मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “थेंबे थेंबे… वीजही वाचे…”  ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

‘मोबाईल चार्जर मोबाइलला लावला नसेल, पण बटन चालू असेल तर वीज वापरली जाते का? ‘ 

…हाच प्रश्न टीव्ही, एसीसारख्या उपकरणांसाठी लागू होतो. ज्यांचे बटन चालू असते, पण वापर सुरू नसतो, तर वीज वापरली जाते का?

वीजनिर्मिती होते त्या ठिकाणी एसी वोल्टेज तयार होते आणि ते आपल्या घरापर्यंत त्याच रूपात पोहोचते. जवळ जवळ सगळीच आधुनिक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरणे डीसी वोल्टेजवर काम करतात. मग या उपकरणांना एसी वोल्टेजपासून डीसी वोल्टेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी काही कन्व्हर्टर सर्किट वापरले जाते. यामध्ये रोहित्र (Transformer), रेक्टिफायर, फिल्टर या तिघांचा वापर होतो.

आता चार्जरचं उदाहरण घेऊ. हे कसं काम करते?  ….                                     

चार्जर ५ वोल्ट डीसी आपल्या मोबाईलला देतो. आपण चार्जरला २३० वोल्ट एसी देतो. मग रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) या २३० वोल्ट एसीचे १२ वोल्ट एसीमध्ये रूपांतर करतो. कमीत कमी विजेचे नुकसान करून हे रूपांतर करणे रोहित्राचं (ट्रान्सफॉर्मर) काम. मग रेक्टिफायर नावाचे सर्किट डायोड वापरून एसीचे डीसी वोल्टेजमध्ये रूपांतर करते. चार्जर मोबाईलला लावले नसेल तर रेक्टिफायर, फिल्टर व बाकी सगळं काही काम करत नाही व ऊर्जाही वापरत नाही, पण रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मात्र आपलं काम करत राहतो. कारण रोहित्रामध्ये (ट्रान्सफॉर्मर) प्राथमिक आणि दुय्यम वायडिंग असतात. प्राथमिक वायडिंमधून विजेचा प्रवाह चालूच असतो. मग तुम्ही चार्जर वापरात असाल किंवा नसाल.

१ साधा ५ वॅटचा चार्जर जर बटन बंद न करता दिवसभर चालू राहिला, तर १ वॅट ऊर्जा वाया जाते. चार्जर सुमार दर्जाचा असेल, तर २०% अजून ऊर्जा वाया जाते. वर्षभर असं होत राहीलं, तर ३६५ वॅट ऊर्जेचं नुकसान. ६ रुपये एका युनिटची किंमत पकडली तर जवळपास २००० रुपयांची वीज वाया जाते. पैशामध्ये मोजलं तर जास्त वाटत नाही. पण कित्येक घरांमध्ये असे कित्येक चार्जर चालू सोडले जात असतील. १ किलोवॅट ऊर्जा वातावरणात १ पाउंड कार्बन डायॉक्सिड उत्सर्जित करते. जगात फक्त या चार्जरमुळे लाखो किलोवॅट ऊर्जा वाया जाते आणि त्याजोगे हरित वायूंचे नाहकच उत्सर्जन होते.

मोबाईलच्या चार्जरचे बटन बंद न करणे, हे अज्ञान किंवा आळस असू शकतो. आळसाला काही पर्याय नाही, पण तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल, की चार्जर न लावता बटन चालू ठेवल्यामुळे ऊर्जा वापरली जात नसेल, तर तो तुमचा गैरसमज आहे, म्हणून आतापासून चांगली पर्यावरणपूरक सवय अंगीकारूया व चार्जरचे बटन बंद ठेऊ या.

जुने चार्जर ५ वॅटचे आहेत, पण नवीन येणारे चार्जर ३० वॅटपर्यंत येतात. ६ पट ऊर्जा म्हणजे ६ पट नुकसान. आधी घरात सगळ्यांचे मिळून एक चार्जर असायचे, पण आता प्रत्येकाचा एक किंवा आळशी लोकांचा प्रत्येक खोलीमध्ये एक चार्जरसुद्धा असतो. त्या हिशेबाने प्रत्येक व्यक्तीकडून किती ऊर्जेचा अपव्यय होतो, याचा विचार करण्याची गरज आहे. भारतात नेहमीप्रमाणे हा उपेक्षित विषय आहे. पण युरोपियन देशांनी १ वॅट धोरण अवलंबले आहे, म्हणजे उपकरणाचे बटन बंद नसेल केलं तर १ वॅटच्या वर ऊर्जा वापरू नये. तसे कायदे आहेत. विजेची मागणी आणि वापर वाढतच आहे.  त्या अनुषंगाने आपल्याला या गोष्टीचा भविष्यात गांभीर्याने विचार करावा लागेल, हे नक्कीच.

मोबाईल चार्ज करत नसाल, तर बटनसुद्धा बंद करा. कारण तो थोडी का होईना वीज वापरतोच. म्हणून शक्य तेवढ्या सर्व उपकरणांना हा नियम लागू करू या. ऊर्जेचा अपव्यय टाळू या, कारण ‘उर्जा बचत’ हीच उर्जा निर्मितीही असते.

चार्जर एक उदाहरण आहे. सर्व इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, लॅपटॉपसाठी वरील नियम लागू आहे. बटन बंद करणे अथवा शटडाऊन करणे, हाच पर्याय आहे.

*आजवर माहीतच नव्हतं हे ठीक आहे! पण आता हे माहित झालं आहे ना? तर किमान आपण आजपासून ठरवूया की, काम नसेल तेव्हा बटन बंद करुया. असा निर्धार केला तर पहा किती मोठा बदल घडू शकेल. थेंबाथेंबातून फक्त तळेच साचत नसते, तर वीज देखील वाचत असते !                            

विचार करा !!…     

(महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे ) 

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ खोलवर विचार करा – मूळ इंग्रजी लेखक : अनामिक ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे

… तुमचा जीवनरक्षक कोण आहे??

अनीता अल्वारेज, अमेरिकेतील एक व्यावसायिक जलतरणपटू. तीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान स्पर्धक म्हणून इतर स्पर्धकांसह जलतरण तलावात उडी घेतली आणि उडी मारताच ती पाण्याखाली गेल्यावर अचानक बेशुद्ध पडली.

जिथे संपूर्ण जमाव फक्त विजय आणि पराभवाचा विचार करत होता, तिथे अनिता नियोजित वेळेपेक्षा जास्त काळ पाण्याखाली असल्याचे तिच्या प्रशिक्षक अँड्रिया यांच्या लक्षात आले.

जगज्जेतेपदाची स्पर्धा सुरू आहे हे सर्व काही क्षणात अँड्रिया विसरली व एक क्षणही वाया न घालवता आंद्रियाने स्पर्धा सुरू असतांनाही जलतरण तलावात उडी घेतली. तेथे असलेल्या हजारो लोकांच्या काही लक्षात येईपर्यंत अँड्रिया अनितासोबत पाण्याखाली होती.

पाण्याखाली गेल्यावर अँड्रियाने अनिताला स्विमिंग पूलाच्या तळाशी पाण्याखाली बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहिले. अशा स्थितीत पाण्याखालून ना हात पाय हलवून इशारा करता येतो, ना मदतीसाठी कुणाला आवाज देणे शक्य होते. अशा परिस्थितीत अँड्रियाने बेशुद्ध अवस्थेतील अनिताला बाहेर काढल्याचे बघून हजारो लोक अक्षरशः सुन्न झाले. आपल्या समयसुचकतेमुळे अँड्रियाने अनिताचा जीव वाचवला.

ही घटना आपल्या आयुष्याशी जोडून बघता आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक मोठा प्रश्न सोडवला असल्याचे जाणवेल !

किती माणसं आपल्या आयुष्याशी जोडलेली असतात हे आपल्या लक्षातही येत नाही, आयुष्यात आपल्याला कितीतरी जण दररोज भेटत असतात, पण मनुष्य प्रत्येकाला आपल्या मनातील गोष्ट काही उकल करून सांगू शकत नाही. आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही तो कुठेनाकुठेतरी बुडत असतो, कोणत्या ना कोणत्या समस्येला तो सामोरा जात असतो, मनावर कसलातरी दबाव घेऊन तो आयुष्यात अस्वस्थ होत असतो, पण कुणाला ते सांगू शकत नाही, किंवा कुणाला सांगण्याइतपत कुणी जवळचं उपलब्ध नसतं.

जेव्हा माणूस आपल्या वेदना, त्रास कोणाला सांगू शकत नाही, तेव्हा मानसिक ताण इतका वाढतो की तो स्वतःला सगळ्या जगापासून, सगळ्यांच्या नजरेपासून दूर, एकांतात, स्वतः ला चार भिंतीत कैद करून घेतो. ही अशी नाजूक वेळ असते जेव्हा माणूस आतल्याआत बुडायला लागतो, त्याची इच्छा संपलेली असते, सहनशीलतेचा अंत झालेला असतो. ना कोणाशी बोलणे, ना कोणाला भेटणे. ही मानसिक परिस्थिती मानवासाठी सर्वात धोकादायक असते.

जेव्हा माणूस त्याच्या अशा बुडण्याच्या अवस्थेतून जात असतो, तेव्हा इतर सर्व प्रेक्षक ज्याच्या त्याच्या आयुष्यात व्यस्त असतात. हा माणूस मोठ्या संकटात सापडला आहे याची कोणालाच पर्वा रहात नाही. एखादी व्यक्ती काही दिवस गायब झाली तरी काही काळ लोकांच्या ते लक्षातही येत नाही.

अचानक काही घटना घडली तेव्हा लोक जमले तर त्याच्याविषयी विचार करतात, की हा पूर्वी किती बोलायचा, आता तो बदलला आहे किंवा त्याला गर्व झाला आहे की आता तो मोठा माणूस झाला आहे. तो बोलत नाही तर जाऊ द्या, आपल्याला काय करायचं! किंवा त्यांना असं वाटतं की जर तो आपल्याला आता दिसत नाही तर तो त्याच्या आयुष्यात आनंदी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही.

अनिता एक निष्णात व्यावसायिक जलतरणपटू असूनही ती बुडू शकते तर कोणीही त्यांच्या आयुष्यातील वाईट काळातून जाऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. पण त्या इतर लोकांशिवाय एकादी अशी व्यक्ती असेल जी तुमच्या मनाचा कल, मनःस्थिती ताबडतोब ओळखू शकेल, तिला न सांगता सर्व काही आपसूकच कळेल, तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर नेहमी नजर ठेवेल, थोडासा त्रास झाला तरी तो येऊन तुम्हाला तुमच्या समस्या विचारेल.

तुम्ही तुमची वागणूक ओळखा, स्वतःला प्रोत्साहन द्या, तुम्ही स्वतः ला सकारात्मक बनवा आणि अँड्रियासारखे प्रशिक्षक बनून तुम्ही दूसऱ्याचा जीव वाचवा.

आपल्या सर्वांनाच अशा प्रशिक्षकाची खरी गरज आहे… असा प्रशिक्षक कोणीही असू शकतो. तुमचा भाऊ, बहीण, आई, वडील, तुमचे कोणी मित्र, कोणी तुमचे हितचिंतक, कोणी नातेवाईक, कोणीही, जो न सांगता तुमच्या भावना, स्वभावातील बदल ओळखून लगेच सकारात्मक कारवाई करू शकेल.

खोलवर विचार करा व वेळीच शोधा, जीवनातील तुमचा जीवन प्रशिक्षक कोण आहे ते….

 

मूळ इंग्रजी लेखक- अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“How is the Josh…! ☆ श्री संभाजी बबन गायके 

— कोण म्हणतं आभाळाला स्पर्श करता येत नाही?

 रमण नावाचा एक तरुण. त्याचे वडील तीस वर्षे सैन्यात शिपाई होते. उत्तम कामगिरी बजावल्याने त्यांना मानद कॅप्टन अशी बढती मिळाली होती. आपल्याही मुलाने सैनिक व्हावे, नव्हे सैन्य अधिकारी व्हावे, अशी त्यांची इच्छा असणं स्वाभाविक होतं. पण रमण अभ्यासात रमला नाही. त्याला हॉटेलचे क्षेत्र खुणावत राहिले. त्यातून Hotel Managementची पदवी प्राप्त करून तो एका मोठ्या हॉटेलात शेफ म्हणून रुजू झाला…ही नोकरी त्याने तीन वर्षे केली!

 पण त्याच्या वडिलांचे स्वप्न त्यालाही पडू लागले होते. वडिलांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांच्या जोरावर त्याने आणखी मेहनत घेतली..अभ्यास केला..व्यायाम केला आणि Junior Commissioned Officer म्हणून तो सेनेत भरती झाला. त्याचे पहिले पद होते…नायब सुबेदार. अनुभव आणि ज्ञान पाहून श्री.रमण यांना

इंडीयन मिलिटरी अकॅडमी मध्ये Mess In-Charge पदाची जबाबदारी देण्यात आली.

सैन्य अधिकारी बनत असलेल्या साहेब लोकांना उत्तम भोजन देण्याची त्यांची जबाबदारी बनली. पण इथेच त्यांचा दृष्टिकोन बदलला. प्रशिक्षणार्थी तरुण आणि आपण यांत फरक आहे तो शिक्षणाचा आणि आत्मविश्वासाचा..त्यांनी समजून घेतले. त्या तरुणांशी त्यांनी मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यांनी कसा अभ्यास केला, कसे परिश्रम घेतले ते सारे जाणून घेतले. सेवेतील सक्षम लोकांना भारतीय सेनेत अधिकारी होण्याची संधी दिली जाते. श्री.रमण यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर ही संधी साधली. पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले..पण रमण खचून गेले नाहीत. त्यांनी अभ्यास आणखी वाढवला…आणि हे करत असताना त्यांनी कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. याचेच फळ त्यांना तिस-या प्रयत्नात मिळाले. Officer Cadre परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले….वयाच्या पस्तीस वर्षांपर्यंत त्यांना संधी होती….अगदी शेवटच्या क्षणी त्यांना यशश्री प्राप्त झाली.

 जिथे इतरांना जेवण वाढले, अधिकाऱ्यांना salute बजावले, तिथेच मानाने बसून भोजन करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले ..अधिकारी बनून भारत मातेची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले…बाप से बेटा सवाई बनून शेवटी अधिकार पदाची वस्त्रे परिधान केलीच!

नुकत्याच झालेल्या IMA passing out parade मध्ये मोठ्या अभिमानाने त्यांनी अंतिम पग पार केलं…त्यावेळी त्यांच्या मनात किती अभिमान दाटून आला असेल नाही?

 लेफ्टनंट रमण सक्सेना ….एका अर्थाने यश Success ना म्हणत असताना successful होऊन दाखवणारा लढाऊ तरुण!

चित्रपटात हिरो होणं तसं तुलनेने सोपे असेल…हॉटेलात काम करून चित्परपटात हिरो बनलेले आपण पाहिलेत…पण सैन्लायाधिकारी झालेला असा तरुण विरळा! लाखो सक्षम तरुण मुलांमधून निवडले जाणे म्हणजे एक कठीण कसोटी असते!

 सक्सेना साहेबांनी दाखवलेली ही जिद्द प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात सक्सेना साहेबांना उपयोगी पडेल, यात शंका नाही! जय हिंद! 🇮🇳

जय हिंद की सेना! 🇮🇳

यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकेल.

माझा उद्देश फक्त आपल्या तरूणांचे कौतुक करण्याचा असतो…त्यातून एखादा मुलगा, मुलगी प्रेरणा घेईल…अशी आशा असते. तशी उदाहरणे मी पाहिली आहेत, म्हणून हा लेखन प्रपंच. ज्ञानी माणसांनी या विषयावर अधिक लिहावे. जय हिंद !

(How is the Josh…! ही आपल्या सैनिकांची हल्लीची घोषणा आहे. उरी सिनेमा आल्यापासून ही घोषणा प्रसिद्ध झाली. तुमच्यात किती उत्साह आहे…यावर High sir असे उत्तर दिले जाते !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था – लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

‘स्थितप्रज्ञ’ अवस्था – लेखक : श्री गिरीश ओक ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावणे हे आईचे संस्कार, लावलेले वळण, म्हणून आईला घरी जाऊन आवरून येतो असे सांगून, नर्सताईंना किती वेळाने परतेन ही कल्पना देऊन रस्त्याने भराभर चालत हॉस्पिटलमधून घरी पोहचलो. हातपाय धुवून देवा समोर दिवा लावला व तास दीड तासात घरातील आवरले. स्वतःशीच म्हणालो आता जरा निवांत बसू व मग पुन्हा हॉस्पिटलला आईकडे जाऊ. जेमतेम १५ मिनिटे झाली असतील तर दाराची बेल वाजली, समोर पाहतो तर साहेबराव.

आत ये म्हणून त्यास खुणावले तसे तो म्हणाला ” सिक्युरिटीने सांगितले तुम्ही घरी आला असे, म्हणून आईंची तब्येत कशी आहे ते जाणून घ्यायला इकडेच वळलो. ” मी त्याला खाली बसण्यास खुणावले. त्यास म्हणालो “आईची तब्येत स्थिर आहे. श्री गुरुमाऊली, डॉक्टर व देवमाणसे आहेत सोबतीला मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा व आपले प्रयत्न सुरु ठेवायचे, नसती चिंता करून काय साधणार”.

साहेबरावाने माझे उत्तर ऐकून सरळ मुद्दयाला हात घातला, “दादा तुमचं बोलणं कधी कधी उलगडतच नाही. अहो आईंची तब्येत सिरीयस आहे माहित आहे मला, पण मला समाधी अवस्थेबद्दल सांगताना तुम्ही सांगितलेले, तसे काहीसे बोलताना शांत वाटता व आम्ही कोड्यात पडतो”.

मी म्हणालो “साहेबा, अरे मी इतका मोठा निश्चित नाही, बस श्री गुरुसेवक आहे हेच काय ते पुरेसे आहे. अरे बाबा ती पातळी गाठणे फार कर्मकठीण, दुर्लभ अवस्था आहे. पराकोटीच्या श्री गुरुदेवसेवेनंतर श्री गुरुराव कृपेनेच लाभते त्याला ‘स्थितप्रज्ञ’ अवस्था म्हणतात”.

साहेबराव तो काय मला सोडणार नव्हता, “दादा मी सोडतो तुम्हाला हॉस्पिटलला, पण वेळ असेल जवळ तर सांगता का जरा काही स्थितप्रज्ञ अवस्थेबाबत”. मला देखील साहेबरावाच्या विचारण्याचे कौतुक वाटले, परमार्थाच्या वाटेवर, अर्थ जाणून घेण्यास आपण जर उत्साह, आतुरता दाखवली नाही तर आपल पाऊल पुढे पडत नाही.

तासभर अवधी हातात होता त्यामुळे म्हणालो…..

“जेवढे मला आजवर उलगडले ते सांगतो, पहा तूला किती समजते, कारण हा विषय अतिशय खोल आहे. साहेबा अरे समजा एखादया जागी जिथे वारा वाहात नाही अशा ठिकाणी तेवत असलेली समईची ज्योत जशी निश्चल असते, तसेच श्री गुरुदेव मार्गदर्शनानुसार प्रामाणिक साधना करणाऱ्या व्यक्तीचे मन हे स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल, स्थिर, ताब्यात, नियंत्रणात असते. अशा गुरुसेवकाचे मन चंचल नसते, त्याची मनःस्थिति डळमळीत, अस्थिर, दोलायमान नसते. आयुष्यात अडचणीच्या, संकटाच्या, अटीतटीच्या, संघर्षप्रसंगी माणसाचे मन जर स्थितप्रज्ञ म्हणजे निश्चल असेल तर तो कोणत्याही बिकट प्रसंगावर श्री गुरुकृपेने मात करू शकतो. ”

“ साहेबा आपण सामान्य माणसे असल्या प्रसंगी फार गोंधळतो, काय करावे ते सुचत नाही, बावरतो, मायेच्या मोहात वेढले जातो. अगदी पुरते भावविवश होतो. परिणामी स्वधर्म, म्हणजे प्रसंगानुरूप कसे वागायला हवे ह्याचा आपणास विसर पडतो. ज्ञान, बुद्धीचे दरवाजे स्वतःच बंद करून, स्वतःस कोंडून घेतो व बुद्धिभ्रंश झाल्याप्रमाणे वागू, बोलू लागतो. ह्या सगळ्याचा परिणाम असा होतो की तो माणूस आत्मघात, आत्मविनाशाकडे कधी कसा वळला हे त्याचे त्यालाच कळत नाही. ”

“ वास्तविक पाहता प्राणीमात्रात माणूस हा अत्यंत बुद्धिमान प्राणी पण बहुतेक वेळा स्थितप्रज्ञता.. म्हणजे निश्चलतेच्या अभावामुळे जनावरापेक्षा अधिक बहिर्मुख होतो. अति सुखात श्री गुरुरायांनी दर्शविलेला मार्ग विसरतो. यशाच्या धुंदीत बेधुंद होतो, हुरळून जातो. मग कधी कधी आनंदाच्या उकळ्या, तर कधी कधी तो चिडतो, अकारण संतापतो. सत्य मात्र इतकेच की कधी अति आनंदाने तर कधी घोर निराशेने त्याचे मन, त्याची बुद्धी, वादळात सापडलेल्या होडीसारखी हेलकावे खात असते. ह्या सगळ्याचा सर्वात वाईट परिणाम काय तर जणू रात्रीच्या अंधाराने सूर्यप्रकाशास गिळंकृत करावे तसे चंचल माणसाचा बुद्धिभ्रंश अंतरातील ईश्वरास झाकोळून टाकतो. त्या माणसास श्री गुरुदेव दत्त ह्यांचे तसेच त्यांच्या वचनांचे, शिकवणीचे विस्मरण होते. “

“साहेबराव अरे स्थितप्रज्ञ किंवा निश्चल माणसाचे वागणे अगदी ह्याच्या विरुद्ध असते. तो श्री गुरुवचन अनुसरणारा असतो, पूर्णतः अंतर्मुख होऊन विचार करणारा, वागणारा, बोलणारा असतो. प्रारब्धाने, श्री गुरुकृपेने लाभलेल्या भौतिक सुखाने तो हुरळून जात नाही आणि अडचणीत, दुःखात हतबलही होत नाही. सदैव आत्मानंदाच्या नदीत डुंबत असतो, स्वस्थचित्त, शांत, ज्ञानाने परिपूर्ण असतो. त्यास सुख किंवा दुःख ह्या भावना स्पर्शत नाहीत. ”

“स्थितप्रज्ञ किंवा निश्चल मनाच्या व्यक्तीचे मोठे लक्षण म्हणजे तो अहंकारी नसतो. त्याने अहंकार, अहंभाव, घमेंड श्री गुरुचरणी गुरुसेवामार्गे नियंत्रणात राखलेली असते, हेच कारण म्हणून स्थितप्रज्ञ माणसास सर्व जीवाबद्दल आत्मीयता असते, प्रेम असते, जिव्हाळा असतो. तो सदैव श्री गुरुसेवेची संधी मानून दुसऱ्यांना साह्य करण्यासाठी तयार असतो. तो कोणाचे भले करू शकला नाही, तरी त्याच्या मनात कोणाबद्दलही कधीच वाईट येत नाही, अथवा तो कोणाचे वाईट करू अथवा चिंतू शकत नाही. ‘हे विश्वची माझे घर’ ह्या भावनेने प्रेरित होऊन तो सूर्यप्रकाशासारखा उजळून निघालेला असतो. ह्याचे मूळ कारण श्री गुरुकृपेने लाभलेले ज्ञान, सदाचारी वर्तणूक, सद्वर्तन व संयम ह्या अंगी विकसित केलेल्या सद्गुणांमुळे त्याच्या मनावर त्याने ताबा, नियंत्रण मिळवलेले असते. ”

“साहेबा अशी व्यक्ती म्हणजे देवमाणूसच. ज्यांचे अंतरी श्री गुरुदेव अनुभवावे. अखंड श्री गुरुसेवेत रमणारी व सर्वाना शक्य ती मदत सदैव करणारी. अरे ह्या देवमाणसांना माझ्या मते स्वतः श्री गुरुमाऊलीच घडवतात, जागोजागी भक्त रक्षणार्थ योजतात. आज आईचे उपचार शक्य झाले ते ह्यांचे कृपेनेच. अरे श्री गुरुमाऊली स्वस्वरूपात येऊन नाही तर ह्या देवमाणसांच्या हस्ते आपणास साह्य करीत असतात. अशी व्यक्ती आयुष्यात भेटलीच तर त्या क्षणीच विनम्र नमस्कारावे.

अशा व्यक्तीला कशाचाही व कोणाबद्दल राग, लोभ, मत्सर आणि द्वेष नसतो, अशी व्यक्ती सदैव प्रसन्न चित्त असते. एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यातील पाण्यात ओत, पाणी पाण्यास काय बुडवणार, ते फक्त मिसळते, पूर्वावस्था कायम असते.. तसेच शरीरधर्मानुसार जरी स्थितप्रज्ञ व्यक्तीचा चेहरा उदास, मलूल किंवा शारीरिक मरगळ आपणास जाणवली तरी ह्यांच्या अंतरंगाची प्रफुल्लित अवस्था, मानसिक प्रसन्नता अखंड कायम स्वरूपी असते. ”

“साहेबा एकदा का आपली बुद्धी अंतरंगातील भगवंताचे ठायी केंद्रित झाली की चित्त, अंतःकरण, मन केव्हाही किंचित देखील सैरभैर, अस्थिर, विचलीत होत नाही. खरच ज्यास असे व्हावे असे वाटते त्यासाठी साधा सरळ सोपा मार्ग म्हणजे म्हणजे नित्य श्री गुरुस्मरण, माझे श्री गुरुदेव दत्त निरंतर माझ्यासोबत आहेत, असा भाव मनात दृढ खोलवर रुजवणे. अरे साहेबा हे तितके सोपे पण नाही आणि मनात दृढ निश्चय केल्यास कठीण देखील नाही. मात्र दृढ श्रद्धा, एकाग्रता, निष्ठा, मनाचा निग्रह आवश्यक आहे. अंतरातील श्री गुरुमूर्तीचा अनुभव, आपण ओठी श्री गुरुस्मरण करीत घ्यायचा आहे. तेव्हा कुठे तुझा अंतरात्मा आणि भगवंत श्री गुरुदेव दत्त भिन्न, वेगळे नाहीत अशी श्री गुरुनाम व श्री गुरुरूपाच्या समरसतेची अंतरंगास अनुभूती येते. ”

“स्थितप्रज्ञ माणसाचे मन हे समुद्रासारखे अक्षुब्ध, क्षोभरहित, दु:खरहित असते. अशी माणसे समाजात कितीही, कशीही, कुठेही वावरली, मिसळली तरी त्यांची मानसिक स्थिती स्थिर, त्यांची प्रज्ञा म्हणजे बुद्धी स्थिर असते. कितीही नद्यांचे पाणी येऊन समुद्रात मिसळले तरी समुद्र पातळी स्थिर असते, नद्यांच्या प्रवाहाच्या मिसळण्याने समुद्रास महापूर आला असे ऐकलेले आठवते का कधी तुला साहेबा ? उन्हाळ्यात जरी सर्व नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी समुद्रात मिसळले नाही तरी समुद्र पातळी कायम असते, तो कधी आटत नाही. ”

“ज्याचे उभे आयुष्य श्री गुरुदेव दत्त ह्यांचे कृपेने, शिकवणीने उजळून निघाले आहे, तो सूर्यप्रकाशासमक्ष पणती कशी लावेल आणि पणती लावली नाही म्हणून अंधारात सूर्यप्रकाशास कोंडणे जितके अशक्य तितकेच स्थितप्रज्ञ व्यक्तीची मानसिकता विचलीत होणे केवळ असंभव आहे. स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या समोर सर्व प्रलोभने पुसट ठरतात कारण श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या आत्मज्ञानाने ही व्यक्ती इतकी ऐश्वर्य संपन्न झालेली असते की ह्यांना जगातील कोणतेही इतर ऐश्वर्य कवडीमोल वाटते. सत्यच आहे ज्याचे जवळ श्री गुरुदेव दत्त माउली त्यास कशाची कमतरता जाणवणार. ”

“स्थितप्रज्ञ व्यक्ती आत्मसंधान साधण्यात मग्न असते. अंतरिक परमोच्च सुखाच्या आनंदाने तृप्त असते. श्री गुरुदेव दत्त कृपेने लाभलेल्या अंतर्ज्ञानाने संतुष्ट असते. ज्याचे मनी साक्षात श्री गुरुदेव दत्त अखंड त्याचे सोबत आहेत असा भाव पूर्णतः विकसित झाला आहे अशी स्थितप्रज्ञ व्यक्ती श्री गुरुमाऊली कृपेने परमानंदाने पुष्ट असते, मात्र स्थितप्रज्ञ व्यक्ती कधीच आत्मकेंद्री, स्वार्थी नसते तर त्यांच्या मनात ….

 ॐ सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे सन्तु निरामयाः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु

मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ 

…. हीच सर्वांबाबत सद्भावना.. साह्य करण्याची भावना आरूढ झालेली असते. “

“काय साहेबराव, ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ अवस्था व अशी असते स्थितप्रज्ञ किंवा निश्चल, स्थिर, न डगमगणारी मानसिकता असलेली व्यक्ती. काय उलगडला का काही अर्थ ? चला आता बाईक काढा आणि सोड मला हॉस्पिटलला आईकडे, चल निघूया “.

साहेबरावाच्या चेहरा समाधानी वाटत होता, बऱ्यापैकी अर्थ लागला होता बहुतेक त्याला, जाणवत होते आणि आम्ही हॉस्पिटलच्या दिशेने निघालो.

*******

लेखक : श्री गिरीश ओक

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ अभिजात मराठीपुढील आव्हाने… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ अभिजात मराठीपुढील आव्हाने… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मिरज विद्यार्थी संघातर्फे “जागर मराठीचा २०२४”, सन २०२५ च्या १०० व्या वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने विशेष व्याख्यानमाला झाली. या मध्ये सांगली येथील प्रा अविनाश सप्रे यांचे “अभिजात मराठी पुढील आव्हाने” या विषयावर अतिशय सुरेख व्याख्यान झाले. त्या व्याख्यानाचा मिरजेतील श्री मुकुंद दात्ये यांनी अत्यंत प्रभावी घेतलेला आढावा, आपणापर्यंत पोहोचवल्याशिवाय रहावले नाही.

सरांनी आपल्या सव्वा तासाच्या भाषणात अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? तो कसा मिळतो? याचे सविस्तर विवेचन केले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होते? त्यामुळे काय आव्हाने उभी आहेत हे सांगितले. ते एका प्रकारे आपलेच कठोर परीक्षण होते.

भाषा म्हणजे संस्कृती. पुर्वी इंग्लंडमध्ये लॅटिन भाषा बोलली जात असे. इंग्रजीला गावंढळ भाषा समजली जात असे. अगदी शेक्सपीअरच्या नाटकातही दुय्यम पात्रे इंग्रजीत बोलत असत. पुढे इंग्रजी भाषेवर लेखकांनी व अनेकांनी खूप काम केले व तिला पुढे आणले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने भाषा मोठी होत नाही. ती मोठी असतेच. तिला तसा दर्जा शासनदरबारी दिला जातो. तिच्या मोठेपणावर एक शासकीय मुद्रा लावली जाते एवढेच.

शासनाने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी ती कमीतकमी दोन हजार वर्षे पुरातन असली पाहिजे. ती सतत वापरली जात असली पाहिजे असे काही निकष ठरवले आहेत. अर्थात निकषांची पूर्तता होते की नाही हे अखिल भारतीय पातळीवरची समिती ठरवते. त्या समितीत तीन अमराठी भाषेतील लेखक सदस्य असतात.

दक्षिणेकडील राज्ये भाषेच्या बाबतीत फारच स्वाभिमानी आहेत. संवेदनशील आहेत. कोणत्याही पक्षाचे सरकार असो ते त्यांच्या भाषेबाबत अभिमानीच असतात. त्यामुळे भिजात भाषेच्या दर्जा देण्याचे ठरवल्यानंतर तसा दर्जा मिळविण्याचा पाहिला मान तामिळ भाषेने मिळवला.

त्यानंतर एक दोन वर्षच्या अंतराने तो मान मल्ल्याळम, कन्नड, उडीसी भाषेने मिळवला. त्यांनी अर्ज करायचा. पुरावे द्यायचे आणि दर्जा मिळवायचा असे घडत गेले. त्यासाठी दिल्लीत मोठे राजकीय पाठबळ, प्रश्न पूढे रेटण्याची ताकद असावी लागते. त्याबाबतीत आपले लोक फारच थंड असतात. त्यांना भाषेच्या प्रश्नाचे काहीच पडलेले नसते. ते आपले राजकारण आणि निवडणुका यात गर्क असतात.

यशवंतराव चव्हाण दिल्लीत असताना त्यांचे मराठी भाषा, मराठी लेखक यांच्याकडे लक्ष असे. लेखकांच्या वैयक्तिक कामातही ते मदत करत.

ना. धो. महानोर याचे दिल्लीत काही काम होते. ते त्या ठिकाणी पोचण्याच्या आधीच यशवंतरावांचा संबंधितांना फोन गेला होता. “उद्या तुमच्याकडे मराठीतील मोठे कवी येणार आहेत. त्यांचा योग्य सन्मान करा व त्यांचे काम पहा. ” महानोर ऑफीसात पोचण्यापूर्वी त्यांची ओळख पोचली होती. काम झाले.

इतर राज्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर आपले लोक जागे झाले. सरकारने रंगनाथ पठारे यांस निमंत्रक करून एक समिती तयार केली. समितीने खूप तातडीने शोधकार्य सुरु केले.

शिलालेख, ज्ञानेश्वरी, तुकोबाचें अभंग, लीलाचरित्र वगैरे पुरावे पहिल्या शतकापासून मराठी होती आणि ती सलग वापरात आहे हे दाखवत होते. अहवाल सादर झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास संमती दिली आणि तो केंद्रीय समितीकडे पाठवला.

अनेक वर्षे तो तेथे पडूनच राहिला. दिल्लीत पुढाकार घेऊन अहवाल पुढे रेटण्यास कोणीच काही केले नाही. कोणी ते प्रकरण कोर्टातही नेले. तिथे काही वेळ गेला.

शेवटी अहवाल साहित्य अकॅडमीकडे आला. तेथे मराठी भाषेसाठी भालचंद्र नमाडे होते. अनेकांच्या प्रयत्नास यश आले आणि तेवीस ऑक्टोबर २०२४ ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला.

ज्ञानेश्वरी एकदम आकाशतुन उतरली नाही. त्यापुर्वीही मराठी होतीच. ती महाराष्ट्री प्राकृत अशा स्वरूपात होती.

आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्या निमित्ते काही कोटी रुपये काही काम करण्यासाठी प्राप्त होतील. कामे होतील. पण तेवढ्याने भागणार आहे का हा प्रश्न आहे? प्रत्यक्षात मराठी भाषेसमोर अनेक प्रश्न उभे आहेत.

पालकच वाचन करेनासे झालेत. वाचनालये ओस नसतील पडली पण ओढ कमी झालीये. अनेक कपाटे उघडलीही जात नाहीत. इंग्रजी शाळांच्या प्रेमामुळे तिकडे ओढा वाढत आहेत. इतके इंग्रजी आल्यावर कित्ती मुले इंग्रजीत बोलणारी, पुढे जाणारी दिसली पाहिजेत. तसे काहीच दिसत नाही. मराठी शाळा व वर्ग बंद पडत चाललेत.

या शाळा काही वाईट नाहीत. कवी नामदेव माळी यांनी “शाळा भेट” हे पुस्तक लिहिले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या कित्येक शाळा किती चांगले काम करत आहेत ते दाखवले आहे. तरीही आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालण्यासाठी किती जण तयार होतील.

मराठी भाषा टिकवून, वाढविण्यासाठी ती ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल, पुस्तके मराठीत निघाली पाहिजेत. मातृभाषा मराठीत हे ज्ञान मिळाले तर तीचा फायदा होईल. हे सर्व क्षेत्रात व्हायला हवे. एकोणीसव्या शतकात हे काम मोठया प्रमाणात झाले होते. कोष वाङमय मराठी भाषेत सर्वात जास्त झाले आहे.

अनुवाद हे दुसरे आव्हान भाषेपूढे आहे. मराठीतील उत्तम साहित्य अन्य भाषात जाणे व त्या भाषांतील साहित्य मराठीत येणे आवश्यक असते.

टागोरांची कविता बंगालीतच होती. ती इंग्रजीत गेल्यावर जगाला माहिती झाली. दिलीप चित्रे यांनी तुकाराम “तुका सेज” ना नावाने इंग्रजीत नेला तेव्हा तुकाराम हे केवढे मोठे कवी आहेत, दार्शनिक आहेत हे समजले.

तामिळ, कन्नड, बंगाली या भाषात हे खूप होत असते. कन्नड मधील इंग्रजी शिकवणारे प्राध्यापक हे काम करतात. आपल्याकडील इंग्रजीचे प्राध्यापक, आपण इंग्रजी शिकवतो म्हणजे मोठेच आहोत या भ्रमात वावरतात. त्यांचे इंग्रजी सुद्धा चांगले नसते. गोकाक, मुगली हे इंग्रजीचे प्राध्यापक कन्नड साहित्य इंग्रजीत नेतात. कन्नड आवृत्तीबरोबर इंग्रजी आवृत्ती येते.

भैरप्पा यांचे कन्नड साहित्य उमा कुलकर्णी, वीरूपाक्ष कुलकर्णी यांनी मराठीत आणून मोठेच काम केले आहे. त्यांनी काही मराठी साहित्यही कन्नडमध्ये नेले आहे.

गेली पंचवीस वर्षे पुण्यात भाषांतर करण्याचे काम भाषांतरु आनंदे नावाने करत आहे.

साहित्य अकॅडमी मिळवताना साहित्य इंग्रजीत नसणे हा मोठाच अडसर होतो. कुसुमाग्रजांना ते देण्याच्या वेळेस हीच अडचण आली. काही घाई करून ते काम करावे लागले.

विकीपीडिया हे नवे माध्यम उपलब्ध झाले आहे. त्यात तामिळच्या सोळा हजार नोंदी झाल्या तर मराठीच्या सहाशे. त्या नोंदी करण्याची विशिष्ट पद्धत असते. जयंत नारळीकर यांनी त्यांची सर्व पुस्तके विकीपीडियाला दिलीत. ती वाचनासाठी मोफत उपलब्ध आहेत. पु. लं. ची काही पुस्तकं आहेत.

इकडे अभिजात राजभाषा म्हणून कौतुक करायचे आणि व्यवहारात तीला वापरायचेच नाही, तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा दुटप्पीपणा. दर साहित्य संमेलनात “मराठी भाषा जगेल का?” या विषयावर परिसंवाद घ्यायचे आणि करायचे काहीच नाही हे दुर्देव आहे.

राजकारण्यांनी भाषणांत मराठी भाषेला अत्यंत खालच्या स्तरावर नेली.

पुस्तकाचे रुप बदलेल, पण पुस्तक संपणार नाही या विषयावर “धिस ईझ नॉट द एन्ड ऑफ द बुक” असे पुस्तक लिहिले आहे. वेळ आहे काही विचार करण्याची आणि भाषेसाठी कृती करण्याची..

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बालकांच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉक्टर ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“बालकांच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉक्टर ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती अकरा वर्षांची असताना तिची आई क्षयरोगाने दगावली… आणि तिलाही किंचित क्षय देऊन गेली. त्यामुळे तिचे ते दिवस आजारपणातच गेले. सततच्या खोकल्यामुळे तिच्या श्रवणशक्तीवर खूप विपरीत परिणाम झाला. नीट ऐकता न आल्यामुळे तिला वाचनही करता यायचे नाही… अक्षर-अक्षर जुळवून तयार होणारा एखादा शब्द तिचा मेंदू लवकर स्वीकारायचा नाही… आणि शिक्षणात तर हा सर्वांत मोठा अडथळा ठरला. पण हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ असलेल्या तिच्या वडिलांनी तिला प्रचंड आत्मविश्वास दिला. प्रश्न अभ्यासाचा होता. मग तिने अभ्यासाच्या निरनिराळ्या युक्त्या शोधल्या, एकदा लिहिलेले तीन तीनदा तपासून पाहिले आणि माध्यमिक शिक्षणाचा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला… महाविद्यालयात ती उत्तम टेनिसपटू म्हणून प्रसिद्ध झाली होतीच. पण तिला डॉक्टरच व्हायचे होते! कारण तिचे आजोबा डॉक्टर होते आणि त्यांना जीवशास्त्र विषयात खूप रस होता. त्यांचीच प्रेरणा या मुलीने घेतली असावी.

आणि त्यावेळी महिलांना वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणून प्रवेश मिळणे दुरापास्त होते. महिला परिचारिका उत्तम करू शकतात… मुलांना वाढवू शकतात पण मग डॉक्टर का नाही होऊ शकत? हा विचार त्यावेळी फारसा केला जात नव्हता. हार्वर्ड विद्यापीठाने तिला वैद्यकीय शिक्षणाच्या तासांना बसायची परवानगी तर दिली मात्र डॉक्टर ही पदवी देण्यास असमर्थतता दाखवली… म्हणून ती बाल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात गेली. हे विद्यापीठ मात्र महिलांना वैद्यकीय शिक्षण देण्याच्या बाजूने होते. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हेलेन तौसिग झाल्या … डॉक्टर हेलेन ब्रुक तौसिग. जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात निवासी वैद्यक अधिकारी होण्याची त्यांची संधी मात्र अगदी थोडक्यात हुकली. हृदयरोग विभागात एक वर्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांची पावलं बालरोग विभागाकडे वळाली…. आणि त्यांचे लक्ष बालकांच्या हृदयाकडे गेले !

बालकांच्या हृदयरोगावर उपचार करणा-या डॉक्टर एडवर्ड पार्क यांच्या क्लिनिकमध्ये त्या स्वयंस्फूर्तीने म्हणून काम करू लागल्या…. ही एका इतिहासाची पहिली पाऊलखूण होती. पुढे या क्लिनिकचा संपूर्ण ताबाच त्यांच्याकडे आला. त्यावेळी बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया ही कल्पनाच पुढे आलेली नव्हती. बालके हृदयरोगाने दगावत…. जगभरात अशी हजारो बालके आयुष्य पाहण्याआधीच जगाचा निरोप घेत होती… त्यांच्या जन्मदात्यांना दु:खाच्या खाईत लोटून निघून जात होती. ह्या कोवळ्या कळ्या अशा झाडावरच सुकून गळून पडताना पाहून डॉक्टर हेलन यांचे कोमल काळीज विदीर्ण होई.

स्टेथोस्कोप हे उपकरण म्हणजे डॉक्टर मंडळींचा कान. पण डॉक्टर हेलन यांचे कानच काम करीत नसल्याने स्टेथोस्कोप निरुपयोगी होता… मग त्यांनी बालकांच्या हृदयाची स्पंदने तळहाताने टिपण्याचा अभ्यास केला ! त्यांचा हात बालकाच्या काळजावर ठेवला गेला की त्यांना केवळ स्पर्शावरून, त्या स्पंदनामधून त्या हृदयाचे शल्य समजू लागले. फ्ल्रूरोस्कोप नावाचे नवीन क्ष-किरण तंत्रज्ञान त्यांच्या मदतीला आले. कित्येक लहानग्यांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करून त्यांनी हृदयरोगाची कारणे शोधण्याचा अथक प्रयास आरंभला. हा साधारण १९४० चा सुमार होता… हृदयक्रिया बंद पडून बालके मृत होत आणि त्यावर काहीही उपाय दृष्टीपथात नव्हता. पण डॉक्टर हेलन यांचा अभ्यास मात्र अव्याहतपणे सुरूच होता. सायनोसीस नावाची एक वैद्यकीय शारीरिक स्थिती बालकांचे प्राणहरण करते आहे हे डॉक्टर हेलन यांना आढळले. एका विशिष्ट वैद्यकीय स्थितीत असलेल्या बालकांच्या फुप्फुसांना प्राणवायूयुक्त रक्त पुरेसे पोहोचत नाही हे त्यांनी ताडले. ह्रदयाकडे जाणारी एक रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडली तर हा पुरवठा वाढू शकेल, असा तर्क त्यांनी लावला…. आणि तो पुढे अचूक निघाला !

ही युक्ती मनात आणि कागदावर ठीक होती, पण प्रत्यक्षात उतरवणे खूप कठीण होते. याच काळात जॉन्स हाफकिन्स मध्ये प्रसिद्ध सर्जन डॉक्टर आल्फ्रेड ब्लालॉक, त्यांचे प्रयोगशाळा सहाय्यक विवियन Thomos यांच्यासह संशोधन विभागात रुजू झाले होते. डॉक्टर हेलन यांनी आपली ही कल्पना त्यांना ऐकवली आणि ते कामाला लागले… विशेषत: विवियन यांनी ही कल्पना चांगलीच उचलून धरली ! आता तीन देवदूत बालकांच्या जीवनाची दोरी बळकट करण्याच्या उद्योगाला लागले. पण या कामात त्यांना मानवाच्या सर्वाधिक निष्ठावान मित्राची, श्वानाची मदत घ्यावी लागली… कित्येक श्वानांना या प्रयोगात जीव गमवावा लागला… आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे !

मानवाच्या हृदयात ज्या प्रकारे हृदयदोष निर्माण होतो, त्याचसारखा दोष कुत्र्याच्या हृदयात निर्माण करणे, आणि तो दुरुस्त करणे हे मोठे आव्हान होते.. ते विवियन यांनी पेलले.

दरम्यानच्या काळात डॉक्टर हेलन यांनी बालकांना हा हृदयरोग होण्यामागचे एक महत्त्वाचे कारण शोधून काढले. त्यावेळी अमेरिकेत प्रसूतीपूर्व आजारावर Thalidomide हे औषध अगदी सर्रास दिले जाई. अत्यंत किचकट संख्यात्मक माहिती गोळा करून डॉक्टर हेलन यांनी हे औषध घेण्यातले धोके जगाला समजावले… आणि Thalidomide चा वापर टाळला जाऊ लागला… आणि त्यातून मातांच्या पोटातील बालकांना होणारा ‘ब्लू बेबी’ नावाने प्रसिद्ध असणारा आजार होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. निम्मी लढाई तर इथेच जिंकल्या डॉक्टर हेलन.

९ नोव्हेंबर, १९४४ रोजी पंधरा महिन्यांच्या एका बालिकेवर ब्लू बेबी विकार बरा करण्यासाठीची पहिली शस्त्रक्रिया झाली. यासाठी शोधल्या गेलेल्या प्रक्रियेला ‘ Blalock-Taussig-Thomos shunt ‘ असे नाव दिले जाऊन या तीनही जीवनदात्यांचा उचित सन्मान केला गेला.

डॉक्टर हेलन ब्रुक Taussig यांना पुढे विविध सन्मान प्राप्त झाले.. पण सर्वांत मोठा सन्मान आणि आशीर्वाद त्यांना जीव बचावलेल्या बालकांच्या पालकांनी दिला असावा, यात काही शंका नाही. त्यांना वैद्यकीय जगत “Mother of pediatric cardiology” म्हणून ओळखते.

याच डॉक्टर हेलन यांनी भारताला एक वैद्यकीय देणगी दिली…. भारताच्या पहिल्या महिला हृदयशल्य विशारद पद्मविभूषण डॉक्टर शिवरामकृष्णा पदमावती यांनी डॉक्टर हेलन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले आणि भारतात अतिशय मोठे काम उभारले.. १०३ वर्षांचे कर्तव्यपरायण आयुष्य जगून डॉक्टर पदमावती कोविड काळात स्वर्गवासी झाल्या !

या दोन महान आत्म्यांना परमेश्वराने सदगती दिली असेलच.. आपण त्यांच्या ऋणात राहूयात…..

(माझ्या अल्पबुद्धीला अनुसरून या वैद्यकीय विषयावर लिहिले आहे. तांत्रिक शब्द, नावांचे उच्चार चुकण्याची शक्यता आहे आणि याबद्दल आधीच दिलगीर आहे. तज्ज्ञ मंडळींनी जरूर आणखी लिहावे आणि या महान आत्म्यांना प्रकाशात आणावे. संबंधित माहिती मी इंटरनेटवर वाचली (परवानगी न घेता केवळ सामान्य वाचकांसाठी भाषांतरीत केली. कारण मराठीत असे लेखन कमी दिसते) आणि जमेल तशी मांडली.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ कलीयुगातील राम – सीता… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ कलीयुगातील राम – सीता… माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मालेगांव जवळच्या “गिल पंजाब हॉटेल” चे मालक लकी आबा गिल यांना आज रस्त्याच्या कडेने एक वयस्कर जोडपं पायी जातांना दिसलं. भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं त्यांनी सहजच जेवणाचं विचारलं. तर ते नको म्हणाले. म्हणून त्यांना 100 रुपये देऊ केले तर ते सुद्धा नको म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय? त्यानंतर सुरू झाला त्यांचा जीवनपट – ते 2200 km चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही. मग माझ्या आईने डॉक्टर ला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूर ला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय, मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करायला येते म्हणून निघाली. ते 25 % हिन्दी 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे त्यांचे‌ शिक्षण विचारलं तर उत्तर ऐकून सुन्न झालो. त्यांनी लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र विषयात पीएचडी केलीय तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पीएचडी केलीय. (एवढ शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्वाचा लवलेशही नव्हता. (नाहीतर आपल्या कडे 10वी नापास सुद्धा छाती ताणून हिंडतो) एवढच नाही तर व सी. रंगराजन (गव्हर्नर) यांचे बरोबर, तसेच कल्पना चावला ह्यांच्या बरोबर काम व मैत्रीचे संबंध होते. त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांसाठी काम करणाऱ्या ट्रस्ट ला देऊन टाकतात. सध्या ते सोशल मेडियापासून लांब राहतात. रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं नाही. एखाद जोडपं हे आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होतं. आणि आपल्या पती सोबत कोणी सीता सुद्धा होतं म्हणूनच आज भेटलेली माणसे ही कलीयुगातील राम सीता च समजतो.

आम्ही जवळ जवळ 1तास गप्पा मारल्या रस्त्यात उभे राहूनंच. इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला. आणि वाटलं की आपण उगाचंच खोट्या फुशारकी‌ वर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून ३ महिने झाले आणि अजून घरी पोहचायला १ महिना लागेल.

त्यांचे नाव डॉ. देव उपाध्याय आणि डॉ. सरोज उपाध्याय

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – २… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सगळे आनंदाचे प्रेक्षणीय क्षण अनुभवत मुख्य पुस्तक दालनात प्रवेश केला. आणि कुठे जाऊ हा प्रश्नच पडला. कारण समोर फारच मोठे पुस्तकांचे मायाजाल होते. लगेच लक्षात आले, हे एक दिवसाचे काम नव्हे. एकदा माणूस आत शिरला की किमान ४/५ तास हरवून जाईल. इतकी मोठी तीन दालने त्यात सातशे स्टॉल्स. एका फेरीत एक दालनही नीट बघून होणार नाही याचा अंदाज आला. शेवटी एक बाजू ठरवून आत शिरले. पहिलेच स्वागत  जुन्या जिव्हाळ्याच्या  पुणे मराठी ग्रंथालय याच्या स्टॉल वर झाले. तिथे उपस्थित जाणत्या मंडळींनी लगेच नावानिशी ओळखले. आणि “अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे यांच्या पुस्तक परीक्षणाचे पारितोषिक मिळालेल्या तुम्हीच ना?” असे स्वागत झाले. मग त्यांच्या समवेत छायाचित्रे काढली गेली. थोड्या गप्पा अर्थातच पुस्तकांच्या विषयी झाल्या. आणि पुढचे स्टॉल खुणावत असलेले दिसले. प्रत्येक स्टॉल व तेथील पुस्तके आपल्याला खुणावत असलेले दिसत होते.

प्रत्येक स्टॉलवर व्यवस्थित स्वागत व आवश्यक ती माहिती सांगणे होत होते.  विशेष म्हणजे स्टॉल वर ३/४ खुर्च्या तर काही ठिकाणी टेबल पण दिसले. आणि त्यावर बसून मंडळी पुस्तक उघडून बघण्याचा आनंद घेत असलेली दिसली. स्टॉल मध्ये गेल्यावर त्या पुस्तकांना हातात घेताना फार समाधान व आनंद होत होता. ऑनलाईन पुस्तके मगवताना या आनंदाला पारखे झालो आहोत याची खंत वाटली. 

सर्वात कौतुक वाटले  ते पाठ्यपुस्तकांच्या स्टॉल वर. सर्व इयत्तांची पुस्तके एकाच छताखाली दिसली. व  आपण शिकवलेली सगळीच पुस्तके बघायला मिळाली. आपल्या संविधानाची मूळ प्रत एका स्वतंत्र दालनात दिसली. त्याच्या वरील स्वाक्षरी असलेल्या पानाचा फोटो काढता येत होता. आणि ग्रुप फोटो सुद्धा काढता येत होता. त्याच्या जवळच

शिवरायांचा सिंहासनावर बसलेला तर कट आऊट इतका सुंदर, की प्रत्यक्ष शिवराय या महोत्सवाचे साक्षीदार आहेत असेच वाटत होते. सर्व वाचलेला  शिवइतिहास आठवला. त्या भारावलेल्या इतिहासाची मनात उजळणी होत असतानाच समोर दिसला पु. ल. यांचा हसरा पुतळा. जणू तेही कोण काय वाचत आहे,काय चाळत आहे? हे आपल्या दृष्टीतून बघत असावेत. आणि सगळे बघून काही मिश्किल लिहिणार असे दृष्य डोळ्या समोर येत होते. ते विचार मनात घोळतच होते तोच समोर साक्षात हातात शिवपिंड घेतलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा दिसला आणि नतमस्तक झाले! आश्चर्य म्हणजे तेथे असलेली मंडळी मोठ्या नम्रतेने “चप्पल बाहेर काढून आत या”, असे सांगत होते. तेथे आत प्रविष्ट झाल्यावर त्यांचे चरित्र चित्ररूपाने लावलेले दिसले. खूप छान वाटले. मात्र तेथे त्यांच्या विषयीची पुस्तके  उपलब्ध नव्हती. म्हणून थोडी निराशाच झाली. 

लगेच समोरच हॅपी थॉटस हे दालन दिसले. मग काय सरश्री यांची सगळी पुस्तके एकाच ठिकाणी बघून फारच हरखून गेले. तेथील मंडळी खूप छान माहिती देत होती. पुस्तके शोधायला मदत करत होती. आणि तिथेच टेबल,खुर्ची याची व्यवस्था असल्याने चर्चाही करता येत होती.

किती विविध साहित्य! विविध भाषेतील साहित्य! ज्याला ज्याची आवड तो ते पुस्तक घेऊन बघत होता.

मुलांच्या साठी स्वतंत्र दालने, विविध रंगीबेरंगी पुस्तके, चित्र साहित्य! शालेय सहली बरोबर आलेल्या मुलांच्या हातात चांदोबा,किशोर, या बरोबरच शामची आई, स्वामी, छावा अशी पुस्तके दिसत होती. किती सुंदर दृश्य!! 

मी तर वय विसरून तेच बघत बसले. 

स्टॉलच्या शेवटी एक सुंदर स्टेज व खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर समजले तिथे  लेखक आपल्या भेटीला येत होते. त्यांच्याशी बोलता येत होते. 

गर्दी तर होती. पण त्याला एक शिस्त होती. सगळे जणू एका आनंद सोहळ्याला उपस्थित असावे असे वाटत होते. बंदोबस्त खूप होता. पण त्यातील महिला पोलिस आपल्या बाळांना घेऊन पुस्तक खरेदी करताना दिसत होत्या. खूप कौतुक वाटले त्यांचे!

विविध शाळांची मुले व शिक्षक दिसत होते. कॉलेज मधील तरुणाई दिसत होती. अक्षरशः आबाल वृद्ध दिसत होते. कॉलेज युवती सिनियर असणाऱ्यांना मदत करताना दिसत होत्या. इतके फिरून पाय बोलायला लागले होते. पण एका कॉलेज युवतीने बसायला लगेच स्वतःची खुर्ची दिली आणि मला अचंबित केले. बहुतेक वातावरणाचा परिणाम असावा. एकंदर सर्व वातावरण संस्कारी, सकारात्मक दिसत होते.

यात गंमत म्हणजे व्यसनी लोक जसे एका ठिकाणी सापडतात तसे पुस्तक वाचनाचे व्यसन असणारे पण सापडले आणि आपली इथे भेट होणारच! अशी वाक्ये पण झाली. पुस्तकांवर चर्चाही झाली. 

एकूणच  पुस्तक महोत्सव हा एक सोहळाच झाला होता. वाचन संस्कृती लोप पावत आहे, याला उत्तर मिळाले आहे असे मनात आले. या सगळ्यात बाल चित्रपट मात्र बघता आला नाही. आणि बाहेरूनच त्याचा फलक बघावा लागला.

बरेच दिवस मनात रेंगाळणारी पुस्तके हाताळून खरेदी करता आली याचा खूप आनंद व समाधान मनात घेऊन परतले. 

अशा महोत्सवाची कल्पना मांडणारे व ती साकार करणारे सर्वांना शतशः धन्यवाद ! आणि हा असा महोत्सव दर वर्षी अनुभवायला मिळावा ही मनापासूनची इच्छा! 

समाप्त

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “लोकनायक टंट्या भिल्ल..☆ सुश्री शोभा जोशी ☆

‘राष्ट्रास्तव जे झिजले कण कण, तेच खरोखर यशस्वी जीवन ‘

असे यशस्वी जीवन जगलेले अनेक क्रांतीकारक आपल्या भारत देशात होऊन गेले हे आपण जाणतो. मातृभूमीला मुघल आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करण्यासाठी प्राणाचे बलिदान देणारे अनेक शूर वीर आपल्या देशात होऊन गेले त्यात जनजातीतील लोकही अग्रेसर होते. असेच जनजातीतील एक क्रांतीकारक टंट्या भिल्ल.

टंट्या भिल्लांचा जन्म १८४२ साली मध्यप्रदेशातील बदादा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊसिंह होते. भिल्लांना स्वसंरक्षणासाठी लहानपणापासूनच भालाफेक आणि धनुष्यबाण चालवण्याचे शिक्षण मिळे. या युध्द कलांमध्ये टंट्या तरबेज होते.

सामान्य लोकांवर ब्रिटिश करत असलेले अत्याचार पाहून टंट्यांच्या मनामध्ये आगडोंब उसळे. त्यांनी गावा गावात जाऊन जनजाती युवकांची एक सेना तयार केली. ही सेना जनतेला लुटणार्‍या सावकारांच्या आणि जमीनदारांच्या विरूध्द लढत होती. टंट्या या लोकांची संपत्ती लुटत आणि गोर गरीबांमध्ये वाटून टाकत. कोणाच्याही संकट काळात ते त्यांच्या मदतीला धाऊन जात. लोकांच्या सुख दुःखात समरस झाल्यामुळे त्यांच्याविषयी लोकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आणि ते जनतेत मामा म्हणून संबोधले जाऊ लागले.

जमीनदार आणि सावकार हे इंग्रजांचे हस्तक असल्याने टंट्या मामांनी इंग्रजांविरूध्द संघर्षास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडून खांडवाच्या तुरूंगात डांबले. पण तुरूंगात बंदिवासात राहाणे त्यांना सहन होत नव्हते. त्यांनी तुरूंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले. ५ सप्टेंबर १८५७ ला त्यांची आणि तात्या टोपेंची भेट झाली. त्यांनी तात्या टोपेंकडून गनिमी काव्याने लढण्याचे शिक्षण घेतले आणि त्यांनी इंग्रजांशी गनिमी काव्याने लढण्यास सुरूवात केली. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जग जंग पछाडले पण ते इंग्रजांच्या हाती लागेनात.

टंट्या मामांचा एक विशेष म्हणजे त्यांना उलटे चालण्याची कला अवगत होती. जेव्हा जेव्हा इंग्रज सेना त्यांना पकडण्यासाठी येई तेव्हा तेव्हा ते उलटे चालत जात. त्यांच्या पाऊल खुणांमुळे इंग्रजांची दिशाभूल होई. इंग्रज सैन्य बरोबर विरूध्द दिशेला त्यांचा शोध घेई आणि टंट्या मामा निसटून जात. निमाड, बेतुल, होशींगाबाद या भागात त्यांचा जबरदस्त दरारा होता.

११ वर्षं त्यांनी ब्रिटिश सत्तेशी झुंज देऊन त्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी १०, ५०० रू. रोख आणि पंचवीसशे एकर जमीनीचे बक्षिस जाहीर केले. ‘टंट्या पोलिस ‘नावाचे स्वतंत्र पोलिस दल निर्माण केले. गावा गावात पोलिस चौक्या वसवल्या, जमीनदार आणि सावकारांना मोफत शस्रे दिली. तरी हा वीर ११ वर्षं पोलिसांच्या हातावर तुरी देऊनडोंगर दर्‍यात तळपत होता.

शेवटी इंग्रजांनी षडयंत्र रचून त्यांना पकडले आणि इंदौरला आणले. तिथून त्यांना जबलपूर जेलमध्ये आणले गेले. शेवटी ४ डिसेंबर १८८९ ला त्यांना फाशी दिली. निर्घृणपणे त्यांचे शव पाताल पानी जवळ रेल्वे रूळांवर फेकून दिले. आजही तिथे त्यांचे स्मारक आहे.

आपली वीरता, अदम्य साहस आणि इंग्रजांविरूध्द बुलंद आवाज उठवणारे टंट्या भिल्ल जनजातींचे लोकनायक बनले. त्यांना जनजातींचे राॅबिनहूड म्हणूनही संबोधले जाते.

अशा या शूरवीर साहसी जननायकाच्या ४ डिसेंबर या बलिदान दिनी, जनजाती कल्याण आश्रमातर्फे त्यांना विनम्र श्रध्दांजली.

©  सुश्री शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈

आजि पुस्तकाचा दिनु…. भाग – १ … ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

 दिनांक १४ ते २२ डिसेंबर २०२४.

ठिकाण – फर्ग्युसन महाविद्यालय.

विशेष काय? तर पुस्तक सोहळा! 

पुण्यात कायमच काही ना काही विशेष ज्ञान, सांस्कृतिक, कला, नाट्य, संगीत याची विविध प्रकारची रेलचेल चालू असते. आम्हा पुणेकरांना आता कोठे जावे ? असा प्रश्न नेहेमीच पडतो.

एकाच वेळी बालरंगभूमी संमेलन, भीमथडी जत्रा, शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन, सवाई गंधर्व आणि विविध नाट्य गृहातील कार्यक्रम. सगळे एकाच वेळी. असे वाटले गोष्टीत जशी जादू घडते तसे पटापट एका ठीकाणहून दुसरीकडे जाता यायला हवे.

पण वाचन वेड असल्याने पुस्तक महोत्सव पाहूया असे ठरले. एक दिवस जाऊ असे वाटले होते. पण तिथे गेल्यावर लक्षात आले, एकदाच जाऊन जमणार नव्हते. इतका खजिना आहे तर किमान २/३ वेळा तरी जावेच लागेल. आणि याची आठवण आकाशवाणी सतत करून देत होती. मुख्य आकर्षणे अशी होती, १) पुस्तक व लेखकांशी भेट २) खाद्य जत्रा ३) बाल चित्रपट महोत्सव आणि माझ्या दृष्टीने पुन्हा ज्ञान खजिन्याचा आनंद घेणे या निमित्ताने पुन्हा कॉलेजच्या आवारात जायला मिळणार होते.

जाहिराती प्रसिद्ध व्हायला लागल्या पासूनच मामाच्या गावाला जाऊया! या धर्तीवर

पुस्तकांच्या गावा जाऊया..

पुस्तक महोत्सव पाहूया…

असेच मन घोकत होते. आणि त्या पर्वणीची आतुरतेने वाट बघत होते. आणि त्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. पुस्तकांचे दालन ( मोठे व त्यात छोटी छोटी दालने ) सर्वांसाठी खुले झाले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिथे मैत्रिणीसोबत पोहोचले. चौका चौकात मोठमोठे फ्लेक्स लागले होते. त्या रस्त्याने जाताना मागच्या वर्षीचा पुस्तक महोत्सव व तेथील अनुभव आठवत होते. त्या आठवणी व गप्पा करतच तिथे पोहोचलो. आणि ते भव्य प्रवेशद्वार दिसले. त्या दारातच इतकी गर्दी दिसली की मन धास्तावलेच! प्रवेश दारातच किमान ३/४ शाळांची मुले ओळीने बाहेर येताना दिसली. प्रत्येकाच्या हातात एक पुस्तक आणि चेहेऱ्यावर नवल मिश्रित आनंद उतू जात होता. त्यांचे ते आनंदी चेहरे बघूनच मन प्रफुल्लित झाले. मग मीही थोडा वेळ त्यांचा आनंद बघत राहिले. नंतर आत प्रवेश केला. आत प्रवेश करताना अलिबाबाच्या गुहेत प्रवेश करताना खुल जा सिम सिम म्हणून ते दार उघडल्यावर त्या अलीला वाटला असेल तसाच उत्सुकता मिश्रित आनंद वाटला. आत प्रवेश करताच एका झाडाला लटकलेली पुस्तके अर्थात प्रतिकृती दिसल्या. आणि भावना, विचार यांच्या बीजाला आलेली फळेच दिसली. ते बघून फारच छान वाटले. असे वाटत होते उड्या मारुन ती पुस्तकरूपी फळे घेऊन बघावित. पण मग लक्षात आले की पुढे तर हिरे, रत्ने, माणके, सोने यासम आणि न बघितलेली अनमोल रत्ने नुसतीच दिसणार नाहीत तर हाताळायला मिळणार आहेत. मग जास्त उशीर करायला नको म्हणून इकडे तिकडे बघायचे नाही असे ठरवले. पण आमचे बालमन तिथली एकूणच सजावट बघून कुठले ऐकायला. मग रमले तिथे. तिथे इतक्या सुंदर संदेश देणाऱ्या शिल्पाकृती उभारल्या होत्या की ते संदेश स्वीकारल्या शिवाय पुढे कसे जाणार? शिवाय सेल्फी काढण्याचा मोह होताच. प्रत्येक आकृती वेगळा संदेश देत होती. प्रथम दिसले एक गोंडस बाळ, जे पुस्तकांच्या ढिगाऱ्यावर बसून चेहेऱ्यावर आश्चर्य घेऊन जगाकडे बघत होते. जणू आपल्याला सांगत होते, या पुस्तक रुपी ज्ञानातून इतके ज्ञान मिळते की सर्व जगावर राज्य करु शकता. आणि प्रगतीच्या उंच जागी जाऊ शकता. तो बघे पर्यंत तिथे फोटो घेणाऱ्यांची गर्दी झाली. पुढे तर पुस्तक वाचताना गुंग असणारा माणूस असा पुतळा दिसला. त्याच्या हातातील पुस्तकावर व अंगावर अक्षरेच अक्षरे होती. मग आम्हीही त्याच्या समोर फोटो घेतला.

थोडे पुढे आल्यावर दिसले एका ठिकाणी एका शाळेचे विद्यार्थी व त्यांचे सर उभे आहेत. मग मीही त्यात सामील झाले. त्यांच्या समोर एक आकृती होती. त्यात उघडून ठेवलेले भव्य पुस्तक होते. व त्यातून एक अळी सारखा प्राणी बाहेर पडत होता आणि त्याचे तोंड मात्र भव्य ड्रॅगन प्रमाणे होते. जणू ज्ञान घेतल्यावर आपण कसे मोठे होऊ शकतो हेच दर्शवित होते.

त्यानंतर एक पुतळा असा दिसला की मी तर बघतच राहिले. त्या पुतळ्याच्या डोक्याच्या ठिकाणी पुस्तक होते आणि डोके त्याच्या हातात होते. आणि तो ते पुस्तक एकाग्रतेने वाचत होता. यातून माझ्या मनात बरेच अर्थ आले. असे वाटले आपले तन मन, मस्तिष्क एकाग्र करून सगळे विसरून पुस्तक वाचावे असा संदेश देत आहे. एकदा वाटले डोक्याच्या ठिकाणी पुस्तक ठेवून प्रथम स्वतःला वाचा आणि स्वतःचे परीक्षण करा असा संदेश देत आहे. त्या मार्गावर जागोजागी छोटे मांडव होते. त्यातूनच प्रवेश करावा लागत होता. त्या मांडवाच्या छताला पुस्तकांच्या प्रतिकृती खूप आकर्षक रीतीने टांगल्या होत्या. एका ठिकाणी तर त्यांचा आकार मराठी व इंग्रजी अक्षरांचा होता. आणि दोन्ही बाजूला महोत्सवात काय बघू शकाल याची चित्रे होती. याच मार्गावर जागोजागी पुस्तकांच्या विविध रंगाच्या, विविध आकाराच्या शिल्पाकृती दिसत होत्या. आणि बसायला पुस्तक दुमडल्यावर जसे दिसेल तशा आकाराचे अक्षरे असलेले बेंच होते.

सगळीकडे असलेले पुतळे मात्र मोठे आकर्षक आणि संदेश देणारे होते. एका ठिकाणी एका बेंचवर गावातील माणसाची पुस्तक वाचनात गुंग असलेली आकृती होती.

तेथून पुढे गेल्यावर एका मार्गावर प्रवेश केला. आणि डाव्या बाजूला दिसली खाद्य जत्रा. खूप विशेष वाटले. तिथे एक मॅडम विद्यार्थ्यांना सांगत होत्या, ज्यांना काही खायचे असेल त्यांनी खाऊन घ्या. त्यांची सूचना जरा विचित्र वाटली पण विचार केल्यावर योग्य वाटली. एकदा पुस्तके बघायला लागलो की पुन्हा भूक लागली म्हणून बाहेर यायला नको. आम्ही मात्र थेट मुख्य प्रवेश दारातच प्रवेश केला. त्या लाल कार्पेट वरून चालताना आपण वाचकही विशेष आहोत असेच वाटत होते. आत प्रवेश करताच भव्यता लक्ष वेधून घेत होती. डाव्या बाजूला सुंदर स्टेज व समोर ठेवलेल्या खुर्च्या दिसल्या. चौकशी केल्यावर त्या ठिकाणी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे समजले. पण या वेळी तिथे काही मुले चित्रे काढताना दिसली. आणि त्यांच्या शिक्षिका त्यांना सूचना देत होत्या. उजवीकडे उत्कृष्ट सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी आपले मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांचे कट आऊट ठेवले होते. त्यांच्या हातात समृध्द भारताचे पंचप्राण लिहिलेले प्रमाणपत्र होते. आणि ते आपल्याला देत आहेत असा फोटो काढण्याची व्यवस्था होती. तेथे आलेले सर्वच त्या ठिकाणी फोटो काढत होते. आणि त्याच्या बाजूलाच प्रत्येक मुलाला पुस्तक दिले जात होते. आता प्रत्यक्ष पुस्तकांच्या गुहेत प्रवेश करायचा होता. गर्दीचा अंदाज बाहेरच आला होता. त्यामुळे आतही गर्दी असणार हे गृहीत धरूनच आत प्रवेश केला.

– भाग पहिला 

©  सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares