ही नशा देणाऱी पावडर असावी. त्यान्च्या लक्षात येईना.. शेठजीची आहे सोन्याची पेढी, त्यान्च्या साडूची पण.. मग ही नशापावडर? म्हणजे शेठजी आणि साडू, सोन्याच्या आडून हा गुपचूप धंदा करत असणार… आपल्याला हे समजले हे कुणाला कळवायचे नाही.

भटजी परत नेहेमीप्रमाणे पूजा करू लागले परंतु त्याना स्वास्थ मिळेना. एकतर त्यान्च्या कन्येचे तिच्या आतेशी जमेना. दुसरे त्यान्च्या कन्येचे गुरु बनारसला गेले त्यामुळे तिचे शिक्षण अर्धवट राहिले, त्यामुळे ती गावी आली. आपल्या कन्येचे संगीतशिक्षण हे अंतूभटजीचे आशा स्थान होते, पण त्यालाच हादरा बसला होता.

अंतूभटजीना अलीकडे वाटू लागले होते, आपले या गावात तरी काय आहे? ना जमीन ना नातेवाईक ना सगेसोयरे.. या पेक्षा सरळ बनारसला जावे… गंगाकिनारी रहावे.. काशीविश्वेश्वराची पूजा करावी, पण कसे?

बनारसला त्यान्च्या कन्येचे गुरु पण रहात होते, त्यान्च्या आश्रमात निवासी पद्धतीने संगीताचे शिक्षण दिले जायचे. तिची पण इच्छा होती, बनारसला जाऊन गुरूंच्या आश्रमात राहून संगीत विद्या शिकायची.

शेटजीच्या पार्सलात काय असते हे कळल्यापासून भटजी मुंबईत जायचे नाव काढत होते, तशात एका सिनेमानटाच्या मुलाच्या खिशात गांजा सापडला, त्याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात घातल्याची बातमी त्यानी ऐकली होती. परदेशातून आलेली चरस NCB (नार्कोतिक सेंट्रल ब्युरो)च्या अधिकाऱ्यांनी पकडली आणि एका उद्योगपतीला दहा वर्षे खडी फोडायला पाठविले, हे त्यानी वाचले होते. त्यामुळे अशी पावडर आपल्यकडे सापडली तर शेठजी लांब रहातील पण आपण तुरुंगात सडून मरू आणि आपली मुलगी उघड्यावर येईल, हे त्याना माहित होते.

पण एकदिवस शेठजीचे बोलावणे आलेच..

“गुरुजी, एक काम होत तुमच्याकडे.

आमच्या साडूंना बॅग पोचवायची होती.

“नको सावकार, मला नाही जमणार.. दुसऱ्या कुणाला तरी सांगा..

“का? इतक्या वेळा गेला की घेऊन.. आणि आता काय? वीस हजार देतो की..

“नाही जमायचे, तुम्ही पैशाची बंडले देता बहुतेक माझ्याबरोबर.. मला माझ्या जीवाची भीती वाटते… मला कुणी हटकले तर.. चोरले तर पैसे? 

“कुणी चोरत नाही तुमची पिशवी.. आम्हाला तुमची खात्री आहे.. तुम्ही सोमवारी निघा..

“नाही जमायचे शेठजी..

शेठजीचा संताप अनावर झाला, त्याना कुणी नकार दिलेला चालत नसे. त्यानी “भिवा ‘म्हणून हाक मारली, तसा भिवा त्याचेंसमोर हजर झाला.

“भिवा, हे गुरुजी मुंबईतला जायचे नाही म्हणत्यात..

भिवाने डोळे लाल केले.

“भटा, शेटजीस्नी न्हाई म्हणत्यास, तुजी पोरगी हाय न्हवं.. कधी तिला उचलीन कळायचं बी नाय.. गुमान पिशवी घेऊन जायचं..

आपल्या मुलीचा विषय निघाल्याने भटजी गप्प झाले, घाबरले.. आपले काही झाले तरी चालेल, आपल्या मुलीला काही होता कामा नये..

आणि हा तर भिवा भिल्ल.. काय करील कोण जाणे?

अंतूभटजीनी मान खाली घातली आणि “बर शेटजी, सोमवारी जातो मी.. बॅग तयार ठेवा ‘असं म्हणून घरी गेले.

अंतूभटजी मनातून अस्वस्थ झाले.. या शेटजीना आयतें आपण सापडलो.. सुरवातीला वाटले नुसते खाऊ असेल म्हणूंन.. पण यांचे काळे धंदे… ही माणसाला नासवणारी आणि बरबाद करणारी पावडर.. त्यात अमाप पैसा.. सोन्याच्या वीसपट.. पैशासाठी हे असले चोरटे धंदे.. त्यात त्यांचा साडू मोठा भिडू असणार. दोघेही चोर. काय करावे? याच्यातून मान कशी सोडवावी.

शनिवारी अंतूभटजीची मुलगी मुंबईला गेली. सोमवारी सायंकाळी भटजी शेटजीकडे गेले. शेटजीनी भली मोठी बॅग तयार ठेवली होती, त्यात भटजीचे कपडे वरखाली घातले, बॅगेला कुलूप लावले आणि किल्ली भटजीकडे दिली.

नेहेमी जायचे त्या बसमध्ये भटजी बसले. भिवा गाडी सुटल्यावर लांब झाला. प्रवासात भटजी टक्क जागे होते.

दुसऱ्या दिवशी भटजी बॅग घेऊन उतरले. बहिणीकडे बॅग ठेवली आणि फोर्ट मधील NCB कार्यालयात शेटजीचे साडू आणि शेटजी, हे चरस, गांजा स्टॉक करतात, असा रिपोर्ट दिला.

एका तासात भुलेश्वरला आणि शेटजीच्या घरी, गोडाऊन मध्ये NCB चे अधिकारी पोलीसफाटा घेऊन पोचले. चरसचा स्टॉक पकडला आणि शेटजी, त्त्यांचा मुलगा, भुलेश्वरचे साडू, त्त्यांचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली..

सगळीकडे खळबल माजली.. सोन्याचा मोठा धंदा करणारे व्यापारी ड्रुग्सच्या धंद्यात..

टीव्हीवर मोठंमोठ्याने बातम्या दिल्या जात होत्या.. सायंकाळ पेपरनी पहिल्यापानावर बातमी छापली होती, त्याचवेळी.. त्याचवेळी 

 अंतूभटजी आपल्या कन्येसह बनारसच्या रेल्वेत बसले होते… काल शेठजीनी दिलेली पन्नास लाखाची बॅग सांभाळत.

 आता या पैशानी त्याना भविष्याची काळजी नव्हती.. शेपटीवर पाय पडल्याबरोबर नागाने दंश केला होता.

— समाप्त 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

??

☆ ✍️ सहज सुचलं म्हणून… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

विश्वास व श्रध्दा यांचा संबंध बुद्धी व हृदय दोघांशीही आहे. बुद्धीला जे पटतं ते व तसंच घडलं की आनंद मिळतो कारण तीच आपली तळमळ असते. मन म्हणतं पहा हे असंच व्हायला हवं होतं पण एक महत्त्वाचा विषय यात दुर्लक्षित रहातो तो म्हणजे हृदयाचा कल ! हृदय या आनंदात आनंदी आहे की नाही हा विचार व्हायलाच हवा. ही गरज आहे पण त्या आवाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं बुध्दी मनाला पटवत रहाते. आंतरिक तळमळ व बौद्धिक इच्छा वेगळ्या आहेत हे निश्चित ! अन्यथा जे जे मनासारखे झाले आहे त्यातून संपूर्ण समाधान मिळालेच असते व हुरहूर संपली असती. पण तसे का होत नाही याचा विचार विवेकाने करणे क्रमप्राप्त आहे.

याउलट फक्त हृदयाचा कौल घेतला तर लक्षात येतं की त्याला काहीच नको आहे. त्याला देण्यात सुख आहे. त्याचा स्वभावच प्रेम, भक्ती, समर्पण आहे. व आहे त्यातही तो समाधानी आहे पण मन स्वस्थ बसू देत नाही. वेगवेगळे विकार, तुलना, इर्षा, मीच का? हे शक्य नाही असेच ठसवत जाते व हृदयाकडे दुर्लक्ष होते. ही मानवी अवस्था संत, सज्जन ओळखतात व सत्याचा एक गुरुमंत्र देतात. पण बुद्धी तो ही आपल्या आनंदाच्या कल्पनांवर घासून पहातं व ती वचने खरी नाहीत असं मनाला पटवतं.

हाच भ्रमाचा खेळ सुरू असतो. तो आपण स्वतः स्वतः च्या बुध्दीला पटवणे व तिला हृदयाकडे वळवणे हा स्वधर्म आहे.

हृदयस्थ परमात्मा मग खूष होऊन “सदा सुखी भव” चा आशीर्वाद देतो जो स्वतःचा स्वतः ला जाणवतो.

हेच तर हवंय !!

*

भगवंत हृदयस्थ आहे 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ६ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

काळ बदलत गेला. समीकरण बदलत गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जेथे साधं पोस्ट कार्ड मिळायला दोन चार दिवसाचा, कदाचित आठ दिवस लागायचे, तिथे बातमी कळायला काही मिनिट पण लागतं नाही. रेडिओ गेला, ट्रानझीस्टर पण गेला. टेप रेकॉर्डिंग गेल. ग्रामो फोन गेला. आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला, जग झटक्यात बदललं. त्याच रुपड बदललं.

इंटरनेट पण मोबाईलच्या कुशीत लोळू लागला. क्षणात हिकडची बातमी तिकडं. पोस्टाची काम कमी झाली. पोस्टकार्ड, अंतर्देशीय गेल.

एका मोबाईल मध्ये घड्याळ, कॅमेरा, internet, फोटो अल्बम, इन्स्टा ग्राम, फेसबुक अश्या नानाविध गोष्टीच घबाड हाती लागलं.

गेम्स नावाचा प्राणी तिथेच शिरला आणि बालपण माती मोल झालं. व्हाट्सअपनं तर जगण मुश्किल केल. माणुसकी गहाण पडली. व्हाट्सअप, फेसबुक ची व्यसन जडली. जी दारू पेक्षा घातक ठरली.

माणसातील संवाद आता स्क्रीन वर आला. एवढंच काय टीव्ही पण मोबाइलला अडकला. विसंवाद चालू झाला. घरात कोण आला कोण गेला हे पण कळल नाही. सदा भासमान दुनिया झाली. फायदे झाले तितकेच तोटे पण झाले. सतत खाली मान घालून माणुसकी टच स्क्रीन खेळायला लागला.

वाय फाय, डोंगल हे परवलीचे शब्द झाले. लहान मुलांच्या हातात मोबाईल आला आणि बालपण हरवलं गेल. वयाच्या दोन चार वर्षाच्या मुलांच्या हातात गेम्स चालू झाले. त्याशिवाय पालकांची कामे खोळाम्बत होती. खेळतोय खेळू दे. गप्प तरी बसेल. त्याच्या व्यसनाने बाळ जेवण करेल, खाईल पीईल. ह्या कारणाने ते बालक ज्यास्त अधीन होतं गेले. पालकांना कळत होतं पण वळत नव्हतं. बाहेर बांगडण्याचे खेळायचे दिवस हरवले. आणि बालपण संपुष्टात आल! चार चौघात बोलायचे हसायचे दिवस सरले. बाळ ऐकलं कोंड होतं गेल ते कळल नाही. घरी पाहुणे मंडळी आली गेली त्याच्या खिजगणतीत नव्हते. त्यात शिशुना पाळणा घर हे नवीनच तंत्र ज्ञान निर्माण केलं गेल!

ते तिथे काय करतय काय नाही हे देव जाणे! बाळ मोठं झाले घरी राहिले तर त्याला ब्लु व्हेल सारख्या गेम्सच व्यसन! बाहेरची शुद्ध हवा, शरीराला होणारा व्यायाम, ओळखी, मौज मजा ह्याला हरवून बसलाय. हेच काय ते संशोधन, हीच का ती मानवाची प्रगती! नुसते बालपणच नाही तर माणुसकी, आत्मीयता हरवलेली ही पिढी पुढे जाऊन काय काय करेल, ह्याची कल्पना सुद्धा करावी असे वाटतं नाही. सदा मान वाकडी मंडळी डोळ्याला चस्मा, येणारे पाठीला कुबड, कम्बर दुःखी इत्यादी गोष्टींची सांगड घालत देश प्रगती पथावर जात आहे. आधुनिक तंत्र ज्ञान काळाची गरज आहे, हे जरी खरे असले तरी, येणारी पिढी ही रोगग्रस्त असेल एवढ नक्कीच! त्वरित मिळत असलेल्या गोष्टीची किम्मत मात्र कमी होतं आहे का युज अँड थ्रो च्या जमान्यात माणुसकी पण गहाण पडत आहे, हे तितकेच खरे.

— समाप्त —  

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -२- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – २ – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

(लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल.’) – इथून पुढे 

पीएच. डी. झाल्यावर जयंतरावांना भारतामध्ये लगेच येता आले नाही. पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळत होती. शिवाय फ्रेड हॉएल यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ थिअरॉटिकल ॲस्ट्रोनॉमी सुरू केली होती. तेथे किमान पहिली पाच वर्षे जयंतरावांनी काम करावे आणि संस्थेची घडी बसवून द्यावी अशी हॉएलची इच्छा होती. जयंतरावांनी गुरूचा शब्द पडू दिला नाही. पाच वर्षे त्यांनी या संस्थेला दिली. त्या संस्थेचे मंगल झाले… आणि याच काळात जयंतरावांचे पण मंगलम् झाले. मंगल राजवाडे या गणितज्ञ मुलीशी लग्न. ❤️ मंगला नारळीकर.. जयंत नारळीकर यांची बेटर हाफ.. अगदी अक्षरशः. त्यांची थोडी माहिती घेतल्याशिवाय पुढे जायला काहीच मजा नाही.

मंगला राजवाडे.. गणित विषय घेऊन एमए करताना मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावून पहिली आलेली. जयंत नारळीकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या केंब्रिजमध्ये गेल्या. तीन वर्ष तिथे शिकवले. नंतर कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अध्यापनकार्यास काहीसा विराम दिला. या गणिती जोडप्याला तीन मुली झाल्या. कुटुंब भारतात परतले आणि पुढे सहा वर्षे त्यांनी TIFR मध्ये शिकवले. १९८१ मध्ये.. म्हणजे लग्नानंतर १६ वर्षांनी पीएचडी पूर्ण केली. त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ’नभात हसते तारे’ हे पुस्तक नारळीकर दांपत्याने मिळून लिहिले आहे. “पाहिलेले देश, भेटलेली माणसं”, दोस्ती गणिताशी, यासारखी अनेक पुस्तके मंगलाबाई यांनी लिहिली आहेत. करियर आणि कुटुंब याच्यात समतोल साधताना मंगलाबाईंना कुटुंबाला अधिक प्राधान्य द्यावे लागले.

नारळीकर कुटुंबाने जेव्हा ठरवले की आता भारतात परतावे, तेव्हा शास्त्री कालवश झाले होते. जयंतरावांनी इंदिरा गांधी यांना पत्र पाठवले, शास्त्री यांच्यासोबत झालेल्या बोलण्याचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला. “तुम्ही कुठे काम करू इच्छिता” अशी विचारणा झाली. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये काम करण्याची इच्छा नारळीकर यांनी व्यक्त केली अन् ती पूर्ण झाली देखील. नारळीकर कुटुंब मुंबईला टाटा संस्थेत दाखल झाले. आता मुलींना शाळेत टाकायचे होते. सोबत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची मुले महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जात होती. मात्र नारळीकरांनी त्यांच्या तिन्ही मुलींसाठी केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

गणित, विज्ञान, वा भाषा यांचे मूलभूत आकलन होण्यासाठी, माणसाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत वा तिच्या जवळच्या भाषेत झाले पाहिजे, ही त्यामागची भूमिका. मुलींना कुठला कोचिंग क्लास देखील लावला नाही. स्वतःच्या अभ्यासातून स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलींनी शोधली पाहिजेत. घरात अभ्यासाची सक्ती नाही. “घोड्यांच्या शर्यतीमध्ये जिंकल्यावर घोडा कधीच खूश होत नसतो. खूश फक्त जॉकी होत असतो. मुलांच्या बाबतीत देखील हेच लागू होते. ” असे नारळीकर दांपत्य मानायचे. मुलींना घरांमध्ये केवळ विनोद सांगायची सक्ती. रोज जेवायला बसले सगळे की सगळ्यांनी जोक सांगायचेच. भारी ना! ❤️ तिन्ही मुली मोठ्या होऊन संशोधन क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या आहेत. “गीता नारळीकर” या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवरसायनशास्त्र आणि जीवभौतिकी याच्या प्राध्यापिका आहेत. “गिरिजा नारळीकर” या मेलोन युनिवर्सिटीमध्ये संशोधिका आहेत. “लीलावती नारळीकर” या पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.

१९८८ मध्ये जेव्हा पुण्यात आयुका स्थापन करायचे ठरले, तेव्हा प्रा. यशपाल यांनी जयंत नारळीकर यांना बोलावले. आयुका आज संशोधनक्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहे, यात जयंत नारळीकर यांच्या दूरदृष्टी आणि कुशल व्यवस्थापनाचा खूप मोठा हात आहे. नासाच्या हबल दुर्बिणीपेक्षा कमी क्षमतीची दुर्बीण आयुकाकडे असली तरी नासाच्या शास्त्रज्ञांना शक्य झाले नाही, अश्या अनेक बाबी आपले भारतीय शास्त्रज्ञ आयुकामध्ये करून दाखवत आहेत. आयुका केवळ संशोधन कार्य करत नाही, तर सामान्य जनतेत विज्ञान रुजविण्याचे काम देखील करते. जगभरातील दिग्गज शास्त्रज्ञांना ऐकण्याची संधी तिथे उपलब्ध करून दिली जाते. २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे आयुकामधील जत्राच. अनेक कार्यक्रमाचे, व्याख्यानांचे दिवसभराचे नियोजन असते.

पृथ्वीवर जीवन परग्रहावरून आलेल्या सूक्ष्म जीवांपासून सुरू झाले असेल, असे एक गृहितक शेकडो वर्षांपासून मांडण्यात येत आहे. होएल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी देखील या गृहितकाचे समर्थन केले. हे गृहितक पडताळून पाहण्याचा प्रयोग नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली आयुकाच्या टीमने हैदराबाद येथे जानेवारी २००१ मध्ये केला. पृथ्वीच्या वातावरणात ४० किलोमीटर (मराठीमध्ये २० ते ५० किमी पर्यंतच्या पट्ट्याला स्थितांबर म्हणतात) उंचीपर्यंत फुगे सोडण्यात आले. २००५ मध्ये देखील पुन्हा एकदा हा प्रयोग करण्यात आला. या स्थितांबरात पृथ्वीवर न आढळणारे सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. या फुग्यांवर विविध उपकरणे जोडली होती. त्या उपकरणांनी जी निरीक्षणे नोंदवली, त्यातून आलेले निष्कर्ष – गृहितकाची पुष्टी करत असले तरी नारळीकर यांच्या मते त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

जयंतराव लेखनाकडे कसे वळले, त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे. मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. नारळीकरांनी गंमत म्हणून या स्पर्धेत भाग घेतला. मात्र एक जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण असा आपला लौकिक इथे स्पर्धकांच्या आड येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःचं नाव बदलून ‘कृष्णविवर’ ही कथा पाठवली. ❤️ त्यांच्या नावाची आद्याक्षरे जविना यांचा क्रम उलट करून नाविज.. (नारायण विनायक जगताप) या नावाने ही कथा पाठवली. जेव्हा त्यांच्या कथेला पहिले बक्षीस मिळाले, त्या वेळेस हा सगळा खुलासा झाला. 😁

आईन्स्टाईन म्हणतो की, जी व्यक्ती विषयांमध्ये तज्ज्ञ असेल, तीच विषय सोपा करून मांडू शकते. नारळीकर यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा भाषणे, मुलाखती वाचताना, ऐकताना सुद्धा त्यांचे विषयातील प्रभुत्व लक्षात येते. कारण अतिशय सोप्या भाषेत वाचकांपर्यंत विज्ञान पोचवले जाते. त्यांच्या विज्ञानकथा इज माय लव, ❤️कारण कथेमधील प्रश्न नेहमी भारतीय शास्त्रज्ञच सोडवत असतो. 😍मात्र नारळीकर यांच्या मते विज्ञान हे एका देशासाठी मर्यादित नसते, संपूर्ण जगाचे असते. विज्ञानाची प्रगती होण्यासाठी प्रयत्न जगभरातून व्हावा आणि त्याचा फायदा देखील अखिल जगासाठी व्हावा. 👍

“पोस्टकार्डवरील उत्तर” हा त्यांनी केलेला प्रयोग तर अगदीच अफलातून. कोणत्याही शाळकरी मुलाने त्यांना साधे पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावे आणि नारळीकर यांनी त्याला उत्तर द्यावे.. तेही अगदी स्वाक्षरीसह. ❤️ तुम्हाला देशभरात हजारो व्यक्ती सापडतील ज्यांनी नारळीकर यांच्याकडून आलेल्या उत्तराचे पोस्टकार्ड जपून ठेवले असेल. व्याख्यानांच्या वेळी समोर जसे श्रोते असतील, त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे व्याख्यान होई. महाविद्यालयीन काळातील त्यांच्या एका शिक्षकाचे राहणीमान आणि उच्चार खूपच गावठी होते. सहाजिकच विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र त्याच्या ज्ञानाने नंतर मुले खूप प्रभावित झाली. कपड्यावर ज्ञान ठरत नाही, याचा धडा जयंतरावांना तेव्हाच मिळाला होता. त्यामुळे आयुकाच्या संचालकपदी असताना देखील त्यांचा पोषाख शक्यतो साधा असायचा. नवीन व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधताना हाच साधेपणा उपयोगी ठरायचा.

सामाजिक परिवर्तनासाठी आग्रही असणारे नारळीकर प्रसंग आला म्हणून बोटचेपेपणाची भूमिका घेताना कधी दिसत नाहीत. १९८६ साली मंगलाबाईंना कर्करोग झाल्याचे आढळून आले. मात्र या प्रसंगाने देखील त्यांची, मंगलाबाई यांची, अंगिकारलेल्या तत्त्वांवरची निष्ठा ढळली नाही. वि. वा. नारळीकर यांनीदेखील आजार आणि दैववाद यांना एकत्र येऊ दिले नाही. झालेल्या आजाराची व्यवस्थित कालमीमांसा केली, त्यावर उपचार केले आणि मंगलाबाई त्यातून पूर्णतः बऱ्या झाल्या. आज ही जोडी जराशी थकली असली तरी सामाजिक कार्यात पूर्वीप्रमाणेच क्रियाशील आहे.

शास्त्रज्ञ आस्तिक असो अथवा नास्तिक, मात्र त्याने चिकित्सक असले पाहिजे, विवेकी असले पाहिजे असा आग्रह नारळीकर धरतात. त्यांचा “पुराणातील विज्ञान विकासाची वांगी” हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. त्यात ते म्हणतात की “क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्म यांच्यात वरवर थोडे साम्य दिसत असले तरी क्वांटम फिजिक्समधील सर्व संकल्पना गणिताच्या भाषेत मांडल्या जातात आणि त्या प्रयोगाने पडताळता देखील येतात. पुराणकथांमध्ये अनेक वैज्ञानिक शोध असल्याचा दावा केला जातो. परंतु आजमितीला त्याचा पुरावा सापडत नाही, हेच सत्य आहे. “

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असो वा फलज्योतिषाचा भांडाफोड. आपल्या विनयी मात्र ठाम भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची चाचणी घेण्याचे आव्हान दिले होते. कुंडलीचा अभ्यास करून सदर व्यक्ती ती अभ्यासात हुशार आहे की नाही.. बस एवढेच सांगायचे होते. यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येणार होता. मात्र या चाचणीमध्ये कोणीही ज्योतिषी सफल झाला नाही. फलज्योतिष हे शास्त्र नाही, हे सिद्ध झाले. आजही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यामध्ये नारळीकर यांनी घेतलेल्या चाचणी-परीक्षा खूप बळ देणा-या ठरल्या आहेत. डॉ. लागू, निळूभाऊ फुले, पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर यांसारख्या वलयांकित व्यक्तींनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वजन प्राप्त झाले आहे.

पु. ल. देशपांडे आणि नारळीकर यांची इंग्लंडमध्ये अचानक भेट झाली होती, बरं का. इंग्लंडमध्ये बागेत फिरताना मराठी शब्द कानावर पडले म्हणून नारळीकर ‘कोण आहे’, हे पहायला गेले, तर साक्षात पु. ल. आणि सुनीताबाई समोर. तेव्हा त्या दोघांना नारळीकरांनी मोठ्या आवडीने केंब्रिज विद्यापीठ दाखवले. पुढे आयुकाचे काम पाहिल्यावर, आवडल्यावर पु. ल. आणि सुनीताबाई यांनी आयुकाला भरघोस देणगी दिली. त्यातून लहान मुलांसाठी एक नवी इमारत निर्माण करण्यात आली आणि कल्पक नारळीकर यांनी त्या इमारतीचे नाव “पुलस्त्य” ठेवले. पुलस्त्य हा सप्तर्षीमधील एक तारा आहे. पु. ल. आणि पुलस्त्य अशी छान सांगड घालण्यात आली.

पु. लं. बाबत अजून एक गमतीशीर किस्सा घडला आहे. नारळीकर यांचे लग्न व्हायचे होते. वयाच्या पंचविशीत पद्मभूषण मिळालेले (माझ्या माहितीत सर्वात कमी वयाचे पद्मभूषण) नारळीकर प्रसिद्धीपासून दूर राहायचा प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या भावी सासऱ्याने पु. लं. च्या “वाऱ्यावरची वरात”ची तिकीटे आणली होती. ‘मी नाटक पाहायला आलो आहे’, असा उल्लेख पु. ल. यांनी करू नये अशी जयंतरावांची इच्छा. मात्र खोडकर पु. ल. यांनी त्यांचा उल्लेख केलाच. त्यातही अशी गुगली टाकली की आज आपल्याकडे नारळीकर उपस्थित आहेत असे म्हणून नारळीकर बसले होते त्याच्याविरुध्द बाजूला नजर टाकली. आसपासचे प्रेक्षक शोधत बसले नारळीकर कुठे आहेत. 😂

जीवनाचा भरभरून आनंद घेणारे जयंत नारळीकर अतिशय हजरजबाबी. त्यांना एकदा विचारले गेले.. “पुनर्जन्मावर तुमचा विश्वास नाही. पण जर खरंच पुढचा जन्म घेताना पर्याय असेल, तर तुम्हाला काय व्हायला आवडेल?” नारळीकर उत्तरले “मला पुन्हा जयंत नारळीकर व्हायला आवडेल.” ❤️ एकदा त्यांना विचारले, “आर्यभट, भास्कर, ब्रह्मगुप्त ही नावे तुम्ही नेहमी वापरता. तुमच्यावर परंपरेचा पगडा आहे का?” नारळीकर म्हणाले, “या सर्वांनी सैद्धांतिक मांडणी केली होती. मात्र आर्यभटने सुरू केलेली परंपरा भास्करपर्यंतच संपली. दुर्बिणीने स्वतः तपासून पाहणाऱ्या गॅलेलिओच्या परंपरेचा मी पाईक आहे. “

मी खूप लहान होतो, तेव्हा ‘यक्षाची देणगी’ कथासंग्रह (पहिली आवृत्ती १९७९ सालची) वडिलांनी घरी आणला होता. वडिलांना का विकत आणावा वाटला, माहीत नाही.. पण मी आजवर त्याची किमान ५० वेळा तरी पारायणे केली आहेत. विशेष म्हणजे कागद अतिशय जीर्ण झाला असला तरी दर वेळेस आतील कथा ताज्याच वाटतात. हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या गणितज्ञाला अगणित पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात २००४ साली मिळालेला पद्मविभूषण आणि २०११ साली मिळालेला महाराष्ट्रभूषण यांचा समावेश आहे.

नारळीकरांचे एक वाक्य नेहमी वापरले जाते, “आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो का? असे जेव्हा मला विचारले जाते तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते. आश्चर्य यासाठी की ही व्यक्ती एकविसाव्या शतकात हा प्रश्न विचारत आहे. आणि खेद यासाठी की प्रश्न विचारणारी व्यक्ती भारतीय आहे. 😔 आगामी काळात असे प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या कमी होईल, अशी आशा आपण बाळगूया.. विज्ञानाचा प्रसार करू या.”

 जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘क्षण प्रेमाचा…’ – कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘क्षण प्रेमाचा…’ – कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

एक क्षण पुरेसा आहे, कोणाचं आयुष्य बदलून टाकायला. एखाद्या रस्त्यावरच्या भुभू च्या अंगावरून प्रेमाने, मायेने हात फिरवा… त्याचं प्रेम ते भुभु नक्की व्यक्त करेल. झाडं, पान, फुलं सगळ्यांना प्रेमाची भाषा व्यवस्थित समजते. मोकळ्या वातावरणात, मुक्तपणे वाढणारी झाडं आणि फुलं अधिक सुंदर, तेजस्वी भासतात… त्यांना वाढायला पूर्ण मोकळेपणा असतो… कोणाचं बंधन नसतं.. निसर्गाचं चक्र त्यांना अधिक तेजस्वी, अधिक बलवान बनवत. निसर्गाचं प्रेमच आहे तसं… हे ऋतुचक्र तसच तर ठरवल गेलं आहे की. खायला अन्न, प्यायला पाणी, सूर्यप्रकाश, सुखावणारा वारा, पक्षांचं गोड कुजन, फुलांचे वेगवेगळे आकार आणि सुगंध, गवताची… पानांची… वेलींची घनदाट सुखद अशी हिरवाई, पाण्याचं फेसळण… कड्या वरून झेप घेणं.. किनाऱ्यावर नक्षी काढणं… एखाद्या लहानग्या प्रमाणे खिदळत, अवखळपणाने पुढचं मार्गक्रमण करण…

… अस आणि किती अगणीत रुपात निसर्ग आपल प्रेम व्यक्त करत असतो. सगळ्या संतांनी पण सांगून ठेवलं आहे… भगवंत प्रेमाचा भुकेला आहे… त्याला मोठे समारंभ नकोत, फुलांची आरास नको, उदबत्यांचा गुच्छ नको, अवडंबर नकोच… एक क्षण त्याला द्यावा, ज्यात फक्त त्याची आठवण… त्याचेच विचार असतील. खूप मिळतंय आपल्याला… एक क्षण पुरे आहे ते सगळ अनुभवण्याचा, आणि व्यक्त होऊन देण्याचा.

तुमचा पैसा, शिक्षण, बुद्धिमत्ता प्रदर्शन कोणाला नको असतो… एक क्षण द्या तुमच्या प्रेमाचा… एक हसू, एखादा संदेश, एखादी मदतीची कृती… व्यक्त होण्याची पद्धत वेगवेगळी… पण माझ्या पद्धतीने झालं नाही तर ते कसल व्यक्त होणं… अस नसत हो. ही निसर्गाची, भगवंताची…. प्रेमाची हाक त्यांच्याच पद्धतीने होत असते… ती ऐकून घेण्याची संवेदनशीलता आपल्यात शोधून वाढवायला हवी…

… आपल्यातील हे प्रेम वाढवायला हवं… भगवंताची देणगी आहे ही.. !!

हे आपल्यातलं प्रेम वाढले ना… भगवंताबद्दल, निसर्गाबद्दल… जी प्रत्येक आत्म्याची गरज आहे… की आपण नक्की बदलायला लागू… स्वतःबरोबर इतरांना समजून घ्यायला सुरुवात करू, अहंकार मुक्त होऊ, स्वच्छ सात्विक होऊ, प्रेम मय, आनंदमय होऊ… या जगाला त्याची खूप गरज आहे, आपल्याबरोबर…

फक्त रोज एक क्षण हवा…

आनंदात रहा..

कवयित्री : सुश्री कौमुदी मोडक

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मनातलं ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मनातलं ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

रंगी बेरंगी भिरभीरी

जुहू चौपाटीला विकते,

कर्ण कर्कश पिपाणी 

छोट्याना खेचून आणते !

*

सरे सारी सकाळ तरी 

पत्ता नाही भवानीचा,

असून सुट्टी शनिवारची 

नाही गोंगाट पोरांचा !

*

रुक्ष माघाची काहीली

जीव करी कासावीस,

पेटली पायाखाली वाळू 

त्याचा वेगळाच त्रास !

*

प्राण आणूनिया डोळा 

वाट पाहे चिमुकल्यांची,

झाला नाही आज धंदा 

चुल कशी पेटायाची ?

चुल कशी पेटायाची ?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ऐरण ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ऐरण ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

एक घाव लोहाराचा, शंभर सोनाराचे 

जगण्याचे हे तंत्र शिकवती बोल ऐरणीचे ||

*
संकटाची जरी आली वादळे 

येतील तैसी जातील सत्वरे 

सौख्याचे बघ घर्मबिंदू हार अभिमानाचे ||

*
हातोड्या या अनेक येती 

घाव घालूनी तुटून जाती 

अभंग ऐरण शिकवी जगाला जिणे अभंगाचे||

*

या खेळाचे घटक दोन 

एक भाता अन दुसरा घण 

ठिणग्यांचे जरी वादळ भोवती बळ ये समर्थ्यांचे ||

कवयित्री : वर्षा बालगोपाल

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #273 – कविता – ☆ गीतिका – जलती रही चिताएँ… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी द्वारा गीत-नवगीत, बाल कविता, दोहे, हाइकु, लघुकथा आदि विधाओं में सतत लेखन। प्रकाशित कृतियाँ – एक लोकभाषा निमाड़ी काव्य संग्रह 3 हिंदी गीत संग्रह, 2 बाल कविता संग्रह, 1 लघुकथा संग्रह, 1 कारगिल शहीद राजेन्द्र यादव पर खंडकाव्य, तथा 1 दोहा संग्रह सहित 9 साहित्यिक पुस्तकें प्रकाशित। प्रकाशनार्थ पांडुलिपि – गीत व हाइकु संग्रह। विभिन्न साझा संग्रहों सहित पत्र पत्रिकाओं में रचना तथा आकाशवाणी / दूरदर्शन भोपाल से हिंदी एवं लोकभाषा निमाड़ी में प्रकाशन-प्रसारण, संवेदना (पथिकृत मानव सेवा संघ की पत्रिका का संपादन), साहित्य संपादक- रंग संस्कृति त्रैमासिक, भोपाल, 3 वर्ष पूर्व तक साहित्य संपादक- रुचिर संस्कार मासिक, जबलपुर, विशेष—  सन 2017 से महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9th की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में एक लघुकथा ” रात का चौकीदार” सम्मिलित। सम्मान : विद्या वाचस्पति सम्मान, कादम्बिनी सम्मान, कादम्बरी सम्मान, निमाड़ी लोक साहित्य सम्मान एवं लघुकथा यश अर्चन, दोहा रत्न अलंकरण, प्रज्ञा रत्न सम्मान, पद्य कृति पवैया सम्मान, साहित्य भूषण सहित अर्ध शताधिक सम्मान। संप्रति : भारत हैवी इलेक्ट्रिकल्स प्रतिष्ठान भोपाल के नगर प्रशासन विभाग से जनवरी 2010 में सेवा निवृत्ति। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय गीतिका गीतिका – जलती रही चिताएँ” ।)

☆ तन्मय साहित्य  #273 ☆

☆ गीतिका – जलती रही चिताएँ… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

बने रहो आँखों में ही, मैं तुम्हें प्यार दूँ

नजर, मिरच-राईं से, पहले तो उतार दूँ ।

*

दूर रहोगे तो, उजड़े-उजड़े पतझड़ हम

अगर रहोगे संग-संग, सुरभित बयार दूँ।

*

जलती रही चिताएँ, निष्ठुर बने रहे तुम

कैसे नेह भरे जीवन का, ह्रदय हार दूँ।

*

सुख वैभव में रमें,रसिक श्री कृष्ण कन्हाई

जीर्ण पोटली के चावल, मैं किस प्रकार दूँ।

*

चुका नहीं पाया जो, पिछला कर्ज बकाया

माँग रहा वह फिर, उसको कैसे उधार दूँ।

*

पानी में फेंका सिक्का, फिर हाथ न आया

कैसे मैं खुद को, गहरे तल में उतार दूँ ।

*

दायित्वों का भारी बोझ  लिए  काँधों पर

चाह यही हँसते-हँसते, जीवन गुजार दूँ।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares