मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

थेरेसा सर्बर माल्कल!

? इंद्रधनुष्य ?

☆ हेरेसा… ☆ प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक ☆

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे..

थेरेसा सर्बर माल्कल!

हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो…

मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया…

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले.

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती!

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत.

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे.

साभार फेसबुक 

संग्रहिका – प्रस्तुती – सुश्री रेवती वैभव मोडक

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगल द्या,चांगल मिळेल…अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

एकदा श्रीकृष्ण व अर्जुन एका जंगलातून जात असताना अचानक अर्जुन श्रीकृष्णाला बोलतो… मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे. त्यासाठी तू माझी मदत कर. 

श्रीकृष्ण त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो की तुला ते शक्य नाही. पण अर्जुन हट्टालाच पेटलेला असतो. तो श्रीकृष्णाच्या मागे सतत एकच धोशा लावतो की मला कर्णापेक्षा मोठे दानशूर व्हायचे आहे.

श्रीकृष्ण म्हणतो ठिक आहे.. मी तुला एक संधी देतो. पण माझी पण एक अट आहे… मी तुला जी संधी देईन, तीच संधी कर्णाला सुद्धा देईन आणि ह्या परीक्षेत तु कर्णापेक्षा मोठा दानशूर असल्याचे सिद्ध करून दाखवायचे. अर्जुन श्रीकृष्णाची ही अट मान्य करतो.

श्रीकृष्ण आपल्या शक्तीने जंगलातल्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये करतो आणि अर्जुनाला म्हणतो.. आता हे सगळे सोने लोकांमध्ये वाटून टाक.. अट एकच एकूण एक सोने तु दान केले पाहिजेस.

लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की… मी प्रत्येक गावकऱ्यांना सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते. दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जुन खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे.

आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने श्रीकृष्णाला सांगितले की बास….!

आता यापुढे मी काम करू शकत नाही.

मग श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की…. या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तु लोकांना दान करून टाकायच्या…..

लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलावले आणि सांगितले की… या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. ज्याला जेवढे शक्य आहे त्याने तेवढे सोने निःसंकोच घेवून जावे. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले.

अर्जुन चकित होऊन पहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही… या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.

श्रीकृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला… अनावधानाने का होईना तु सोन्याकडे आकर्षित झालास…..! तु गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तु दान करत होतास…..! 

कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.

आपले कुणी कौतुक करतंय… गुणगान गातंय… हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही.

व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे.

देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे… शुभेच्छा द्याव्यात… धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे… म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते. कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे… कार्य करावे…                                                  *म्हणून निसर्गाचा एक नियम आहे जे तुम्ही देणार ते तुम्हाला नक्की परत भेटणार. कोणत्या रूपात परमेश्वर देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे चांगलं द्या पदरी चांगलंच मिळेल.

‘आपलं काय चुकलं’ हे शोधायला हवं…. पण आपण मात्र ‘कुणाचं चुकलं’ हेच शोधत राहतो. …

लेखक –  अज्ञात

संग्रहिका – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ आदर घरातील लक्ष्मीचा… सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ‌ प्रेमळ‌ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.

अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच.  आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.

 – मेघःशाम सोनवणे

                       – 🌼 –

महिला दिनाचा संकल्प करूयात,

घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!

आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर,  सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !

महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.

पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.

समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.

आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!

घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की  संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.

आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.

समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !

तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.

हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले?  माझे आईबाबा कुठे चुकले?  माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं?  मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना???  कधी महत्व कळेल यांना माझं? 

अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.

समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी???  अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!

सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन,  दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.

या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!

या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात…  जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!

©️ सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे

काउन्सीलर. 9766863443

(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती.  -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)

स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ अष्टभूजेच्या कन्या – डाॅ. आरती किणीकर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गेली अनेक वर्षे आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो, अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात, कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, मी विविध क्षेत्रातील महिलांच्या मुलाखती आठ मार्चच्या निमित्ताने लिहिल्या आहेत. आज मी ज्या महिलेचा परिचय करून देणार आहे ती अत्यंत कर्तृत्ववान आणि उच्चविद्याविभूषित स्त्री आहे, कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात त्या,प्रमाणे….”दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती” …तशीच जिच्या दिव्यतेची गेली अनेक वर्षे प्रचिती वैद्यकीय क्षेत्रात येत आहे ती डाॅ.आरती किणीकर !

डाॅ. आरती किणीकर कार्य कर्तृत्ववाने महान आहे पण वयाने माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तिला एकेरी संबोधत आहे.

आरती किणीकर बी.जे.मेडिकल काॅलेजमध्ये प्रोफेसर असून, ससून हाॅस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ (विभाग प्रमुख ) आहे.

विद्यार्थीप्रिय प्रोफेसर, निष्णात डॉक्टर अशी ख्याती असूनही कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व नसलेलं, मृदू भाषिक, प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.आरती किणीकर!
बालरोग तज्ज्ञ असल्यामुळे लहानमुलांच्या आजारावर विशेष संशोधन, थॅलेसेमिया या आजाराविषयक जागरूकता निर्माण करून यशस्वी उपाय योजना, ससून हाॅस्पिटलच्या माध्यमातून अनेक खेडी दत्तक घेऊन कुपोषित बालकांच्या समस्येवर उपाय शोधून, त्या बाबतीतही भरीव कार्य करीत आहे.

डाॅ. आरती किणीकर शालेय शिक्षण काॅन्व्हेंट मधे झाले असून, वडिलांच्या बदलीच्या नोकरी मुळे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, औरंगाबाद, मुंबई इ.शहरात शालेय शिक्षण झाले!

वैद्यकीय शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी( मुंबई ), एम.आर.सी.पी.(इंग्लंड)

अतिशय बुद्धिमान विद्यार्थिनी, यशस्वी डॉक्टर! कर्तव्यदक्ष संसारी स्त्री, पत्नी, सून, आई या सर्व भूमिकेत उत्कृष्ट महिला!

कोरोनो काळात कोविड 19 च्या जागतिक संकटाच्या काळात पुण्यात प्रतिबंधक उपायांसाठी दहा डॉक्टर्स ची टीम नियुक्त करण्यात आली त्यात डॉ.आरती किणीकरचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत – व्हेंटिलेटरचा तुटवडा पडल्याने अनेक रूग्ण दगावले, डाॅ. आरती किणीकर यांनी स्वतः संशोधन करून विशिष्ट प्रकारचे व्हेंटिलेटर्स अतिशय कमी किंमतीत उपलब्ध करून दिले, इतरही अनेक वैद्यकीय यशस्वी प्रयोग केलेआहेत.

डॉक्टर असल्यामुळे कोरोना योद्धा तर आहेच.अतिशय व्यग्र असूनही घर संसारही अतिशय नीटनेटका, वयोवृद्ध सासू सासरे यांची अतिशय उत्तम देखभाल आणि निगराणी राखली! पती डाॅ.अविनाश किणीकर हे सुद्धा बालरोग तज्ज्ञ आहेत. मुलगा आशुतोष इंजिनिअर आहे.

डाॅ. आरती किणीकर पूर्वाश्रमीची नयना चव्हाण, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ती माझी मावस बहीण आहे.

डॉक्टर म्हणून ती ग्रेट आहेच पण माणूस म्हणूनही खूप चांगली आहे. वैद्यकीय व्यवसायातलं तिचं कार्यकर्तृत्व मोठं आहेत, त्या क्षेत्रात तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, गेली अनेक वर्षे मी तिचे तिच्या क्षेत्रातील अथक परिश्रम पहात आहे!

आठ मार्चच्या निमित्ताने तिचे अभिनंदन आणि कौतुक!

स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणा-या स्वयंसिद्ध स्त्रिया म्हणजे मला अष्टभूजेच्या कन्याच वाटतात. विविध क्षेत्रातील या अष्टभूजेच्या कन्यांना माझा सलाम!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?इंद्रधनुष्य?

केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

आज एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्या भेटण्या, ऐकण्याचा योग मैत्र या आमच्या ग्रुप मुळे आला! मूळ अहमदाबादच्या पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या आईचे केस अचानक जाऊ लागतात. ऍलोपेशिया असे निदान होते. steroids मुळे 85 kg वजन झाले. पूर्ण केस गेल्याने विद्रुपता आली. लोकांच्या नजरा, प्रश्नोत्तरे, केविलवाणी मुले, सतत विग किंवा स्कार्फ वापरणे याने जेरीला आली. लोकांना कॅन्सरची शंका येई! तुमची आई वारणार सोसायटीतील मुले हिच्या मुलांना म्हणत! नैराश्यात जाऊन स्टूल, दुपट्टा असा सरंजाम पंख्याखाली मांडला आणि समोरच्या खोलीत झोपलेल्या मुलांकडे पाहून विचार बदलला आणि ती पण आमूलाग्र बदलली!

दुसऱ्या दिवशी विग फेकून दिला, स्कार्फ टाकून दिला!  लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी, प्रश्न टाळण्यासाठी वेळेआधी ऑफिसला पोचून वेळेनंतर बाहेर पडणारी ताठ मानेने, आनंदी चेहऱ्याने वेळेत ऑफिसला पोचू लागली, बाहेर पडू लागली.

मी जशी आहे तशीया भावनेने स्वतःवर प्रेम करू लागली! पूर्ण लाईफ स्टाईल बदलली.  आहार, व्यायाम, योगा, सकारात्मकता यांची कास धरली! नवी क्षेत्रे, यशाच्या वाटा खुणावू लागल्या.

मॉडेलिंग ला निवड झाली आणि मागे वळून पाहिले नाही बालभारती मधील नोकरी आणि शनि रवि मॉडेलिंग!

Mrs Universe 2018

Mrs Confidence

अशी खूप खूप बक्षिसे मिळवली!

सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने आपले न्यून मागे टाकून पाय रोवून आयुष्यात उभी राहिली! केसांविना डोक्यावर अपार वेदना सोसून पूर्ण गोंदवून घेतले.

तिचा जन्म झाल्यावर आजी म्हणाली पत्थर जन्मला!

मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला , आजीला कळले नाही तो  हिरा होता!

उपेक्षित आणि खडतर गेलेल्या बालपणाने पुढचे आघात ती झेलू शकली!

तिच्यासारख्या स्त्रियांसाठी आधार गट स्थापन करायचा तिचा मानस आहे.

‘अग्निजा’ तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक गुजराती भाषेत प्रसिद्ध झाले आहे. ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडगावचे शहाणे की वेडे..? ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पेडगावचे शहाणे की वेडे..? ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

वेड पांघरून पेडगावला जाणे किंवा पेडगावचे शहाणे हे वाक् प्रचार कसे आले???

६ जून १६७४, शिवराज्याभिषेक संपन्न. एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च लागला ह्या अद्वितीय सोहळ्याला. आता हा खर्च मुघलांकडून वसूल कसा केला आपल्या राजाने, त्याची गमतीशीर हकीगत आणि गनिमीकाव्याचे उत्कृष्ट उदाहरण ऐका.

अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं गाव आहे. तिथे बहादुरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार; महा मुजोर. आपल्या शिवाजी महाराजांना खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा असत, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. पण तिथे आरक्षणास तैनात फौजही मोठी होती. ही सगळी मालमत्ता दिल्लीस रवाना होणार होती. महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य चढाई करेल बहादुरगडावर आणि लुटून आणेल ते बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे ही.

कोणासठाऊक कशी पण खानाला ही बातमी मिळाली, आणि चेष्टेने हसत मजूर्डा म्हणाला,

“सिर्फ २००० मराठा मावळे! उनके लिये तो किले के दरवाजे खोल ही दो.  अगर आ जाए पास भी तो खदेड देंगे, काट देंगे.”

तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादुरगडातून मुघल सैनिकीला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे लक्षात आलेच. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या गडावर, आणि आधीच तयार बसलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्या किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तोच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. २००० मावळे बिथरले, अनपेक्षित झालेलं ना हे सगळं! जीव वाचवायला ते मागे फिरले पण त्यांचे घोडे जोर पकडत नव्हते. खानाची संपूर्ण फौज जवळ येऊ लागली, खूप जवळ आली त्यांच्या. नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून धूम ठोकली. बहादुरखान स्वतः त्यांना आडवायला, नव्हे छाटायला, मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली, कारण माजूर्ड्या बहादूरखान कोकलताशला मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती चेव आणीत होती. मावळे पसार झाले, संपूर्ण २००० ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे!

शेवटी खानाची फौज थांबली, आणि एकच जल्लोष झाला. मग सगळे परतू लागले. ही जीत औरंगजेबास कळाली की काय इनाम असेल ह्या आनंदाने बहादूरखान छाती फुगवून घोड्यावर डौलात होता. का नसावं त्याने, शेवटी शिवाजीच्या फौजेला पळायला लावलं हे काही छोट काम नाहीच. शिवबांची फौज हरली, पळ काढला! आणि तितक्यात सगळ सैन्य शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादुगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठे लोट किल्ल्यातून येत होते.

खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं,

“अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?”

“कोई नही जहांपन्हा. आपका हुकुम था सबने चढ़ाई करनी है शिवाजी के उन २००० मावलो पर”, किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा अंदाज त्यांना आला, आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि ज्याची भीती होती तेच बोंबलत एक घोडेस्वार आला,

“हुज़ूर, गज़ब हो गया, हम लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २०००  मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओं ने धावा बोल दिया. सब लूट के चले गए हुज़ूर!”?

१ कोटी राज्याभिषेकाचा खर्च ही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात भरती.

आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, कदाचित रक्ताचा एक थेंबही सांडला नसेल.

खानाला दोन गोष्टीचं श्रेय त्यामुळे नक्की जातं. लक्षात आलं का, की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणूनच पेडगावचे शहाणे किंवा

वेड पांघरून पेडगावला जाणे वरील सत्य हकीकती वरूनच हे वाक् प्रचार आले.

??छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा?? ?

 

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष # 110 ☆ मोरे केशव कुँज बिहारी…. ☆ श्री संतोष नेमा “संतोष”

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं.  “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं  एक भावप्रवण  रचना “मोरे केशव कुँज बिहारी….। आप श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 110 ☆

☆ मोरे केशव कुँज बिहारी….

 

राधा के हैं श्याम मनोहर, मीरा के गिरधारी

ललना पुकारें माँ यसोदा, देवकि के अवतारी

नन्दबाबा के प्रभु गोपाला, सखियन कृष्ण मुरारी

ग्वाल-बाल सखा सब टेरें, कह कह कर बनवारी

वृजवासी कन्हैया कहते, कर चरणन बलिहारी

चरण शरण “संतोष” चाहता, रखियो लाज हमारी

 

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

सर्वाधिकार सुरक्षित

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 9300101799
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माघी गणेश जयंती ☆ संग्राहक मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

माघी गणेश जयंती ☆ संग्राहक मंजुषा मुळे ☆ 

|| माघी गणेश जयंतीच्या ||

सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

श्रीगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात.

या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत.

पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस

दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस

तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची जयंती  माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो.

तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते.

पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.

दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.

तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.

 त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.

पूजा कशी कराल?

मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते.

या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम.

माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते.

ॐ गं गणपतये नमः

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दफन एका गाडीचे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ दफन..एका गाडीचे ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

दफन..एका गाडीचे

                    ?

श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले….

ब्राझील मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अतिशय सामर्थ्यशाली व्यक्ती “चिकुन्हो स्कारपा” यांनी एक दिवस एक अजब घोषणा केली की ते त्यांच्या लाखो डॉलर्सच्या बेंटले कारचे दफन करणार आहेत. स्कारपा यांनी मृत्यूनंतर पण ऐषोआरामाचा आनंद घेता यावा म्हणून बेंटले गाडीचं दफन करायला घेतलं याचं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.

साहजिक त्यांच्या या घोषणेला चांगलंच  मीडिया कव्हरेज मिळालं. त्यांच्या या वेडेपणाबद्दल अनेकांनी त्यांना मूर्खांत काढलं, टीका केली. या माणसाला वेड लागलंय,अतिश्रीमंतांचे चोचले आहेत, एवढ्या महागड्या गोष्टीचा असा विनाश का करत आहेत?, त्यापेक्षा दान देऊन टाका, गरिबांना मदत करा, हा माणूस नक्की कोणत्या जमान्यात वावरतोय अशा अनेक सूचना, नकारात्मक प्रतिक्रिया ब्राझीलच्या जनतेकडून येत होत्या.

अखेरीस कारचं दफन करण्याचा  दिवस उजाडला. मोठा खड्डा खणण्यात आला. अनेक पत्रकार याचं live coverage करत होते.

कार दफन करण्याची वेळ आली तेव्हा स्कारपा म्हणाले की “मी एवढी मौल्यवान गोष्ट वाया घालवतो आहे म्हणून माझ्यावर केवढी टीका झाली. पण लोकांना हे लक्षात येत नाही की या मिलियन डॉलर कार पेक्षाही मौल्यवान गोष्टी लोक दफन करत आहेत. लोक त्यांचे डोळे, किडनी, हृदय, फुफ्फुसे असे कितीतरी सुदृढ अवयव मृत्यूनंतर दफन करतात.

हा शुद्ध मूर्खपणा आहे. हजारो लोक ट्रान्सप्लांट साठी अवयव मिळण्याची वाट बघत आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करण्यापेक्षा आपण त्यांचे दफन करत आहोत.

मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं.”

मित्रानो, डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट आहे. कधी आपण याचा साधा विचार पण करत नाही. मात्र काही लोकांना जीवनदान देण्याची क्षमता असताना केवळ अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे आपण या पुण्यकर्माला मुकत आहोत.

धन्यवाद,

⚡⚡⚡

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उद्योजक प्रदीप ताम्हाणे … प्रमोद सावंत ☆ संग्राहक मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

उद्योजक प्रदीप ताम्हाणे … प्रमोद सावंत ☆ संग्राहक मंजुषा मुळे ☆ 

“आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील”. अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला.

शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची.

२६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्तुगीज चर्चजवळील एका मराठी माध्यम शाळेत प्रदीपचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. घरचं वातावरण टिपीकल मध्यमवर्गीय असंच होतं. त्याकाळी टॅक्सीत बसणं म्हणजे मुलांसाठी एक पर्वणीच असायची. वर्षातून दोन-तीन वेळाच टॅक्सीमध्ये बसण्याची संधी मिळे.

दादरच्या किर्ती महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून त्याने पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी देखील संपादन केली. त्याच दरम्यान एका कंपनीत नोकरी मिळाली पगार होता फक्त ८०० रुपये. संशोधनाची आवड असल्याने दुसऱ्या एका कंपनीत संशोधन आणि विकास विभागात ‘कलर इनचार्ज’ म्हणून नोकरी केली.

कालांतराने औषधी गोळ्यांवरील रंगीत आवरण तयार करणाऱ्या एका अमेरिकन कंपनीत प्रदीपला नोकरी मिळाली. या कंपनीची शाखा लंडन मध्ये होती. तिथे प्रदीप काम करायचा. उत्तम पगार, मर्सिडीज कार, राहण्यासाठी अलिशान घर अशा सगळ्याच सुख-सुविधा पायाशी लोळण घेत होत्या. ही कंपनी मुख्यत: रेडीमिक्स पावडर तयार करत असे. सुरुवातीला फक्त १३ किलो पावडर भारतात विकली जायची मात्र प्रदीपच्या तंत्रज्ञानाने काही दिवसांतच हे प्रमाण ५ हजार किलोवर गेले. भारतातील सर्वांत मोठ्या ५ औषधी कंपन्यांना हेच तंत्रज्ञान पुरविले जाई. मात्र त्याची किंमत अफाट होती.

२५०० रुपये किंमतीची ती पावडर २५ ते ३० हजार रुपयांना विकली जाई. इतकी मोठी तफावत असे. ही तफावत या कंपन्यांच्या लक्षात येत होती. या विषयी त्यांनी प्रदीपला सांगितलं देखील. मात्र हे तंत्रज्ञान पुरविणारी ती जगातील एकमेव कंपनी होती आणि तिचा बॉस एक अमेरिकन होता, ज्याच्यासमोर प्रदीपचं काहीच चालत नव्हतं हे त्यांना माहित होतं.

खरंतर हा अमेरिकन बॉस प्रदीपचा चांगला मित्र होता. प्रदीपने शोधून काढलेल्या तंत्रज्ञानावर एके दिवशी एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक देशांतील औषध निर्मिती करणारे उत्पादक, तंत्रज्ञ त्या व्याख्यानास आले होते. ४५ मिनिटाचं ते व्याख्यान त्या सगळ्यांना इतकं आवडलं कि “वेळेची मर्यादा तुम्हांला नाही तुम्ही बोलत रहा असे”, त्या व्याख्यानमालेच्या गोऱ्या अध्यक्षाने प्रदीपला सांगितले. तब्बल साडेतीन तासानंतर व्याख्यान संपले. व्याख्यानास उपस्थित असलेल्या लोकांनी अनेक प्रश्न विचारले.

व्याख्यान संपल्यानंतर प्रदीप कॉफीचा मग घेऊन बॉसच्या बाजूला बसला. बॉसने पण प्रदीपची तोंड भरुन स्तुती केली. ही योग्य वेळ आहे आपल्या भारतीय औषध निर्मात्या कंपन्याच्या व्यथा सांगण्याची, हे हेरुन प्रदीप बॉसला म्हणाला, “आपण भारतात आपलं कलर कोटींगचं तंत्रज्ञान पुरवितो. मात्र त्याचा दर प्रचंड आहे. तो दर कमी…” हे वाक्य पूर्ण होण्याच्या आतच त्या साडे-सहा-सात फूट अमेरिकन बॉसने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटला. आणि प्रदीपच्या अगदी डोळ्याजवळ बोट नेऊन मोठ्याने जवळपास किंचाळलाच. “You have to pay for our technology’’. “तुम्हां भारतीयांना आमचं तंत्रज्ञान आम्ही सांगू त्या किंमतीत घ्यावंच लागेल”.

कोणाही भारतीयाला जिव्हारी लागेल असे ते शब्द ऐकल्यानंतर प्रदीपने २ मिनिटांचा अवधी मागितला. तो शांतपणे रिसेप्शनिस्ट जवळ गेला. तिच्याकडून एक कोरा कागद घेतला. एका ओळीत राजीनामापत्र लिहीले. आपल्या घराची, गाडीची चावी देऊन तो शांतपणे तिथून निघून गेला. मात्र मनाशी एक निश्चय होता. या अमेरिकन कंपनीला टक्कर देणारी स्वत:ची भारतीय कंपनी सुरु करण्याची.

तो भारतात आला. आई, बाबा आणि पत्नीला सारं काही सांगितलं. घरच्यांनी पूर्णत: पाठिंबा दिला आणि घरातल्या किचनमध्येच सुरु झाली प्रयोगशाळा. रात्री सगळ्यांची जेवणे उरकल्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत ही प्रयोगशाळा चाले. तब्बल दीड महिन्यांचा अथक संशोधनानंतर यश मिळालं आणि रेडिमिक्स पावडरचं तंत्रज्ञान विकसित झालं.

हे तंत्रज्ञान त्या अमेरिकन औषधाच्या तुलनेत १० पटीने स्वस्त होतं. बाजारपेठेत औषधी कंपन्यासोबत ओळख होतीच. अशाच एका कंपनीच्या मालकाने ताम्हाणेंची ती रेडिमिक्स पावडर पाहिली आणि ताम्हाणेंना मिठीच मारली. एवढ्या स्वस्तात संपूर्ण भारतीय बनावटीची ती रेडीमिक्स कोटींग पावडर म्हणजे अविश्वसनीय बाब होती. त्याने तात्काळ ५ किलो पावडरची ऑर्डर दिली.

मात्र आपल्याकडे एवढी लहान ऑर्डरसुद्धा पूर्ण करण्यासाठी तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही असं ताम्हांणेंनी सांगितलं. “तुम्ही जर आता ही ऑर्डर पूर्ण नाही करु शकलात तर आयुष्यात पुढे या क्षेत्रात काहीच करु शकणार नाही”. कंपनीच्या त्या मालकाचे शब्द ताम्हाणेंच्या जिव्हारी लागले. त्यांनी चंग बांधला. आणि ती ऑर्डर पूर्ण केली. पहिल्याच वर्षी त्यांची दीड कोटी रुपयांची उलाढाल झाली.

काही दिवसांनी त्यांना एक व्यावसायिक भागीदार मिळाला. खरा तर तो एक विकासक होता आणि त्याला झटपट विक्री करुन पैसे पाहिजे होते. ताम्हाणेंच्या व्यवसायात संशोधन करुन उत्पादन निघण्याची प्रक्रिया होती ज्यास वेळ लागणार होता. तेवढा संयम नसल्याने अर्ध्यातच त्या भागीदाराने सोबत सोडली. कंपनी विकावी लागली.

मात्र ताम्हाणेंनी धीर न सोडता १९९७ साली विनकोट्स कलर्स ऍण्ड कोटींग प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी उभारली. अंबरनाथला कारखाना सुरु केला. आज ही कंपनी जगातील ५० हून अधिक देशांमधील औषध निर्मिती करणाऱ्या देशांना उत्पादन पुरविते.

मनुष्यबळाकडे ताम्हाणेंचे विशेष लक्ष असते. कामगार हा कार्यक्षम रहावा यासाठी अंबरनाथ स्टेशन ते कारखाना अशी कामगारांना ने-आण करण्यासाठी रिक्षासेवा त्यांनी चालू केली होती. संध्याकाळी कामाची वेळ संपल्यानंतर कामगाराला एक मिनीट देखील थांबविले जात नाही. त्याने जास्तीत जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवला पाहिजे याकडे कटाक्ष असतो. एखादा कामगार अडचणीत असेल तर कंपनी त्याच्यामागे भरभक्कम उभी राहते.

एके काळी पत्र्याच्या घरात राहणारे कामगार स्वत:च्या टूबीएचके फ्लॅटमध्ये राहतात. जवळपास प्रत्येकाकडे किमान मोटरसायकल आणि कार आहेच. ताम्हाणेंकडे आज ५५ कामगार कार्यरत आहेत मात्र ५०० कामगारांच्या दर्जाचे काम करण्याची कार्यक्षमता त्यांनी अंगी जोपासली आहे.

अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत.

 

– प्रमोद सावंत

८१०८१०५२३२

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares