☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ को गार्गी गुप्त अनुवाद-श्री सम्मान ☆
नई दिल्ली, 28 फरवरी। भारतीय अनुवाद परिषददिल्ली, प्रति वर्ष अनुवाद कार्य हेतु गार्गी गुप्त सम्मान प्रदान करती है। भारतीय विद्या भवन सभागार, नई दिल्ली में प्रख्यात साहित्यकार प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी को 2018-2019 के लिए डॉ. गार्गी गुप्त अनुवाद-श्री पुरस्कार संस्कृत – हिंदी – संस्कृत भाषा को आजीवन अनुवाद सेवा के लिए प्रदान किया गया।
उनके स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए यह सम्मान उनकी ओर से उनके सुपुत्र श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी ने स्वीकार किया।
उल्लेखनीय है कि प्रो. श्रीवास्तव ने संस्कृत के विश्व ग्रंथों भगवत गीता, रघुवंश , मेघदूतम के समस्त श्लोकों का हिंदी छंद बद्ध गेय काव्य अनुवाद किया है।
ये अनुवादित पुस्तकें संस्कृत मूल, हिंदी काव्य, हिंदी अर्थ के साथ प्रकाशित हुई हैं। प्रो. श्रीवास्तव ने बताया कि- “इससे संस्कृत नहीं जानने वाले भी इन अमर ग्रन्थों का काव्यगत आनंद उठा सकते हैं। उन्होंने कहा कि अनुवाद कार्य से दोनों ही भाषाओं का साहित्य समृद्ध होता है।”
गुरुवर प्रो. श्रीवास्तव जी की कई अनुवादित पुस्तकों का ई-अभिव्यक्ति में समय समय पर क्रमबद्ध प्रकाशन भी किया गया है।
💐 ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से गुरुवर प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी को इस सम्मान के लिए हार्दिक शुभकमनाएं 💐
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈
सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.
ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.
एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,
भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।
अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।
११/७०८
ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण
निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.
” अगं नातवाचं लग्न ठरलं खुश आहेस ना.. मग आता घे तुला एखादी चांगली पैठणी”
” अगोबाई माझ्यासाठी एकदम पैठणी.. आज राजा बराच उदार झालेला दिसतोय”
“तसं नाही ग.. एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असलं की बरीच वर्षे तु तो लग्नातला शालूच नेसत होतीस… त्यावरून कोणीतरी तुला बोललं होत…. तर घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे.”
“जाऊदे हो.. पूर्वीच ते सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत.. आहे त्यात भागवत होतो… आपल्याला कुठे नव्या साडीचा खर्च झेपणार होता?”
” हो ग साध्या दोन खुर्च्या घ्यायच्या म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण..”
” ओव्हरटाईम करून त्या पैशातून अचानक तुम्ही स्टीलच्या एक डझन मोठ्या प्लेट आणल्या होत्या. भिशीला मी त्या काढल्या तेव्हा सगळ्याजणी चकित झाल्या होत्या”
” तुझ्या अजून ते आठवणीत आहे…. त्या प्लेट घेऊन घरी येताना त्या बघून तू किती खुश होशील हेच माझ्या मनात होतं”
“आता ती गरिबी वाटते. पण तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसतंखेळतं सुखाचा केला…”
” पहिल्यांदाच आपण केलेली हाॅटेलात रहायची अशी तीन दिवसांची कोकणातली ट्रीप आठवते का? समुद्र बघून तुला किती आनंद झाला होता….”
” हो तर… माझ्या सगळं लक्षात आहे नंतर परदेशातही जाऊन आलो. पोरं शिकली भरून पावलो….”
त्या सुखद आठवणीनी डोळे डबडबलेच… आजकाल असंच व्हायचं…
जरा काही जुन्या आठवणी आल्या की रडूच यायचं…..
” तू पहिल्यांदा इडली केलीस आणि कुकरला शिट्टी तशीच राहिली त्या कडक इडल्या आठवतात का?”
यावर मात्र रडता रडता ती हसायला लागली…
” तरी म्हटलं बाबा अजून बोलला कसा नाही… अहो नंतर शिकले की सगळं. हॉटेल सारखे डोसे करून घातले. पिझ्झा बर्गर पण शिकले. ते बरं आठवत नाही…..”
नाही म्हटलं तरी आवाज जरा तापलाच तिचा….
” अगं जरा थट्टा केली तुझी… लगेच काय चंडीकेचं रूप धारण करायला नको……”
” मी पण गंमत केली हो तुमची…. अहो उद्या तर काय म्हणे तो प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे”
” अग तू हे एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस मला आश्चर्यच वाटते आहे”
” अहो पेपरात त्याचं बातम्या आहेत. गुलाब खूप महाग झाले आहेत असं पण लिहिलं आहे”.
” अग आपल्याला हे असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाही. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणे.. हीच आपली प्रेमाची व्याख्या होती.”
“हो… हे मात्र खरं…. कितीतरी वेळा तुम्ही मला सांभाळून घेतलंत.. आधार दिलात… संकटप्रसंगी माझ्यामागे खंबीर उभे राहिलात… आपल्या वेळेस असे गुलाब नव्हते. कधीतरी ऑफिसातून येताना तुम्ही गजरा आणला तरी पण मन मोहरून जायचं… खरं सांगू का म्हणूनच मी आत्ता शांत आहे..”
बोलता बोलता तिचे डोळे भरूनच आले…
तेवढ्यात मुलगा आला म्हणाला,
” अग आई झालं का विष्णू सहस्त्रनाम म्हणून? रात्र झाली आता.. झोप ना..”
” अरे हो का… बराच वेळ झाला कळलंच नाही रे झोपते”
बेडरूममध्ये आल्यानंतर मुलगा बायकोला म्हणाला,
” हल्ली आईचं काय झालंय कळत नाही खूप वेळ रात्री देवाचं म्हणतं बसते”
” हो ना… पूर्वी दिवसा म्हणत असत.. बाबा गेल्यानंतर आता हे रात्री स्तोत्र म्हणणं का सुरू केलं आहे… हे कळत नाही…”
मुलांना कधीच ते कळणारही नव्हते.
ती आज थोडी हळवी झाली होती. पण नवऱ्याशी खूप वेळ गप्पा झाल्याने तृप्त समाधानी होती.
त्यानी बोललेले शब्द हे नुसते हवेत विरलेले नव्हते… ते अंतःकरणापासून म्हटलेले निखळ.. सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळेच हृदयाच्या खोल कप्प्यात तिने ते शब्द जपून ठेवले होते. अशीच कधीतरी आठवण काढून ती त्याचा पुनःपुन्हा आनंद घ्यायची…
त्याच्यावरच तर ती जगत होती…
नाहीतरी भाळणं काही दिवसांचं असतं सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं…..
म्हणूनच लांब गेला तरी तीच्या जवळच होता ना तो……. अगदी आत्ताही….
(कोकणात जन्म घेण्याचं आपल्या हातात नसतं पण त्या नंत्तर ही कोंकणी होण्याचं किंवा कोकणी माणसांशी एकरुप होण्याच सौभाग्य मात्र नक्की मिळू शकतं. पश्चिम महाराष्ट्रातील एका सरकारी कर्मचारी महिलेची आपल्या कर्मभुमी कोकणाविषयीची सुंदर पोस्ट.)
माझं जन्म गाव, शिक्षण सगळं सांगली जिल्ह्यातील आहे. पण माझी कर्मभूमी कोकण आहे.. जन्मभूमी म्हणून ओढ आहे, पण मी कोकण शिवाय जगू शकत नाही… मी कोकणाशिवाय राहू शकत नाही… कारण, कारणं तर खूप आहेत..
कोकणात सगळ्या चालीरीती आहेत ना त्या सगळ्या मानवाला आनंदी ठेवणाऱ्या आहेत, जगण्याचा सोहळा करणाऱ्या आहेत…
इथला बाप कधी हुंडा देत नाही, अन हुंडा घेत नाही… त्यामुळे मुलीला जन्म देण्यापूर्वी तपासणी करत नाही.. जन्माला येईल ते अपत्य तेवढ्याच प्रेमाने वाढवतो…
इथं मुलींना सासुरवास नसतो, सून नोकरी करणारी असेल तर, सासू तिच्या हातात डबा तयार करून देते, किंवा सासरे डबा पोचवायला ऑफिस मध्ये येतात हे मी स्वतः पाहिले आहे…
इथली लोकं खूप कष्टाळू आहेत, एक ग्लास तांदुळाच्या पिठीच्या 20 आंबोळ्या(घावन) टाकून घर जेवू घालते इथली बाई..
फणसाच्या अठळ्या शिजवून प्रोटीन देते सगळ्या घराला..
इथला शेतकरी, रस्त्यावर दूध ओतणार नाही, निषेध म्हणून ते दूध गावभर फुकट पोहचवून येईल!
आंब्याचं नुकसान झालं तर रस्त्यावर आंबे नाही फेकणार.. त्याला अन्न म्हणजे पूर्णब्रह्म आहे हे माहीत आहे!
पुरात, वादळात नष्ट झालीत झाडं.. वीजेच्या तारा तुटल्याने महिना महिनाभर वीज नव्हती… पण, आरडाओरडा न करता, एकमेकांनी श्रमदानातून नवीन झाडांची लागवड केली…
एकदा पीक गेलं की शेतकऱ्यांचं एक वर्षाचं नुकसान होतं.. पण, इथं वादळात, 60-70 वर्षांची झाडं उन्मळून पडली, तरीही चिकाटीने नवीन बाग रोवली…
मागच्या वादळातली बाब.. कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते, वादळामुळे सगळं ठप्प… मनात विचार केला, की याच जनतेने दिलेल्या महसूल करामधून दरमहा पगार मिळतो, त्यातला थोडा भाग त्यांच्यासाठी देऊ! मग आम्ही ZP तल्या कर्मचाऱ्यांनी/अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एका रात्रीत 2. 50 लाख रुपये वर्गणी जमा केली, अन त्या लोकांपर्यंत पोचलो अन त्यावेळी त्यांच्या मनातलं जाणलं, हृदय जाणलं!
त्यांचं म्हणणं एकच,”माझ्या पणजोबाची बाग, त्यांनी लावली म्हणून मी खाल्ली, आता मी लावली तर माझे वारस खातील…”
कोकणात मुलगा मुलगी भेदच नाही, पोरापोरींना समान न्याय आहे… मुलीने प्रेम प्रकरण केले तर खानदान की इज्जत जाते वगैरे असे प्रकार इथे फारसे दिसत नाहीत! पोराने परजातीतील मुलीशी लग्न केलं म्हणून त्याचं तोंड आयुष्यभर बघणार नाही, असली फालतू कट्टरता इथं नाही… आपलीच पोरं म्हणून आईवडील त्यांना डोळसपणे समजून घेतात आणि मुलही स्वातंत्र्य मिळूनही संस्कारांच्या बाहेर कधी जात नाहीत. आईवडिलांना कमीपणा देत नाहीत.
येथली लोक बारीकसारीक भांडणावरून कोर्टात जातील पण, खून पडणार नाहीत…
कायद्यावर, प्रशासनावर खूप विश्वास आहे इथल्या लोकांचा… नियमात वागतील अन नियमात काम करून घेतील…
जीव लावणे, घासातला घास देणे हे कोकणात शिकावे..
इथं मी कामानिमित्त रात्री 3 वाजता सुध्दा एकटी फिरले आहे, अजिबात भीती वाटत नाही.. इथं स्त्रीचा खूप सन्मान राखला जातो..
मी स्वतः पाहिलंय, एका माणसाचे दुकानातून घेतलेले गहू, रस्त्यावर सांडले.. तर लोकांनी त्यावर गाड्या न घालता, 3-4 जणांनी गाडी थांबवून उतरून गहू जमा करून भरून दिले!
आम्ही सरकारी कर्मचारी सुध्दा, आपण या जनते साठी आहोत याची जाण ठेवून लोकाभिमुख काम करतो!
सरकारी कर्मचाऱ्यांना किलोभर तांदूळ, 4 आंबे, 2 नारळ, कुळीथ.. ही प्रेमाने दिलेली भेट इथं मिळते… त्यात गरिबांचे प्रेम असते..
भाऊंनो, बाईंनो अशी प्रेमाने हाक असते..
मी 18 वर्षे कोकणात एकटी, माझं लहान मूल घेऊन राहिले, मूलगा आता 21 वर्षाचा आहे… पण, मला कधी इथं असुरक्षित वाटलं नाही… उलट नारळातल्या गोड मलाईसारखा स्नेहच मिळाला.
माझे शेजारी अन माझे कार्यालयातले सहकारी यांनी माझी कधीही अडचण निर्माण होऊ दिली नाही…
मी आजारी असताना औषधे आणून देणे, मी बाहेर असेल तर माझ्या घरात दूध भाजी पोचवणे, गाडी बंद पडली तरी ती त्या स्पॉट वरून नेऊन परत घरापर्यंत आणून देणे… सगळं घरपोच सेवा देणे हे सगळं इथली लोक आपुलकीने करतात…
इथल्या माणसांच्यात निसर्गतःच प्रेम आहे.. ओल्या नारळाची स्निग्धता आहे. हापुस सारखा स्वभावात राजबिंडेपणा आहे.
खळाळत्या झऱ्यासारखं जगणं..
धो धो पावसासारखे प्रेम बरसणार..
हिरव्यागार डोंगर दऱ्या प्रमाणे काळीज हिरवंगार…
अथांग समुद्राप्रमाणे विशाल काळजाची माणसं…
फणसाचे गोड गरे, तशी गोड माणसं..
रातांबे जसे लाल, तशी रंगीत माणसं..
करवंद, जांभळे, तुरट गोड… तशीही काही मंडळी
गणेशोत्सव, शिमग्याची (होळी) गोष्टच न्यारी… माणसाला वर्षातून बेधुंद होऊन नाचणं हवं, त्यासाठी हे उत्सव..
एकमेकांना मदत करून जीवन जगतात इथली माणसं…
अन मग… मी पण इथलीच झाले आहे… माहेराहून येताना, साखरप्याच्या हद्दीत गाडी आली की माझा श्वास मोकळा होतो..
हातखंबाच्या तिठ्यावरून रत्नागिरीत शिरलं की माझ्या कानात आपुलकीचं वारं भरतं
या मातीत मिसळून जायची तयारी आहे…
मी रिटायर्ड झाले तरी, जग फिरत राहीन पण जग फिरून पुन्हा कोकणातच येईन…
माझं घर आहे इथं…
प्रोमोशन झाले तरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मध्ये घेईन… पण कोकण नाही सोडणार.
(तळटीप: चांगलं वाईट सगळीकडे असतं, अपवादात्मक बाबी सगळीकडे असतात, पण कोकणात मी खूप सुखी आहे. कारण धरतीवर कुठे स्वर्ग असेल तर तो कोकण आहे.)
लेखिका : सुश्री प्रतिभा देशमुख
रत्नागिरी
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बालपण – शिक्षण – नोकरी – कारकून – प्रमोशन – साहेब – हाताखाली चार हुजऱ्ये –
बायको खुश – मुलं खुश –
इकडे तिकडे चोहिकडे –
आनंदी आनंद गडे…
🌸
🙂५०-६० समाधान !
वरची श्रेणी – पगार – निवृत्ती – निरोप समारंभ – पेन्शन – ग्रॅच्युइटी – मुलगा, मुलगी – दोघंही IT त – चांगली नोकरी – जावई भला – सगळे पाच, सहा आकडी पगार वाले – दोन नातवंडं – साठीशांतीला कधी नाही ते बायकोचे पण कौतुकाचे चार शब्द – स्वतःचा दुमजली बंगला -”समाधान निवास !”
🌸
😊 ६०-७० बोनस !
“साठी झाल्येय् असं वाटतंच नाही तुमच्याकडे बघून !” लोकांचं मत – माझी कॉलर ताठ – मलाही तसंच वाटतं – देवाच्या दयेने तब्बेत छान – काही म्हणता काहीही तक्रार नाही – आता कधी तरी सर्दी, पडसं, खोकला हे पाहुणे अधूनमधून यायचेच – काही वेळा खोकला मात्र हटता हटत नाही – आता सत्तरीही जवळ आल्येय्. मध्येच कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटतं! पण तरीही जगायचा कंटाळा आलेला नाही. देवानं मोठ्या उदारपणानं ही बोनस वर्षं दिल्येत, ती नाकारायची कशी ??
🌸
😔 ७०-८० नाईलाज !
सत्तरी झाली तेव्हाच वाटलं होतं, आता बस् झालं की! आता खरं म्हणजे पोथी गुंडाळून फळीवर किंवा कोनाड्यांत ठेवली जावी, हीच इच्छा. आज्ञा झाली की प्रस्थान कधीही हलवण्याची तयारी आहे. तरी पण आपल्या हातांत काय असतं? मुला-नातवंडांनी मोठ्या उत्साहाने पंच्याहत्तरी साजरी केली. पण, त्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून, मी केवळ नाईलाजाने सगळ्यांत भाग घेतला.
दाढी, अंघोळ, यांसारख्या रोजच्या कामांचा सुद्धा आताशा कंटाळा येऊ लागलाय्.
आता कोणतीही गोष्ट केवळ नाईलाज म्हणून करायची !
नाईलाज – नाईलाज – फक्त नाईलाज —
🌸
😖 ८०-९० आत्मनिर्भत्सना !
कशासाठी जगतोय तेच कळत नाही. आता कशातच राम वाटतं नाही. ओझं तरी किती दिवस टाकायचं दुसऱ्यांवर? एकदा आणि एकदाचं संपव रे बाबा !
🌸
😵💫 ९०-१०० शापित भूत !
घरातील बाकीचे :
गेले अडीच तीन महिने असेच निपचित पडलेलेच असतात. जवळजवळ वीस-बाविस दिवस हॉस्पिटलमध्ये होते. नंतर डॉक्टरच म्हणाले की आता घरीच घेऊन गेलात तरी चालेल. डॉक्टरी इलाज संपले. आता कळत पण काहीच नाही. काय करायचं आपण तरी? वाट बघणे एवढेच आपल्या हातात !!!
☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
खरंच आम्ही वांझ आहोत…
(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.)
“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”
“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.
“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.
“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले
”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.
…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.
रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.
आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.
परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.
काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…
… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”
सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.
शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.
सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…
“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”
जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.
मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.
मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.
… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.
– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.
– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.
मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.
पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.
… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…
म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.
योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….
इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।
माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि विज्ञानाचे मर्म…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे.
राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की, अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा पहिला नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकात प्रसिद्ध झाला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी मग तीच मुक्ररर झाली. तोच आज आपण साजरा करत असतो, तो हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
विज्ञान म्हणजे काय?
एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा- विज्ञान, वैज्ञानिक. तुमच्या डोळ्यांपुढे कसल्या प्रतिमा येतात? चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकडय़ांची गिचमिड, पृथ्वीभोवती गरगरणारे तारे, ग्रह, धुमाकेतू, आकाशात होणारी ग्रहणे, फ्रिज, टीव्ही, मोबाईल फोनसारखी दररोजच्या वापरातील अत्याधुनिक उपकरणे, पांढऱ्या कोटातले रुबाबदार किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे दिसणारे शास्त्रज्ञ… आणि मनात कुठले शब्द येतात? न्यूटन, आइनस्टाइन, निरीक्षण, प्रयोग, सिद्धांत, प्रमेय. हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे; पण विज्ञान याच्यापलीकडेही आहे. विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास तर—
१. विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञानसंपादनाची एक पद्धतही आहे.
२. विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.
३. सृष्टीतील रहस्य उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही, तर सत्याचे एक पाऊल पुढे पडलेले असते. अशाप्रकारे विज्ञान हे निरंतर सत्याचा शोध घेत असते.
४. विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती-निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.
५. सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच शेकडो शतकांपासून लाखो-करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत, त्यात आपले योगदान देऊन विज्ञानाला आणि स्वत:लाही समृद्ध करत आली आहेत. हा ‘खेळ’ तो खेळणाऱ्यांसाठी जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे.
वैज्ञानिक पद्धत कशी असते?
काय आहे ही पद्धत? सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. नंतर त्याकडे जाण्याचा आरंभिबदू म्हणजे गृहीतक ठरविणे. त्यानंतर या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता… प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष यांच्या साखळीतून शोधणे. येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहीतक व संशोधन पद्धत परत परत तपासून पहात पुन्हा नव्याने सुरुवात करणे. आपले गृहीतक चुकीचे आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणे. जर अनेक प्रयोगांनी चुकीचे ठरले नाही तरच ते गृहीतक स्वीकारणे आणि वैज्ञानिक सिद्धांत तयार करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते. तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयाचा जर आपण अलिप्तपणे विचार केला नाही, तर जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी अचूकपणे करणे आपल्याला शक्य होणार नाही. त्यातून मग छद्मविज्ञानाची निर्मिती होईल. छद्मविज्ञानात आपण निष्कर्षाला पूरक असे प्रयोग करत जातो. त्यामुळे विज्ञानाची हानी तर होते पण लोकांमध्ये अंधश्रद्धाही बळावतात.
विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्त्वांचे उपयोजन मानवी जीवनातील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, ते अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण ‘तंत्रज्ञान’ म्हणतो. या वैज्ञानिक तत्वांची आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी पृथ्वीवरील लाखो व्यक्तींद्वारे होत असते. त्यातील कोणताही तुकडा सुटा नसतो, तर तो इतर तुकडय़ांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते… असायला हवी. विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया यांच्याशी त्याचे नाते शोधणे याचेच नाव विज्ञान. आणि ते सत्य शोधून काढण्याच्या पद्धतीचे नाव वैज्ञानिक पद्धत.
खऱ्या वैज्ञानिक पद्धतीमुळेच आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडले आहे. स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञाचे नाव आपण ऐकले असेलच. त्यांनी केलेल्या निरीक्षण प्रयोगांद्वारे हे सिद्ध केले आहे की, हे विश्व भौतिक आणि रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे या विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या सगळ्या घटना आणि यापुढे भविष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनाही भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचा परिपाक आहेत आणि असणार आहेत. म्हणूनच या विश्वाचा कोणी निर्माता नाही. हे विश्व भौतिक-रासायनिक नियमांनी बद्ध असल्यामुळे स्वयंभू आहे. या घटना विविध पातळीवर निरंतर घडत राहत असतात आणि म्हणूनच विज्ञानसुद्धा निरंतर असते.
थोडक्यात काय तर, विज्ञान ही एक सत्याचा शोध घेण्याची पध्दत वा प्रक्रिया आहे. वैज्ञानिक सत्य हे सर्वांनाच एकसारखे लागू पडते. अमुक एक ह्या धर्माचा, ह्या वर्णाचा, गटाचा, पंथाचा, म्हणून त्याच्यासाठी हे वैज्ञानिक सत्य, तमुक एक त्या धर्माचा, वर्णाचा, पंथाचा म्हणून त्याच्यासाठी वेगळे वैज्ञानिक सत्य हे असे घडत नसते. म्हणून विज्ञानाने शोधलेले सत्य हे कोणीही नाकारू शकत नाही. विज्ञानाची सत्ये सर्वकालीक असून जगभर सर्वांना सारखीच लागू पडतात. तसेच ती सर्वमान्य असतात. कारण ते कोणालाही पडताळून पाहता येते. म्हणून आपण आपले जगणे, राहणे, वावरणे या वैज्ञानिक सत्याच्या प्रकाशातच पारखून घ्यायला पाहिजे. आपले जीवन वैज्ञानिक सत्याशी सुसंगत ठेवले पाहिजे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?
कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे किंवा दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासून पाहणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोण. अशी एकदम साधी-सोपी व्याख्या करता येईल. किंवा असंही म्हणता येईल की, जेवढा पुरावा उपलब्ध आहे तेवढाच विश्वास ठेवणे. एखादी गोष्ट सत्य आहे का नाही यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोण”निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग.” या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची विज्ञानाची ही पद्धत आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आपली दृष्टी कशी प्रगल्भ होते हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया…
वैज्ञानिक दृष्टिकोन शब्दप्रामाण्य म्हणजे कुणी एका मोठ्या व्यक्तीने सांगितले म्हणून खरे मानायचे, हे नाकारतो. वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रन्थप्रामाण्य म्हणजे कुणाच्या तरी पुस्तकात लिहलंय म्हणून ते चिकित्सा न करता स्वीकारणे नाकरतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हे चमत्काराचा दावा करणाऱ्या लोकांना मूर्खात काढण्याचं प्रभावी साधन आहे. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मुर्ख असतात आणि याला विरोध न करणारे भ्याड असतात. चमत्करामागे हातचलाखी वा विज्ञान यापैकी काहीतरी एक असते. जगात सुष्ट शक्तिमुळे चांगले आणि दुष्ट शक्तिमुळे वाईट घडते असे अजिबात होत नाही. जे काही घडते त्यामागे निश्चितच कारण असते, आणि ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्याच आधारे शोधता येते.
विज्ञानाचे मर्म काय —
– – तेव्हा विज्ञानाचे मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवा…
☆ “आणखी एक सिद्धार्थ (अनुवादित कथासंग्रह)”– मूळ हिन्दी लेखिका : सुश्री प्रतिमा वर्मा – अनुवादिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : आणखी एक सिद्धार्थ – ( अनुवादित कथासंग्रह )
मूळ लेखिका : प्रतिमा वर्मा
अनुवाद : उज्ज्वला केळकर.
प्रकाशक : महाकवी एंटरप्राईजेस.
पृष्ठे:२०८
किंमत :४२०/—
२०२२ साली नव्याने प्रकाशित झालेला, मूळ लेखिका प्रतिमा वर्मा यांचा अनुवादित कथासंग्रह”आणखी एक सिद्धार्थ” नुकताच माझ्या वाचनात आला. या कथासंग्रहाचा अनुवाद सुप्रसिद्ध लेखिका आणि कवियत्री माननीय सौ. उज्वला केळकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारक रीतीने केलेला आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक हिंदी कथासंग्रह व इतर साहित्याचं अनुवादित लेखन मी वाचलेले आहे आणि मला ते आवडलेलं आहे. त्यापैकीच”आणखी एक सिद्धार्थ” हे पुस्तक.
सौ. उज्ज्वला केळकर
मा. उज्वला ताई त्यांच्या इतर भाषेतील साहित्याचा अनुवाद करण्याच्या भूमिकेबद्दल मनोगतात म्हणतात,
”अनुवादरूपाने का होईना इतर भाषेतील दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता येतो. त्या त्या समाजाच्या धारणा, वर्तन प्रणाली, संस्कृती याचाही अनुभव घेता येतो.”
साध्यर्म आणि वैधर्म जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांना आवडलेल्या विशेष करून आशय – विषय मांडणीच्या अनुषंगाने जवळच्या वाटलेल्या हिंदी कथांचा मराठी अनुवाद करून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस खरोखरच स्तुत्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या प्रतिमा वर्मा यांच्या कथासंग्रहात आठ दीर्घकथा आहेत. प्रतिमा वर्मा या मूळच्या पाटणा बिहार इथल्या रहिवासी. १९७० पासून त्यांनी स्वतंत्र लेखनाला सुरुवात केली आणि अनेक साहित्यप्रकार विविध माध्यमातून प्रकाशित केले. प्रतिमा वर्मांच्या बहुतेक कथा या स्त्री केंद्रीत आहेत. मात्र त्यातील स्त्री दर्शन हे विविधरंगी आहे. त्यांच्या कथेतल्या स्त्रिया मुक्त असल्या तरी विचारी आणि खंबीर आहेत. मानसिक आणि भावनिक पातळीवर आधार मिळण्याचे सामर्थ्य त्यांच्याच आहे. प्रतिमा वर्मा यांचे लेखन तरल आणि संवेदनशील आहे. त्यात नुसतीच कल्पनारम्यता नसून वास्तवतेचे रेखाटन आहे आणि या कथांचा अनुवाद करताना उज्वला ताईंनी लेखनाचा गाभा, आशय त्याच प्रभावीपणे जपण्याचे भान आणि समतोल दोन्हीही राखलं आहे. उज्ज्वलाताईंचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व लक्षवेधी आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या कथासंग्रहातील आठही कथा वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. वास्तविक कथानकं ही नेहमीच्याच सामाजिक, कौटुंबिक अथवा भावभावनांचं विश्व उलगडवणारं असलं तरी या सर्वच कथा वाचकाला जगत असणाऱ्या नेहमीच्या जीवनापलीकडचं जीवन, वेगळं भावविश्व अनुभवायला भाग पाडतात. एका वेगळ्याच स्तरावरचं सुंदर, सूत्रबद्ध लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. सुरुवात मध्य आणि शेवट अशा नियमबद्ध साच्यातल्या या कथा नसून त्या वाचल्यानंतर मनात काही प्रश्न ठेवून जातात. जिथे कथा संपते तिथूनच ती पुन्हा सुरू झाल्यासारखे वाटते हे या कथांचं वैशिष्ट्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” ही कथा एका श्रीमंत बापाच्या शाळकरी मुलाची मनोविश्लेषणात्मक कथा आहे. चांगल्या शिक्षण प्राप्तीसाठी भरपूर पैसा असलेल्या अनुपम नावाच्या मुलाच्या पैसेवाल्या, प्रसिद्ध वकील बापाने त्याला महागड्या रेसिडेन्सी स्कूल मध्ये ठेवलेले असते पण तिथे आलेल्या अत्यंत वाईट अनुभवामुळे त्याच्या बालमनावर परिणाम होतो. या वाईट अनुभवात शाळेतल्या गुंड मुलांनी त्याच्या मित्राची निर्घुण हत्या केलेली असते आणि या विरुद्ध लढण्या ऐवजी शाळेचे व्यवस्थापन केवळ पैशाच्या लोभाने प्रकरण दाबून टाकतात. दुसरा वाईट अनुभव म्हणजे शिक्षकाकडून.. ज्याची प्रतिमा खरोखरच चांगला शिक्षक अशी असते आणि त्याच्याकडून अनुपमचे लैंगिक शोषण होते. परिणामी अनुपम सारखा मूळचा हुशार विद्यार्थी मनोरुग्ण होतो. या घटनेचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊन तीन वेळा नापास झाल्यामुळे शाळेतून त्याला डी बार केले जाते. याच दरम्यान त्याला त्याचे वडील जे आदर्श वकील वाटत असतात तेही गुन्हेगारांना सोडवण्याच्या धंदा करून अमाप पैसा मिळवत आहेत हे कळल्यावर त्याच्या मनाचा उद्रेक होतो आणि अखेर एक नापास केडरचा मुलगा असला तरी वाईट कर्मांची साथ देणाऱ्या त्याच्या डॅडी समोर तो ताठपणे उभा राहून त्यांना”तुम्हाला शरम वाटली पाहिजे.” असे तो म्हणू शकतो आणि त्याचवेळी कोमेजलेलं त्याचं मन मुक्त होतं. स्वप्नात भयभीत होणारा हा मुलगा क्षणात भयमुक्त होतो. आणि मग तो काहीतरी स्वतःशीच ठरवून घराबाहेर पडतो. पिंजरा तोडून बाहेर येतो. मुक्त होतो. अशी अतिशय सुंदर संवेदनशील बालमनाची ही एक प्रौढ कथा आहे.
दूरस्थ या कथेतल्या या ओळी मला फार आवडल्या.”इतक्या वेळानंतर मला वाटू लागलं की मी घराचा मालक आहे. माझ्याविना काही जरुरीची कामं खोळंबून राहू शकतात. प्रेम किंवा रोमान्सने पूर्णपणे झाकून टाकता येईल इतका जीवनाचा फलक लहान नाहीच मुळी. जीवनाचे अनेक पैलू आहेत,”
ही कथा दोन व्यक्तींची आहे. एक स्त्री आणि एक पुरुष. त्यांचे एकमेकांशी लग्न झालेलं आहे पण मुळातच हे लग्न दुसऱ्यांची मनं सांभाळण्यासाठी झालेलं आहे. एका वेगळ्याच नात्याची कथा वाचताना मन थकून जाते. या कथेतल्या स्त्री पात्राची सक्षमता मनाला समाधान देते.
तिचं हसू ही एका कुरूप उपेक्षित आणि प्रत्यक्ष आईकडूनच अवहेलना सहन करत जगणाऱ्या स्त्रीची हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या कथेतल्या पात्रांचे विविध प्रकारचे भावनिक स्तर वाचताना मानवी जीवनाचे अनेक पैलू वाचकांसमोर येतात. ही सुद्धा एक अतिशय सुंदर कथा आहे.
राख ही पती-पत्नीच्या विस्कटलेल्या नात्याची कथा आहे. या कथेतले भावबंध वाचताना मन घायाळ होते. पुरुषाचं मन आणि स्त्रीचं मन याचे वास्तव रूप या कथेत अनुभवायला मिळतं. असहाय्यता, प्रेम, पर्याय नसणारी स्थिती आणि त्यातूनच निर्माण होणारी घृणा, तिरस्कार, हतबलता आणि तटस्थता याचे सुरेख मिश्रण म्हणजे ही कथा. वाचायलाच हवी अशी.
दिलासा या कथेत एका लष्करातल्या बेपत्ता जवानाच्या बापाच्या मनाची घालमेल आणि त्याच वेळी गावातल्या एका शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी जमलेलल्या जनसमुदायाचे वर्णन आहे आणि त्या अनुषंगाने समाज, सरकार, आजची तरुण पिढी यांची सीमेवर लढणाऱ्या सैनिकाविषयीची जी भावना, जी मानसिक गुंतवणूक अनुभवायला मिळावी अशी अपेक्षा असताना नेमके त्या उलट सामाजिक चित्र दिसावं याची खंत आणि केंद्रस्थानी सीमेवर बेपत्ता अथवा युद्धकैद्यांच्या यादीत नाव असणाऱ्या जवानाच्या वृद्ध बापाची प्रचंड मानसिक यातायात अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. ही कथा वाचताना वाचकालाही सूक्ष्मपणे अपराधाची जाणीव पोचत राहते. या तुटलेल्या बापाला निदान देशासाठी लढणाऱ्या त्याच्या मुलाची दिलासा देणारी एखादी खबर मिळावी असे वाटत राहते.
काळा त्रिकोण या कथेचं शीर्षक वाचल्यावरच या कथेतला विषय कळतो. ही एक प्रेमकथाच आहे आणि या प्रेमकथेतही त्रिकोण आहे. तीन व्यक्तींभोवती ही प्रेम कथा गुंफली आहे वरवर हा विषय नेहमीचाच वाटत असला तरीही या कथेत टिपलेली मनामनाची वादळे हही विलक्षण वाटतात. या प्रेमात कुठलीही स्पर्धा, द्वेष, मत्सर चढाओढ अथवा फसवणूक नाही. एका वेगळ्याच उंचीवरची कथा ही आहे. या कथेच्या शीर्षकाबद्दल मी काही सांगण्यापेक्षा कथा वाचून वाचकाने त्यातला गर्भितार्थ शोधावा एवढीच अपेक्षा.
एकंदरीत विचारांचं आणि समर्थ भाषेचं सौंदर्य प्रत्येक कथेत जाणवतं. कधी विधानातून तर कधी संवादातून.
दूरस्थ या कथेत तो तिला विचारतो,”तुला पुरुषाची गरज वाटत नाही का?”
तेव्हा ती उत्तर देते,
“वाटते की. पण जिला मन मारायची सवय लागली आहे तिच्या बाबतीत हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. प्रेम हे असं गीत आहे की जे प्रत्येक वाद्यावर गाता येत नाही. मी दुसऱ्या प्रकारचं वाद्य आहे असं समजा.”
राख या कथेतील नायिका तिच्या जीवनात हरलेल्या पतीला ठामपणे सांगते,”तुम्ही गरीब यासाठी नाही की तीन चारशे रुपयात तुमचं भागत नाही. तुम्ही गरीब यासाठी आहात की आपल्या इच्छा, आपली स्वप्नं, आपलं व्यक्तिमत्व तुम्ही हरवत चालला आहात. संतपणाचा अभिमान बाळगताना अकिंचन असल्याचा जाणीवेतून तुम्ही सुटू शकत नाही.
“प्रेतावर एक मण लाकडाचे ओझं काय नि नऊ मण काय.. काय फरक पडतो. तुमचे जितक्या मर्यादेपर्यंत पतन झाले त्याच्या खाली कोणतीच पातळी नाही. मृत्यूची सुद्धा नाही.”
सांजवात या कथेत जयंतीच्या मनातले विचार किती सुंदर आणि परिणामकारक शब्दात लिहिले आहे ते बघा.”आत्मीयतेच्या ओलाव्याने भरलेला गोपू तेल वातीने ओथंबलेल्या दिव्यासारखा आहे. त्याच्या स्वप्नांची वात चेतवायला हवी. चिरा गेलेल्या दिव्यात मनोबलाची स्नेहधारा भरायला हवी.”
असाच एक आणखी सुंदर वास्तविक विचार.
“आपण जळू लागलात तर प्रथम काय फेकाल? शरीराची कातडी की परिधान केलेले नैतिकतेचे कपडे?”
“क्षणाच्या छोट्याशा अंगठीतून अनुभूतीचं पुरच्या पुरं ठाणंच खेचून निघतं. ढाक्याची मलमल तरी इतकी बारीक असेल?”
“तू भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की मला एक परिपूर्ण स्त्री हवी आहे जिच्याजवळ हृदय, बुद्धी, समज, शक्ती आहे केवळ चेहरा नाही.”
अशा अनेक सुंदर विचारांची शाब्दिक रोपटी, फुलं या कथासंग्रहात जागोजागी फुललेली आहेत. अर्थपूर्ण संवाद, चपखल उपमा ही सौंदर्यस्थळे यात अनुभवता येतात. वाचताना मन कधी व्यथित होतं, कधी उद्युक्त होतं, प्रोत्साहित होतं, आनंदी समाधानी होतं. कथासंग्रह वाचताना वेगवेगळ्या मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडतो.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही खूप बोलकं आहे. कृष्णधवल रंगातलं हे चित्र परिणामकारक आहे. शीर्षक कथेशी संबंध दर्शविणारं आहे. मुठीतून दिसणारी खिडकी, खिडकीच्या बाहेरचं जग पाहणारा एक किशोरवयीन मुलगा आणि उडत जाणारा मुक्त पक्षी. कुणाच्यातरी मनमानी मुठीत अडकलेल्या त्या मुलाच्या भविष्याला खिडकीच्या बाहेरच्या जगात स्वतंत्र जगण्याची वाट मिळाल्यावर तो अथांग आभाळात विहरणार्या पक्ष्यासारखा मुक्त होतो. अतिशय अर्थपूर्ण, आकर्षक मुखपृष्ठ भरत यादव यांनी रेखाटलं आहे. जे या संपूर्ण कथासंग्रहासाठी समर्पक आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन.
शेवटी इतकेच म्हणेन”मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडविणार्या या कथा आहेत.” थोडक्यात प्रत्येकाने एक सुंदर पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. विशेष म्हणजे हिंदी साहित्यातले सौंदर्य वाचकांपर्यंत तंतोतंत पोहोचवणाऱ्या मा. उज्वलाताई यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. त्यांच्या या साहित्य वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा !